TDM एका पिढीचा ऐतिहासिक दस्तऐवज !!!
दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांनी दिग्दर्शित केलेला TDM हा चित्रपट नुकताचं पाहिला. भूतकाळातील स्मृतींना पडद्यावर चित्रित करणे अतिशय कठीण असते. काळाचे चक्र मागे फिरवून इ.स.1995 च्या जगण्याला चित्रपटातून मांडणे अतिशय आव्हानात्मक होते. भाऊराव कऱ्हाडे यांनी हाच विषय अतिशय ताकदीने चित्रपटातून मांडला आहे. इ.स. 1990 नंतर जागतिकीकरणाचे पर्व सुरू झाले. खाजगीकरण ,उदारीकरण , भांडवलीकरण हे शब्द व व्यवस्था नव्याने उदयाला आल्या. या नव्या व्यवस्था जन्माला येत असताना जुनं काहीतरी झपाट्याने मोडलं गेले. हे मोडलेलं बालपण ,तरूणपण ,कुटुंबातील नाती ,सांस्कृतिक भावविश्व ,प्रेमाचे बदललेले स्वरूप एका पिढीच्या डोळ्यादेखत संपत गेले. 1990 नंतरची पिढी या बदलांना परिवर्तनाला अनुभवत होती. परंतु आपल्यासोबत नेमकं घडलं काय ? हे टिपण्याची ,लिहिण्याची , मांडण्याची शक्ती नसलेल्या माणसांना या मागच्या काळात घेऊन जाणारा हा चित्रपट आहे.
जागतिकीकरणा आधीचा ग्रामीण महाराष्ट्र आणि नंतरचा महाराष्ट्र यात खूप अंतर आहे. जागतिकीकरणाने काही समस्या निर्माण केल्या. तसेच यातून काही संधीही जन्माला आल्या. अर्थव्यवस्थेचे स्वरूप बदलल्यामुळे सर्वसामान्य माणसाला नवे स्वप्न ,नव्या आशा खुणवू लागल्या. या नव स्वप्नांच्या पूर्तीसाठी या पिढीला मोठ्या प्रमाणात संघर्ष करावा लागला. या पिढीचा प्रतिनिधी असलेला बाबू थोरात या नायकाची भावनिक संघर्षमय जीवन कहाणी TDM मध्ये मांडली जाते.1995 या वर्षात घडणार हा चित्रपट आपल्याला मागच्या काळात घेऊन जातो.भूतकाळातील समाजकारण ,राजकारण ,अर्थकारण ,कला,संस्कृती ,चित्रपट,धार्मिकता ,जातीयता ,भावनिकता या चित्रपटातून उभी करण्यासाठी खूप परिश्रम कष्ट घेतले आहेत. TDM मध्ये भाऊराव कऱ्हाडे यांनी अतिशय मेहनतीने , कष्टाने ,अभ्यासपूर्ण पद्धतीने हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे.
अतिशय सरळ पद्धतीने या चित्रपटाचे कथानक साकार होते. ही कथा केवळ नायक असलेल्या बाबूची नाही. तर ही कथा अख्या एका पिढीची आहे. जी पिढी केवळ भूतकाळातील स्मृतींना हळवेपणाने जपते. काहीतरी अनमोल हरवून गेल्याची खंत ही पिढी बोलून दाखवते. आपल्या वाट्याला आलेला भोग नेमका काय होता ? या भोगाची तरल भावस्पर्शी कथा TDMमधून मांडली जाते. गरीब शेतकरी कुटुंबातील बाबू थोरातच्या वाटेला आलेले जीवन चित्रपटातून उभे राहते.शेतीमातीला माता समजणारी बाबूच्या आई-वडिलांची पिढी आणि शेती विकून काहीतरी नवा करण्याचे धाडस करणारी तरुण पिढी. या दोन पिढ्यांमध्ये संघर्ष उभा राहतो. जुन्या पिढीला बदल ,घडलेले परिवर्तन अवाक करून जाते. दोन पिढ्यातील नात्यातील दुरावा यातून वाढत जातो. हा दुरावा या चित्रपटातून अस्वस्थपणे मांडला जातो. या दुराव्याचे चित्रण सदर चित्रपटातून अतिशय उत्तम पद्धतीने साकारले जाते.
ट्रॅक्टर हे ग्रामीण अर्थव्यवस्थेतील एक महत्त्वाचे साधन होय. कोणत्याही काळात साधनांच्या अपूर्णतेतून ,अभावातून संघर्ष जन्माला येतो. बाबुला जागतिकीकरणाचे नवे जग साद घालत आहे. ट्रॅक्टर ड्रायव्हर असणाऱ्या बाबुला स्वतः चा ट्रॅक्टर घेऊन वाळू धंदा करून झटपट श्रीमंत व्हायचा आहे. या झटपटच्या वेगात सगळंच हरवून जाण्याची वेळ बाबूवर येते. या सगळ्या संघर्षात बाबू हाताश होतो. मोडून पडतो. तो पुन्हा आशावादी होतो. स्वतःला सावरतो. बाबूच्या जीवनात अतिशय महत्त्वाचा टप्पा म्हणजे प्रेम होय. जीवनात सगळं हरवलं तरी चालेल पण प्रेम जिंकलं पाहिजे. हे वाक्य फार महत्त्वाचे आहे. या वाक्यातून प्रेरणा घेऊन बाबू नवा मार्ग अनुसरतो. जब जिंदगी झंड होती है ! तो पुना बंबईही याद आती है ! या प्रवासातील नजाकत TDM मध्ये खास अनुभवण्यासारखी आहे. बाबू आणि नीलम यांच्या सफल प्रेमची कथा म्हणजे TDM हा चित्रपट होय. या प्रेम कथेत ट्रॅक्टर हे साधन अतिशय महत्त्वाचे ठरते. गरीब नायक आणि श्रीमंत घरातील नायिका हा पारंपारिक व्यूह या चित्रपटाच्या मांडणीला आहे. परंतु या मांडणीमध्ये भूतकाळातील काही संदर्भ खूप देखणेपणाने मांडले जातात. प्रेम भावनेतील तरलता ,नाजूकता हळुवारपणे चित्रपटातून येते. रोमँटिक दृश्य मांडणीतील भाऊरावचे वेगळेपण नजरेत भरणारे आहे. रोमँटिक भावनांमधील काही क्षण वेडं लावणारे आहेत.बाबू आणि नीलम यांच्या प्रेमाला सजातीय गरीब- श्रीमंतीच्या संघर्षाची किनार आहे. नीलम आणि बाबू या पात्रांचा देखाणा अभिनय आनंददायी आहे. विशेषतः बांबूची भूमिका,अभिनय अतिशय ताकदीचा आहे. किंवा तेवढ्यासाठी TDM हा चित्रपट पाहावा. पैसे वसूल करून देणारा हा चित्रपट आहे. बाबू ,नीलम ,भिकू शेठ,मेंबर ,बाबूचा बाप,चेअरमन ,बाबूची बहीण ,तिचा शिक्षक पती हे सगळेचं पात्र उत्तम अभिनयातून आपल्याला मागच्या काळात घेऊन जातात. भिकूशेठ ,मेंबर या पात्रांनी चित्रपटात खास ग्रामीण झिंग आणली आहे. ग्रामीण बेरकीपणा उत्तमपणे ताकदीने उभा केला आहे. चित्रपटातील संवाद अतिशय खटकेबाज आहेत. ध्यानात राहणारे आहेत.चित्रपटातील पिंगळा गाणं , आणि त्याचं चित्रण चित्रपटाचा आत्मा आहे. चित्रपटातील सर्वच गाणी कथानकाशी एकरूप झालेली आहेत. चित्रपटातील गाणी कथानकाच्या भावनिकेतला उंच परिमाण प्राप्त करून देतात.
विहीर खोदण्यासाठी सुरंग लावले जातात. या सुरुंगासाठी ट्रॅक्टरचा वापर केला जातो. भिकूशेठ या ट्रॅक्टर मालकाकडे बाबू रोजंदारीवर काम करतो. भिकूशेठ श्रीमंत शेतकरी आहे. नीलम ही कॉलेजला जाणारी भिकूशेठ ची मुलगी आहे. नीलमवर बांबूचे प्रेम आहे. सुरुवातीला नीलम बाबुला भाव देत नाही. परंतु बाबू मधील कष्ट करणारा माणूस नीलमला भावून जातो. तो तिला आवडतो. ती त्याच्या प्रेमात पडते. या कथानकात कुठेही फारसा संघर्ष येत नाही. बाबुला बहिणीच्या लग्नासाठी कर्ज घेऊन खर्च करावा लागतो. यातून फायनान्स कंपनीच्या हप्ते बाबू भरू शकत नाही. यातून फायनान्सवाले बाबूचा ट्रॅक्टर ओढून घेऊन जातात. आर्थिक ओढाताणीतील बाबू खचत जातो. 1995 च्या काळातील तरुण पिढीच्या कोंडमाऱ्याची कथा TDM मधून उभी राहते.
सहकारी सोसायटी सर्वसामान्य शेतकऱ्यांना सहजतेने कर्ज मिळवून देण्यासाठी असतात. परंतु राजकारण ,ठग प्रवृत्तीचे शोषक सर्वसामान्य शेतकऱ्यांना लुटण्यासाठी वेगवेगळी आयुध वापरतात. ग्रामीण अर्थकारणाचा कणा असलेल्या सहकारी सोसायटी ह्या सक्षमपणाने सर्वसामान्य शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी उभ्या राहत नाहीत. गावगाड्यातील टगे या संस्थांवर ताबा मिळवतात. TDM मधील चेअरमन ,मेंबर हे अतिशय ठसठशीतपणे या प्रवृत्तींचा प्रतिनिधित्व करतात. बाबुला वेळेवर सहकारी सोसायटीकडून कर्ज मिळाले असते तर काहीतरी सकारात्मक घडले असते. परंतु तसे होत नाही. या विविध प्रवृत्तींचे TDM मध्ये सकस चित्रण येते. भाऊराव यांना ग्रामीण भागातील ग्राउंड लेव्हल वरील असलेल्या समृद्ध अनुभवातून या कलाकृतीत हे चित्रण प्रत्ययकारी झाल्याची जाणीव होते.
TDM मध्ये १९९५ च्या काळातील हिंदी ,मराठी चित्रपट ,गाणी यांचा प्रभाव ग्रामीण भागातील माणसांवर कसा होता ? हे अतिशय छानपणाने मांडला आहे. मोठ्या आकाराच्या कॅसेट ,टेप रेकॉर्डर ,मोठे साऊंड ,व्हिडिओ कॅसेट ,व्हीसीआर मोठ्या आकाराचे टीव्ही या सगळ्यांशी निगडित असलेल्या आठवणी ,स्मृती TDM मधून जिवंत होतात. तो काळ पुन्हा अनुभवण्यासाठी TDM ही एक पर्वणीस ठरते. या चित्रपटावर सैराट ,बबन ,ख्वाडा या चित्रपटांची छाप आहे. नायिकेचे ट्रॅक्टर चालवणे. मोठ्या दगडांमध्ये बांधलेली विहीर त्या विहिरीत पोहणे. नायकाचा आंघोळीचा सीन , गुलाबाची फुलं पावलांच्या ठशावर ठेवणे. नायकाचा मित्र म्हणून मुस्लिम पात्र घेणे. काही चित्रपटातील प्रसंगांवर सैराट ,बबन ,ख्वाडाची छाप दिसते. भाऊराव यांनी या मर्यादेवर मात केल्यास मराठी चित्रपटासाठी महत्त्वाचे ठरू शकते. तोच तोच पणा टाळून नवं काहीतरी देण्याची तयारी भाऊराव यांनी ठेवल्यास मराठी चित्रपटाला उंचीवर घेऊन जाण्याची क्षमता त्यांच्यामध्ये निश्चित आहे.
मर्यादित पात्रांचा वापर ही या चित्रपटाची मर्यादा वाटते. दलित समाजजीवन हे ग्रामीण व्यवस्थेचे महत्त्वाचे अंग आहे. विशेषतः वाळू भरणारे मजूर हे दलित वर्गातील असतात. परंतु तसे चित्रण TDM मध्ये येत नाही. चित्रपटातून मांडल्या जाणाऱ्या आशयाचा महत्त्वाचा भाग असणाऱ्या जीवनाचे कलाकृतीतून चित्रण येत नाही. चित्रपटातून येणाऱ्या बाजारपेठा आजच्या काळातील वाटतात. इ.स.1995 च्या काळातील बाजारपेठ चित्रपटातून नीटपणे उभी राहत नाही. कापड दुकानातील साडीला लावलेला बारकोड ही गोष्ट त्या काळात अस्तित्वात नव्हती. परंतु ती चित्रपटातून येते. बाबू आणि नीलम यांचे प्रेम त्रोटकपणे चित्रीत होते. ते एकजीव रूपात हळवेपणाने उभे राहत नाही. चित्रपटातील काही संवादांमध्ये शहरी पुणेरी मराठी बोली येते. नीलम, बाबूची बहीण ही पात्र जास्त प्रमाण भाषेत बोलताना दिसतात. शिरूर परिसरातील ग्रामीण बोली चित्रपटात नीटपणे येत नाही. प्रमाण भाषेतील शब्द मोठ्या प्रमाणात येतात. ही या चित्रपटाचे मर्यादा वाटते. विहीर खोदण्यासाठी सुरुंग पेरणारा बाबू वाळू धंद्यात यशस्वी होतो. विहीर फोडून पाणी देणारा सुजनशील नायक निसर्ग ओरबाडणाऱ्या विकृत व्यवस्थेचा हस्तक होतो. यातील बोच लक्षात घेण्यासारखे आहे. वाळू धंद्यातील बारकावे ,वृत्ती प्रवृत्ती ह्या TDM मधून अचूकपणे टिपल्या जात नाहीत. वरवरचे चित्रण येते. ही या चित्रपटाची मर्यादा वाटते. इ.स. 1995 च्या काळातील कपडे ,ड्रेस ,फॅशन अतिशय चपखलपणे चित्रपटातून येते. विशेषतः पॅरेगॉन स्लीपर चप्पलचा चित्रपटातील वापर दाद देण्यासारखा आहे. त्या काळातील लग्न ,वेगवेगळ्या प्रथा , परंपरा नीटचपणे चित्रपटातून येतात. लग्नात होणारी भांडण ,हुंडा पद्धती , त्या काळातील मानापानासाठी होणारा अवाढव्य खर्च या सगळ्या बाबी चित्रपटातून उत्तम पद्धतीने साकार झालेल्या आहेत. TDM मध्ये TDM नावातील सस्पेन्स अगदी कटप्पाने बाहुबलीला का मारले ? यासारखा आहे. ग्रामीण जीवनातील दुर्लक्षित , सर्वसामान्य माणसचं जगणं , त्यांच्या वृत्ती ,प्रवृत्ती यावर चित्रपट येणे हीच अतिशय उल्लेखनीय बाब आहे.मराठी माणसांच्या अभिरूचीचा दर्जा श्रेष्ठ आहे. हे या चित्रपटातून सिद्ध होते. क्षुल्लक ,हिंसक चित्रपट मोठ्या प्रमाणात येत आहेत. KGF, भोला या चित्रपटांच्या तुलनेत TDM हा अतिशय कल्पकतेने साकारलेला मराठी चित्रपट आहे. भाऊराव कऱ्हाडे यांच्या चित्रपट मांडणीला एक खास ग्रामीण शैलीचा सुगंध आहे. हा सुगंध असाचं दरवळत राहो ! भाऊसाहेब व त्यांच्या टीमला मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा !!! ...
---------------------------------------------
डॉ.गणपतराव ढेंबरे
रावेर ,तालुका रावेर ,जिल्हा जळगाव
पिनकोड - 425508
मोबाईल नंबर - 94210812 70
ई-मेल - dhembregr@gmail.com
----------------------------------------------