लोकशाहीर अण्णा भाऊ साठे : एक शोध
प्रा. गणपतराव ढेंबरे
"हे जग, पृथ्वी शेषाच्या मस्तकावर नसून दलितांच्या तळहातावर तरलेली आहे. इ.स. १९५८ च्या दलित साहित्य संमेलनाच्या उद्घाटनपर भाषणात अण्णा भाऊंनी हे विधान केले. या विधानातून अण्णा भाऊंनी जगाच्या सक्रियतेची योग्य शब्दांत मीमांसा केली. आज जगभर भांडवलशाहीने उद्दामपणाचा कळस गाठला आहे. विशेषत: १९९० नंतर जग झपाट्याने भांडवलशाहीच्या पंजाखाली गेले आहे. भारतही या संक्रमणातून आज जात आहे. गरीब आणि श्रीमंत या दोन वर्गांतील दरी प्रचंड वाढली आहे. भारतामध्ये एकाच वेळी दोन देश निर्माण झाले आहेत. संपत्तीचे ध्रुवीकरण भारताला अराजकतेकडे नेऊ लागले आहे. या पार्श्वभूमीवर आज अण्णा भाऊ साठेंच्या विचारांची, मूल्यांची खरी गरज आहे.
शाहीर, लेखक, विचारवंत, राजकीय विश्लेषक, मार्क्सवादी कार्यकर्ता, गुणी कलावंत, समाजसुधारक या विविधांगी भूमिकेतून अण्णा भाऊ साठेंचा विचार आपणाला करावा लागतो. कोणतेही औपचारिक शिक्षण नसलेले अण्णा भाऊ साठे हे एक प्रख्यात लेखक झाले. अण्णा भाऊंनी जनसामान्यांच्या जीवनातून, अनुभवातून साहित्य निर्माण केले. महाराष्ट्राच्या ग्रामीण, दलित जीवनाचे चित्रण करत असताना येथील सर्वसामान्य माणसांच्या सुखदुःखाबद्दल त्यांनी वाचा फोडली. सर्वसामान्य दलित, उपेक्षित, भटक्या लोकांचे जीवन साहित्याचा विषय होऊ शकते हे अण्णा भाऊंनी समाजाला दाखवून दिले. त्यांच्या कलाकृतीतून त्यांनी वर्गसंघर्ष मांडला. हा वर्गसंघर्ष मांडत असताना यातून गरीब, दीन दुबळ्यांच्या विजय पराजयापेक्षा त्यांचे जीवन साहित्यातून मांडणे अण्णा भाऊंना महत्त्वाचे वाटले. समकालीन समाजवास्तवाला अभिव्यक्त करणे हा अण्णा भाऊंच्या लेखनाचा स्थायिभाव होता. समकालीन समाजवास्तव अण्णा भाऊंना नेहमीच अस्वस्थ करीत आले. या अस्वस्थतेतून निर्माण झालेल्या साहित्याचा कस अद्वितीय होता.कल्पनेच्या भराऱ्यांपेक्षा वास्तवतेचे चित्रण अण्णा भाऊंना महत्त्वाचे वाटले. अण्णा भाऊ त्यांच्या भाषणात म्हणतात, ''दलिताविषयी लिहिणाऱ्यांनी प्रथम त्यांच्याशी एकनिष्ठ असले पाहिजे. तू गुलाम नाहीस, हे जग तुझ्या हातावर आहे, याची जाणीव करून घ्यावी. त्यांचे जीवन वरच्या पातळीवर नेण्याची शिकस्त करावी आणि त्यासाठी लेखक हा सदैव आपल्या जनतेबरोबर असावा लागतो. कारण जो कलावंत जनतेबरोबर असतो त्यांच्याबरोबर जनता असते. जनतेकडे पाठ फिरविणाऱ्यांकडे साहित्यही पाठ फिरवीत असते. जगातील सर्वश्रेष्ठ कलावंतांनी वाङ्मय हा जगाचा तिसरा डोळा मानला आहे आणि तो डोळा सदैव पुढे व जनतेबरोबर असणे जरूर आहे."
हे विचार अण्णा भाऊंच्या लेखन प्रेरणा स्पष्ट करतात. आपल्या बांधिलकीचे स्वरूप सांगतात. वाङ्मय हे जगाचा तिसरा डोळा आहे. ते काळाच्या पुढे असते. जगाचे स्वरूप पुढील कालखंडात कसे असेल याचे दिग्दर्शन साहित्य करत असते. अण्णा भाऊंचे साहित्य हे जगातील शाश्वत चिरस्थायी मूल्यांचा शोध घेते.
संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील अण्णा भाऊंचे योगदान : -
इ.स. १९४७ ला भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले. राज्यकारभाराच्या सोयीसाठी भाषावार प्रांतरचना करण्याचे त्या कालखंडातील राजकीय नेतृत्वाने ठरविले. १ मे १९६० रोजी महाराष्ट्र हे राज्य निर्माण झाले. मुंबई हे बेट गुजरात राज्यात ठेवावे, की महाराष्ट्रात याबद्दल वाद झाले. बेळगाव, कारवार, निपाणी, डांग, उंबरगाव मराठी भाषिक प्रदेश महाराष्ट्रापासून अलग करण्यात आले व ते शेजारच्या कर्नाटक राज्यात समाविष्ट करण्यात आले. महाराष्ट्राने केंद्र सरकारविरुद्ध अतिशय तीव्र आंदोलन केल्यामुळे राज्यांच्या पुनर्रचनेच्या वेळी मुंबई महाराष्ट्राला मिळाली. हेच आंदोलन संयुक्त महाराष्ट्र आंदोलन या नावाने ओळखले जाते.
संयुक्त महाराष्ट्र चळवळ, बेळगाव - कारवार सीमावाद आणि गोवामुक्ती आंदोलनामध्ये हिरिरीने भाग घेणाऱ्या 'समिती'च्या स्थापनेपूर्वी आणि स्थापनेनंतर अण्णा भाऊंनी सामान्यजनांना आपल्याभोवतीच्या राजकीय घडामोडींबद्दल जागृत करण्याचे मोठे कार्य केले. अण्णा भाऊंनी आपली लेखणी सामाजिक प्रश्न सोडविण्यासाठी झिजवली. महाराष्ट्र आणि मराठी संस्कृती यांच्यावरील प्रशंसापर पद्यरचना अण्णा भाऊंनी केली. या रचनांमधून
आजही उत्स्फूर्तता, जल्लोष, सार्थ अभिमान, जाज्वल्यता दिसते. मराठी भाषा, संस्कृती, महाराष्ट्र मायभूमी यांविषयी अण्णा भाऊ साठेंच्या मनात प्रचंड प्रेम आणि ओढ होती. या प्रेम व ओढीमधून त्यांनी काही रचना केल्या. या रचनांमध्ये शाहिरांनो! महाराष्ट्र देश आमुचा, उठला मराठी देश, महाराष्ट्रावरूनी टाक ओवाळुनी काया, माझी मैना गावावर राहिली, जग बदल घालुनी घाव, साताऱ्याची तऱ्हा या रचनांचा समावेश होतो.
'उठला मराठी देश' ही रचना संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या पार्श्वभूमीवर लिहिलेली आहे. महाराष्ट्रावरील आपल्या इतर रचनांप्रमाणेच या रचनेतही शाहीर मुंबई महाराष्ट्राला मिळावी या मागणीसाठी मुंबईच्या रस्त्यावर प्राण देणाऱ्या हुतात्म्यांची स्तुती करतात.
'महाराष्ट्रावरून टाक ओवाळुनी काया' ही रचनासुद्धा संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर लिहिलेली आहे. आपल्या समृद्ध परंपरेपासून प्रेरणा घेऊन महाराष्ट्रवासीयांनी संयुक्त महाराष्ट्रासाठी पूर्ण शक्तिनिशी लढावे आणि मृत्यूला तोंड द्यायची वेळ आली तरी पाय मागे घेऊ नये असे आवाहन शाहीर अण्णा भाऊंनी महाराष्ट्रातील जनतेला केले आहे. व्यक्तिगत दुःखाची सांगड योग्य प्रकारे एखाद्या सामाजिक-राजकीय समस्येशी कशी घातली जाऊ शकते हे 'माझी मैना गावावर राहिली' या लावणीवरून दिसते. ही रचना सर्वांत लोकप्रिय आहे.
कलावंताने आपली सामाजिक बांधिलकी स्वीकारून कार्य केले पाहिजे. या विचाराचे अण्णा भाऊ साठे होते. संयुक्त महाराष्ट्रासाठी डफ हातात घेऊन स्वतःच्या उत्स्फूर्त रचनांचे सादरीकरण अण्णा भाऊंनी केले. समाजाच्या हितासाठी अण्णा भाऊंमधील कलावंत रस्त्यावर उतरला. त्यांची प्रतिभा समाजकल्याणासाठी झिजली. यातच अण्णा भाऊंच्या कार्याचे वेगळेपण आहे.
मार्क्सवादी आणि अण्णा भाऊ साठे: -
अण्णा भाऊ साठे मुंबईच्या भायखळा उपनगरात राहत. त्याकाळी मुंबईत अनेक घडामोडी घडत होत्या. या घडामोडींचे परिणाम अण्णा भाऊ साठेंच्या व्यक्तिमत्त्वावर होत होते. मुंबईच्या कामावर वस्त्यांमधील संप, बंद व मोर्चा यांचे अण्णा भाऊंवर नकारात्मक तर काही सकारात्मक असे परिणाम झाले. या सर्वांचे चित्रण अण्णा भाऊंच्या साहित्य विश्वात होते. एखाद्या व्यक्तींकडून एखाद्या विचारप्रणालीचा स्वीकार हा बहुधा त्या
व्यक्तीची सामाजिक, आर्थिक व कौटुंबिक पार्श्वभूमीचे त्या व्यक्तीवरील परिणाम यांच्यावर अवलंबून असतो.
कार्ल मार्क्सचे विचार अण्णा भाऊंना प्रभावी वाटले. प्रत्यक्ष जीवनातील प्रश्न सोडविण्यासाठी कार्ल मार्क्सच्या विचारांचे विश्लेषण अण्णा भाऊंनी केले. त्या काळात कम्युनिस्ट पार्टीच्या सभा आयोजित करणे, प्रचारपत्रके वाटणे, भिंतीवर घोषणा लिहिणे, आणि मोर्चासाठी घोषणाफलक रंगविणे, पोस्टर्स रंगविणे, यांसारखी कामे अण्णा भाऊ करीत होते. या सर्व चळवळीतून अण्णा भाऊंचे साहित्यिक व्यक्तिमत्त्व घडत गेले.
अण्णा भाऊ साठे हे कम्युनिस्ट मार्क्सवादी विचाराचे होते. त्यांनी आपल्या कथेतून दलित माणसांचे सामाजिक मनच व्यक्त केले आहे. समाजव्यवस्थेने तुडविलेल्या उपेक्षित माणसांबद्दल त्यांच्या मनात अपार करुणा, प्रेम व तेवढीच सहानुभूती होती. याविषयी अण्णा भाऊ साठे लिहितात, "प्रतिभेला वास्तवाची गरज असते, कल्पनेलाही जीवनाचे पंख असणे आवश्यक असते. अनुभूतीला सहानुभूतीची जोड नसेल तर आपण का लिहितो याचा पत्ताच लागत नाही. ज्यांच्याविषयी मी लिहितो ती माझी माणसं असतात. '' अशा जीवनवास्तवाला घासून स्पर्श करणारी अण्णा भाऊंची लेखणी या उपेक्षित जगातील माणसांचे चित्रण करते. या माणसांचे प्रश्न सोडविले नाहीत, तर ते लुटारू ,चोर बनू शकतात. असामाजिक कृत्याचा धनी तो होतो. हेच अण्णा भाऊंना सांगायचे आहे. या माणसांचे प्रश्न सोडविण्याची जबाबदारी कोणाची? हा गंभीर प्रश्न अण्णा भाऊंचे साहित्य विचारते.
अण्णा भाऊ साठेंच्या साहित्याविषयी प्रा. रा. ग. जाधव लिहितात, “अण्णा भाऊंचे आयुष्य म्हणजे साम्यवादाने झपाटलेली एक जळती चूड होती. वाङ्मय म्हणजे त्या चुडीतून उडालेल्या काही ठिणग्या, काही पेटविणाऱ्या काही डागणाऱ्या, काही झोंबणाऱ्या, काही झोंबता झोंबता हसवणाऱ्या आणि त्यामुळेच अण्णा भाऊ साठे यांना कलावंत होता आले. अण्णा भाऊंना मार्क्सवादाचा हा टॉर्च सापडला नसता, तर त्यांच्यातील कलावंत एवढा मोठा झाला नसता." यातून आपणाला असे म्हणता येईल की, अण्णा भाऊ साठे हे कम्युनिस्ट मार्क्सवादी होते. त्यांच्या साहित्य लेखनाच्या प्रेरणा प्रा. रा. ग. जाधवांनी स्पष्ट केल्या आहेत. अण्णा भाऊंच्या लेखनाला मार्क्सवादामुळे एक वैचारिक अधिष्ठान मिळाले.
अण्णा भाऊंच्या लेखनाचा विचार करताना डॉ. बजरंग कोरडे म्हणतात, "अण्णा भाऊंच्या लेखनाच्या केंद्रस्थानी आहे ते मार्क्सवादाचे तत्त्वज्ञान इतर कोणत्याही अस्सल मार्क्सवादी लेखकाप्रमाणे अण्णा भाऊ कला हे समानता प्रस्थापित करणे आणि पिळवणूक व अन्याय यांचा अंत करणे ही उद्दिष्टे साधणारे सामाजिक बदलाचे एक साधन आहे असे मानीत."
कलेबद्दलच्या वरील विचारांमुळे अण्णा भाऊंनी समकालीन समीक्षकांच्या मतांचा विचार केला नाही. सामान्य माणसाचे जीवन साहित्यातून मांडणे अण्णा भाऊंना महत्त्वाचे वाटले. अण्णा भाऊंच्या साहित्यातून वर्गसंघर्ष मांडलेला दिसतो. यापाठीमागे मार्क्सवादाचे तत्त्वज्ञान होते.
दलित साहित्यातील अण्णा भाऊंचे योगदान : -
“जग बदल घालुनी घाव।
सांगून गेले मला भीमराव ।
गुलामगिरीच्या या चिखलात ।
रुतून बसला का ऐरावत।
अंग झाडुनी निघ बाहेरी ।
घे बिनीवरती धाव " ॥
या अण्णा भाऊ साठेंच्या ओळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल सार्थ विश्लेषण करतात. जग बदलण्यासाठी घाव घालण्याची गरज आहे. प्रयत्न हाच बदलाचा आत्मा आहे. समाजाच्या कल्याणासाठी परिवर्तन आवश्यक आहे. हे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार अण्णा भाऊ काव्यातून मांडतात. अण्णा भाऊंनी बाबासाहेबांना आपले प्रेरणास्थान मानले होते. बाबासाहेबांचे परिवर्तनवादी विचार अण्णा भाऊंच्या साहित्यातून पदोपदी व्यक्त होतात. दलितांच्या उद्धारासाठी बाबासाहेबांचे विचार अनमोल आहेत. हे अण्णा भाऊंनी ओळखले होते.
ज्यांचे अस्तित्वच नाकारण्यात आले होते अशा दलित समाजातील मांग जमातीत अण्णा भाऊ साठे यांचा जन्म झाला. गुन्हेगार जमात म्हणून जन्माचीच टाकलेली, उपेक्षिलेली ही जमात. अशा जीवनाची व जगण्याची झालेली होरपळ त्यांनी प्रत्यक्ष अनुभवली. वाटेगावातील व शाळेतील अस्पृश्यतेचे चटके त्यांनी बालपणापासूनच साहिलेले. ते असह्य झाले आणि त्यामुळेच त्यांचे शिक्षण असे झालेच नाही. अण्णा भाऊ प्रथम शाहीर म्हणून प्रकाशात आले. नव्या युगाचा, नव्या दमाचा तमासगीर म्हणून प्रसिद्ध पावलेल्या अण्णा भाऊंच्या शाहिरीने या जीवनाचा तळ हलविला. आपल्या जगण्यातला सारा दाहक अनुभव गाठीशी घेऊन अण्णा भाऊंनी साहित्यलेखन केले. कादंबरी, कथा, चित्रपट कथा, लोकनाट्य, प्रवासवर्णन, लोकगीते यांसारख्या साहित्याच्या विविध प्रकारांत लीलया विहार करणारे अण्णा भाऊ साठे दलित साहित्याचे उद्गाते आहेत. अण्णा भाऊंनी १३ कथासंग्रह, ३ नाटके, १ प्रवासवर्णन, ३५ कादंबऱ्या; त्यांच्या ७ कादंबऱ्यांवर आधारित ७ चित्रपट निघाले. १० प्रसिद्ध पोवाडे, इतके विपुल लेखन अण्णा भाऊंनी केले. विविध वाङ्मय प्रकारांतील त्यांचे लेखन वैविध्यपूर्ण व गुणवत्तेने श्रेष्ठ अशा दर्जाचे आहे. अण्णा भाऊ साठेंच्या कथालेखनाविषयी प्रसिद्ध समीक्षक प्रा. डॉ. योगेंद्र मेश्राम म्हणतात की, "अण्णा भाऊ साठे हे कम्युनिस्ट मार्क्सवादी विचारांचे होते; पण त्यांनी कथेतून दलित माणसांचे सामाजिक मनच व्यक्त केले आहे.” अण्णा भाऊंच्या साहित्यात दलित जीवनाचे प्रतिबिंब उमटते. दलित जीवनाचे दर्शन अण्णा भाऊंच्या साहित्यात घडते. त्यांचा भाकरीचा आकांत समाजातील सुष्ट, दुष्ट प्रवृत्तींवर प्रहार बनून प्रस्फुटतो. यासंदर्भात आजच्या दलित साहित्यातील विद्रोही क्रांतिमूल्यांची पहिली मुहूर्तमेढ अण्णा भाऊंच्या वाङ्मयात रोवलेली दिसते. विद्रोही दलित साहित्याचे ते पहिले शिल्पकार ठरतात.
अण्णा भाऊंचे कादंबरी वाङ्मय गुणदृष्ट्या अधिक समृद्ध आहे. अण्णा भाऊंनी आपल्या कथांप्रमाणे कादंबऱ्यांतूनही 'माणसानं जगलं पाहिजे' हाच संदेश दिला. अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याविषयी प्रसिद्ध समीक्षक प्रा. रा. ग. जाधव लिहितात, “थोर साहित्यिकांचे एक लक्षण असे की, मानवी जीवनविषयक कोणतातरी नैतिक मूल्यभाव तो आपल्या साहित्यातून सूचित करीत असतो. अण्णा भाऊंनी दीनांच्या, पतितांच्या, भणंगभिकाऱ्यांच्या तथाकथित दरोडेखोरांच्या अर्थशून्य मानल्या गेलेल्या जीवनात माणुसकीची अर्थपूर्णता असल्याचे दाखवून दिले. या दलित-पतित जीवन सृष्टीतही मंगल मानवी भावनांचे नि नैसर्गिक मानीव विकारांचे लळित कसे रंगते, हे स्पष्ट केले. दलित पीडित जगाचा पहिला लेखक व भाष्यकार होय." प्रा. रा. ग. जाधवांचे हे मत अण्णा भाऊंमधील कलावंताची ओळख पटवून देणारेच आहे. अण्णा भाऊंनी आपल्या तळपत्या प्रतिभेने मराठी वाङ्मयात मोलाची नवी भर घातली. दलित चळवळींमध्ये वैचारिक बांधिलकीनुसार अनेक गट असले, तरी कोणत्याही गटाने दलित साहित्याच्या क्षेत्रातील अण्णा भाऊंच्या मूलभूत कार्याचे महत्त्व नाकारलेले नाही. त्यांना मराठी साहित्यातील पहिले प्रमुख, लक्षणीय व समर्थ दलित लेखक मानले जाते. एका उपेक्षित जीवनाच्या आविष्काराने साहित्यक्षेत्रात अपूर्वता आणली. मराठी साहित्य अधिक संपन्न केले असे म्हणता येईल. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन !!!
( पूर्व प्रसिद्धी - समाज सुधारक लोकशाहीर अण्णा भाऊ साठे : संपादक महेंद्र शिंदे या पुस्तकात प्रकाशित प्रथमावृत्ती -२०१२)
डॉ. गणपतराव ढेंबरे
श्री.व्ही.एस. नाईक महाविद्यालय रावेर
ता. रावेर , जि. जळगाव
पिन कोड -४२५५०८
मोबाईल - ९४२१०८१२७०
ई - मेल - dhembregr@gmail.com