॥ १ ॥
'उन्हाच्या कटाविरुद्ध गुलमोहरासारखी त्वेषानं फुलणारी कविता '
डॉ.गणपतराव ढेंबरे, रावेर
'उन्हाच्या कटाविरुद्ध 'हा नागराज मंजुळे यांचा कवितासंग्रह आहे. माइंड अँड मीडिया ,प्रकाशन ,पुणे यांनी नोव्हेंबर २०१० मध्ये प्रकाशित केलेला हा कवितासंग्रह आहे. भूतकाळातील सुप्त जाणिवांचा आत्मशोध म्हणजे प्रस्तुत कवितासंग्रहातील कविता होय. या कवितासंग्रहात एकूण ५४ कवितांचा समावेश आहे. हा कवितासंग्रह प्रसिद्ध होण्याच्या आधी कवितेविषयी गंभीर असणाऱ्या विविध नियतकालिकातून नागराज मंजुळे यांच्या कविता प्रसिद्ध झाल्या आहेत. कवितारती ,मौज ,अस्मितादर्श ,मिळून साऱ्याजणी ,परिवर्तनाचा वाटसरू, सकाळ दिवाळी अंक , लोकमत दिवाळी अंक ,जाणीव दिवाळी अंक , कलात्म , कला कलाकल्पतरूंचे आरव या नियतकालिकातून नागराज मंजुळे यांच्या कविता प्रसिद्ध झाल्या आहेत.
'उन्हाच्या कटाविरुद्ध ' यासंग्रहाला इसवी सन २०११ चा भैरू रतन दमानी पुरस्कार मिळाला आहे. याच कवितासंग्रहाला नारायण सुर्वे काव्य प्रतिभा (२०१४ ) तसेच दया पवार स्मृती पुरस्कार (२०१४ ) हे पुरस्कार सुद्धा मिळाले आहेत.
भूतकाळातील अस्तित्व शोधाची ही कविता आहे. जागतिकीकरणातून वाटेला आलेलीआत्ममग्नता या कवितेतून ठळकपणे अभिव्यक्त होते. प्रेम भंगाचे अतिउ दुःख मांडणारी ही कविता आहे. एकटेपणा ,एकाकीपणा यातून अस्वस्थ होणाऱ्या मानवी मनाचा कोलाहल या कवितेतून मुखर होतो. जातीयतेतून पोळलेल्या विदीर्ण मानसिकता या कवितेतून येते. अतिशय प्रामाणिक असणाऱ्या प्रियकराच्या तुटत जाण्याची व्यथा या काव्यसंग्रहातून मांडले जाते. वरील काही ठळक आशयसूत्रे नागराज मंजुळे यांच्या कवितेतून अभिव्यक्त होतात. आत्मशोधातून वाट्याला आलेले जगणे आणि त्यातून तुटत गेलेले भावविश्व नागराज मंजुळे यांच्या कवितेच्या केंद्रस्थानी आहे. इ.स. १९९० नंतरच्या व्यापक सामाजिक परिघातील व्यक्तिगत कोंडी आणि त्यातून खोल मनातील भळभळणारी जखम नागराज मंजुळे यांच्या कवितेतून मांडली जाते.
॥ २ ॥
काव्य निर्मिती विषयक प्रगल्भ जाणीव : -
नागराज मंजुळे यांची काव्यनिर्मिती विषयीची समग्र जाणीव अतिशय प्रगल्भ आहे. स्वतःच्या काव्य निर्मितीचे मर्म सांगताना कवी म्हणतो , " माझ्या हाती
नसती लेखणी
तर ......
तर असती छिन्नी
सतार ..... बासरी
अथवा कुंचला
मी कशानेही
उपसतच राहिलो असतो
हा अतोनात कोलाहल मनातला "
( उन्हाच्या कटाविरुद्ध पृष्ठ - ०४ )
जर स्वतःला कविता लिहिता आली नसती तर आपल्या मनातला अतोनात कोलाहल आपण उपसतचं राहिलो असतो. वेगवेगळ्या कलांमधून स्वतःला मोकळं करत गेलो असतो. असा ठाम विश्वास कवीला आहे. लेखणी ऐवजी छिन्नी ,सतार ,बासरी , कुंचला आपण हातात घेतला असता. या विविध कलांच्या माध्यमातून मनातला अस्वस्थपणा आपण अभिव्यक्त केला असता. ही कवीची प्रामाणिक कबुली कवीच्या अभिव्यक्तीचे मर्म उलगडून दाखवणारी आहे.
'मित्र ' या कवितेत कवी म्हणतो ,
"एकसारख्या प्रकृतीचे
आम्ही दोघे मित्र
एकमेकांचे जिवलग
एकच ध्येय
एकच स्वप्न घेऊन
जगणारे
पुढे
त्याने आत्महत्या केली
आणि मी कविता लिहिली "
(उन्हाच्या कटाविरुद्ध पृष्ठ ३७ )
मित्राचे आत्महत्या करणे. आणि स्वतः कविता लिहिणे या दोन्ही कृती कवीला समान वाटतात. जीवनातील सर्व पर्याय संपल्यानंतर माणसाला मृत्यूचा पर्याय आश्वासक वाटतो. मृत्यूच्या गाढ निद्रेतील सुख त्याला प्राप्त होते. कवी कविता लिहितो म्हणजे तो एका अर्थाने आत्महत्याच करतो. ही आत्महत्या असते , स्वप्नभंगाची , अगतिकतेची ,अस्वस्थतेची , मनात खोल साचलेल्या दुःखाची तीव्रता कमी करण्यासाठी कवी कविता लिहितो. आपल्या काव्य निर्मितीची प्रेरणा कवी येथे मांडतो. आपल्या कवितेतील प्राणांतिक सूर आपण कशासाठी आळवत आहोत.याची प्रामाणिक कबुलीच कवीने येथे दिली आहे. कवी म्हणतो,
"तसा जीवघेण्या विषण्णतेत
मरण कागदावर लिहित
मी जगतच होतो "
(उन्हाच्या कटाविरुद्ध पृष्ठ ४३)
एकीकडे कवी आपल्या काव्य निर्मितीच्या कार्याची तुलना आत्महत्ये सारख्या गोष्टीशी करतो. तर दुसरीकडे कवी आपल्या काव्य निर्मिती विषयी म्हणतो , जीवघेण्या विषण्णतेत मरण कागदावर लिहित राहण्याची वेळ आपल्यावर आली आहे. जीवनाचा अर्थ हरवून बसलेली विषण्णता कवितेच्या रूपात अर्थपूर्ण होते. जीवघेण्या विषण्णतेतील विविध टोकदार कांगोरे कविता रुपातून आकाराला येतात.
कवितेचे स्वतःच्या आयुष्यातील स्थान शोधताना कवीला कविता सावलीसारखी वाटते. अतीव दुःखाच्या उन्हातली सावली बनून कविता कवीची सोबत करते. कवी 'सावली'या कवितेत म्हणतो,
" उजेडताना मी
माझ्यावर
कवितेनं
धरली सावली
कुणास ठाऊक
कशी मनात
अंकुरली कविता
पृथ्वीला
कशी सुचली झाडे "
(उन्हाच्या कटाविरुद्ध पृष्ठ - ५४ ) उजाडताना ,लख्ख प्रकाशात कविता माझ्यावर सावली धरते. समकालीन जगण्यातल्या उन्हाच्या कटाविरुद्ध कवीला काव्य निर्मिती सावली सारखी वाटते. पृथ्वीवरती झाडांचे जे अस्तित्व आहे.अगदी तेच कवीच्या जीवनातील कवितेचे स्थान आहे. अगदी सहज नैसर्गिकपणे कविता मनात अंकुरत असल्याची भावना कवीच्या काव्यनिर्मितीचे स्वरूप विशद करते. आपली कविता ही नेमकी कुणासाठी आहे ? याचे उत्तर 'या शुभ्र कागदासाठी 'या कवितेतून कवी देतो.
"ही कविता
आपल्या कोरड्या तळाचे सुस्कारे ऐकणाऱ्या उद्ध्वस्त आडासाठी आहे ही कविता
खोलवर ओल शोधून
थकलेल्या हताश झाडासाठी आहे"
(उन्हाच्या कटाविरुद्ध पृष्ठ ७२)
आपली कविता ही मनाच्या कोरड्या तळातून शब्दरूप घेऊन येते. जगण्याचे प्रामाणिक सुस्कारे आपल्या कवितेतून येतात. हे प्रामाणिक सुस्कारे ऐकणाऱ्या उद्ध्वस्त आडासाठी आहेत. स्वतःचं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी आतोनात धडपडणाऱ्या माणसाचे प्रयत्न म्हणजे आपली कविता होय . ही जाणीव कवीने कवितेतून मांडली आहे.
॥ ३ ॥
कवी आपली कविता कोणासाठी आहे ? हे मांडताना म्हणतो,
"ही कविता
आटलेल्या झऱ्यासाठी
तुटलेल्या तार्यासाठी
एकांतात केलेल्या
निरार्थक हातवाऱ्यांसाठी आहे "
(उन्हाच्या कटाविरुद्ध पृष्ठ ७२)
आपली कविता ही उपेक्षितांसाठी आहे. ज्यांच्या स्वप्नांचे ,आशा - आकांक्षांचे आभाळ चोरीला गेले आहे. त्यांच्यासाठी आपली कविता आहे. असे कवीला वाटते.आटलेल्या झऱ्यासाठी ,तुटलेल्या तार्यासाठी , आणि एकांतात केलेल्या निरर्थक हातवाऱ्यांसाठी आपली कविता आहे. ही जाणीव कवितेच्या प्रेरक तत्त्वांचा वेध घेणारी आहे.
" ही कविता आहे
कफनाआडच्या
निर्घृण नि:शब्दतेसाठी
आहे ही कविता
कफनासारख्या
या शुभ्र कागदासाठी "
(उन्हाच्या कटाविरुद्ध पृष्ठ - ७२)
आपली कविता ही कफनाआडच्या , निर्घृण नि:शब्दतेसाठी आहे. काही भावना संवेदना शब्दातीत असतात. या भावना , संवेदना केवळ काळजाच्या स्पंदनातून जाणवतात. या कफनासारख्या शुभ्र भावना अतिशय नितळपणे या कवितेतून अभिव्यक्त होतात.
॥ ४ ॥
मराठी कवितेत स्वतःच्या काव्य निर्मिती प्रक्रियेविषयीची संवेदना फार कमी प्रमाणात अभिव्यक्त झालेली आहे. नागराज मंजुळे आपण कविता का लिहितो ? कुणासाठी लिहितो ? कशासाठी लिहितो ? कधी लिहितो ? याविषयी अतिशय सजगपणे आपल्या कवितेतून भाष्य करतात. उपेक्षित , वंचितांच्या जगण्याला शब्दबद्ध करणारी ही कविता कमालीची व्यक्तिगत तर दुसऱ्या बाजूने समष्टीची कविता आहे. समकालीन समाज वास्तव ,त्यातील विविधांगी जीवनपटाला या कवितेतून अविष्कृत होतो. जागतिकीकरणाने सर्वसामान्य माणसांच्या अस्तित्वच शून्यवत केले आहे. एकूण कणा मोडलेल्या गर्भगळीत माणसांचा अगतिकपण या कवितेतून येते.
कवी लिहितो ,
"आत्महत्याऐवजी
मी पडून राहिलो रात्ररात्र
टीव्हीच्या अश्लील उजेडात
एम टीव्ही ,स्टार मुव्ही ,डिस्कवरी .... वहात गेलो वाहिन्यातून
अन दचकलो झुरमुळणारा पांढरा मलूल स्क्रीन पाहून
काळजातल्या दुखऱ्या रिक्ततेसारखा लांडग्यांच्या झुंडीतून सुटून
पळत सुटावं पाडसानं तसा
मी पळत सुटतो गर्भगळीत
माणसामाणसाआड दडतो "
(उन्हाच्या कटाविरुद्ध पृष्ठ -७०)
जागतिकीकरणात टीव्हीच्या माध्यमामुळे लोक स्वतःच दुःख विसरून जातात. वाहिन्यांच्या सुळसुळाटात माणसं टीव्हीच्या स्क्रीनला चिकटून राहतात. परंतु कवीचं मन या सगळ्यात रमत नाही. भांडवलदारांच्या झुंडी लांडग्यांच्या रूपात वावरत आहेत. या झुंडीपासून बचाव करण्यासाठी कवी माणसांच्या आड दडतो. परंतु या भय घेऊन जगणाऱ्या माणसांचे असणे कवीने अचूकपणे टिपले आहे. जागतिकीकरणाच्या युगात जाहिरातींचे स्थान महत्त्वाचे आहे. मुळात आजचे जग हे जाहिरातीचे जग आहे. आपलं मन कुणापुढे मांडावं. या भ्रमात असणारा कवी म्हणतो , "जाहिरातींच्या या बोलघेवड्या युगात कोण ऐकेल माझ्या स्पंदनांची विराणी आणि मी तर कुठवर
काळीज काढून ठेवावं कुणाकुणाच्या तळहातावर "
(उन्हाच्या कटाविरुद्ध पृष्ठ - ७१)
आपल्या स्पंदनांची विराणी ऐकण्यासाठी कुणालाच वेळ नाही. आजच्या जगात सगळा जाहिरातींचा बाजार आहे. स्वतःचे सत्व हरवत जाणाऱ्या समाजात आपण कुठपर्यंत स्वतःला सिद्ध करत राहावं. असा प्रश्न कवीला पडतो .
नागराज मंजुळे यांच्या कवितेतून गरिबी ,दारिद्र्य ,बेकारी यांचे अतिशय वास्तववादी चित्रण येते. समकालीन वास्तव मांडताना कवी म्हणतो , "उपचाराअभावी
विझत चाललेले आईचे डोळे
खचलेला आशाळभूत बाप
भूक ... बहीण ... हुंडा
डिग्री .... नोकरी..... वशिला
लाच "
(उन्हाच्या कटाविरुद्ध पृष्ठ - ३५ ) दवाखान्यात नेण्यासाठी घरातल्या माणसांकडे पैसे नाहीत. त्यामुळे अत्यंत जवळच्या माणसाचं मरण डोळ्यांनी अनुभवणारी माणसं काळजात रूतून बसतात. अतिशय कमी शब्दात समकालीन जगण्यातील अस्वस्थता ,आगतिकता भेदकपणे कवीने मांडली आहे. समकालीन जगण्यातले तीव्र प्रश्न एका एका शब्दातून प्रत्ययी होत घायाळ करतात. ही कविता समकालीन वास्तवाला नेटकेपणाने शब्दबद्ध करते.
समकालीन वास्तवातील भयानता , काळजाला पीळ पाडणारे अनुभव चित्रमय शैलीत नागराज मंजुळे कवितेतून मांडतात. काही प्रश्न कवितेत ते लिहितात ,
"मुलीच्या शाळेचा खर्च ,आईची औषधं
दलालाचे इतके अन् खाटेचे भाडं वेगळच
तुम्ही करून पाहिला आहे का कधी वेश्येचा संभोगरत हिशोब "
(उन्हाच्या कटाविरुद्ध पृष्ठ - ६३)
हा वेश्येचा संभोगरत हिशोब अंगावर येणार आहे. शोषित घटकाच्या जगण्यातले वास्तव अस्वस्थ करणारे आहे. एक वेश्या गिऱ्हाईका सोबत संभोग करत असताना मनात कोणता हिशोब मांडते. हा हिशोब काळजाच्या तळाला हलवून जाणार आहे. वेश्येचा खर्च कधी आपला होऊन जातो. हे आपल्यालाच कळत नाही. समाजातील दुर्लक्षित घटकांचे जगणे नागराज मंजुळे यांच्या कवितेतून ठळकपणे व्यक्त होते.
भुकेचा वास्तव मांडताना कवी म्हणतो ,
" ' बा 'ची वाट पाहून
रात्र पडते पोटात पाय घेऊन पोरांसहित तेव्हा
भुकेजल्या चुलीसाठी काटे तोडताना तळहातात मोडलेला काटा उपसून मुक्यानंच टिपं गाळणारी
आश्राप माझी ..... सोशिक कविता "
( उन्हाच्या कटाविरुद्ध पृष्ठ - ३१ )
पोटात भूक घेऊन झोपणारी लहान मुलं या कवितेतून येतात. भुकेजल्या चुलीसाठी कुणी तरी काटे तोडत राहते. या गरीब माणसांची भूक आपल्या आश्राप कवितेतून नागराज मंजुळे मांडतात.
गरिबी आणि श्रीमंती यातील दरी मांडताना कवी लिहितो ,
" छत्रपती शिवाजी पुलापर्यंत
तुझी फोर व्हीलर येऊ शकेल
खाली झोपडपट्टीत अजूनही
एक पाऊलवाटच नाक धरून उकिडर्यातून वाट काढत खाली येते पुलावरून पहाशील तेव्हा महानगरपालिकेच्या सार्वजनिक शौचालयाभोवती
विटक्या पत्र्यांची मान पाठीत रुतलेली खुजी घरे मोकळ्या आगपेट्यांच्या ढिगऱ्यांसारखी दिसतील "
( उन्हाच्या कटाविरुद्ध पृष्ठ -१० )
'तुझ्या येण्याअगोदर एक पत्र ' या कवितेत कवीने आपल्या प्रियसीला लिहिलेले पत्र आहे. प्रियसीने आपल्याला भेटण्यास आपल्या घरी येण्याअगोदर काही गोष्टी समजून घ्याव्यात. असे नायकाला वाटते. अतिशय कथनात्मक पद्धतीने कवीने हा अनुभव मांडला आहे. प्रियसीची फोर व्हीलर केवळ छत्रपती शिवाजी पुलापर्यंतच येऊ शकते. झोपडपट्टीत जाणारी वाट अजूनही उकिरड्यातून जाते. विटक्या पत्र्यांची मान पाठीत रुतलेली खुजी घरे मोकळ्या आगपेट्यांच्या ढिगार्यासारखी दिसतात. गरिबी , दारिद्र्य , झोपडपट्टीतील जगणं अतिशय थेटपणे कवितेतून उभे राहते. प्रियसीचा इंडिया आणि कवीचा भारत यांना विभागणारी व्यवस्था कवीने कवितेतून उभी केली आहे. आपल्या स्वतःच्या दहा बाय दहाच्या घरात प्रेयसीचा जीव गुदमरू शकतो. नायकाच्या घरातील कण्हत - धुपत पेटणारी चूल ,काळा कुळकुळीत चहा सगळं किळसवाणं वास्तव कवीने कवितेतून चित्रमय शैलीतून चित्रित केले आहे.
॥ ॥
केवळ गरीबी ,उपासमारी ,दारिद्र्य कवीच्या वाट्याला येत नाही. तर त्या जोडीला जातीयतेचे चटके कवीच्या वाट्याला येतात. या चटक्यांचे चित्रण कवीने आपल्या कवितेतून ताकदीने उभे केला आहे.
प्रियकर आणि प्रियसी यांच्या नात्यात जात ,धर्म येतो. आणि ती त्याचे प्रेम नाकारते. कवी लिहितो ,
"पुढे एक समीकरणच झालं
ती आणि पाऊस
पण अचानक एक दिवस
तिच्या घरात वाद उसळला
पावसात भिजल्यावरून ..... पावसाच्या जातीवरून ..... धर्मावरून चिखलमाखल्या वाटेला भिऊन की काय
तिने पावसात भिजल्याचं साफ नाकारलं "
( उन्हाच्या कटाविरुद्ध पृष्ठ २९ )
प्रियसीने प्रेम नाकारणे जीवघेणे असते. कवीने हा अनुभव ताकदीने या कवितेत उभा केला आहे. पावसाला ही जातीचा ,धर्माचा रंग असावा का ? तिने शेवटी पावसात भिजल्याचा साफ नाकारले. यातून नायकाचे जीवन पाचोळा होऊन जाते. मरणकाळा सोसण्यासाठी ती त्याला एकट्याला वाऱ्यावर सोडून निघून जाते. यातील करूण वास्तव कवीने या कवितेतून मांडले आहे.
भूतकाळातील प्रेमभंगाचे दुःख अतिशय तरलपणे कवीने आपल्या कवितेतून मांडले आहे. 'मागे मागे तू ' या कवितेत भूतकाळातील तिच्या आठवणी अतिशय अस्वस्थ करणारे आहेत. फ्रॉकची ओटी करून फुले वेचताना ती नायकाकडे गजरा मागते. वासना विरहित प्रेम अनुभव या कवितेतून कवीने उभा केला आहे. तिच्या आठवणींच्या फुलांची ओटी उधळून गेल्याची खंत कवी व्यक्त करतो. कवीच्या मनातले तिचे असणं स्मृतीतून परागंधा होते. यात काहीतरी मूल्यवान हरवल्याचं नोंद कवीने या कवितेतून केली आहे. कवी म्हणतो , "आता तुझा चेहरा आठवत नाही नुसताच गंध येतो ओटीतल्या फुलांचा गजऱ्यासाठी पुढे केलेला हात असतो आणि नुसताच किणकिणाट बांगड्यांचा
आता फुल बरसात असतील नसतील तिथं झाडही असेल नसेल "
(उन्हाच्या कटाविरुद्ध पृष्ठ १६ )
ही कविता भूतकाळातील अवघड वयातली मनोभावना मांडणारी कविता आहे. आता तिचा चेहरा नीट आठवत नाही. परंतु तिच्या ओटीतल्या फुलांचा गंध मात्र अभिशापासारखा पाठलाग करत राहतो. आठवणींचा पाठशिवणीचा खेळ मनात काहूर माजवत राहतो. यातील अस्वस्थ मानसिकता कवीने कागदावरती अचूकपणे उतरवली आहे. एकीकडे तिचा चेहरा नीटसा आठवत नाही. तर दुसरीकडे तिचा चेहरा प्राणांतिक आठवत राहतो. तिच्या आठवणींच्या यात्रेत हरवलेला एक निरागस माणूस नागराज मंजुळे यांच्या कवितेतून उभा राहतो. कवी लिहितो ,
" तुझा चेहरा आठवतोय प्राणांतिक
तर तुझे हजार रात्रींच्या झोपेने जडावलेले श्लील डोळेच
पुरासारखे वेढतायेत मला चहूबाजूंनी "
( उन्हाच्या कटाविरुद्ध पृष्ठ - १४ )
प्रियसीचा हजार रात्रींच्या झोपेने जडावलेले डोळे नायकाला आठवणींच्या पुरात वेढतायेत. तिच्या देहाच्या सर्व सीमा ओलांडून आतोनात जवळ आलेली प्रियसी आठवणींचा डोह घेऊन येते. या अस्वस्थ डोहात स्वतःच अस्तित्व नगण्य झालेला नायक रूक्मांगंदा असणाऱ्या तिच्या आठवणींचा भाग बनतो.
उन्हाच्या कटाविरुद्ध या काव्यसंग्रहातील प्रतीके प्रतिमांचे स्वरूप : -
एखाद्या कवीच्या कवितेतून येणाऱ्या प्रतिमा , प्रतीके ,प्राकथा ,उपरोधकता व उपहास , नादमयता ,लयबद्धता , सुचकता इत्यादी वाङ्मयीन मूल्यामुळे ती कविता काळाच्या कसोटीवर श्रेष्ठ ठरत असते. नागराज मंजुळे यांच्या उन्हाच्या कटाविरुद्ध या कवितासंग्रहात प्रतिमा , प्रतीके यांचे अतिशय नाविन्यपूर्ण उपयोजन केलेले आहे.कवितेची सुई , पाठीत रुतलेली खुजी घरे ,बोन्साय ,स्वप्नबीजं , वांझोटी भूमी ,स्वप्नांचा खत-पाणी , चुरगळलेली माणसं 'रुक्मगंधा , कातरवेळी 'दर्शनातुर डोळे ,
दुर्बोध नृत्यमग्न लिपी , मायाळू अंधार , सावळी सावळी ,निद्रिस्त लावण्यपाश , स्वप्नांचा खच , बेइमान फुलपाखरू , निष्पर्ण झाड ,स्वप्नाळू चांदणी , आळवावरचं पाणी , पेंगणारी घरे , विरहिणी नागीन ,हेतूंचे जंतू , हातवीर्य सूर्य , चौथं पान पळसाला ,अनैतिक संस्कृती ,जन्मंधांच्या दृष्टीभर , पाऊसस्पर्श , मरणकाळा , पाचोळा , कातर सांजसूर्य , उपाशी प्रश्न ,अवेळीचा पाऊस , नादमय सांजसुर्य , इंद्रनील जखम ,निष्पर्ण खोड , आठवआभाळ , पाऊसवेडी भूमी , भुकेचे प्रचंड कुरण ,सनकी आकाश ' गुढगर्भ अडगळीत, उखणलेल्या अंगणाला , आठवचंद्र , पडदानशीन आशय , गर्दुल्या गोसाव्यांचा वांझ आशीर्वाद , वेश्येचे उद्ध्वस्त गर्भाशय ,प्रसववेणा , बेशर्म जगणं ,ओसाडाचं गळ्यात लोढणं , उखाणलेल्या ओट्यावर ,पोरकी पाखरं , सुकलेली तुळस ,धसकटलेल्या जगण्याला ,दुःखविभोर सांज, वांझोटा धुरळा ,आयुष्याचा गारठणारा कॅनव्हास ,गाईचं मौन , इत्यादी प्रतीके , प्रतिमांचे उपयोजन नागराज मंजुळे यांच्या कवितेत येते. विशेषतः ग्रामीण जगण्यातले संदर्भ असणारे प्रतीके ,प्रतिमा त्यांच्या कवितेतून येतात. निसर्गातील शाश्वत सत्य प्रतिमा प्रतिकांमधून मांडले जाते. वैविध्यपूर्ण प्रतिमा ,प्रतीकांचा वापर हे मंजुळे यांच्या कवितेचे खास वैशिष्ट्ये सांगता येईल.
सकारात्मक ,आशावादाची मांडणी करणारी कविता :-
प्रखर वास्तवाला कवेत घेणारी नागराज मंजुळे यांची कविता सकारात्मक आशावाद मांडणारी कविता आहे. व्यवस्थेने आपल्या वाट्याला दुःख ,वेदना , शोषण दिले आहे. समतावादी जगाच्या निर्मितीचे स्वप्न पाहणारे मंजुळे यांची कविता आहे. कवी म्हणतो ,
" कधीतरी दिवस जातीलच
इथेही फुले फुलतील
स्वप्न साकारतील "
( उन्हाच्या कटाविरुद्ध पृष्ठ - १२ )
आज जी काही व्यवस्था आहे ती नक्कीच बदलणार आहे. याबद्दल कवी प्रचंड आशावादी , सकारात्मक आहे . समतापूर्ण व्यवस्था निर्माण होण्यासाठी आपण काय केले पाहिजे ? हे सांगण्यासाठी कवी लिहितो ,
"मला माझ्या स्वप्नांचं खतपाणी करून मला स्वतःलाच गाडून घ्यायला हवं माझ्या या चुरगळलेल्या माणसांसाठी "
( उन्हाच्या कटाविरुद्ध पृष्ठ - १२ )
स्वतःच्या स्वप्नांची आहुती देण्यासाठी कवी सज्ज होतो. आपल्या उपेक्षित , शोषित चुरगळलेल्या माणसांसाठी कवी गाडून घेण्याची घोषणा करतो. व्यक्तिगत स्वार्थ बाजूला ठेवून समाज परिवर्तनासाठी कवी त्यागासाठी सज्ज झाला आहे .उन्हाच्या कटाविरुद्ध गुलमोहरासारखं त्वेषानंआपण फुललं पाहिजे असे कवीला वाटते. नागराज मंजुळे यांची सकारात्मक आशावाद मांडणारी कविता मराठी कविता विश्वात आगळीवेगळी ठरते.
'उन्हाच्या काटाविरुद्ध ' या काव्यसंग्रहाला काही मर्यादाही आहेत. यामध्ये विशिष्ट अनुभवाच्या मांडणीतील तोच तो पणा जाणवत राहतो. काव्यसंग्रहातील कवितांच्या क्रमाला कोणताही मूल्यात्मक आधार नाही. कवितासंग्रहातील प्रेमानुभव मांडणाऱ्या ,व्यक्तिगत जीवन अनुभव मांडणाऱ्या ,सामाजिक आशयाच्या कविता अशी वर्गवारी करणं गरजेचं वाटतं.
प्रतिमा प्रतीकांच्या वापराबद्दलही तोच तोपणा दिसून येतो. आत्ममग्न मानसिकता कवितेतून प्रत्ययाला येते. यासारख्या काही मोजक्या मर्यादा या काव्यसंग्रहाच्या नोंदवता येतील. इ.स. २०१० नंतरच्या महत्त्वाच्या कवितेत नागराज मंजुळे यांच्या कवितेचा समावेश करावा लागतो.
नागराज मंजुळे यांना काव्य निर्मितीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा !!! धन्यवाद !!!
डॉ.गणपतराव ढेंबरे
मराठी विभाग
श्री. व्ही. एस. नाईक महाविद्यालय , रावेर ,तालुका रावेर ,जिल्हा जळगाव पिनकोड ४२५५ ०८
मोबाईल नंबर - ९४२१०८१२७० ई-मेल : dhembregr@gmail.com
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा