गुरुवार, ५ ऑक्टोबर, २०२३

इ.स.१९७५ नंतरच्या स्त्रियांच्या कवितेचे स्वरूप आणि प्रेरणा

 इ.स.१९७५ नंतरच्या स्त्रियांच्या कवितेचे स्वरूप आणि प्रेरणा 



डॉ. गणपत रामदास ढेंबरे,

मराठी विभाग,

श्री.व्ही.एस.नाईक महाविद्यालय, रावेर ,ता.रावेर ,जि.जळगाव,

पिन कोड - ४२५५०८

मोबाईल नंबर -९४२१०८१२७०

ई-मेल-dhembregr@gmail.com

इ.स.१९७५ ते इ.स.२००० या कालखंडात स्वातंत्र्यपूर्व काळात जन्मलेल्या पद्मा, इंदिरा संत या जेष्ठ

कवयित्रींपासून आजच्या उषाकिरण अत्राम या आदिवासी कवयित्रीपर्यंतच्या अनेक पिढ्यांच्या, विविध वयोगटांतल्या, विविध वर्गातून आलेल्या कवयित्रींचे काव्यलेखन प्रकाशित झालेले दिसते. या कालखंडात स्त्रियांना कुटुंबाकडून, समाजाकडून विस्तृत परिसर मिळाला. शिक्षण,वाचन भोवतीये सजग होत चाललेले सामाजिक,राजकीय वातावरण यांच्या प्रभावामुळे त्या मुक्तपणे आविष्कार करू लागल्या. आपला आविष्कार निःसंकोचपणे जगापुढे ठेवता यावा असे खुले, मोकळे सांस्कृतिक वाङ्मयीन वातावरण महाराष्ट्रातील स्त्रियांना लाभले. या काळात प्रकाशन व्यवसायही फोफावला. प्रयोगशील आणि संचारी बनला. त्यातील स्पर्धा आणि अहमहमिका वाढली. त्यामुळे काव्यसंग्रह मोठ्या प्रमाणात प्रकाशित होऊ लागले.

या कालखंडात स्वातंत्र्यपूर्व काळात जन्मलेल्या आणि स्वातंत्र्योत्तर काळात जन्मलेल्या कवयित्री कविता लिहित आहेत. परंतु अभ्यासाच्या सोयीसाठी इ.स. १९७५ नंतर ज्यांचे काव्यलेखन वैशिष्ट्यपूर्ण आहे अशाच कवयित्रींचा विचार केला आहे. इंदिरा संत, शांता शेळके, अनुराधा पोतदार, शिरीष पै, निर्मला देशपांडे, पद्मा, वृंदा लिमये, संजीवनी मराठे, पद्मा लोकूर, सुहासिनी इर्लेकर,सरिता पदकी,  अंजली ठकार या कवयित्रींचे काव्यसंग्रह इ.स. १९७५ नंतर प्रकाशित झाले असले तरी ते अभ्यासासाठी विचारात घेतलेले नाहीत. इ.स. १९७५ नंतर प्रभा गणोरकर,रजनी परुळेकर,वासंती मुजुमदार, उषा मेहता,सुशीला पगारिया, सुलभा हेर्लेकर,अनुराधा पाटील, मलिका अमर शेख, नीरजा, अंजली कुलकर्णी, आसावरी काकडे, हेमा लेले,अश्विनी धोंगडे,मृणाल चिंचाळकर,ज्योती लांजेवार, अरुणा ढेरे,यशोधरा साठे,हेमा अंतरकर, सुनंदा भोसेकर,प्रज्ञा लोखंडे,संजीवनी खोजे, सुमती लांडे,श्रद्धा पराते, संजीवनी बोकील इ.कवयित्रींचे काव्यलेखन आकार घेऊ लागले. कवितेविषयीच्या जाणिवा,कवितेतून व्यक्त होणाऱ्या वृत्तिप्रवृत्ती आणि कवितेचे स्वरूप या बाबतीत पूर्वी कधीही आढळले नव्हते,एवढे वैविध्य या स्त्रियांच्या काव्यलेखनात आढळते. या काळातल्या कवयित्रींनी आपल्या आधीच्या व समकालीन  कवयित्रींचे संस्कार घेतले.त्याचबरोबर आशय आणि अभिव्यक्ती या बाबतीत आपल्या स्वतःच्या नव्या वाटा शोधण्याचाही मनःपूर्वक प्रयत्न केलेला दिसतो. इ.स.१९७५ नंतरच्या स्त्रियांच्या कवितेविषयी प्रभा गणोरकर लिहितात,"स्वातंत्र्योत्तर काळात इ.स. १९६० नंतर आणि पुढे इ.स. १९७५ नंतर भारतीय समाजजीवनात जी स्थित्यंतरे होत गेली,समाजवास्तव बदलत गेले त्यांचेही प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम या काळातल्या कवितेवर होत गेलेले दिसतात आणि ते नव्या पिढीच्या कवयित्रींच्या कवितेतून दिसतात असे नाही, तर इ.स. १९६० पर्यंतच्या काळात सुप्रतिष्ठित झालेल्या इंदिरा संत किंवा शांता शेळके, शिरीष पै इ. कवयित्रींच्या कवितेतूनही जाणवतात. बदलत्या जीवनजाणिवा आणि कवितेविषयीच्या बदललेल्या कल्पना यांचे कवितेत उमटलेले मुख्य चिन्ह म्हणने पूर्वी कविता व्यक्ती आणि समाज,व्यक्ती आणि निसर्ग,व्यक्ती आणि प्रीती किंवा ईश्वर अशा सुट्या, विलग अनुभूतींमध्ये विभागली जात असे.१९६० नंतर कवितेतील अनुभूतीचे स्वरूप असे एकारलेले दिसत नाही.अनेक बहुपदरी अनुभव एकत्रितपणे व्यक्त करणारी ही कविता आहे. तिच्यातील संवेदनाविश्व नुसते व्यापकच नव्हे, तर गुंतागुंतीचेही आहे. कवितेचे हे बदललेले स्वरूप ज्येष्ठ पिढीच्या कवयित्रींनाही जाणवलेले दिसते. यंत्रयुगामुळे निर्माण झालेली भीषण वास्तवता त्यांना विशेष भेडसावत नसावी. ह्या वास्तवतेचे दर्शन घडविणाऱ्या बीभत्साचेही आवाहन त्यांच्यापर्यंत पोचत नसावे, जीवनात जे सत् आहे व सुंदर आहे, त्याच्यावरील त्यांच्या श्रद्धेला अद्यापि ढळ पोहोचलेला दिसत नाही... आपल्या जीवनाबाहेरील जगताचे कोडे सोडविण्याचा प्रयत्न त्या सहसा करत नाहीत...' असे ज्या या ज्येष्ठ कवयित्रींबद्दल रा.श्री.जोग यांनी म्हटले होते त्या कवयित्रींची १९७५ नंतरची  कविता या मर्यादा ओलांडणारी आहे, असे निश्चितच म्हणता येईल. अर्थात आपल्या पिंडधर्माशी,प्रकृतीशी, अनुभवांशी व जीवनजाणिवांशी त्यांची कविता प्रामाणिकच राहिली आहे, तरीही बदलत्या काळानुसार  बदललेल्या वास्तवाचा वेध त्यांनी आपल्या परीने घेतलेला दिसतो. हे वास्तव नेहमीच सामाजिक होते असे नाही. किंबहुना सामाजिक वास्तव एकूण कवयित्रींच्या कवितेतून थेटपणाने क्वचित अवतरले आहे. कवयित्रींच्या कवितेतील वास्तव हे त्यांच्या भावविश्वात प्रतिबिंबित झालेले,अप्रत्यक्ष वास्तव आहे. बदललेल्या सामाजिक वास्तवाविषयीच्या कधी त्या प्रतिक्रिया आहेत. पूर्वीच्या आत्मकोषातून बाहेर पडल्याची ती खूप आहे. "१


इ.स. १९७५ नंतरच्या स्त्रियांच्या कवितेचे स्वरूप वरील विवेचनातून आपल्या लक्षात येते.इ.स.१९७५ नंतरचे सांस्कृतिक पर्यावरण स्त्रीच्या अभिव्यक्तीसाठी पोषक ठरत गेले आणि कविता हे अभिव्यक्तीचे सहज रूप असल्यामुळे स्त्रियांच्या काव्यसंग्रहांची निर्मिती मोठ्या प्रमाणावर झाली. इ.स.१९७५ हे 'आंतरराष्ट्रीय स्त्री वर्ष ' म्हणून घोषित झाल्यामुळे विविध गटांमध्ये तसेच विविध देशांमध्ये विखुरलेल्या स्त्रियांचे वैचारिक आदान-प्रदान सुरू झाले. त्यातून स्त्रीमुक्तीच्या तत्त्वज्ञानाचे नवे विचार,नव्या विचारांच्या संदर्भात सामाजिक वास्तवाचे नवे भान अशी जागृतता येऊ लागली.स्त्रियांच्या काव्यामधून नवी संवेदनशीलता व्यक्त होऊ लागली. स्त्रियांसाठीची नियतकालिकेही निघू लागली.इ.स. १९७५ पूर्वीही काही कवयित्रींनी नवी जाणीव अधूनमधून व्यक्त केली होती. पण एक प्रवाह म्हणून लक्ष वेधणारी कविता मुख्यतः इ.स.१९७५ आणि नंतर दिसते.


या कवितेचे स्वरूप प्रभा गणोरकर सूत्रबद्ध पद्धतीने व्यक्त करतात. त्या लिहितात, "इ.स. १९७५ नंतरच्या कवितांतही आत्माविष्काराची जाणीव अधिक प्रभावी आहे हे स्पष्ट  आहे. तथापि इ.स.१९७५ पर्यंत कवितांमध्ये क्वचितच आढळणारे सामाजिक संदर्भ तीव्र असे सद्य:स्थितीचे भान इ.स. १९७५नंतरच्या अनेक कवयित्रींनी प्रकट केलेले आहे. किंबहुना या काळातली स्त्रियांची कविता जी वैशिष्ट्ये घेऊन अवतरली आहे त्यांचा,त्यांच्याभोवतीच्या समाजस्थितीशी जवळचा संबंध आहे. या कवयित्री आणि त्यांची कविता त्यांच्या अस्तित्वविषयक प्रश्नांशी नाळेने जोडलेल्या आहेत. इ.स.१९७५ नंतरच्या कालखंडातील स्त्रियांच्या कवितेत मानवी संबंधामध्ये आलेले दुरावा, .बदल स्त्री- पुरूषांच्या नात्यांमध्ये झालेला बदल,कवीला हस्तिदंती मनोऱ्यात राहून चालत नसते याचे आलेले भान,अनेक प्रश्नांनी ग्रस्त असलेल्या विखुरलेल्या, बुजबुजलेल्या, कोरड्या, बुजबुजलेल्या, कोरड्या,अलिप्त मानवसमूहात वावरताना येणारे असह्य एकाकीपण आणि परात्मता ,भोवतीच्या आर्थिक-सामाजिक स्तरांमधल्या मानवी जीवनाकडे डोळसपणे पाहण्याची वृत्ती,स्वतःच्या माणूस म्हणून, स्त्री म्हणून असणाऱ्या जगण्याचा, अस्तित्वाचा विचार करताना पडणारे प्रश्न,वाटणारे भय, येणारे नैराश्य आणि उद्वेग, शहरे- महानगरे,खेडी यात जगणाऱ्या माणसांना आलेली अवकळा, अवतीभोवती सतत अस्वस्थ करणाऱ्या घटनांचे मनावर उठणारे ओरखडे,दहशत,हिंस्त्रता,दंगली यांनी  ग्रासलेला रक्तपिपासू वर्तमानकाळ, विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात येऊन सुटू न शकलेले सामाजिक प्रश्न, अशा अनेक पदरी जाणिवांचे संदर्भ सतत येत राहतात. ते प्रकट करताना या काळातील स्त्रीची कविता शब्दांचा, प्रतिमांचा अत्यंत प्रभावी वापर करताना दिसते. " २


वरील विवेचनातून इ.स.१९७५ नंतरच्या स्त्रियांच्या कवितेचे स्वरूप थोडक्यात विशद होते.सामाजिक प्रश्नांची जाण असलेली ही कविता आहे.विशेषतः स्त्रियांच्या जीवनाला केंद्रवर्ती ठेवणारी ही कविता आहे. स्वतःचा आत्मशोध घेणारी ही कविता आहे. आत्मभान आल्यामुळे स्वतःच्या जीवनाची उचित समीक्षा ही कविता करते. व्यवस्थेला प्रश्न विचारणारी, अस्वस्थ मनाचे संवेदनशीलपणे प्रकटीकरण करणारी ही कविता आहे. स्वतःचा वेगळा चेहरा असलेली ही कविता स्वतःची भाषाशैली, प्रतीके, प्रतिमांची मांडणी करते. स्त्रियांच्या प्रश्नांबरोबरच स्त्रीविशिष्ट अनुभवाच्या प्रकटीकरणाला ही कविता महत्त्व देते.  आपल्या अस्तित्वाचा विशेष शोध हे या कवितेचे वैशिष्ट्य आहे. अशा प्रकारे आपणाला इ.स.१९७५ नंतरच्या स्त्रियांच्या कवितेचे स्वरूप सांगता येईल.


इ.स.१९७५ नंतरच्या स्त्रियांच्या कवितेच्या प्रेरणा :-


समकालीन समाजवास्तव, झपाट्याने बदलणारे समाजजीवन,शिक्षणाचा होणारा प्रसार,बदलती आर्थिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि जातीय समीकरणे, समाजात असलेले स्त्रीचे स्थान, स्त्री म्हणून येणारे विविध पातळ्यांवरील अनुभव अशा अनेकविध घटकांचा विचार कवयित्रींच्या निर्मितीप्रेरणा मांडताना करावा लागतो. इ.स.१९७५ नंतर आपल्याकडे जी स्त्रीवादी विचारसरणी आढळते ती पाश्चात्य स्त्रीवादी चळवळीतून आणि स्त्रीवादी दृष्टीकोनातून प्रेरणा घेऊन आलेली असली तरी त्यामागे भारतीय स्त्रीमुक्तीचा वैचारिक स्रोत त्याला बळ देणारा ठरतो.म.फुले,पं.रमाबाई,आगरकर, महर्षी कर्वे,डॉ.आंबेडकर,म.गांधी, यांनी येथील परिस्थितीतून स्त्रियांना गुलामगिरी,शोषण,समाजातील हीन दर्जा यातून बाहेर काढून समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला.भारतीय स्त्रीच्या विकासामध्ये फार मोठा वाटा प्रथम पुरुषांनीच उचलला. पाश्चात्य स्त्रीवादामुळे प्रभावित झालेल्या भारतीय स्त्रीचळवळीचा उगम १९व्या शतकातील समाजसुधारणांमधून झालेला दिसून येतो.एकोणिसाव्या शतकामध्ये स्त्री शिक्षणाला महत्त्व

दिले गेले. शिक्षणामुळे स्त्रीला तिच्या सामर्थ्याची जाणीव झाली.आधुनिक मराठी कवितांच्या स्त्रियांच्यासंवेदनशीलतेचा आविष्कार वेगवेगळ्या प्रकारे, वेगवेगळ्या रूपात झाला आहे.भिन्न प्रकृतिधर्माच्या कवयित्रींवर स्वीवादाचा परिणाम वेगवेगळ्या प्रकारे होणे स्वाभाविक आहे.सर्व स्वीवादी जाणिवेचे प्रकटीकरण करणाऱ्या कवयित्रींच्या लेखनामागे काही समान प्रेरणा असलेल्या दिसतात.या समान प्रेरणा म्हणजे भारतीय समाजसुधारकांच्या चळवळी, स्त्रीमुक्तीची चळवळ,शिक्षणाचा प्रसार,म.फुले यांचे कार्य य विचारधारा, वाङ्मयीन चळवळींच्या उदयाची प्रेरणा इत्यादी प्रेरणा आपणाला ठळकपणे सांगता येतील.

 स्त्रीमुक्ती चळवळ :-

स्वातंत्र्योत्तर काळात युवकांच्या अनेक चळवळी उदयास आल्या. ह्यामध्ये दलित तरुणांच्या चळवळीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. दलितांनी जातीअंताच्या लढ्यासाठी आक्रमक आणि विद्रोही पवित्रा घेतला. समाजातील अनेक स्तर कार्यप्रवण बनले.सन १९६०नंतर स्त्रियांची चळवळ हळूहळू संघटित होऊ लागली. सन १९७५ ते १९८५ ह्या आंतरराष्ट्रीय महिला दशकात स्त्रियांच्या हक्क आणि अधिकारांविषयी जागृती निर्माण करण्याचे प्रयत्न झाले. ह्या दशकात स्त्रीमुक्ती चळवळीचा पाया रोवला गेला.स्त्रियांना आपला जोडीदार निवडण्याचे स्वातंत्र्य असायला हवे, आपल्या शरीरावर आपला अधिकार असायला हवा, नवऱ्यालाही 'नाही' म्हणण्याचा अधिकार हवा, स्त्रीला एक व्यक्ती म्हणून पुरुषाच्या बरोबरीने, समानतेने वागवले पाहिजे अशा प्रकारचे विचार स्त्रीमुक्ती चळवळीत मांडले गेले. ही चळवळ सुरूवातीला पुरुषांच्या वर्चस्वाविरूद्ध टीका करण्यात गुंतली.परंतु पुढे चळवळ या विचारातून बाहेर पडून व्यापक झाली.


उच्चवर्गीय स्त्रिया व कनिष्ठवर्गीय स्त्रिया त्या-त्या वर्गातील पुरूषांपेक्षा दुय्यम असतात. त्यांचे शोषण होत असते.त्यांच्या शोषणाचे स्वरूप वर्गीय स्थानाप्रमाणे बदलते. कनिष्ठवर्गीय स्त्रीस वर्गीय शोषण सहन करावे लागते.म्हणूनच स्त्री-मुक्ती चळवळीला वर्गसमाज नष्ट करण्यामध्ये रस आहे. त्याचबरोबर पुरुषी वर्चस्व नष्ट करण्यामध्येही रस आहे.हे पुरुषी वर्चस्व केवळ काही दुष्ट बुद्धीच्या बलात्कारी,हिंसक पुरूषांमुळे निर्माण झालेले नसून या समाजात अस्तित्वात असलेल्या सर्व रचनेतूनच हे पुरुषी वर्चस्व आपोआप अस्तित्वात येते आणि म्हणूनच ते मानसिकतेचा, संस्काराचा भाग होऊन बसते. जातिव्यवस्था जशी जनमानसात रूजून बसलेली असते तशी पुरुषप्रधान व्यवस्था सुद्धा पुरूषांच्या व स्त्रियांच्याही मनात घट्ट बसलेली असते आणि म्हणूनच ती नैसर्गिक वाटते.वरील विचारांना छेद देण्यासाठी स्त्रीवादी चळवळीचा जन्म झाला. स्त्रियांना व्यक्ती म्हणून योग्य न्याय मिळवून देण्यासाठी जगभरात स्वीवादी चळवळ आकार घेऊ लागली. स्त्रियांना वेगवेगळ्या प्रकारचे अधिकार मिळावेत या मागणीसाठी काम करणारे स्त्रियांचे गट व संघटना तयार होऊ लागल्या.युरोपात प्रथम स्त्रीवादी चळवळ आकाराला आली.

भारतातील स्त्री-मुक्ती चळवळीची सुरूवात पुरूष समाजसुधारकांकडून झाली.राजा राममोहन रॉय,गोपाळराव हरी देशमुख,महादेव गोविंद रानडे, गोपाळ गणेश आगरकर,म.ज्योतीबा फुले,म.गांधी, धोंडो केशव कर्वे,डॉ. बाबासाहेब आंबेडकर या समाजसुधारकांनी स्त्री-मुक्तीचा विचार मांडला.यातून भारतात स्त्रीमुक्ती चळवळीला प्रेरणा मिळाली. स्वातंत्र्योत्तर काळात स्त्रियांसाठी अनेक गोष्टी अनुकूल झाल्या.विविध कायदे हे स्त्री सुधारणांसाठी निर्माण झाले.अनेक राजकीय पक्षांनी स्त्रियांना आपल्या पक्षात सामावून घेतले. सामाजिक स्तरावर विविध आंदोलनाचे नेतृत्व स्त्रियांनी केले. यातून स्त्रियांच्या मनात आत्मविश्वास निर्माण झाला. आत्मभानातून स्त्रियांनी स्त्रीवादी चळवळीला बळकट करण्यासाठी विविध साधनांचेउपयोजन सुरू केले. या स्त्रीवादी विचारधारेतून, स्त्री-मुक्ती चळवळीतून स्त्रीवादी साहित्याने वैचारिक बळ

प्राप्त केले.स्त्रियांच्या साहित्याला एक निश्चित अशी दिशा स्त्री-मुक्ती चळवळीतून प्राप्त झाली.म्हणून इ.स.१९७५ नंतरच्या स्त्रियांच्या काव्यलेखनामागे स्त्री-मुक्ती चळवळ ही एक प्रेरणा ठरते.काव्यातील आशय व अभिव्यक्तीला या चळवळीतून बळ मिळाले.आत्मशोध घेण्यास या चळवळीमुळे कवयित्रींना प्रेरणा मिळाली.एकूणच इ.स.१९७५ नंतरच्या स्त्रियांच्या साहित्यलेखनामागे स्त्री-मुक्ती चळवळीचा इतिहास, परंपरा,विचारधारा,कार्य ही एक प्रधान प्रेरणा आहे असे म्हणता येईल.


महात्मा फुले यांचे कार्य व विचारधारा:-


महात्मा ज्योतीबा फुले ह्यांनी केलेले स्त्रियांसाठीचे समाजकार्य क्रांतिकारक ठरते.महात्मा ज्योतीबा फुले ह्यांनी इ.स.१८४८ मध्ये पुण्यात मुलांसाठी पहिली शाळा सुरू केली.स्वतःची पत्नी सावित्रीबाई फुले ह्यांना घरी शिकवून शिक्षिका बनविले.महात्मा फुले ह्यांनी विधवांचे केशवपन केले जाऊ नये म्हणून न्हाव्यांचा संप घडवून आणला.अनैतिक संबंधातून गरोदर असलेल्या महिलांसाठी त्यांनी प्रसुतीगृह चालवले.महात्मा फुले यांच्या कार्याविषयी बाबा आढाव म्हणतात, "स्त्री-शिक्षणाबरोबरच जोतीरावांनी स्त्री-स्वातंत्र्याचा कैवार  घेतलेला आहे. काही लोभी पुरूष आपल्यास जास्ती सुख व्हावे,अथवा आपल्या घरात दोनदोन,तीनतीन लग्नाच्या बायका करून नांदतात व त्याविषयी आपण काही हेकड पुरूषांनी केलेल्या धर्मग्रंथांचा आधारही दाखवितात,त्याचप्रमाणे जर काही स्त्रियांनी आपल्या मनःकामना तृप्त करण्याकरिता दोनदोन,तीनतीन लग्नाचे नवरे करून एक घरात नांदू लागल्यास आपणा सर्व पुरूषांस त्याविषयी काही विधिनिषेध वाटणार नाही काय ?"

'तुम्हास जर स्त्रियांचे तसे आचरण आवडणार नाही,तर आपणा सर्व पुरूषांचे त्याच मासल्याचे आचरण स्त्रियांस तरी कसे आवडेल? कारण स्त्री आणि पुरूष एकसारखे.एकंदर सर्व मानवी अधिकारांचा उपभोग घेण्यास पात्र असता स्त्रियांस एकतऱ्हेचा नियम लागू करणे व लोभी,धाडशी पुरूषांस दुसरा नियम लागू करणे हा निव्वळ पक्षपात होय. उदाहरण,'स्त्रियांचे ते पुरूषांचे आणि पुरुषांचे ते हुं हुं' त्याचप्रमाणे काही धाडशी पुरुषांनी आपल्या जातीच्या स्वार्थासाठी बनावट मतलबी धर्मपुस्तकात स्त्रियांविषयी असे आपमतलबी लेख करून ठेविले आहेत.'                                           


(सार्वजनिक सत्यधर्म-जोतीराव फुले) 'मानवाला बुद्धीचे वरदान आहे. स्त्रीपुरूषांच्या बुद्धीमध्ये कमी-जास्त काही नाही.जगातील सर्व धर्मपुस्तके पुरूषांनी लिहिलेली आहेत.त्यांनी 'गोमा' करून स्त्रियाचे नैसर्गिक मानवी हक्क काढून घेतले व स्त्रीला गुलाम बनविले.वास्तविक,स्त्री पुरूषापेक्षा श्रेष्ठ आहे.मानवी संस्कृतीत प्रेमाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.अपत्यप्रेमाचे वरदान स्त्रीला निसर्गत: मिळाले आहे.ती याबाबतीत पुरूषापेक्षा श्रेष्ठ आहे.'जोतीरावांनी याच भूमिकेवर पुढे पंडिता रमाबाईचा, बुलढाण्याच्या ताराबाई शिंदे यांचा गौरव केलेला आहे.ताराबाई शिंद्यांनी त्या काळात 'स्त्री-पुरुष तुलना' हे पुस्तक खरमरीत भाषेत प्रसिद्ध केलेले आहे. " ३


वरील विवेचनावरून महात्मा फुले यांचे स्त्री-स्वातंत्र्याविषयीचे विचार आपल्या लक्षात येतात.समकालीन काळात पंडिता रमाबाई व ताराबाई शिंदे यांच्या लेखनाचा पुरस्कार करणारे महात्मा फुले हे इ.स.१९७५ नंतरच्या स्त्रियांच्या साहित्याची प्रेरणा ठरतात. म्हणून १९७५ नंतरच्या स्त्रियांच्या काव्यलेखनाच्या प्रेरणांपैकी महात्मा फुले हे एक प्रधान प्रेरणा आहेत.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य व विचारधारा :-


डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रियांच्या समान अधिकाराचा पुरस्कार केलेला दिसतो.हिंदू स्त्रीला पुरुषाच्या बरोबरीने हक्क आणि अधिकार मिळावेत म्हणून त्यांनी 'हिंदू कोड बिल'तयार केले. परंतु ते संसदेत मांडले गेले नाही म्हणून त्यांनी आपल्या कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिला होता.मंगला वरखंडे लिहितात,"म.फुले,म.गांधी,

डॉ.बाबासाहेब आंबेडकर इ.नी भारतीय संदर्भात स्त्रीमुक्तीचा जो विचार केला आहे,तसेच स्त्री मुक्तीच्या संदर्भात ज्या विविध चळवळी झाल्या आहेत,सुधारणावादाचे प्रबोधनाचे जे प्रयत्न झाले आहेत त्यातील सत्यांश घेऊन समकालीन प्रश्नांची सोडवणूक करणारी व भविष्यातील स्त्री पुरुष समरसतेचे स्वप्न साकार करणारी जीवनपद्धती सुचविणारी नवी स्त्रीवादी आचारसंहिता देणे हे भारतीय स्त्रीवादी मांडणीचे उद्दिष्ट असले पाहिजे. "४


 यातूनन आपल्याला असे दिसते की, स्त्रीवादी साहित्याने डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेला आपल्या केंद्रस्थानी ठेवले पाहिजे असे मंगला वरखेडेंना वाटते.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्त्रियांच्या हक्कांविषयी लिहितात,"आजच्या जगात संपत्तीच स्वातंत्र्याचा आधारस्तंभ आहे.जोवर स्त्रियांना संपत्तीचा वारसा मिळत नाही,तोवर त्यांची गुलामगिरी संपणार नाही. त्यादृष्टीने हिंदू कोड बिलात मी तरतूदही केली होती,पण ते बिल मंजूर होऊ शकले नाही.यापुढे आता येणारे बिल कोणत्या स्वरूपात येते व त्यात स्त्रियांच्या स्वातंत्र्याची,हक्कांची काय तरतूद आहे याकडे महिलावर्गाने फार बारकाईने पाहिले पाहिजे.इतकेच नव्हे, तर आपल्या हक्कांसाठी झगडण्यास त्यांनी आपले मनोदौर्बल्य टाकून कंबर कसली पाहिजे,तरच त्यांची सुधारणा व प्रगती होईल. "५


 कोल्हापूर येथे दि.२५ डिसेंबर १९५२ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी भाषणात वरील विचार मांडले होते. हिंदू कोड बिलाचे महत्त्व बाबासाहेबांनी येथे सांगितले. स्त्रियांच्या प्रती असणारी बाबासाहेबांची संवेदनशीलता व कळकळ आपल्या लक्षात येते.


डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याविषयी सौदामिनी राव लिहितात, "डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे जसे दलितांचे नेते,भारताच्या राज्यघटनेचे शिल्पकार, तसेच ते स्त्रियांचे कैवारी होते.डॉ.बाबासाहेब स्वतः दलित असल्यामुळे दलितांप्रमाणेच समाजात हीन वागणूक देण्यात येणाऱ्या स्त्रियांबद्दल बाबासाहेबांना अपार सहानुभूती होती.कुटुंबातील स्त्रियांचे हाल कमी व्हावेत म्हणून,त्यांनी स्त्रियांना घटस्फोट,पोटगी,पुनर्विवाह, वडिलार्जित संपत्तीत वारसा,दत्तक घेणे वगैरे हक्क देणाऱ्या हिंदू कोड बिलाचा आग्रह धरला.तर स्त्रियांना ज्ञानसाधनेचा हक्क नाकारून अज्ञानाच्या अंधःकारात खितपत ठेवणाऱ्या हिंदू धर्माचा त्याग करून प्रौढ,कुमारिका,विधवा,परित्यक्ता, पतिता आणि इतर स्त्रियांना ज्ञानसाधनेचा मार्ग उपलब्ध करून देणारा बौद्ध धर्म त्यांनी स्वीकारला."६


वरील विवेचनावरून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे स्त्री-स्वातंत्र्याविषयीचे विचार व कार्य आपल्या लक्षात येते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे इ.स.१९७५ नंतरच्या वाङ्मयीन प्रवाहांच्या निर्मितीची प्रधान प्रेरणा आहेत.स्त्रीवादाला अपेक्षित असणारा स्त्री-मुक्तीचा ध्यास बाबासाहेबांच्या विचारातून व्यक्त होतो.म्हणून इ.स.१९७५ नंतरच्या स्त्रियांच्या काव्यलेखनामागे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य व विचारधारा ही एक प्रधान प्रेरणा आहे.

शिक्षणाचा प्रसार :-

 महात्मा ज्योतीबा फुले यांनी इ.स.१८४८मध्ये मुलींसाठी पुण्यात पहिली शाळा सुरू केली.शिक्षणामुळे व्यक्तीला आत्मज्ञान प्राप्त होते. शिक्षणातून व्यक्तीमध्ये आत्मविश्वास निर्माण होतो.स्त्रियांच्या शिक्षणाची गरज ओळखणारे डॉ.धोंडो केशव कर्वे आणि त्यांचे कार्य अत्यंत महत्त्वाचे ठरते.कर्वे यांच्या कार्याविषयी विलास खोले लिहितात,"भारतवर्षीय महिला विद्यापीठ (श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ) हे कर्वे यांच्या स्त्रीविषयक कार्याचे चिरस्थायी स्वरूपाचे स्मारक आहे.ज्या स्त्रीशिक्षणाचा त्यांनी जन्मभर ध्यास घेतला.त्या कार्याचा सर्वोच्च आविष्कार महिला विद्यापीठाच्या रूपाने झाला.भारतातील पहिले आणि प्रदीर्घ काळ एकमेव असे स्थान असणारे हे विद्यापीठ स्थापून त्यांनी ऐतिहासिक महत्त्वाचे शैक्षणिक कार्य पार पाडले.सामाजिक जीवनात स्त्रीला पुरूषाच्या बरोबरीचे जे स्थान आज प्राप्त होऊ लागले आहे आणि शैक्षणिक क्षेत्रात स्त्रीने पुरूषांच्या बरोबरीचे जे स्थान आज निर्विवाद प्रस्थापित केले आहे, ते स्थान तिला लाभण्याजोगी परिस्थिती उत्पन्न होण्यासाठी महर्षी कर्वे यांचे कार्य पायाभूत स्वरूपाचे ठरले आहे,हे विसरता येणार नाही. केवळ पाच विद्यार्थिनींच्या आधारे पहिले पाऊल टाकणारे विद्यापीठ आज वयाची नव्वदी पार करून प्रगतिपथावर वाटचाल करीत आहे. विधवांचे पुनर्विवाह,त्यांचे शिक्षण,एकंदर स्त्रीशिक्षण,अनाथबालिकाश्रमाची उभारणी,निष्काम-कर्म-मठाचा उपक्रम,कन्या विद्यालयाचा प्रारंभ असे स्त्रियांच्या उन्नतीचे क्रमशः पार पाडलेले एकेक कार्यक्रम हे पवित्र धर्मकार्य वा राष्ट्रकार्य आहे,अशा विचाराने कवें यांनी हाती घेतले; आणि या सर्वांवर कळस चढला तो स्वतंत्र महिला विद्यापीठाच्या रूपाने यासाठी निःस्वार्थ भावनेने आणि त्यागी व समर्पणशील वृत्तीने समाजातील विरोधी शक्तींना न जुमानता अविश्रांत कार्य करणारे अण्णासाहेब कर्वे यांनी स्त्रियांच्या सुस्थितीचे आणि प्रगतीचे जे स्वप्न पाहिले होते,ते विद्यापीठाच्या रूपाने साकार झाले. "७


वरील विवेचनातून महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या कार्याची आपणाला जाणीव होते.स्त्री-शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे स्त्रियांना आत्मभान प्राप्त झाले.त्या अधिक सजग झाल्या. स्वातंत्र्योत्तर काळात स्त्रियांच्या शिक्षणाचे प्रमाण खूप वाढले.यातून आपण आपले अनुभव साहित्यातून मांडले पाहिजेत असा विश्वास स्त्रियांमध्ये निर्माण झाला.शिक्षणाचा प्रसार ही स्त्रीवादी साहित्याची प्रेरणा ठरते.असे आपणाला म्हणता येईल.


इतर प्रेरणा :-

ताराबाई शिंदे यांनी एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात 'स्त्री-पुरुष तुलना'( सन-१८८२) हा निबंध लिहून भारतीय स्त्रीवादी विचारसरणीचा पाया रचला असे म्हणता येईल. या निबंधातून त्यांनी स्त्री-पुरुष विषमतेची चर्चा केली.ही एक इ.स.१९७५ नंतरच्या स्त्रीवादी कवितेची प्रेरणा सांगता येईल. त्याचबरोबर इ.स. १८८२ मध्ये पंडिता रमाबाईंनी 'आर्य महिला समाज' ही पहिली स्त्रियांची संघटना स्थापन करून स्त्री- मुक्तीच्या कामाला संघटनात्मक स्वरूप प्राप्त करून दिले.रूढी परंपरामुळे स्त्रियांचे शोषण करणाऱ्या बालविवाह, विधवांचे केशवपन इ.जाचक रूढींविरुद्ध जनमत तयार करण्याचे काम त्यांनी केले.त्याचबरोबर 'शारदासदन ' ( इ.स.१८२१) आणि 'मुक्तीसदन ' ( इ.स.१८९६) या संस्थातून स्त्रियांना सुतारकाम, लोहारकाम,चुना मळणे,छपाई, शिवणकाम,भरतकाम, परिचारिकेचे काम शिकवून स्वावलंबनासाठी अर्थार्जनासउपयुक्त ठरणारी कौशल्ये शिकविण्यावर भर दिला.तसेच हंटर कमिशन समोर साक्ष देताना पंडिता रमाबाईंनी स्त्री शिक्षणाची गरज आग्रहाने मांडली.'आर्य महिला समाजात जे पुरुष पत्नीला घेऊन येतील त्यांनाच सभेला बसण्यास अनुमती असे.स्त्री-पुरुष समानतेचा असा नवा आदर्शच त्या रूढ करू पाहत होत्या. हे त्यांचे कार्य व विचार स्त्रीवादी साहित्याला प्रेरणादायी ठरणारे आहे असे आपणाला म्हणता येईल.

स्वातंत्र्योत्तर काळात मराठी साहित्यात जे विविध वाङ्मयप्रवाह निर्माण झाले त्यामध्ये ग्रामीण साहित्य,दलित साहित्य आणि स्त्रीवादी साहित्य हे प्रवाह महत्त्वाचे आहेत. हे वाङ्मयप्रवाह आपल्या प्रश्नांना घेऊन व्यक्त झालेले दिसतात.हे प्रश्न 'न्याय','समता' आणि 'स्वातंत्र्यासाठी' निर्माण झालेले दिसतात.ह्या प्रवाहात साहित्याइतकेच समाजदर्शनही व्यक्त झालेले आढळते. हे प्रवाह निखळ वाड्मयीन प्रवाह नसून ते सामाजिक स्थित्यंतराचे प्रवाह आहेत,सामाजिक परिवर्तनाचा आशय ह्या प्रवाहांमध्ये व्यक्त होताना दिसतो.हे प्रवाह समकालीन आहेत.त्यांचा एकमेकांवर प्रभाव आहे.

दलित चळवळीतून दलित साहित्याला प्रेरणा मिळाली. ग्रामीण साहित्य चळवळीतून ग्रामीण साहित्याला दिशा मिळाली.तर स्त्रीमुक्ती चळवळीतून स्त्रीवादी साहित्य आकाराला आले. या सर्व चळवळी व साहित्यप्रवाह एकमेकांशी संवादी आहेत.या साहित्यप्रवाहांनी माणसाला 'माणूस' म्हणून जगण्याची संधी मिळाली पाहिजे अशी भूमिका घेतली.या सर्व प्रवाहांनी माणसाच्या शोषणाला विरोध केला.'न्याय','समता', आणि स्वातंत्र्यासाठी हे प्रवाह स्वागतशील आहेत.समकालीन साहित्यप्रवाहाची, साहित्य चळवळीची प्रेरणा इ.स.१९७५ नंतरच्या स्त्रीवादी साहित्याने घेतली आहे.

अशा प्रकारे आपणाला इ.स.१९७५ नंतरच्या स्त्रियांच्या कवितेच्या प्रेरणा सांगता येतात. वरील सर्व प्रेरणा कमी-अधिक फरकाने कवयित्रींच्या लेखनासाठी कारणीभूत ठरतात. या प्रेरणांशिवाय कवयित्रींच्या काव्यलेखनामागे काही व्यक्तीगत गोष्टी,विचार,व्यक्ती ह्या प्रेरणादायी ठरत असतात.स्थूलमानाने कवयित्रींच्या निर्मितीला कारणीभूत असणाऱ्या प्रेरणांचा आढावा वरीलप्रमाणे घेता येतो.


संदर्भ टिपा : -


१.गणोरकर प्रभा, 'स्त्री साहित्याचा मागोवा ' खंड -२ इ.स.१९५१ते इ. स. २०००,(संपा. मंदा खांडगे आणि इतर) साहित्यप्रेमी भगिनी मंडळ,पुणे, प्रथमावृत्ती ,डिसेंबर २००२,पृ.६९


२.तत्रैव,पृ.९१,९२


३.आढाव बाबा,'महात्मा फुले गौरव ग्रंथ ',डॉ.बाबासाहेब आंबेडकर , महात्मा फुले आणि राजर्षी शाहू चरित्र साधने प्रकाशन समिती ,मुंबई , ( संपादक - हरी नरके ) ,सुधारित तृतीयावृत्ती - २००६, पृ. ८,९


४. वरखेडे मंगला,'स्त्रीवादी समीक्षा: संकल्पना व उपयोजन ',का.स.वाणी प्रगत अध्ययन संस्था,धुळे ,प्रथमावृत्ती,१९९९ ,पृ.४


५. आंबेडकर बाबासाहेब, ' बोल महामानवाचे ' , डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची ५०० मर्मभेदी भाषणे ( खंड एक ) आत्मनिवेदन आणि मार्गदर्शन , ( अनुवाद आणि संपादन डॉ. नरेंद्र जाधव) , ग्रंथाली प्रकाशन , प्रथमावृत्ती , २०१२ , पृ. ३१९


६.राव सौदामिनी ,डॉ.बाबासाहेब आंबेडकर गौरव ग्रंथ ',(संपा. दया पवार) ,महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ ,मुंबई ,तृतीयावृत्ती ,२००६ ,पृ. ११४


७.खोले विलास ,महर्षी धोंडो केशव कर्वे , (महाराष्ट्र चरित्र - ग्रंथमाला (संच)), श्री.गंधर्व -वेद प्रकाशन,पुणे , प्रथमावृत्ती २०१०,पृ.११२



- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -

वैशिष्ट्यीकृत पोस्ट

भाषा , साहित्य निर्मिती आणि कृत्रिम बुद्धिमत्ता

 भाषा, साहित्य निर्मिती आणि कृत्रिम बुद्धिमत्ता डॉ. गणपतराव ढेंबरे  मराठी विभाग श्री.व्ही.एस. नाईक महाविद्यालय, रावेर,ता.रावेर,जि. जळगाव पिन...