शुक्रवार, १७ एप्रिल, २०२०

निवडक १० कथा -आकलन आणि मूल्यमापन



निवडक १० कथा -आकलन आणि मूल्यमापन "
प्रास्ताविक -
 मराठी साहित्यामध्य अंत्यत कमी लेखन करून स्वतःचे वेगळेपण सिद्ध करणाऱ्या लेखकांमध्ये हमीद दलवाई यांचे नाव आपणाला विचारात घ्यावे लागते. इंधन नावाची कादंबरी व 40 कथा हमीद दलवाई यांच्या नावावर आहेत. संख्यात्मकदृष्ट्या हमीद दलवाई यांचे लेखन अल्प असले तरी त्यांच्या साहित्याचे गुणात्मक वेगळेपण लक्षात घेण्याजोगे आहे. मराठी साहित्याला एका अपरिचित विश्वाचे दर्शन हमीद दलवाई यांच्या साहित्यातून घडले. ग्रामीण मुस्लिम समाज जीवन हा तसा मराठी साहित्याला अस्पर्श असा विषय होय .काही अपवाद वगळता हा विषय मराठी साहित्यातून कमी प्रमाणात चित्रित झालेला आहे. मुस्लिम कुटुंबव्यवस्थेचे सूक्ष्म चित्रण हमीद दलवाई यांच्या कथेतूनbnbbb येते. मुस्लिम कुटुंबातील लहान मुलांच्या भावविश्वाचा वेध हमीद दलवाई यांची कथा घेते. मुस्लिम माणसाच्या जगण्यातला संघर्ष हा हमीद दलवाईंच्या कथेचा केंद्रबिंदू आहे .या संघर्षाच्या विविध बाजू , पैलू हमीद दलवाईंच्या कथेतून चित्रित होतात. मुस्लिम जीवनातील वैविध्यपूर्ण विषयांना हमीद दलवाई यांनी आपल्या कथांमधून जोरकसपणे मांडले आहे .कथा विषयांमध्ये विविधता दिसून येते. कोकणातील ग्रामीण मुस्लिम जगण्याचा शोध ही हमीद दलवाईंच्या साहित्याची प्रेरणा आहे . मुस्लिम समाजाविषयीचे अनेक प्रकारचे पूर्वग्रह, तर्क, विचार समाजामध्ये असलेले दिसून येतात. या पूर्वग्रहांना, तर्कांना, विचारांना धक्का देण्याचे काम हमीद दलवाईंची कथा करते. हमीद दलवाईंच्या कथा वाचनातून वाचकाचा मुस्लिम समाजाकडे पाहण्याचा पूर्वग्रह बदलून जातो .एका वेगळ्या प्रकारची  संवेदना, कणव, सहानुभूती वाचकाच्या मनात निर्माण करण्यात हमीद दलवाई यांच्या कथांना यश येते आजचा आपला भवताल तपासत असताना अशा विचारांची मूल्यांची किती गरज आहे याची आपल्याला जाणीव होते. आणि म्हणून हमीद दलवाई यांचे कथाविश्व महत्त्वपूर्ण ठरते .साधना प्रकाशनाने जुलै 2018 मध्ये प्रकाशित केलेल्या निवडक दहा कथा हा कथासंग्रह एक महत्त्वपूर्ण असा आहे .या कथासंग्रहामध्ये एकूण दहा कथा आहेत .प्रत्येक कथा ही आशयसूत्र च्या दृष्टीने वेगळी व महत्त्वपूर्ण अशी आहे.कथेच्या आकृतिबंधाच्या दृष्टीने हमीद दलवाई यांनी लघुकथा, दीर्घकथा या दोन्ही आकृतिबंधाचे उपयोजन आपल्या लेखनात केले आहे. निवडक दहा कथा या संग्रहाचा प्रस्तुत निबंधात आकृतिबंध व वैशिष्ट्ये या अंगाने विचार केलेला आहे

२. निवडक१0कथांची आशय सूत्रे _

 हमीद दलवाई यांच्या कथांच्या आशयामध्ये आपणाला काही समान सूत्रे आढळून येतात .या समान सूत्रांना आपण आशय सूत्रे म्हणू शकतो. ही आशय सूत्र म्हणजे हमीद दलवाईंच्या कथेच्या अनुभवविश्वाचे वा आशयक्षेत्राचे केंद्रवर्ती किंवा मध्यवर्ती सूत्र होय. हमीद दलवाईंच्या निवडक दहा कथा या संग्रहातील कथांमध्ये मुख्यतः ग्रामीण मुस्लिम जीवनाचे चित्रण ,बाल मानसिकतेचे चित्रण , मुस्लिम कुटुंबातील गरीबी ,दारिद्र्याचे चित्रण ,स्त्री-पुरुष संबंधांचे विविधांगी शोध, मुस्लिम मानसिकतेतील दुभंगलेपणा चे चित्रण ,धर्मापेक्षा मैत्री जोपासणारी माणसं,  मूल्य हरवलेल्या माणसांचे चित्रण इत्यादी प्रधान आशय सूत्र त्यांच्या कथांमधून अभिव्यक्त होतात. 
२ .१_ ग्रामीण मुस्लिम जीवनाचे चित्रण करणाऱ्या कथा 
निवडक दहा कथा या संग्रहातील जवळपास पहिल्या सात कथांमध्ये ग्रामीण मुस्लिम कुटुंबाचे चित्रण येतेे .दहा रुपयांची नोट या कथेतील नायक करीम मुंबई मध्ये नोकरी करत असला तरी कथेचे कथानक तो गावाकडे जातो आणि जी परिस्थिती अनुभवतो यावर बेतलेले आहे . करीम मुंबईत नोकरी करत असला तरी त्याचा प्राण गावांमध्ये अडकला आहे. ग्रामीण भागातील मुस्लिम कुटुंबाकडे जीवन जगण्याची साधने फार कमी आहेत. याचा परिणाम सण उत्सवांवर होतो. गौरी गणपती आणि ईद हे दोन्ही सण नीटपणे लोक साजरे करू शकत नाही. याची खंत कथानायकाला होते. अहमद या कथेमध्ये अहमदच्या कुटुंबाचे चित्रण येते . गरीबीमुळे आई वडील अहमद कडे नीट लक्ष देत नाहीत .यातून त्यांच्या वाट्याला दुःख येते .ग्रामीण मुस्लिम कुटुंबातील मुलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन या कथेतून व्यक्त होतो. माणूस आणि गाढव या कथेचा नायक अब्दुल्ला ग्रामीण भागात राहणारा स्वार्थी माणूस आहे. अधिक पैसे मिळवण्यासाठी वांग्याची शेती करणारा अब्दुल्ला या कथेत आपल्याला भेटतो . छप्पर या कथेतील नायक शिक्षण घेतलेला आहे . त्याला शिक्षणातून आधुनिक दृष्टिकोन मिळाला आहे. शिक्षणातून मिळालेली माहिती प्रत्यक्ष उपयोगात आणण्यात अपयशी ठरलेला नायक कथेत लेखकाने उभा केला आहे . ग्रामीण भागातील माणसं संसर्गजन्य रोगाबद्दल बेफिकीर राहतात. यातून शिक्षण घेतलेला नायक आपल्या कुटुंबाला बाहेर काढू शकत नाही. शिक्षणामुळे श्रम करण्याचा कंटाळा आलेला नायक या कथेत उभा राहतो. ग्रामीण मुस्लिम कुटुंबातील अशिक्षितपणा ,अडाणीपणा यातून घडणारी शोकांतिका या कथेत उभी राहते .कफनचोर या कथेतील रसूल ग्रामीण परि क्षेत्रातून आकाराला येतो . कोल्हाआणि कोकरू या कथेतून ग्रामीण मुस्लिम जीवनाचे चित्रण येते .आपला स्वार्थ साधण्यासाठी कोणत्याही थराला जाणाऱ्या बेरकी हैदरचे  चित्र लेखकाने अत्यंत वेधक पणे उभे केले आहे. ग्रामीण मुस्लिम कुटुंबातील स्त्रियांचे जीवन त्यातील अगतिकता लेखकाने अत्यंत प्रत्ययकारीपणे चित्रित केली आहे. हमीद दलवाई यांनी ग्रामीण मुस्लिम जीवनाचे चित्रण अत्यंत वास्तवदर्शी रूपात उभे केले आहे. ग्रामीण भागातील मुस्लिम कुटुंब ,त्यांची रहन सहन, बोली, वागण्यातील बारकावे लेखकाने अत्यंत संवेदनशीलतेने टिपली आहेत.
२.२- मुस्लिम कुटुंबातील गरीबी दारिद्र्याचे चित्रण करणाऱ्या कथा
- हमीद दलवाई यांच्या निवडक दहा कथा या संग्रहातून मुस्लिम कुटुंबातील गरीबी ,दारिद्रयाचे अत्यंत वास्तववादी चित्रण येते. गरिबीमुळे माणसाच्या जीवनातील आनंद, सुख समाधान नष्ट झाले आहे .या वास्तवाचे चित्रण हमीद दलवाई यांनी आपल्या कथांमधून अत्यंत संयमी व संयत पद्धतीने केले आहे . या वास्तवाला कुठेही अतिशयोक्तीची किनार नाही. कथेतील वास्तव हे खरेपणाच्या कसोटीवर उतरणारा आहे. दहा रुपयांची नोट या कथेतील नायक करीम एकशे वीस रुपयात खर्डेघाशी करीत राहतो. मिळवलेल्या पैशात भागणार नाही म्हणून लग्न करायचं टाळीत जातो. यातील वास्तव वाचकाला अंतर्मुख बनवते .गरिबीमुळे  लोक आपले सण-उत्सव साजरे करू शकत नाहीत. मुंबईला गेलेली गावाकडील माणसं गावात येत नाहीत कारण त्यांना गावातील गरिबीचा तिटकारा येतो. या कथेतील श्रीराम सांगू लागतो की ,दारिद्र्य _ दारिद्र्यनि दारिद्र्य ! चिंता आर्थिक चिंता ! बेकारी उपासमार ! साऱ्यांनाच आर्थिक चिंतेने ग्रासले होते . दारिद्रयाने काळवंडून टाकले होते. भुकेने अर्धमेले केले होते. हे चित्रण प्रभावी व वेधक आहे. मित्राला दिलेले दहा रुपये पुन्हा प्रवास करण्यासाठी परत घेण्याच्या आलेली वेळ यातून वास्तवाचे चित्र उभे राहते. अहमद कथेतील अहमद या लहान बालकांचे बालपण गरिबी व दारिद्र्यामुळे संपून जाते. आईवडील आपल्या लहान मुलावर प्रेम करू शकत नाहीत. परिस्थितीशरण झालेल्या आई-वडिलांना मुलांच्या भावनांपेक्षा उपयोगिता मूल्य अधिक महत्त्वाचे वाटते .गरिबीमुळे आपली भूक न भागवू शकलेला अहमद वाचकाला विचार करायला लावतो .अहमदला आपण पोटभर खाल्ल्याचे ,शाळेत शिकत असल्याचे ,धार्मिक शिक्षण घेत असल्याचे स्वप्न पडते .परंतु ते गरिबीमुळे दारिद्र्यामुळे अपूर्ण राहते .माणूस आणि गाढव या कथेतील नायक अब्दुल्ला गरिबीमुळे पैशासाठी मूल्य हरवून बसतो. माणसात आणि जनावरात फरक करायला अब्दुल्ला विसरून जातो .छप्पर या कथेतील कुटुंब गरिबी आणि दारिद्र्यामुळे शोकांतिका ओढून घेते . गरीबीतून अज्ञान अडाणीपणाचा जन्म होतो .याचे चित्रण या कथेत येते .कफनचोर या कथेतील रसूलला आपला उदरनिर्वाह चालविण्यासाठी कफनची चोरी करावी लागते. गरिबीमुळे दारिद्र्यामुळे मूल्यहीन काम करण्याची वेळ रसूल वर येते .निषिद्ध असणारे काम करावे लागते .यातून त्याची अगतिकता प्रकट होते . कोल्हाआणि कोकरू या कथेतून लेखकाने गरिबीमुळे मरीयमला आपल्या इच्छेविरुद्ध हैदरशी लग्न करावे लागते.याचे प्रभावी चित्रण लेखकाने केले आहे . बेकार (पण कलावंत ) माणसाची गोष्ट या कथेमध्ये एका सृजनशील माणसाची कथा लेखकाने मांडली आहे.शिक्षण घेऊनही नोकरी न मिळालेल्या नायकाची ही कथा आहे .भूक लागलेली असतानाही नायकाला अन्न मिळत नाही. उत्तम कथा लिहिण्याचे कसब असूनही जीवन जगण्यास अपयशी ठरलेल्या कलावंताची गरिबीमुळे दारिद्र्यामुळे काय दशा होते याचे चित्रण या कथेत येते . खुदा हाफिज या कथेत लेखकाने वेगळ्या प्रकारच्या गरिबीचे चित्र उभे केले आहे . उबेदुला या खानदानी माणसाची व्यथा या कथेतून लेखकाने मांडली आहे. पूर्वी श्रीमंतीचे वैभवाचे दिवस होते.आता ते परत कधी मिळणार या चिंतेतून भूतकाळात रमणारा  उबेदुला व आपला भूतकाळ पुन्हा मिळवण्यासाठी अयोग्य हिंसेचा मार्ग स्वीकारणारा सुद्रद्दीन यांची शोकांतिका या कथेतून लेखकाने उभी केली आहे.
२ .३ स्त्री - पुरुष संबंधाचे चित्रण करणाऱ्या कथा 
हमीद दलवाई त्यांच्या कथांमधून स्त्री -पुरुष संबंधाचे विविधांगी चित्रण येते .हमीद दलवाई यांच्या कथेतील स्त्री-पुरुष संबंधांचे चित्रण वास्तव स्वरूपाचे आहे. पुरुषांचा स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टिकोन या कथांमधून व्यक्त होतो .कफन चोर या कथेतील रसूल पोटाची भूक भागवण्यासाठी प्रेताच्या कफनची चोरी करतो .एकदा कफनची चोरी करत असताना कबर मध्ये चौदा पंधरा वर्षांच्या मुलीचे प्रेत त्याला सापडते .त्या स्त्री देहाकडे पाहून रसूलची वासना पेट घेते . मृत मुलीच्या शरीराशी संग  करण्याची भावना त्याला होते. परंतु शेवटी रसूल स्वतःवर नियंत्रण मिळवता. या कथेत लेखक हमीद दलवाई यांनी वेगळा जीवनानुभव मांडला आहे. विकृतीतून माणूस कोणत्या थराला जाऊ शकतो .याचे प्रभावी चित्रण या कथेतून येते. कोल्हाआणि कोकरू  या कथेतील हैदर हा अत्यंत बेरकी आहे .लोकांच्या दुःखातही सुख शोधणारा हैदर या कथेतून लेखकाने उभा केला आहे .मरीय मला मिळवण्यासाठी काहीही करायला तयार असलेला हैदर लग्नानंतर मात्र मरियम चे शोषण करतो .मरियमच्या मृत्यूनंतर लगेच तिच्या लहान बहीणला उपभोगण्याची तयारी ठेवणारा हैदर हा उपभोगवादी संस्कृतीचा प्रतिनिधी ठरतो .एक अव्यवहारी अपूर्णांकाची गोष्ट या कथेतील नायक आपल्या इच्छेखातर लहानपणी विवाहबद्ध झालेल्या पत्नीला सोडून देतो .केवळ इच्छेखातर कोणत्याही स्त्रीचे जीवन उद्ध्वस्त करण्याची मानसिकता ही खास पुरुषी मानसिकता आहे .यातून स्त्री-पुरुष संबंधाकडे पाहण्याचा नकारात्मक दृष्टिकोन कथाकार आपणा समोर उभा करतो .बेकार (पण कलावंत )माणसाची गोष्ट या कथेतील नायक रझाक साहेबांच्या तरुण मुलीकडे वासनामय नजरेने पाहत राहतो. खुदा हाफिज या कथेतील सद्रुद्दीनचाही आपल्या पत्नीकडे पाहण्याचा उपभोगवादी दृष्टिकोन व्यक्त होतो .एकूण हमीद दलवाई यांच्या कथांमधून मुस्लिम समाजातील पुरुषांचा स्त्रियांकडे पाहण्याचा उपभोगवादी दृष्टिकोन व्यक्त होतो.
२ .४- बाल मानसिकतेचे चित्रण करणाऱ्या कथा 
हमीद दलवाईंच्या निवडक दहा कथा या संग्रहातील काही कथांमधून बाल मानसिकतेचे उत्तम चित्रण येते .बाबूखानचा ग्रामोफोन या कथेतून लहान मुलांची ग्रामोफोन विषयीचे ओढ व्यक्त होतो. ग्रामोफोनमुळे बाबू खानशी लहान मुले जोडली जातात . एक बाल सुलभ भावना या कथेतून व्यक्त होते. बालकांमधील ग्रामोफोन विषयीचे अदभूत कुतूहलातून बाबू खानचा भूतकाळा नायकच्या मनात कायमचा कोरला जातो. अहमद या कथेतून अहमदचे बालपण उभे केले जाते. अहमदच्या बाल मानसिकतेचे चित्रण अंत्यत प्रत्ययकारी असे झाले आहे. विशेषत या कथेतील सकाळचे  वातावरण लेखकाने अत्यंत जिवंतपणे चित्रित केले आहे .या कथेतील अहमदचे  बालपण परिस्थितीमुळे कोमेजून जाते. त्याच्या मनातील अपूर्ण स्वप्नांची मालिका या कथेतून उभी राहते. लहान मुलांच्या मनातील भावना अभिव्यक्त करणे अत्यंत कठीण असते .लेखक हमीद दलवाई यांनी लहान मुलांचे बालविश्व मोठ्या ताकदीने उभे केले आहे.
२.५- मुस्लिम समाजातील दुभंगलेपणाचे चित्रण _ फाळणीपासून मुस्लिम समाजाला पाकिस्तान विषयी एक कुतूहल आहे .हिंदु समाजाबद्दल नेहमी संशयाची भावना आहे.याचे चित्रण हमीद दलवाईंच्या कथांमधून येते .काही कथांमध्ये हिंदू आणि मुस्लिम यांच्यातील नातं खूप घट्ट असल्याचे चित्र येते . बेकार (पण कलावंत ) माणसाची गोष्ट या कथेतील नायक रझाक बोहरी यांच्याकडे नोकरीची शिफारस घेण्यासाठी जातो .तेव्हा ते म्हणतात, आजकाल आपल्या लोकांना (म्हणजे मुसलमानांना ) नोकऱ्या मिळणं फारच कठीण झालंय . सगळीकडे आपले दुश्मन भरलेले आहेत .शब्द तरी कुणाला टाकायचा ?हा प्रश्न मुस्लिम समाजातील काही प्रवृत्तींवर प्रकाश टाकणारा आहे. नायक रझाक बोहरींशी चर्चा करत असताना त्यांना पाकिस्तानात सर्व काही ठीक चाललेलं आहे असे वाटते .यातून मुस्लिम समाजातील दुभंगलेपणा चित्रण येते .खुदा हाफिज ही कथा या आशय सूत्राचे उत्तम उदाहरण म्हणून सांगता येईल. मुस्लिम समाजातील उच्चभ्रू व्यक्तींचे चित्रण या कथेत येते .कुठेतरी आपण या देशाचे मालक होतो. राज्यकर्ते होतो .आणि स्वातंत्र्यामुळे आपले पूर्वीचे वैभव लयाला गेले. याविषयीची खंत खुदा हाफिज या कथेतून व्यक्त होते .हैदराबादच्या निजाम राजवटीचे पुसटशी आठवण, भूतकाळ मनात ठेवून जगणारे उबेदुला हे मुस्लिम समाजातील दुबळेपणाचे उत्तम उदाहरण म्हणून सांगता येतील .खुदा हाफिज या कथेतील उबेदुला आणि त्यांचा मुलगा सद्रुद्दीन   यांच्यातील संवाद हा मानसिक दुंभगलेपणावर बेतलेला आहे. सदृद्दिन म्हणतो ,तुम्ही म्हणता ते खरे आहे ,पूर्वीच्या हैदराबाद आता राहिलेली नाही .आमचे नामोनिशाण शिल्लक ठेवायचे नाही असा या सल्तनतने चंग बांधला आहे .आमची कौम, आमची जबान ,आमचे कल्चर_ सारे कसे भराभरा उध्वस्त होत आहे. जाणून बुजून केले जात आहे. पूर्वीसारखे आता एकमेकांचा निरोप घेतांना कुणी खुदा हाफिज देखील म्हणत नाही. या संवादातून मुस्लिम समाजातील काही व्यक्तींच्या मानसिक दुभंगलेपणा चे उत्तम चित्रण उभे राहते .
२ .६- हमीद दलवाई यांच्या कथांमधील  इतर  आशयसूत्रे
 वरील आशयसूत्रांबरोबरच हमीद दलवाई यांच्या कथांमधून वेगवेगळी आशय सूत्रे अभिव्यक्त होतात. धर्मापेक्षा मैत्रीचं नातं जपणारी पात्र हमीद दलवाईंच्या कथांमधून साकार होतात. दहा रुपयांची नोट या कथेतील करीम -श्रीराम एका अव्यवहारी अपूर्णांकाची गोष्ट या कथेतील नायक - शामा ,बेकार ( पण कलावंत ) माणसाची गोष्ट या कथेतील हमीद - मेघा या पात्रांचा उल्लेख करावा लागेल. हमीद दलवाई यांच्या कथांमधून अनेकदा भूतकाळात रमणारी पात्रे भेटतात. भूतकाळ कसा सुखद होता. याचे स्वप्नरंजन करणारे पात्रे निवडक दहा कथांमध्ये भेटतात.
३ . हमीद दलवाईंच्या कथेचा आकृतीबंध -
हमीद दलवाईंच्या कथेचा आकृतीबंध विचारात घेतला असता आपल्या लक्षात येते की हमीद दलवाईंनी लघु व दीर्घ दोन्ही प्रकारात कथालेखन केले. हमीद दलवाईंच्या  कथेची सुरुवात ही खळबळजनक विधानाने उत्कंठावर्धक वगैरे अशी असलेली दिसत नाही .कथेचा प्रारंभ साधारणतः संथ , संयमी शांत अशी झालेली दिसते. कथेतील अनुभवांची अभिव्यक्ती चढत्या क्रमाने केलेली दिसते. कथेचा शेवट काहीसा धक्का देणारा अनपेक्षित असा केलेला दिसून येतो .कथेतून काही एक ठोस विचार ,मूल्य मांडण्याचा प्रयत्न केलेला दिसून येतो. नियोजनपूर्वक कथेची मांडणी केलेली दिसते. साध्या सरळ सोप्या पद्धतीने कथेची रचना केलेली दिसते.अनुभवाच्या अस्लतेमुळे कथेमध्ये जिवंतपणा जाणवतो. निवडक दहा कथा संग्रहातील पहिल्या आठ कथा लघुकथा स्वरूपात आकाराला येतात .या कथासंग्रहातील शेवटच्या दोन कथा म्हणजे बेकार (पण कलावंत )माणसाची गोष्ट , आणि खुदा हाफिज या कथा दीर्घकथा आकृतिबंधाचा आकार घेताना दिसून येतात .कथेच्या आकृतिबंधाला साजेशी पात्ररचना हमीद दलवाईंच्या कथेत दिसून येते . पात्रचित्रण अत्यंत मोजके आटोपशीर असे आहे .या पात्र चित्रणाला सजीव करणारी भाषाशैली हमीद दलवाईंच्या कथेमध्ये दिसून येते .हमीद दलवाई कोकणी बोली भाषेचा अत्यंत चपलखपणे वापर करतात. प्रसंग घटना यांना अनुसरून संवाद आकाराला येतात .संवाद छोटे आटोपशीर असे आहेत .अशा प्रकारे आपल्याला हमीद दलवाईंच्या निवडक दहा कथा संग्रहातील कथांच्या आकृतीबंधाचा विचार करता येतो.
४ . निवडक१० कथा या संग्रहातील कथांचे विशेष -
१ कोकणातील ग्रामीण जीवनातील माणसांच्या संघर्षावर या कथा बेतलेली आहेत.
२.  मुस्लिम समाजातील उपेक्षित शोषित व्यक्तींच्या दुःखाचे विविध पदर या कथांमधून व्यक्त होतात.
३ . मुस्लिम कुटुंबातील गरीबी, दारिद्र्याचे वास्तवदर्शी चित्रण या कथांमधून येते .
४ .मुस्लिम समाजातील स्त्री-पुरुष संबंधाचा सखोल वेध घेणाऱ्या या कथा आहेत .
५ .मुस्लिम समाजातील असुरक्षितपणाची , दुभंगलेपणाची कारणमीमांसा या कथांमधून येते.
६ .परिस्थितीशरण झालेली व्यक्ती, दुःख ,दारिद्र्य गरिबीमुळे मानवी मूल्यं पासून दुरावत जाते .  समाजव्यवस्था मूल्यव्यवस्था नाकारणारी पात्र हमीद दलवाईंच्या कथांमध्ये उभी राहतात. मानवी मूल्य हरवत चाललेल्या समाजाचे चित्रण या कथांमधून येते .मूल्य हरवून बसलेल्या माणसांच्या या कथा आहेत .या कथाच्या वाचनातून एक प्रकारची अस्वस्थता जन्म घेते .
७ .मुस्लिम कुटुंबातील विविधांगी नात्यांचा शोध हमीद दलवाईंची कथा घेते.
 समारोप  -हमीद दलवाईंचे कथा अनोखे जीवन विश्व चित्रित करणारी कथा आहे .हमीद दलवाई यांनी मुस्लीम समाजातील सामाजिक सुधारणांसाठी जे प्रबोधनात्मक कार्य केले त्याचे प्रतिबिंब त्यांच्या कथांमध्ये उमटते .निवडक दहा कथा या संग्रहातील सर्व कथा वाङ्मयीनदृष्ट्या व कलात्मक दृष्ट्या उत्तम अशा कथा आहेत. हमीद दलवाईंच्या कथांमधून पन्नास वर्षांपूर्वीच्या सर्वसामान्य भारतीय मुस्लिम समाज जीवनाचे चित्रण आले आहे.ते अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.  मराठी वाङ्मयाच्या इतिहासत हमीद दलवाईंच्या कथांची आपणाला  विशेष नोंद घ्यावी लागते. यदुनाथ थत्ते  म्हणतात, त्याप्रमाणे हमीद दलवाईंचे समाजाच्या वास्तवाचे सम्यक आकलन आहे.याचे प्रतिबिंब निवडक दहा कथा या संग्रहात उमटलेआहे .मानवी जगण्याचा दुःखाचा, मूल्यऱ्हासाचा सम्यकपणे घेतलेला शोध म्हणजे हमीद दलवाईंच्या कथालेखन होय. एकूणच हमीद दलवाई यांच्या कथांमध्ये कुठेही आक्रमकता , भडकपणा ,उरबडवेपणा, आक्रस्ताळेपणा दिसून येत नाही. त्यांच्या कथा लेखनामागे एक संयत ,संयमीपणा दिसून येतो.
_________________________
डॉ .जी.आर. ढेंबरे ,
मराठी विभाग
श्री .व्ही .एस. नाईक कला , वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय रावेर ता . रावेर जि. जळगाव पिन-४२५५O८
मोब_९४२१०८१२७० 
ई मेल _dhembregr@gmail.com

काव्यअंकुर मधील राष्ट्र भावनेची कविता : स्वरूप आणि विशेष

'काव्यअंकुर मधील राष्ट्र भावनेची कविता :स्वरूप आणि विशेष '
 डॉ. जी आर .ढेंबरे  ,रावेर
 प्रस्तावना :
राष्ट्रप्रेम आणि राष्ट्रद्रोही या संकल्पना अगदी निसरड्या झाल्या I आहेत .कोणती कृती राष्ट्रद्रोही ठरवली जाईल याचा काही अंदाज बांधता येत नाही. जगभर राष्ट्र प्रेमाचे भरते आले आहे .सत्तांध  लोकांनी राष्ट्रप्रेमाची नवी व्याख्या तयार केली आहे. धर्मांध मनोवृत्तीच्या नेतृत्वाला ,धोरणाला विरोध केल्यास तुम्ही राष्ट्रद्रोही ठरू शकतात. किंबहुना आसपास राष्ट्रप्रेमाचा दबाव प्रचंड आहे. बेगडी राष्ट्रप्रेम असणाऱ्या झुंडी तुम्हाला राष्ट्रद्रोही ठरवू शकतात. त्यामुळे 'सामील व्हा ' या मनोवृत्तीचा जोर मोठा आहे. सगळ्या क्षेत्रात या वृत्तीने दबदबा निर्माण केला आहे. संस्कृती ,धर्म ,कला, अर्थव्यवस्था ,साहित्य क्षेत्रात या प्रवृत्तीचे विकसन मोठ्या प्रमाणात होत आहे .याला विरोध करणारे जगभर विविध देशात नजरकैदेत ,तुरुंगात, संशयी वातावरणात घुसमटून जगत आहेत .राष्ट्रद्रोही शिक्का बसू नये म्हणून लोक कातडीबचाव धोरण घेत आहेत. या दोन्ही वृत्तीच्या शोषक व शोषित वर्गाला  अस्सल  राष्ट्र भावनेची ओळख होणे अत्यंत गरजेचे  आहे.
  काव्यांकुर मधील  राष्ट्र भावनेची कविता या दृष्टीने महत्त्वाची आहे .भारताच्या इतिहासाचे आकलन करत असताना काही ठळक बाबी आपल्या लक्षात येतात .भारतीय स्वातंत्र्यलढ्यात वेगवेगळ्या घटकांनी अतुलनीय योगदान दिले आहे .यात सर्वसामान्य जनता, प्रतिभावान कलाकार, शाहीर ,पत्रकार, लेखक यांचे योगदान आपल्याला लक्षात घ्यावे लागते .लेखक कवींनी आपल्या लेखनातून जाज्वल्य राष्ट्रप्रेमाचे स्फुल्लिंग पेटवले होते.केशवसुत, कवी विनायक, वि. दा. सावरकर ,कुसुमाग्रज, वसंत बापट ,कवी गोविंद, सेनापती बापट ,दुर्गाप्रसाद आसाराम तिवारी, ग दि माडगूळकर ,साने गुरुजी, शांता शेळके ,राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या कवितेतून राष्ट भावना प्रेरणा प्रकट होते. किंबहुना या कवींच्या वेगवेगळ्या कवितांना राष्ट्र प्रेमाच्या गीताचे  स्वरूप प्राप्त झालेले दिसते. स्वातंत्र्यलढ्यातील नेतृत्वाला, सर्वसामान्य माणसाला या कवितांमधून लढण्याचे बळ मिळाले .यातील अनेक कविता समाजाच्या मुखातील क्रांतिकारी मंत्र म्हणून प्रकट झाल्या .सर्व सामान्यांच्या तोंडातून सहजपणे या कविता बाहेर पडत .यातील कित्येक कविता त्या काळातील पिढीला मुखोद्गत होत्या .या सर्व व्यवस्थेमधून आपल्याला राष्ट्रभावनेच्या कवितेचे महत्त्व लक्षात येते. 

   राष्ट्र भावनेची कविता स्वरूप आणि प्रेरणा
स्वातंत्र्याची जाणीव, राष्ट्रविषयक भक्ती आणि राष्ट्रासाठी वीरांनी केलेले अपूर्व बलिदान हा चिरंतन प्रेरणा देणारा विषय असल्याने राष्ट्र भावनेची कविता कालबाह्य होत नसते . राष्ट्रप्रेम आणि उत्तम वाङ्मयीन रचनातत्त्व  यांच्यातून राष्ट्र भावनेची कविता आकार घेते. भारतीय स्वातंत्र्यलढा सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचविण्याचे एक साधन म्हणून राष्ट्रभावना ची कविता आकाराला आली. लोकजागृतीचे माध्यम म्हणून राष्ट्रभावनेच्या कवितेकडे पाहता येते .1885 ते 1947 या कालखंडात उत्कट राष्ट्र प्रेमाची कविता मोठ्या प्रमाणात निर्माण झाली. क्रांतिकारकांना सर्वसामान्य ,माणसांना स्फूर्ती देण्याचे सामर्थ्य या कवितेत होते . राष्ट्रासाठी त्याग, सर्मपणाची वृत्ती या कवितेतून व्यक्त होते . राष्ट्रविषयक भावनांची उत्कट अभिव्यक्ती या कवितेतून घडलेले दिसते .राष्ट्रीय भावना जागृत करण्यासाठी वाङ्मयाचे नेहमीच साधन म्हणून उपयोजन केलेले   दिसते .भारतीय स्वातंत्र्यलढ्यात राष्ट्र भावनेची कविता अत्यंत महत्त्वपूर्ण ठरते. भारतीय स्वातंत्र्यसंग्रामात लोकमत घडविण्याचे एक हत्यार म्हणून या कवितेचा वापर झाला .या संषर्घकालातील कविता वीररस प्रधान अशी होती .या कवितेतून अत्यंत ओजस्वी तेजस्वी आव्हान जनसमुदायाला केले गेले . मराठीमध्ये शाहिरी काव्य ची मोठी परंपरा आहे .विशेष पोवाड्यामधून वीररस प्रधान अशी रचना केलेली दिसून येते. राष्ट्रभावनेच्या कवितेला पोवाडा वाङ्मयाची प्रेरणा होती असे म्हणता येईल . राष्ट्रभावनेच्या कवितेतून त्याग ,समर्पण, बलिदान यांचे महत्त्व सांगितले जाते .स्वातंत्र्यासाठी मुल्यांसाठी मरण स्वीकारण्याची वृत्ती या कवितेतून व्यक्त होते. राष्ट्र उभारणीमध्ये या वाङ्मयाचे, कलाकृतीचे एक अपूर्व स्थान असते .म्हणून राष्ट्र भावनेची कविता श्रेष्ठ असते. अशा प्रकारे आपणाला राष्ट्रभावनेच्या कवितेचे स्वरूप सांगता येते.

 काव्यांकुर मधील राष्ट्र भावनेची कविता स्वरूप आणि वैशिष्‍ट्ये

 भारतीय स्वातंत्र्यलढा संपून गेला .आता कुणाच्या विरोधात लढ्याचे ?असा प्रश्न पडू शकतो. राष्ट्र भावनेची कविता आता कालबाह्य झाली आहे. असेही मत मांडले जाऊ शकते. या पार्श्वभूमीवर राष्ट्रभावनेच्या कवितेचे अध्ययन-अध्यापनाची गरज काय ?असा प्रश्न निर्माण होऊ शकतो .स्वातंत्र्य मिळाले राष्ट्रा पुढील सर्व प्रश्न संपले   आहेत .असे मुळीच म्हणता येत नाही .किंबहुना गेल्या सत्तर वर्षात राष्ट्र विघटनाचे पुष्कळ प्रयत्न झाले .फुटिरतावादाने नवे रूप धारण केले आहे. परकीय शत्रूपेक्षा अंतर्गत शत्रूंनी राष्ट्र  पोखरून टाकले आहे. याला कारण भारत या राष्ट्राची विविधता आहे . राष्ट्राची व्याख्या करताना स्टॅलिन म्हणतो - 'एका समान भूप्रदेशात समान भाषा बोलणारे ,समान इतिहास असणारे ,समान संस्कृती असणारे समान मानसिकता व समान आर्थिक हितसंबंध असणारे त्या भूप्रदेशातील लोकसमूह म्हणजे राष्ट्र ' स्टॅलिनची वरील व्याख्या भारताला लागू करता येत नाही. किंबहुना वरील व्याख्या भारताला लागू करता येत नाही . वरील व्याख्याच्या अगदी उलट बाजू भारतात आहे .भारत हा असमान भूप्रदेश असणारा, विविध भाषा बोलणारा, असमान इतिहास असणारा ,विविधतापूर्ण संस्कृती असणारा ,असमान मानसिकता व असमान आर्थिक हितसंबंध असणारे खंडप्राय भूप्रदेशातील लोकसमूह असणारे राष्ट्र म्हणजे भारत होय .भारताच्या वरील व्याख्येत अनेक प्रश्नांचे उत्तर दडलेले आहेत. विविधतेत एकता हे भारताचे रूप आहे. समता ,बंधुता , न्याय , स्वातंत्र्य, मानवता या मूल्यांची जपणूक करून राष्ट्रउभारणी ही काळाची गरज आहे .भारत हे राष्ट्र म्हणून कसे असावे याचे आदर्श चित्र काव्यांकुर मधील राष्ट्रभावनेच्या तीन कवितेतून मांडले आहे.

 'बलसागर भारत होवो ' ही कविता म्हणजे कवीचे आदर्श स्वप्न आहे . आदर्श, सशक्त, बलवान राष्ट्र म्हणून भारत आकाराला यावे असे कवीचे स्वप्न आहे .जनसेवेसाठी कटिबद्ध राहण्याचे आव्हान कवी करतो .स्वार्थ सोडून राष्ट्रासाठी प्राण देण्याची तयारी ठेवली पाहिजे असे कवीला वाटते .त्याग आणि समर्पणातून देशाला वैभव प्राप्त करून देण्याचा निश्चय कवी करतो. अंधारामध्ये, अज्ञानामध्ये खितपत पडलेल्या देशबांधवांसाठी कार्य करण्यास सज्ज होण्याची भाषा कवी करतो .सर्वांना समान पातळीवर आणण्याची घोषणा कवीने या कवितेतून केली आहे. सर्वांना सोबत घेऊन शाश्वत विकासासाठी वाटचाल करणे महत्त्वाचे आहे .असे मत या कवितेतून मांडले आहे .राष्ट्र कार्य करत असताना प्रयत्नांची शर्थ करावी लागते .या कसोटीच्या क्षणांमधून दिव्य पुरुषार्थ घडेल असे कवीला वाटते .भारत मातेचे वैभव दिव्य शोभेल असा कवीचा विश्वास आहे . ही शक्ती ,ताकद, सामर्थ्य कशासाठी ?तर जगाला शांती देण्यासाठी आहे .एक राष्ट्र म्हणून आम्ही कार्य करू अशी प्रतिज्ञा कवी म्हणतो. प्रस्तुत कवितेतून कवीने राष्ट्राच्या उभारणीचे नवे स्वप्न पाहिले आहे .राष्ट्राच्या जडणघडणीमध्ये काय काय अडचणी येऊ शकतात याची तीव्र जाणीव कवीला आहे .या सर्वांवर मात करण्यासाठीचा मंत्र म्हणून ही कविता श्रेष्ठ ठरते. प्रस्तुत कविता गीताचा रचनाबंध घेऊन आकाराला येते. ही कविता गेय स्वरूपाचे आहे. या कवितेला उत्तम उत्तम चाली लावल्या गेल्या आहेत .प्रस्तुत रचना ही संगीतबद्ध केली गेली आहे .किंबहुना संगीत अनुकूलता हे या कवितेचे वैशिष्ट्य सांगता येईल .सरळ साधी सोपी भाषा या कवितेचे वैशिष्ट्य म्हणून सांगता येईल. कवितेतील लय मनाचा ठाव घेणारी आहे .चढत्या क्रमाने कवितेतील  गतिमानता आकार घेते. वीररसप्रधान अशी ही रचना आहे . 'बलसागर भारत होवो ' ही लोकप्रिय, सर्वश्रुत रचना आहे .वेगवेगळ्या पिढीतील लोकांना ही रचना प्रिय आहे .ही रचना अत्यंत लोकप्रिय आहे . ही कविता स्फूर्तीदायी स्वरूपाचे  अशी आहे. यमक रचनाअत्यंत सहज अशी आहे . उपमा अलंकाराचे उचित उपयोजन या कवितेतून दिसते .या कवितेचे पहिले कडवे तीन ओळींचे आहे .बाकी सर्व कडवी दोन ओळींची आहेत .एकूण सहा कडव्यांमधून ही कविता आकाराला येते.

काव्यांकुर मधील
' या भारतात ' ही राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची राष्ट्र भावनेची कविता आहे .भारत हे एक राष्ट्र म्हणून कसे असावे? याबद्दलचा आशावाद या कवितेतून अभिव्यक्त होतो. भारतीय समाज व्यवस्थेचे उत्तम आकलन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना होते. या आकलनातून व राष्ट्र प्रेमातून या कवितेची निर्मिती झाली आहे . समता ,स्वातंत्र्य,बंधुता ,न्याय या मूल्यांची मागणी प्रस्तुत कवितेतून करण्यात आली आहे .भारतात विविधतेतुन एकता नांदण्याचे स्वप्न  कवी पाहतो .या राष्ट्रउभारणीत येणाऱ्या अडथळ्यांचे कवीला भान आहे .पंथ, संप्रदाय श्रीमंती, गरीबी ,विविध धर्म यांच्यात बंधुभाव असावा असे कवीला वाटते .मानवता हीच राष्ट्र भावना असावी .सर्वांनी मिळून मानवतेचे गीत गावे. तरुण राष्ट्राचा कणा असतो. हा तरुण शीलवान असावा अशी कवीची धारणा आहे .समाजातून जातीयता नष्ट व्हावी अशी कवीची अपेक्षा आहे .वेगवेगळ्या प्रकारची अस्पृश्यता समूळ नष्ट व्हावी असा कवीचाआशावाद आहे. सत्य आणि न्याय या मूल्यांची उभारणी राष्ट्रासाठी आवश्यक आहे .किंबहुना सत्य आणि न्याय या मूल्यांवर राष्ट उभे असते म्हणून कवी सत्य आणि न्यायाची मागणी करतो. घराघरात स्वर्गभाव  निर्माण होवो ,विपत्ती ,भीती नष्ट होऊ दे असा विश्वास कवी कवितेतून व्यक्त करतो .जगाच्या सेवेत आपला देह पडावा असे स्वप्न कवीला पडते .वरील रचनाही गीतात्मक स्वरूपाची आहे .ही कविता चार कडव्यांचे आहे. पहिले कडवे सहा ओळींचे आहे. उरलेले तीन कडवे प्रत्येकी चार ओळींचे आहेत . गेयता हे या कवितेचे प्रधान वैशिष्ट्य आहे .या कवितेला उत्तम चालवता येते .ही कविता उत्तम चालीत संगीतबद्ध केलेली आहे. यमकप्रधानता हे या कवितेचे रचना वैशिष्ट्य म्हणून सांगता येईल .वर मागणे आणि स्वर्ग या प्रक्कथांचे  उपयोजन कवीने आपल्या कवितेत केले आहे .सरळ साधी सोपी अशी ही रचना आहे. सर्वसामान्य माणसाला समजेल आवडेल अशी कवितेची भाषा आहे .प्रतिमा प्रतीके यांच्या उपयोजनापेक्षा साधेपणाने काव्यानुभव कवीने कवितेत मांडला आहे .लयबद्धता हा या कवितेचा विशेष म्हणून सांगता येईल .अंतर्गत व बाह्य लय , दोन्हींचा प्रत्यय या कवितेत येतो .

'शूर आम्ही सरदार , ही कवयित्री शांता शेळके यांची कविता आहे . वीर रस प्रधान अशी ही रचना आहे .या कवितेची भाषा अत्यंत ओजस्वी तेजस्वी स्वरूपाची आहे .देशासाठी सर्वस्व अर्पण करण्याची  भाषा या कवितेतून मांडली गेली आहे. शूर सरदराला मरणाची भीती किती असणार आहे ?मरण हाच त्याचा धर्म आहे .देशासाठी देवासाठी धर्मासाठी प्राण हातात घेतले आहे .कधीही आपला प्राण देण्यासाठी सज्ज झालेल्या सैनिकाचे हे आत्मवृत्त आहे .आम्हाला कुणीही संघर्ष काय आहे ?हे शिकवू नये. आईच्या गर्भातूनच अभिमन्यूसारखी संघर्षाची करण्याची रीत आम्ही शिकलेलो आहोत . या कवितेतील सैनिकाचे आपल्या तलवारीवर प्रेम आहे .त्याचे सर्वस्व ती तलवार आहे .संघर्ष करणे हिच्या सैनिकाची परिभाषा आहे .लाख संकट झेलण्यास पहाडी छातीचा हा सैनिक तयार आहे .मरणाचाही सोहळा होईल असे वीर मरण हा सरदार मागतो आहे .देशापुढे माया ,ममता , नाती सारेशुल्लक आहेत .  ही कविता म्हणत  असताना अंगात वीरश्री संचारते. या कवितेची रचना ही आकलनास साधी सोपी अशी आहे .तीन कडवे असणारी कविता आहे. पहिल्या कडव्यात दोनच ओळी आहेत. उरलेल्या दोन कडव्यात प्रत्येकी तीन ओळी आहेत .गीतात्मक रचना असल्यामुळे यमक प्रधान अशी या कवितेची बांधणी आहे. या कवितेला चाल लावता येते .या कवितेला संगीतबद्ध अशी चाल लावली गेली आहे .ही कविता म्हणजे लोकमानसात अजरामर झालेली गीतात्मक रचना आहे. येडी प्रीत ,पहाडी छाती या प्रतिमांमधून काव्यानुभवाची इंद्रिय संवेदना प्रत्ययाला येते. वरील कविता गीत स्वरूपाची आहे .लयबद्धता हा या कवितेचा ठळक विशेष आहे .ही कविता म्हणजे लोकप्रिय ,सर्वश्रुत असे गीत आहे .


डॉ .जी.आर. ढेंबरे
मराठी विभाग प्रमुख
श्री .व्ही.एस. नाईक महाविद्यालय रावेर , जि . जळगाव पिन_425508
मोब-9421081270
ई - मेल -dhembregr@gmail.com

विज्ञान पटकथा स्वरूप आणि महत्त्व

'विज्ञान पटकथा स्वरूप आणि महत्त्व '
डॉ .जी आर ढेंबरे
सहायक प्राध्यापक ,
श्री .व्ही.एस. नाईक कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय , रावेर , जि . जळगाव , पिन-425508
मोबईल नंबर -9421081270
ईमेल -dhembregr@gmail.com
 प्रास्ताविक : -
 मराठी चित्रपटाला जवळपास शतकाची परंपरा आहे .किंबहुना भारतामध्ये चित्रपटांची प्रथम निर्मिती मराठी माणसाने केली. मराठी चित्रपटांसाठी मालिकांसाठी वेगवेगळ्या विषयावरील पटकथांचे लेखन केले जाते. आध्यात्मिक , धार्मिक , सांस्कृतिक ,ऐतिहासिक, व्यक्तिगत ,कौटुंबिक, समस्याप्रधान पटकथा मराठी चित्रपट, मालिकांमध्ये सादर केल्या जातात .भावनाप्रधान अशा विषयांची प्राधान्याने निवड केली जाते .चित्रपट आणि मालिका यांच्या निर्मितीमागे एक व्यावसायिक गणित असते .या व्यवसायाच्या गणिताबरोबरच ही एक कला सुद्धा आहे .मुळात आज प्रसार माध्यमांचा विस्फोट झाला आहे. शेकडो विविध चॅनलची निर्मिती व वाटचाल सुरू आहे. मोबाईल , संगणक यांची हाताळणी व उपलब्धता सहज सोपी झाली आहे .नेटच्या वापरा संदर्भातील कमाल मर्यादा संपल्या आहेत. मनोरंजन करमणूक ही आज माणसाच्या मूलभूत गरजांपैकी एक गरज बनली आहे .चित्रपट मालिकांचा साधन म्हणून काही लोक उपयोग करत आहेत. विशिष्ट विचारधारा, कर्मकांड, संस्कृती ,संस्कार यांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी ही साधने उपयोगात आणली जात आहेत. कुठेतरी प्रेक्षकांच्या मनावर, बुद्धीवर ताबा मिळवण्यासाठी चित्रपट, मालिकांचा वापर केला जात आहे .या आजच्या महत्त्वाच्या सादरीकरणाच्या कलेचा आत्मा म्हणजे पटकथा होय .उत्तम विषयावरील पटकथाचा अभाव दिसून येतो .लोकांच्या भावनांना ,मनाला जपणारी पटकथा लिहिली जाते .चित्रपट व मालिकांमधून विशिष्ट वर्गाची, विशिष्ट जातीची संस्कृती बहुजन समाजावर लादली जाते. या माध्यमाच्या प्रभावी वापरातून इतर वर्गातील बहुजन समाज या विशिष्ट संस्कृतीला आत्मसात करत आहे .एकूण मराठी चित्रपट व मालिकांमध्ये विज्ञानविषयक व विवेकवादी पटकथाचा अभाव दिसून येतो. विज्ञान पटकथेवर आधारित असणारे मराठी चित्रपट व मालिका निर्मितीची आज मोठ्या प्रमाणात गरज आहे.

पटकथेचे स्वरूप : -

 चित्रपट आणि दूरचित्रवाणीवरून प्रसारित होणाऱ्या मालिकांच्या निर्मितीप्रक्रियेत पटकथा हा एक महत्त्वाचा घटक असतो. कथानक, घटना ,पात्रे ,पात्रांचे संवाद ,पात्रांच्या कृती ,वातावरण ,काळ ही पटकथेची अंगे असतात. चित्रपट व मालिकांचे माध्यम दृकश्राव्य स्वरूपाचे असते. त्यामुळे पटकथेचे रूपांतर चित्रीकरणात करता यावे असे तिचे लेखन अपेक्षित असते. ध्वनी ,दृश्य ,प्रकाश, चित्रे ,तक्ते इत्यादी बाबतचा नेमक्या सूचना पटकथाकाराला द्याव्या लागतात. पटकथाकार पटकथा लिहितो. त्या पटकथावरून दिग्दर्शक चित्रीकरण संहिता तयार करतो. पटकथाकाराला चित्रपट, मालिका या माध्यमांचे चांगले ज्ञान असेल तर त्याच्या पटकथेचाच चित्रीकरण संहिता म्हणून उपयोग करता येतो. पटकथा हा एक सृजनशील लेखनाचा प्रकार आहे .पटकथेचे साहित्याशी असणारे नाते स्पष्ट करताना वाङ्मयीन संज्ञा संकल्पना कोशामध्ये अभ्यासक म्हणतात - 'चित्रपट हे माध्यमच दिग्दर्शक छायाचित्रकार आणि संपादक यांचे असल्यामुळे लिखित शब्दाला तिथे फारसे महत्त्व नसते .तथापि उत्कृष्ट चित्रपटांच्या पटकथा अत्यंत वाचनीय असतात. आणि त्यात साहित्याचे गुणधर्म असतात. तांत्रिक तपशील वगळल्यानंतर ती संहिता एखाद्या कादंबरीचा अथवा नाट्य संहितेचा आकार घेते .या दोन्ही साहित्यप्रकारांचे  गुणधर्म लिखित पटकथेत मिसळलेले असतात. शेवटी पटकथा लेखन हे प्रतिभेचे काम आहे .सृजनात्मकतेने आपला अनुभव प्रकट करण्याचे एक साधन म्हणून पटकथाकडे पाहता येते .पटकथाविषयी प्रभाकर पेंढारकर लिहितात - 'चित्रपट या माध्यमात अनेक व्यक्तींचा कलाप्रकारांचा तंत्राचा आणि शास्त्रांचा समन्वय साधावा लागतो .या पसाऱ्याची सूत्रबद्ध रचना करणारा आराखडा म्हणजे पटकथा. पटकथेला अमकेच स्वरूप असावे ,असे काही नियम सांगता येणार नाहीत. '        वरील विवेचनावरून आपणाला असे म्हणता येईल की पटकथेचे लेखन हे विशिष्ट असे वस्तुनिष्ठ स्वरूपाचे शास्त्र नाही .पटकथेचे अगदी अचूक असे स्वरूप आपल्याला नमूद करता  करता येत नाही. थोडक्यात पटकथा लेखन हे शास्त्र नसून ही एक कला आहे. ही कला परिश्रमपूर्वक अभ्यासातून आत्मसात केली जाऊ शकते.
३ .समाजाची अभिरूची आणि चित्रपट -
समाज आणि विविध कलांचा परस्पर संबंध हा साध्य आणि साधन या स्वरूपाचा आहे. हे दोन्ही घटक परस्परपूरक असे आहेत .समाजाचे प्रतिबिंब चित्रपट कलेत उमटत असते. चित्रपटाचा चांगला ,वाईट परिणाम समाजावर होत असतो. चित्रपट निर्मिती त्यातील आर्थिक उलाढालीमुळे, कलेच्या धन निरपेक्ष आत्मानंदाच्या कल्पनांपेक्षा व्यापाराच्या लाभ प्रेरणेशी अधिक निगडित असते. भारतीय चित्रपट आणि समाज याविषयी प्राध्यापक समीर दुबळे लिहितात, ' चित्रपटाचा भारतीय समाजाच्या संदर्भात विचार केला तर काही गोष्टी लक्षात येतात. भारतातील शहरांची निर्मिती ब्रिटिश काळात झाली .शहरात रोजगार मिळत असल्याने तेथील लोकां जवळ पैसा होता .आपापले गाव घर शेती सोडून आलेल्यांचा सरमिसळ समाज असल्याने गावाकडच्या लोक रंजनाच्या पद्धती दूर राहिल्या होत्या .शहर म्हणजे नवे आधुनिक झकपक ऐटबाज अशा कल्पना होत्या. काही प्रमाणात अजूनही आहेत. या शहरी राहणीचा भाग म्हणून सिनेमा आला. त्यात मैफलीत जाण्यासारखा रितीरिवाजाचा प्रश्न नव्हता. तिकीट काढलं की कुणीही बघू शकेल .त्या काळाच्या शेतीनिष्ठ जातिनिष्ठ समाजात कलांचा आस्वाद अन्य प्रयोजनांशी धार्मिक- सामाजिक इत्यादींची जोडलेला होता .कलावंत कलावंतीणीचा वर्ग गृहस्थाने पेक्षा वेगळा होता. त्यामुळे रसिकाची, आस्वादकाची भूमिका घेणे उच्चभ्रू श्रेष्ठ वर्गाला शक्य होते. चित्रपटाने तिकीट विक्रीच्या व्यापारी तत्त्वावर मनोरंजन देऊ केले .त्यामूळे संमिश्र समाज एकाच वेळी चित्रपटगृहात तोच चित्रपट बघू लागला. त्यामुळे सर्व स्तरातील लोक ग्राहक म्हणून एका पातळीवर आले.
 थोडक्यात वरील विवेचनातून भारतीय चित्रपट आणि भारतीय समाज यांचा इतिहास स्पष्ट होतो .या इतिहासातून एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे भारतीय चित्रपट आणि समाज यांच्या परस्पर गरजांमधून एकमेकांना घडत-बिघडत दोन्हींची निर्मिती ,विकास झाला. शहरातील माणसाच्या करमणुकीचे साधन म्हणून चित्रपट कलेचा जन्म झाला. सुरुवातीच्या काळात भारतीय चित्रपटांवर धार्मिकतेचा पगडा असलेला दिसून येतो. किंबहुना आजही धार्मिकतेच्या जोखडातून भारतीय चित्रपट मुक्त झालेला आहे असे म्हणता येत नाही .त्याच त्या धार्मिक कथा नव्या रूपात चित्रपटातून मांडल्या जातात . लोक त्या चवीने बघतात . यामध्ये भारतीय समाजाच्या अभिरुचीचे गमक दडलेले आहे. भारतीय समाज माणसांमध्ये धार्मिक कथांचे गारूड कायम आहे .सरंजामी व्यवस्थेचे समर्थन करण्याची भारतीय मानसिकता चित्रपटातूनही अभिव्यक्त होते. मुळात भारतीय समाजात चित्रपट पाहणारा वर्ग हा आस्वादकापेक्षा ग्राहक जास्त आहे .त्यामुळे ग्राहकाला खूश करण्यासाठी ठराविक फॉर्मुला किंवा मसाला पटांना वाव दिला गेला .कलात्मकदृष्ट्या उत्तम असणारे चित्रपट व्यवसाय करत नाहीत. कारण लोकांना ते चित्रपट आवडत नाहीत. कुठे तरी जातीय अस्मिता कुरवळणारे सरंजामी व्यवस्थेचे समर्थन करणारे चित्रपट, लैंगिक भावभावनांचे उत्तान प्रदर्शन करणारे चित्रपट ,      टिनपाट विनोद निर्मिती करणाऱ्या चित्रपट, हिंसेचे प्रदर्शन करणारी चित्रपट भारतीय माणसांना अधिक आवडतात .मुळातच भारतीय लोकांची अभिरुची ही नेहमी स्वस्त निम्म दर्जाचे राहिलेली आहे .काही अपवाद सांगता येतील .परंतु बहुसंख्य चित्रपटांना वरील विवेचन लागू पडणारे आहे .या पार्श्वभूमीवर भारतामध्ये विज्ञान पटकथेवरील चित्रपट किती यशस्वी होऊ शकतील याबद्दल शंका आहे .परंतु आजच्या आधुनिक भारतीय समाजाला विवेकवादी विज्ञानवादी रसिक गरज आहे असे वाटते.

४ .विज्ञान पटकथा स्वरूप आणि महत्त्व : -
स्टार वॉर्स, क्लोज एन्काऊंटर्स ऑफ द थर्ड काइंट ह्या चित्रपटांच्या भव्य यशानंतर पाश्चात्य चित्रपटसृष्टीत विज्ञान पटकथेवर आधारित चित्रपटांची एक प्रचंड लाट आली. मराठी भाषेतील विज्ञान पटकथांवर आधारित असणाऱ्या चित्रपटांची संख्या अत्यंत मर्यादित आहे .हे चित्रपटही परिपूर्ण विज्ञान पटकथेवर आधारित आहेत असे म्हणता येत नाही .विज्ञान पटकथा घेऊन चित्रपट निर्माण करणे हे एक आव्हान आहे .विज्ञान पटकथेवर आधारित असणारे चित्रपट मराठी माणसं किती पाहतील याबद्दल शंका आहे. चित्रपटनिर्मितीबद्दल प्राध्यापक समीर दुबळे -लिहितात ' प्रत्येक माध्यमाबाबत अभिरुची घडण्यामध्ये त्यातील कलाकृतींचा अनुभव महत्त्वाचे कार्य बजावत असतो .चित्रपट माध्यमाला व्यापाराच्या शक्यता आहेत. हे चित्रपट उद्योगाच्या वाढीत स्पष्टच दिसते .परंतु कलात्मक अभिव्यक्तीचे माध्यम म्हणून त्याकडे पाहणाऱ्या व निर्मिती करणाऱ्या कलाकारांची आणि सामान्य प्रेक्षकांची गाठ पडणे कठीण होते .त्यामुळे चित्रपटाबद्दल एकच एक धंदेवाईक दृष्टी आणि प्रेक्षकांमध्ये ग्राहकवृत्ती उद्दीपनाची ओढ आणि विरंगुळ्या  पलीकडे अपेक्षाच न करण्याची वृत्ती असा प्रकार दिसतो '
 वरील विवेचनातून भारतीय प्रेक्षकांची अभिरुची आणि चित्रपटांच्या निर्मितीमागील अर्थव्यवस्था यातील सहसंबंध स्पष्ट होतो .चित्रपटाकडे भारतीय माणूस केवळ विरंगुळ्याचे साधन म्हणून पाहतो. चित्रपटातून नव्या कल्पना, विचारांना बळ मिळू शकते अशी शक्यता फार कमी आहे .या पार्श्वभूमीवर विज्ञान पटकथा असलेले चित्रपट भारतीय माणसाच्या पसंतीला उतरतील का हा खरा प्रश्न आहे.
 आज तंत्रज्ञानात बदल झाला आहे .या बदलत्या तंत्राचा आधार घेऊन मराठीतून उत्तम विज्ञान पटकथेवरील चित्रपटांची निर्मिती होणे महत्त्वाचे वाटते .
संदर्भ : -
१ . प्रभा गणोरकर , वसंत आबाजी डहाके आणि इतर , वाङ्मयीन संज्ञा -संकल्पना कोश , ग . रा भटकळ फाउण्डेशन , मुंबई , पहिली आवृत्ती ,डिसेंबर २००१ , पृ .२५६
२ . प्रभाकर पेंढारकर , ' मराठी वाङ्मय कोश ' खंड चौथा , ( समन्वयक संपादक - विजया राजाध्यक्ष ) महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ , मुंबई , प्रथमावृत्ती , २००२ पृ .१८८
३ . समीर दुबळे , ' प्रयोगाधिष्ठित कला , यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ , नाशिक , प्रथमावृत्ती -२००० पृ ६१
४ . समीर दुबळे ,तत्रैव , पृ .६२

राष्ट्रीय सेवा योजना व्यक्तिमत्त्व विकासाचे खुले व्यासपीठ

"राष्ट्रीय सेवा योजना व्यक्तिमत्व विकासाचे खुले व्यासपीठ "
 डॉक्टर जी.आर .ढेंबरे
 प्रस्तावना :
 व्यक्तिमत्व विकास ही संकल्पना आज रूढ झाली आहे .व्यक्तिमत्व विकासाची शिबिरे मोठ्या शहरांपासून ते छोट्या गावांपर्यंत घेतली जात आहेत . या शिबिरांमधून किती प्रमाणात व्यक्तिमत्व विकास होतो याबद्दल फार चांगले निष्कर्ष काढता येत नाहीत. किंबहुना बाजाराच्या नियमानुसार मागणी तसा पुरवठा असे या व्यक्तिमत्व शिबिराचे स्वरूप दिसते. केवळ पैसा कमावण्यासाठी, गल्ला जमा होण्यासाठीचे एक माध्यम म्हणून या व्यक्तिमत्व विकास शिबिरांकडे पाहिले जाते .आज पालक वर्ग आपल्या पाल्या बाबतीत अत्यंत सजग झाला आहे. हा पालक वर्ग आपल्या पाल्याच्या व्यक्तिमत्व विकासासाठी पैसा खर्च करण्यास तयार असतो. पालक वर्ग अशा स्वरूपाच्या व्यक्तिमत्व विकास शिबिरांमध्ये आपल्या पाल्याला पाठवून भरमसाठ पैसा खर्च करून त्याच्या व्यक्तिमत्व विकासाचे स्वप्न पाहतो .पण अशा शिबिरातून पालकांच्या वाट्याला निराशा येते .व्यक्तिमत्व विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. उच्च शिक्षण क्षेत्रात प्रवेश घेतल्यानंतर आपल्या पाल्याचा वाढत्या स्पर्धेमध्ये कसा निभाव लागेल याबद्दल पालक चिंतातुर असतात .पदवीच्या प्रथम वर्षाला प्रवेश घेतल्यानंतर विद्यार्थ्याला अभ्यासक्रमाव्यतिरिक्त अनेक क्षेत्रांची दालने खुली होतात . महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना ,युवती सभा, विद्यार्थी विकास विभाग, सांस्कृतिक विभाग यांचा परिचय विद्यार्थ्यांना होतो. या प्रत्येक क्षेत्राची स्वतंत्र वैशिष्ट्य आहेत . तसेच या प्रत्येक क्षेत्राला काही मर्यादाही आहेत . महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये अतिशय प्रिय असणारे क्षेत्र म्हणजे राष्ट्रीय सेवा योजना हे होय . गेली ५० वर्षे राष्ट्रीय सेवा योजना  विभागने अनेक उद्दिष्टांसाठी कार्य केले आहे .हा विभाग विद्यार्थ्यांमध्ये प्रिय होण्याची अनेक कारणे आहेत. महाविद्यालयीन जीवनामध्ये राष्ट्रीय सेवा योजना विभागाशी जोडल्यामुळे अनेक मान्यवरांचे जीवन आमूलाग्र बदलून गेले .शैक्षणिक, सांस्कृतिक कला, क्रीडा ,उद्योग, राजकारण, समाजकारण ,समाजकार्य, ग्रामीण विकास या विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत असणारे हजारो व्यक्ती राष्ट्रीय सेवा योजना या विभागामुळे , 'आम्ही घडलो ' असे म्हणतात, तेव्हा राष्ट्रीय सेवा योजना विभाग हे व्यक्तिमत्व विकासाचे खुले व्यासपीठ आहे .असे आपणाल ठामपणे म्हणता येते .आज भारतभर अनेक विद्यापीठांचे कुलगुरु, अनेक महाविद्यालयातील प्राचार्य, प्राध्यापक हे राष्ट्रीय सेवा योजना विभागातून 'आम्ही घडलो ' , आमच्यामध्ये नेतृत्व क्षमता निर्माण झाली .असे म्हणतात तेव्हा राष्ट्रीय सेवा योजना विभाग हा केवळ विभाग राहत नाही तर ती राष्ट्रासाठी नेतृत्व घडवणारी चळवळ होते .असे आपल्याला म्हणता येईल. राष्ट्रीय सेवा योजना विभाग हा हजारो विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकास घडवतो . विद्यार्थ्यांना स्वतःमधील सुप्त गुणांचा ठेवा शोधण्यासाठी हा विभाग उपयोगी पडतो .विद्यार्थ्यांमधील 'स्व ' शोधण्यासाठी या विभागाची मदत होते. राष्ट्रीय सेवा योजना विभागातून विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास का? व कसा ?घडतो हे समजावून घेणे महत्त्वाचे ठरते.

विद्यार्थ्यांची कौटुंबिक सामाजिक स्थिती आणि राष्ट्रीय सेवा योजना : -

 विद्यार्थी ग्रामीण विभागातील असो किंवा शहरी विभागातील यातील
70 % टक्के विद्यार्थी हे उच्च शिक्षण घेणाऱ्या त्यांच्या कुंटुबातील  पहिल्या पिढीतील  असतात . शेतकरी, शेतमजूर ,कामगार, छोटे व्यावसायिक, व्यापारी या पार्श्वभूमीतील हे विद्यार्थी पारंपारिक शिक्षण घेत आहेत . अशा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये ,विचारांमध्ये असंख्य न्यूनगंड  परिस्थितीमुळे निर्माण झालेले असतात. या न्यूनगंडमुळे  या विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाला काहीसे बुजरे स्वरूप स्वरूप प्राप्त झालेले दिसते. आत्मविश्वासाचा अभाव, अनाठायी  असंख्य गोष्टींबद्दलची भीती ,भाषा, संवाद कौशल्याचा अभाव या विद्यार्थ्यांमध्ये दिसून येतो. या विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व काहीसे कुंठित झालेली दिसते .या विद्यार्थ्यांमध्ये नवी आशा ,उमेद राष्ट्रीय सेवा योजना या एकका च्या माध्यमातून निर्माण होते. आपल्या व्यक्तिमत्त्वाला असणाऱ्या मर्यादा विद्यार्थ्यांना  राष्ट्रीय सेवा योजना या एककात प्रवेश घेतल्यानंतर लक्षात येतात. केवळ आपल्याला काय येत नाही ? हे समजून उपयोग नाही तर आपण आपल्या मर्यादा कशा कमी केल्या पाहिजेत, यासाठी राष्ट्रीय सेवा योजना विभागाची कार्यप्रणाली मदतशील ठरते. विद्यार्थ्यांमधील न्यूनगंड कमी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना हा विभाग महत्त्वाचा ठरतो. मध्यमवर्गीय ,उच्च मध्यमवर्गीय स्थितीतील विद्यार्थ्यांना समाजातील प्रश्न समस्यांचे भान राष्ट्रीय सेवा योजनेत काम केल्यामुळे प्राप्त होते. समाजातील गरिबी ,दारिद्र्य, अशिक्षितपणा ,अंधश्रद्धा याविषयीची नवी जाणीव राष्ट्रीय सेवा योजनामुळे विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होते .समाजातील वेगवेगळ्या कौटुंबिक सामाजिक परिवेशातील विद्यार्थ्यांच्या एकत्रीकरणातून विद्यार्थ्यांमध्ये समायोजन करण्याची क्षमता विकसित होते .वरील सर्व घटकांचा विचार करता विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी राष्ट्रीय सेवा योजना हे एक अत्यंत मौलिक कार्य करते असे आपल्याला म्हणता येईल.


 भाषिक कौशल्य आणि राष्ट्रीय सेवा योजना एकक

 राष्ट्रीय सेवा योजना एककात सहभाग घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या भाषिक कौशल्याचा विकास वेगाने होतो .श्रवण ,वाचन ,लेखन, संभाषण या मूलभूत भाषिक कौशल्यांचा विकास आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्यातील सहसंबंध परस्परपूरक असा आहे. राष्ट्रीय सेवा योजना एकका मार्फत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते .अनेक अभ्यासकांना, संशोधकांना, समाजातील विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या लोकांचे विचार विद्यार्थी ऐकतात. एका जागी बसून शांतपणे एकाग्रपणे विचार ऐकल्यामुळे श्रवण कौशल्याचा विकास होतो.विशेष हिवाळी शिबिरातील विविध व्याख्याने, विद्यापीठ स्तरीय, राज्यस्तरीय, राष्ट्रीय स्तरावरील विविध शिबिरांमधून विद्यार्थांचे वैचारिक प्रबोधन होते. विचारांच्या श्रावणातून विद्यार्थ्यांच्या श्रवण कौशल्याचा विकास होतो. मान्यवरांच्या भाषणातून अनेक संदर्भ  विद्यार्थ्यांना माहिती होतात.विद्यार्थी नवनवीन पुस्तके वाचण्याचा प्रयत्न करतात. संदर्भ ग्रंथचाळतात.यातून विद्यार्थ्यांच्या वाचन कौशल्याचा विकास होतो. राष्ट्रीय सेवा योजना एककात विद्यार्थी शिक्षकांशी , मार्गदर्शन करणाऱ्या अभ्यासकांशी संवाद साधतात. प्रश्न विचारतात .चर्चा करतात. यातून विद्यार्थ्यांमधील संवाद कौशल्याचा विकास होतो. विद्यार्थी गटचर्चा करतात यातून एखाद्या समस्येबद्दल ,प्रश्नाबद्दल विद्यार्थी मते मांडतात.यातून नकळतपणे भाषण, संभाषण कौशल्य विकसित होते . राष्ट्रीय सेवा योजना एककातील उपक्रमांमध्ये सहभाग घेत असताना वेगवेगळ्या विषयांवरील लेखन विद्यार्थी करतात. विविध निबंध स्पर्धांमध्ये विद्यार्थी सहभाग घेतात. त्यातून विद्यार्थ्यांचे लेखन कौशल्य विकसित होते .भाषिक कौशल्यांचा विकास हा एक व्यक्तिमत्त्व विकासाचा भाग आहे .राष्ट्रीय सेवा योजनेतील विविध उपक्रममधील सहभागामुळे विद्यार्थ्यांच्या भाषिक कौशल्यांचा विकास होतो. यातून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार प्राप्त होतो. राष्ट्रीय सेवा योजना एकक हे विद्यार्थ्यांच्या भाषिक कौशल्यांचा विकास करणारे उत्तम माध्यम ठरते. भाषिक कौशल्य प्रयत्नाने सरावाने सर्वांना अवगत करता येतात .राष्ट्रीय सेवा योजना एकक विद्यार्थ्यांना भाषिक कौशल्य विकसित करण्यासाठी वेगवेगळ्या संधी प्राप्त करून देते .विविध कार्यक्रमातील सरावाने मुलांमध्ये आत्मविश्वास वाढतो. भाषिक कौशल्य चांगल्या पद्धतीने आत्मसात केली जातात. व्यक्तिमत्त्व प्रभावी बनते. जीवनात यशस्वी होण्यासाठी या कौशल्यांमध्ये पारंगत असणे आवश्यक आहे .ही सर्व भाषिक कौशल्य एकमेकांना पूरक अशी आहेत .

नेतृत्वगुणांचा विकास आणि राष्ट्रीय सेवा योजना

नेतृत्वगुणांचा विकास करता येतो. प्रयत्नांमधून जाणीवपूर्वक नेतृत्व विकसित करता येते. राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यप्रणालीमध्ये विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाला विकसित करण्याची क्षमता असते . राष्ट्रीय सेवा योजना एकक हा एक समूह असतो. या समूहातील काही विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व करण्याची क्षमता असते. राष्ट्रीय सेवा योजना एककातील कार्यप्रणालीत नेतृत्व करण्याची विद्यार्थ्यांना संधी प्राप्त होते. एखादं कार्य करण्यासाठी  योग्य दिशा देणे महत्त्वाचे असते. नेतृत्व हे दिशा देणारे असते. राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थी नेतृत्वासाठी सज्ज होतात. छोट्या-छोट्या जबाबदाऱ्या घेण्यासाठी तयार असतात. त्यातून विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाला यश मिळते. त्यातून आत्मविश्वास विकसित होतो.

राष्ट्रीय सेवा योजना एकक आणि खेळ संस्कृती

राष्ट्रीय सेवा योजना मध्ये सहभाग घेतलेल्या स्वयंसेवकांनामध्ये व्यायामाची आवड निर्माण होते. विशेष हिवाळी शिबिरामध्ये योगासने, व्यायामाची मिळालेले प्रशिक्षण स्वयंसेवकांनीमध्ये शरीर सुदृढ असावे यासाठी प्रेरणा निर्माण करते. विविध खेळांबद्दल स्वयंसेवकांच्या ठिकाणी आवड निर्माण करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना हे एकक महत्त्वपूर्ण कार्य पार पडते. व्यक्तिमत्त्व विकासामध्ये सुदृढ शरीराचे ,तंदुरुस्त शरीरचे महत्त्व सर्वज्ञात आहे. आकर्षक शरीरयष्टी व्यक्तिमत्त्वाला नवा आयाम मिळवून देते .राष्ट्रीय सेवा योजनेची कार्यप्रणाली विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना सकारात्मक बाजूंना सूक्ष्मपणे प्रेरणा देते .विद्यार्थ्यांना स्वतःमधील विविध गुण, मूल्य यांचा ठेवा राष्ट्रीय सेवा योजनेत सहभाग घेतल्यामुळे सापडतो. विद्यार्थ्यांला 'स्व ' चा शोध घेण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना हे एकक महत्त्वाचे ठरते. विद्यार्थ्यांमधील बदल सूक्ष्मपणे घडत जातात. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण उत्तम प्रकारे घडत जाते. राष्ट्रीय सेवा योजनेत सहभाग घेतल्यामुळे विद्यार्थ्यांतील सुरवंटाचे एका फुलपाखरात रूपांतर होते. एक सृजनशील शिक्षक म्हणून कार्यक्रमाधिकारी च्या नजरेत विद्यार्थ्यांमधील सकारात्मक बदल लक्षात येतात. शिक्षणप्रक्रियेतील हा सर्वात आनंददायी असा क्षण असतो. शिक्षकांच्या मनातील विचार विद्यार्थ्यांच्या कृती दिसतात, तेव्हा राष्ट्रीय सेवा योजना हे एकक सृजनशील कार्य करणारे एकक ठरते. एका शिक्षकाला याचा आनंद असतो. शिक्षक आपल्या संपूर्ण सेवेत राष्ट्रीय सेवा योजनेत केलेले काम लक्षात ठेवतो.

 शिक्षकांच्या व्यक्तिमत्व विकासात रासेयोचे स्थान : -

विद्यार्थ्यांप्रमाणेच कार्यक्रम अधिकाऱ्यांचा सुद्धा राष्ट्रीय सेवा योजनेत सहभाग घेतल्यामुळे व्यक्तिमत्व विकास होतो. आपल्या अध्यापन विषयांबरोबरच जिवंत समाजाशी, सळसळत्या तरुणाईशी कार्यक्रम अधिकारी जोडला जातो. तेव्हा त्यांच्यामध्ये नेतृत्व गुणांची क्षमता सिद्ध करण्यासाठीची एक संधी प्राप्त होते. राष्ट्रीय सेवा योजना एकक या दृष्टीने महत्त्वाचे ठरते. आपल्या विषया पलीकडे रासेयोत  काम केल्यामुळे नवनवीन विषयांचे ज्ञान शिक्षकाला मिळते .व्यवस्थापनाचा जिवंत अनुभव मिळतो. समाजाशी, समाजातील विविध घटकांशी अतूट नाते निर्माण होऊन शिक्षकाला जगण्यासाठीचे,आनंदाचे एक साधन राष्ट्रीय सेवा योजनेच्या रूपातून मिळते. औपचारिक शिक्षणपेक्षा, अनौपचारिक शिक्षणाचा वस्तुपाठ शिक्षकाला रासेयोमुळे मिळतो. विद्यार्थ्यांशी नवा संवाद निर्माण होतो. समकालीन तरुणाईच्या भावविश्वात डोकावून पाहण्याची संधी शिक्षकाला मिळते.औपचारिक शिक्षणातील शुष्कपणा, कोरडेपणा, तोचतोचपणा यातून शिक्षणाला रटाळ प्रक्रियेचे स्वरूप येते.यातून चकोरी पलीकडे काहीतरी नवे, कोरे शिकण्याचा अनुभव रासेयेमुळे शिक्षकाला मिळतो. रासेयोमध्ये विद्यार्थ्यांशी साधलेला संवाद, तरुणाईच्या भावभावनांशी होणारी जवळीक शिक्षकाला समृद्ध जीवन अनुभवविश्व देऊन जाते. शिक्षकाच्या पुढील कार्यासाठी रासेयो हा एक प्रेरणास्रोत ठरतो. त्यामुळे रासेयो हे केवळ विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाचे साधन नाही तर ते शिक्षकांसाठीचे साध्य ठरते. आजच्या शिक्षण प्रणालीमध्ये रासेयो हे व्यक्तिमत्त्व विकासाचे दुहेरी खुले व्यासपीठ ठरते.


विविध कलागुण आणि राष्ट्रीय सेवा योजना

राष्ट्रीय सेवा योजना मध्ये सहभाग घेतलेल्या विद्यार्थ्यांना स्वतः मधील कलाकार शोधण्याची संधी प्राप्त होते. स्वतःमध्ये गायक, वादक, उत्तम सूत्रसंचालन करणारा व्यक्ती, उत्तम वक्ता, उत्तम संवादक यांचा शोध घेण्यासाठी रासेयोची कार्यप्रणाली महत्त्वाची ठरते. कलाकाराला एक खुले व्यासपीठ मिळते. चांगल्या कलाकाराला दाद मिळते. कलाकाराला आपले दोष शोधण्यासाठी रासेयो एक कलामंच म्हणून उपयोगी पडतो. कलाकाराला त्याची प्रतिभा सापडते. उत्तम कवी, लेखक होण्याचे विविध गुण ,दृष्टीकोन राष्ट्रीय सेवा योजनेमुळे स्वयंसेवकांना मिळतो. याचा उपयोग स्वयंसेवक आयुष्यभर करतो. यातून समाजाला उत्तम कलाकार देणारा विचारमंच म्हणून आपणाला राष्ट्रीय सेवा योजना कडे पाहता येते.


जीवनातील ध्येयनिश्चिती आणि राष्ट्रीय सेवा योजना

 महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये त्यांच्या भावी जीवनाचे ध्येय निश्चित करणे अत्यंत महत्त्वाचे असते. आपल्याला पुढील जीवनात काय करायचे आहे ? या प्रश्नाचे उत्तर शोधणे फार अवघड असते. शिक्षण प्रक्रियेत विद्यार्थ्याला द हे ध्येयनिश्चित करण्यासाठी मार्गदर्शक ठरेल अशी व्यवस्था अस्तित्वात नाही. विद्यार्थी ध्येयनिश्चिती बाबत चाचपडत राहतो. राष्ट्रीय सेवा योजनेत सहभाग घेणाऱ्या स्वयंसेवकाला आपल्या स्वतःमधील क्षमता व मर्यादा यांचा बोध होतो. आपल्याला कोणती गोष्ट केल्याने समाधान मिळते ,आनंद मिळतो याचा आत्मशोध लागल्यावर विद्यार्थी ध्येय निश्चित करण्यासाठी सक्षम बनतात. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी ध्येयनिश्चिती महत्त्वाची ठरते. या संदर्भात अभ्यासक म्हणतात "नियमित कार्यक्रमातून विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्त्व विकास होतो.परंतु शिबिरामध्ये महाविद्यालयीन युवकांना खेडी बघायला ,अनुभवायला मिळतात. दहा दिवसांच्या (आता सात दिवस ) शिबिरांतून विद्यार्थ्यांना स्व कळतो. आपण काय आहोत याची जाणीव होते. त्याच्यातला कवी, नाटककार, वक्ता,नट बाहेर येतो. अशी अनेक व्यक्तीमत्वे महाराष्ट्रभर पाहायला मिळतात. त्यात डॉक्टर नरेंद्र जाधव, डॉक्टर एस.एन.पठाण, डॉक्टर अरुण अडसूळ, मा. बबनराव पाचपुते, स्लमडॉग करणारा राहुल कंधारे, आशुतोष राणा ,डॉक्टर प्रमोद पाब्रेकर, पोपटराव पवार, डॉ.राजन वेळूकर, नीलोफर अहमद, प्राचार्य डॉक्टर नंदकुमार निकम अनेक प्राचार्य, प्राध्यापक तसेच अनेक राजकारणी व्यक्तींची नावं इथं सांगता येतील ". वरील यशस्वी व्यक्तींमध्ये अजून कितीतरी नावांची भर आपल्याला घालता येईल. राष्ट्रीय सेवा योजना ही केवळ औपचारिक शिक्षण प्रक्रियेतील एक घटक म्हणून कार्यरत नाही तर ते व्यक्तिमत्त्वाला आकार देणारी चळवळ आहे. लोक या चळवळीत येतात.आणि आयुष्यभर जोडले जातात. आयुष्यभर राष्ट्रीय सेवा योजनेचा स्वयंसेवक म्हणून आपली ओळख सांगताना कोणत्याही व्यक्तीला कमीपणा वाटत नाही. वरील मान्यवरांनी आपले ध्येय निश्चित केले व ते पूर्णत्वास नेले .यातून राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवकांच्या व्यक्तिमत्त्वविकासा जडणघडणीतील महत्त्व आपल्या लक्षात येतो.

'स्व 'चा शोध घेणे आणि राष्ट्रीय सेवा योजना : -

 राष्ट्रीय सेवा योजनेत विद्यार्थ्यांनी सहभाग घेतल्यामुळे त्याची स्वतःवर आणि ध्येयावर निष्ठा निर्माण होते. रासेयोतील विविध उपक्रमांमध्ये सहभाग घेत असताना स्वतःवर आणि ध्येयावर आढळ विश्वास निर्माण होतो. विद्यार्थी आत्मसंवाद साधतो. ध्येयप्राप्तीचा आशावाद  विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होतो. स्वतःवरील अढळ निष्ठेमुळे सकारात्मक विचार विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होतात. त्याच्या व्यक्तिमत्त्वाला नवे पैलू पडतात.   जीवनात वेळेचे व्यवस्थापन करणे अत्यंत गरजेचे असते. रासेयोची कार्यप्रणाली विविध ,कार्यक्रम हे वेळेत पार पाडावे लागतात. विद्यार्थ्याला वेळेचे व्यवस्थापन करण्याची सवय लागते. कमी वेळेत, कमी साधनांमध्ये काम करावे लागते. यातून वेळेचे व्यवस्थापन विद्यार्थ्यांना करावे लागते. कमी वेळेत दर्जेदार काम करण्याची सवय विद्यार्थ्यांमध्ये रूजते. वेळेचे नियोजन करण्याचे कौशल्य राष्ट्रीय सेवा योजनेत काम केल्यामुळे विद्यार्थ्याला आत्मसात होते. वरील गोष्टी व्यक्तिमत्व विकासाची गुरुकिल्ली आहे. राष्ट्रीय सेवा योजनेत काम करणारा विद्यार्थी ताण तणाव मुक्त असतो. काम करत असताना नियोजन कसे करावे याचा वस्तुपाठ विद्यार्थ्यांना मिळतो. यातून विद्यार्थ्यांमध्ये कार्यसिद्धीसाठीची निर्माणक्षमता ,निर्णयक्षमता विकसित होते. विद्यार्थ्याला या गोष्टी आयुष्यभरासाठी उपयुक्त ठरतात. व्यक्तिमत्व विकासासाठी विद्यार्थ्यांना शिकण्याची संधी मिळणे गरजेचे असते. विद्यार्थी विविध गोष्टी चुकचुकत शिकतात. चुकांपासून धडा घेऊन वर्तनात बदल करतात. स्वतःबद्दल, समाजाबद्दल, मित्रांबद्दल वर्तनाचे नवे नियम विद्यार्थ्यांना आत्मसात करता येतात. यातून विद्यार्थ्यांमध्यील आत्मविश्वास दृढ होतो. बदलांना सामोरे जाण्याची इच्छाशक्ती तीव्र होते. हे केवळ राष्ट्रीय सेवा योजनेमुळे घडते. राष्ट्रीय सेवा योजनेमुळे विद्यार्थ्यांमध्ये समूह भावना निर्माण होते. अनेक कामे करत असताना सर्वांना विश्‍वासात घ्यावे लागते. कामाची जबाबदारी विभागून द्यावी लागते. यातून समूहाबद्दलचे आकलन विद्यार्थ्यांचे वाढते. संघ भावना वाढीस लागल्यामुळे विद्यार्थी कितीही अवघड कार्य सुलभतेने करतात. समाजातील ,कुटुंबाशी, सहकाऱ्यांशी समायोजन करण्याची क्षमता विद्यार्थ्यांमध्ये वाढते. या सर्व बाबीला राष्ट्रीय सेवा योजनेची कार्यप्रणाली जबाबदार ठरते. राष्ट्रीय सेवा योजना मध्ये काम करणाऱ्या विद्यार्थ्यांना संधीचा शोध घेता येतो. आपल्याला कोणती संधी उपलब्ध आहे याची जाणीव राष्ट्रीय सेवा योजनेमधील स्वयंसेवकांमध्ये निर्माण होते. भविष्यातील अंदाज बांधत राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवक संधीचे यश मध्ये रूपांतर करतात. हा वर्तन बदल रासेयोमुळे स्वयंसेवकांत घडतो. व्यक्तिमत्व विकासात वरील पायर्‍या अत्यंत महत्त्वाच्या असतात. यातून एक नेतृत्व, कर्तृत्व, वकृत्व जन्माला येते. राष्ट्रीय सेवा योजनाही नेतृत्व, वकृत्व, कर्तृत्व जन्माला घालणारी चळवळ आहे.

समारोप : -

राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये सहभागी झालेले विद्यार्थी तरुण असतात. या तरुण विद्यार्थ्यांची मने संस्कारक्षम असतात. चांगली मूल्ये स्विकारून विकृतीला नकार देण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवक सिद्ध होतात. कारण ते यासंदर्भात कृतिशील उपक्रमात सक्रीय सहभाग घेतात. जीवनातील उदात्त मूल्य अंगीकारणे स्वयंसेवकांना महत्त्वाचे वाटते. किंबहुना ही उदात्त मूल्य स्वयंसेवकांच्या व्यक्तिमत्त्वाचा अविभाज्य भाग बनून जातात. भावी सदृढ समाजासाठी, सशक्त राष्ट्रासाठी अशा उदात्त मूल्यांची पाठराखण करणाऱ्या युवकांची गरज असते. ही गरज राष्ट्रीय सेवा योजना एकक पूर्ण करते. राष्ट्रीय सेवा योजना एकक विद्यार्थ्याला स्वतःमधील गुणदोष पडताळून पाहण्याची संधी बहाल करते. स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा कस लावण्याची संधी राष्ट्रीय सेवा योजनेमुळे विद्यार्थ्यांना प्राप्त होते. किंबहुना सर्वसामान्य विद्यार्थ्याला त्याच्यातील असामान्य बाबींचा जाणीव करून देणारा विचारमंच म्हणजे राष्ट्रीय सेवा योजना एकक होय. स्वतःमध्ये दडलेला राजहंस शोधण्यासाठी विद्यार्थ्यांना साहाय्य करणारे एकक म्हणून राष्ट्रीय सेवा योजनेकडे पाहता येते. व्यक्तिमत्त्व विकासाच्या महागड्या शिबिरांपेक्षा दोन वर्षे राष्ट्रीय सेवा योजनेत काम केल्यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास होतो. असे आपणाला म्हणता येते.


संदर्भग्रंथ :-
१.  चाकणे संजय, पाब्रेकर प्रमोद, 'राष्ट्रीय सेवा योजना संकल्पना ' , डायमंड पब्लिकेशन्स पुणे ,जुलै 2010
२ . वाळुंज महादेव , 'व्यासपीठ ' , अक्षर मानव प्रकाशन ,पुणे, मे 2011
३ . नसिराबादकर ल . रा . 'व्यावहारिक मराठी ' , फडके प्रकाशन, कोल्हापूर ,आवृत्ती -2005
४ . पाटणी उज्वल , 'जीत की हार व्हा तयार ', मराठी अनुवाद, यशवंत एकनाथ कुलकर्णी ,डायमंड पाकेट बुक्स प्रायव्हेट लिमिटेड, नई दिल्ली, आवृत्ती ,2014
५ .कमलेश , 'व्यक्तिमत्व विकास आणि अवकाश 'संदर्भ व्यक्तिमत्व संशोधन विकास केंद्र ,पुणे ,आवृत्ती 2009


डॉ.जी.आर. ढेंबरे ,
विभागीय समन्वयक , रावेर,
श्री .व्ही.एस. नाईक महाविद्यालय , रावेर , जि . जळगाव
पिन-४२५५०८
मोब .नं. ९४२१०८१२७०
ईमेल -dhembregr@gmail.com

नव्वदोत्तरी कवितेची समीक्षा स्वरूप आणि विशेष

'नव्वदोत्तरी कवितेची समीक्षा स्वरूप आणि विशेष '

डॉ. जी.आर. ढेंबरे ,रावेर
 दिनांक ७ डिसेंबर 2019

 प्रस्तावना

समीक्षा या संकल्पनेत विश्लेषण आणि मूल्यमापन प्रक्रियेला महत्त्व असते. लेखक वाचक आणि समीक्षक या साहित्य व्यवहारातील महत्वपूर्ण घटकांना सांधणारा दुवा म्हणजे समीक्षा होय. लेखक वाचक आणि समीक्षक यांना मार्गदर्शक दिशा दिग्दर्शनासाठी समीक्षा  व्यवहाराचे उपयोजन होते .लेखकाच्या ठायी असणाऱ्या विशेष क्षमता व न्यूनता प्रकट करण्यासाठी समीक्षा महत्त्वाची ठरते .वाचकाच्या साहित्य आकलनाला व्यापक करण्यासाठी समीक्षा महत्त्वाची असते .समीक्षकाची साहित्याच्या प्रकृतीची आणि स्थिती गतीची जाण अधिक प्रगल्भ करण्यासाठी समीक्षा व्यवहार महत्त्वाचा ठरतो .वा.ला. कुलकर्णी याबद्दल लिहितात 'साहित्य ही समाजाची एक अत्यंत महत्त्वाची सांस्कृतिक गरज आहे .ज्या समाजाला त्याचे स्वतःचे असे साहित्य नाही त्याच्या सांस्कृतिक जीवनात मोठी उणीव निर्माण होते ; म्हणूनच समाजाला त्यांच्या साहित्याबद्दल सोत्साही करणे, त्यात घ्यायला मदत करणे, साहित्य व्यापार हा आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा घटक आहे याची योग्य जाण त्याच्या ठिकाणी निर्माण करणे हे साहित्य समीक्षेचे अप्रत्यक्ष प्रयोजन ठरते '१           मानवी समाजजीवनातील सांस्कृतिक विश्वातील साहित्य व्यवहार व समीक्षा यांच्यातील परस्पर संबंधावर वरील विश्लेषणातून प्रकाश पडतो. कविता या वाङ्मय प्रकाराची समीक्षा विस्तृत व व्यापक स्वरूपात झालेली आहे. नव्वदोत्तरी कवितेची समीक्षा संख्यात्मक दृष्ट्या मोठ्या प्रमाणात झालेली आहे .नव्वदोत्तरी कवितेचे मूल्यमापन करून केवळ न थांबता नव्वदोत्तरी काव्य समीक्षा पूर्वकालीन मराठी कवितेचे पुनर्मूल्यमापन करते. विशेषता नवकविता व साठोत्तरी कवितेचे पूनर्मूल्यमापन नव्वदोत्तरी  काव्य समीक्षेने केले आहे .साठोत्तरी कवितेची चिकित्सा करून साठोत्तरी कवींचे  सामर्थ्य व खुजेपणा मांडण्याचा प्रयत्न नव्याने झालेला दिसतो. आजही काव्य समीक्षेच्या प्रांतात मूल्यमापन व पुनर्मूल्यमापनाची प्रक्रिया सुरू आहे. कवितेच्या समीक्षेचा विचार करताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे नव्वदोत्तरी कवींनी केलेली समीक्षा विपुल आहे. कवी स्वतःच्या कवितेची, समकालीन कवी व पूर्वसूरींची तटस्थ समीक्षा करत आहेत.
 नव्वदोत्तरी  कवितेची समीक्षा विविध पद्धतीने झालेली आहे .आस्वादक, मूल्यमापनात्मक , मानसशास्त्रीय, रूपनिष्ठ शैलीनिष्ठ समीक्षा नव्वदोत्तरी कवितेची झालेली दिसून येते. नव्वदोत्तरी कवितेची समीक्षा अधिक प्रमाणात आस्वादक अंगाने झालेली दिसते .विश्लेषण व मूल्यमापन या प्रक्रियांना नव्वदोत्तरी काव्यसमीक्षेत गौण स्थान मिळालेले दिसते. आस्वादक अंगाने समीक्षा करत असताना मूल्यमापन, विश्लेषण अपूर्ण राहते.
 नव्वदोत्तरी काव्य समीक्षेत सैद्धांतिक समीक्षा व उपयोजित समीक्षा कमी प्रमाणात झालेली दिसून येते . रूपनिष्ठ व शैलीनिष्ठ समीक्षाअल्प प्रमाणात झालेली आहे.



नव्वदोत्तरी कवितेची समीक्षा स्वरूप आणि विशेष :

१ . ग्रंथ रूपातून केली गेलेली नव्वदोत्तरी कवितेची समीक्षा
२ .वाङ्मयीन नियतकालिकातील नव्वदोत्तरी कवितेची समीक्षा :
३ . संपादित ग्रंथातील लेख स्वरूपातील नव्वदोत्तरी कवितेची समीक्षा :
४ .वृत्तपत्रातून प्रकाशित झालेली नव्वदोत्तरी कवितेची समीक्षा :
५ . कवितासंग्रहना लिहिलेल्या प्रस्तावना मधील काव्य समीक्षा :
६ . संस्थात्मक पातळीवरील नव्वदोत्तरी कवितेची समीक्षा :
७ . वाङ्मयीन प्रवाहांच्या प्रेरणेने झालेली नव्वदोत्तरी कवितेची समीक्षा :
८ . विद्यापीठीय संशोधन पदवीसाठी प्रबंध रुपातून झालेली नव्वदोत्तरी कवितेची समीक्षा :

 अशा बहुविध स्वरूपाची समीक्षा नव्वदोत्तरी कवितेची झालेली दिसून येते .संख्यात्मक दृष्ट्या विपुल असली तरी या समीक्षेला मर्यादा आहेत. यातील बहुतांश समीक्षा आस्वादक स्वरूपाचे आहे. ढोबळ विधानात्मक असे या समीक्षेचे स्वरूप आहे. विस्तृतता ,सूक्ष्मता, मूल्यमापनात्मकता यांचा अभाव ही नव्वदोत्तरी काव्य समीक्षेची मर्यादा सांगता येते .

 ३. स्वतंत्र ग्रंथ रूपातून केली गेलेली नव्वदोत्तर कवितेची समीक्षा :
 यातील काही ग्रंथ अत्यंत मौलिक स्वरूपाचे आहेत. अक्षयकुमार काळे, किशोर सानप, रवींद्र ठाकूर, वसंत आबाजी डहाके, नागनाथ कोतापल्ले, प्रकाश देशपांडे केजकर ,निशिकांत मिरजकर ,वसंत पाटणकर, श्रीधर तिळवे ,चंद्रकांत पाटील ,महेंद्र कदम, किसन पाटील, पी. विठ्ठल, देवानंद सोनटक्के इत्यादी समीक्षकांनी स्वतंत्र ग्रंथरूपाने नव्वदोत्तरी कवितेच्या  समीक्षेची साक्षेपी मांडणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे .वरील अभ्यासकांच्या काव्य समीक्षेचे वर्गीकरण आपणास करता येते. नव्वदोत्तरी कालखंडातील कवी व कवींचे काव्यसंग्रह आस्वादक अंगाने विचारात घेतले आहेत. मूल्यमापन , विश्लेषण ,सूक्ष्मता  या समीक्षेत आढळून येत नाही.
 अक्षयकुमार काळे यांनी ' अर्वाचीन मराठी काव्य दर्शन ' या ग्रंथात नव्वदोत्तरी कवींचा धावता आढावा मांडून या कवितेचे विशेष स्पष्ट केले आहेत. त्यांच्या ग्रंथात विशिष्ट कालखंडाचा अभ्यास समग्रतेने मांडण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. नव्वदोत्तरी कवितेचे समग्र विश्‍लेषण येत नाही.
 किशोर सानप यांच्या ' युगांतराची कविता 'या ग्रंथातून त्यांनी नव्वदोत्तरी कविता हा  समीक्षा विषय केला आहे. नव्वदोत्तरी  कवितेतील अजय कांडर,  मोहन कुंभार ,अशोक कोतवाल, पी . विठ्ठल, सुनील अभिमान अवचार, फेलिक्स डिसोजा , सुखदेव ढाणके, जयराम खेडेकर, श्रीकांत देशमुख, संतोष पद्माकर पवार, शशिकांत शिंदे, राजीव जोशी, सुरेश सावंत, लोकनाथ यशवंत, वीरधवल परब ,कल्पना दुधाळ , मनीषा साधू, अजीम नवाज राही ,भगवान निळे, वाहरू सोनवणे इत्यादी नव्वदोत्तरी  कवींच्या  कवितेचे उत्तम विश्लेषण प्रस्तुत ग्रंथात केलेले आहे .या ग्रंथातील समीक्षाही आस्वादकते  बरोबरच नव्वदोत्तरी कवींचे विशेष, वेगळेपण ,प्रवृत्ती स्पष्ट करणारी आहे .किशोर सानप यांच्या ग्रंथातील मर्यादा नोंदवताना एक गोष्ट सांगता येते ती म्हणजे नव्वदोत्तरी कवितेतील महानगरीय कवींच्या काव्यसंग्रहाचे विश्लेषण या ग्रंथात येत नाही .हेमंत दिवटे ,मंगेश नारायण काळे ,श्रीधर तिळवे, खांडेकर संजीव, सलील वाघ ,अरुण काळे ,सिद्धार्थ तांबे या कवींच्या कवितांचा विचार केलेला नाही. ही मर्यादा मान्य करूनही किशोर सानप यांच्या             'युगांतरची  कविता ' हा ग्रंथ नव्वदोत्तरी कवितेचे विस्तृत, सूक्ष्मपणे वस्तुनिष्ठ, व्यापक समीक्षा करणारा महत्त्वाचा ग्रंथ ठरतो .

निशिकांत मिरजकर यांनी संपादित केलेल्या 'नव्या वाटा नवी वळणे ' हा काव्यसंग्रह व त्याला निशिकांत मिरजकर यांनी लिहिलेली प्रस्तावना ही नव्वदोत्तरी कवितेचे उत्तम विश्लेषण करणारी  आहे .साक्षेपीपणे कवींची केलेली निवड त्यातून नव्वदोत्तरी कवितेतील महत्त्वपूर्ण कवींचा आपल्याला अंदाज बांधता येतो. ही प्रस्तावना  त्रोटक स्वरूपातील आहे परंतु या प्रस्तावने मधून नव्वदोत्तरी कवितेची ओळख आपल्याला होते.
 प्रकाश देशपांडे केजकर यांचा 'समकालीन मराठी कविता '   हा ग्रंथ नव्वदोत्तरी कवितेची समीक्षा करणारा ग्रंथ आहे .मुख्य प्रवाहातील कविता, दलित कविता ,आदिवासी कविता, मुस्लिम कविता, ग्रामीण कविता, स्त्रीवादी कविता असे नव्वदोत्तरी कवितेचे वर्गीकरण या ग्रंथात केलेले आहे.
' चौथी नवता : नवनियतकालिके ' हा  श्रीधर तिळवे यांचा ग्रंथ आहे. श्रीधर तिळवे नव्वदोत्तरी कालखंडातील महत्त्वाचे कवी आहेत. नव्वदोत्तरी कवितेची समीक्षा करण्यासाठी कोणते तत्व प्रधान मानले पाहिजे याचे विश्लेषण प्रस्तुत ग्रंथात येते .नव्वदोत्तरी कवितेच्या समीक्षेची सैद्धांतिक मांडणी करण्याचा प्रयत्न श्रीधर तिळवे यांनी केलेल्या समीक्षेत दिसतो .
वसंत पाटणकर यांचा 'कवितेचा शोध ' हा ग्रंथ कवितेचे सैद्धांतिक विश्लेषण करणारा महत्त्वाचा ग्रंथ आहे . नव्वदोत्तरी  काव्य समीक्षेचा विचार करत असताना वसंत पाटणकर यांची सैद्धांतिक मांडणी समग्रलक्षी स्वरूपाची ठरते .
याबरोबरच सुधीर रसाळ यांचा  'कविता आणि प्रतिमा ' हा ग्रंथही काव्य वाङ्मयप्रकाराचे  स्वरूप स्पष्ट करणार हा सैद्धांतिक ग्रंथ आहे .
वसंत आबाजी डहाके यांचा 'कवितेविषयी ' हा ग्रंथ समीक्षेतील महत्त्वाचा ग्रंथ आहे. नव्वदोत्तरी कालखंडातील  कवितेचे  अशय सूत्र स्पष्ट करण्याचा प्रयत्न डहाके यांनी केलेला आहे. एकूणच या ग्रंथातील काव्य वाङ्मय प्रकाराची सैद्धांतिक मांडणी महत्त्वपूर्ण अशी आहे.

 चंद्रकांत पाटील यांचा ' कवितेसमक्ष ' हा ग्रंथही नव्वदोत्तरी कवितेचे विश्लेषण करणारा आहे. सद्यकालीन मराठी कवितेचे स्वरूप स्पष्ट करणारा असा हा ग्रंथ आहे.
 डॉ. किसन पाटील यांचा ' नव्वदोत्तरी कविता : नवी रूपे ' हा ग्रंथही नव्वदोत्तरी कवितेतील काही कवींच्या काव्यसंग्रहाचा आस्वादक अंगाने घेतलेला शोध असे याचे स्वरूप आहे. डॉ. महेंद्र कदम यांचा 'कवितेची शैली ' हा ग्रंथही नव्वदोत्तरी कवितेचा   शैलीच्या अंगांनी विश्लेषण करणारा ग्रंथ आहे. ग्रामीण काव्य प्रवाहातील कवींची शैली विशेष डॉ. महेंद्र कदम यांनी मांडले आहेत.
 नागनाथ कोतापल्ले यांचा ' मराठी कविता आकलन आणि आस्वाद ' या ग्रंथातही नव्वदोत्तरी कालखंडातील काही काव्यसंग्रहाच्या वैशिष्टयेंवर प्रकाश टाकलेला दिसतो .

याबरोबरच डॉ. रवींद्र ठाकूर यांचा 'प्रवाह आणि प्रतिक्रिया ' हा ग्रंथही इ. स. 1975 नंतरच्या मराठी कवितेचे विश्लेषण करणारा आहे .नव्वदोत्तरी कवितेतील काही कवींवर इ.स. 1975 नंतरचा कवींचा प्रभाव कसा आहे हे स्पष्ट करणारा हा ग्रंथ आहे.
' मराठी कविता समकालीन परिदृश्य ' या ग्रंथात पी . विठ्ठल यांनी नव्वदोत्तरी कवितेची सैद्धांतिक मांडणी केलेली आहे. जागतिकीकरणाचे सूत्र केंद्रवर्ती ठेवून नव्वदोत्तरी कवितेच्या मूल्यमापनाचा प्रयत्न प्रस्तुत ग्रंथात केला आहे. नव्वदोत्तरी कवितेतील श्रीकांत देशमुख ,कविता महाजन, संतोष पद्माकर पवार ,श्रीधर नांदेडकर, अजीम नवाज राही, वीरधवल परब, ऐश्वर्य पाटेकर, कल्पना दुधाळ, अभय दाणी , रवी पवार, महेश लीला पंडित, वीरा राठोड, केशव देशमुख, बालिका ज्ञानदेव ,महेश लोंढे, मोहन शिरसाट यांच्या कवितेचे आस्वादक मूल्यमापन असे या ग्रंथाचे स्वरूप आहे.
 देवानंद सोनटक्के यांचा ' .कवितेचा अंत : स्वर हा ग्रंथही आस्वादक स्वरूपात नव्वदोत्तरी कवितेची चिकित्सा करणारा आहे. सुरुवातीच्या तीन लेखांमध्ये कविता प्रकाराची सैद्धांतिक मांडणी केलेली आहे .नव्वदोत्तरी कवितेतील महत्त्वाच्या कवींच्या कवितेचे स्वरूप , विशेष   विस्तृतपणे या ग्रंथातून विशद केलेले आहेत. अशा प्रकारे आपल्याला स्वतंत्र ग्रंथ रूपातून केल्या गेलेल्या नव्वदोत्तरी कवितेच्या  समीक्षेचा थोडक्यात विचार करता येतो.

४ . संपादित ग्रंथातील लेख स्वरूपातील नव्वदोत्तरी कवितेची समीक्षा:
 आज गौरव ग्रंथ मोठ्या प्रमाणात निघत आहेत.  अभ्यासकांनी लेख स्वरूपात नव्वदोत्तरी कवितेचा आढावा घेतलेला आहे .
'साहित्य आणि समाज ' संपादक - नागनाथ कोतापल्ले ,गो .म.पवार गौरव ग्रंथ , ' वाङ्मयीन प्रवृत्ती तत्त्वशोध ' , संपादक -केशव मेश्राम, डॉ. दादा गोरे गौरव ग्रंथ , 'मराठी कविता: परंपरा आणि दर्शन 'संपादक -रवींद्र शोभणे, प्राचार्य राम शेवाळकर गौरव ग्रंथ,            'समकालीन साहित्यचर्चा ' संपादक - मनोहर जाधव ,डॉ.नागनाथ कोत्तापल्ले ,गौरव ग्रंथ  इत्यादी संपादित ग्रंथांमधून नव्वदोत्तरी कवितेचे समीक्षापर लेख प्रकाशित झालेले दिसतात .वसंत पाटणकर व हरिश्चंद्र थोरात यांचे नव्वदोत्तरी कवितेवरील सैद्धांतिक लेख महत्त्वपूर्ण असे आहेत.

५ . वाङ्मयीन नियतकालिकातील नव्वदोत्तरी कवितेची समीक्षा :

अक्षर चळवळ (1985 ) ,कवितारती (1985 ),शब्दवेध (1988 )अभिधा (1992 ते 1998 ) , अभिधानंतर (1998 ते 2008 ) , नवाक्षर दर्शन (2004 ) ,खेळ (2004 ) ,उर्मी (2005 ) , ऐवजी (2006 ) सौष्ठव , ' साक्षात अशी काही कविताकेंद्री नियतकालिके सुरू झाली. या नियतकालिकांनी नव्वदोत्तरी कवितेच्या समीक्षेला गंभीरपणे अभिव्यक्त करण्याचा प्रयत्न केला. वाङ्मयीन नियतकालिके आणि कविता यांच्यातील संबंधाविषयी डॉ. आशुतोष पाटील लिहितात " वाङ्मयीन नियतकालिकांची ,विशेषता कविताकेंद्री नियतकालिकांची भूमिका काव्य संस्कृतीला आकार देण्यात सर्वाधिक महत्त्वाची ठरत असते. कारण लिहिली जाणारी कविता ही संग्रहरूपाने कालांतराने पण प्राधान्याने वाङ्मयीन नियतकालिकातून प्रथम वाचावयास मिळते .कविता हा एक स्फुटरचना प्रकार असल्याने त्याच्या चलनवलनासाठी अन्य वाङ्मय प्रकारांच्या तुलनेत अधिक निकडीने नियतकालिकांची आवश्यकता असते. त्यामुळे जुन्या कवींबरोबरच नव्या कवींच्या अभिव्यक्तीला एक मंच उपलब्ध करून देण्याची आणि काव्याभिरुचीची पत व प्रत दोन्हीही उंचावण्याची ऐतिहासिक जबाबदारी नियतकालिकांवर सर्वार्थाने असते. " २
  वरील विश्लेषणातून नियतकालिकांचे वाङ्मयीन पर्यावरणातील स्थान स्पष्ट होतो .

 वाङ्मयीन नियतकालिके वाङ्मयीन अभिरूचीला वळण देत असतात. कविताकेंद्री वाङ्मयीन नियतकालिकांमुळे नव्वदोत्तरी काव्य समीक्षेला अभिव्यक्तीचे एक साधन उपलब्ध झाले .या नियतकालिकांमुळे कविता हा वाङ्मय प्रकार वाङ्मय विश्वाच्या केंद्रस्थानी आला. या वेगवेगळ्या नियतकालिकांनी नव्वदोत्तरी कवितेविषयी सैद्धांतिक मांडणी उभी करण्याचा प्रयत्न केला. यातील काही नियतकालिकांनी नव्वदोत्तरी मराठी कविता विशेषांक प्रकाशित केले .यामध्ये
१ . अभिधानंतर, दिवाळी, 2003
२ . नवाक्षर दर्शन ,वर्ष तीन ,अंक दोन, जानेवारी मार्च 2007
३ .खेळ, एप्रिल, मे, जून, 2010 सतरावा
४ . सर्वधारा, जानेवारी मार्च 2017 ५ .अतिरिक्त मार्च 2013
६ . अतिरिक्त ऑगस्ट 2014
 नव्वदोत्तरी मराठी कविता विशेषाकांमध्ये नव्वदोत्तरी कवितेचे विस्तृत व व्यापक मांडणी अभ्यासकांनी करण्याचा प्रयत्न केलेला दिसून येतो. या नियतकालिकातील समीक्षा मांडणीमध्ये जाणीपूर्वकता, आग्रहीपणा अधिक दिसून येतो. या नियतकालिकातील काही लेखांची मांडणी एकांगी स्वरूपाची आहे. नव्वदोत्तरी काव्य समीक्षेच्या प्रवाहामध्ये या नियतकालिकांच्या कामगिरीला विशेष महत्त्व आहे. वाङ्मयीन नियतकालिकातील नव्वदोत्तर कवितेची समीक्षा करणाऱ्या समीक्षकांनी मध्ये द.गो.काळे ,मंगेश काळे, दिनकर मनवर, नितीन रिंढे, प्रविण बांदेकर ,उदय रोटे, रणधीर शिंदे, हेमंत दिवटे , आशुतोष पाटील, महेंद्र भवरे ,एकनाथ पगार, गोविंद काजरेकर ,श्रीधर तिळवे, देवानंद सोनटक्के, पी.विठ्ठल , महेंद्र भवरे, मनोहर जाधव या नव्या समीक्षकांचा समावेश करावा लागतो. या नव्या दमाच्या समीक्षकांसोबतच वसंत पाटणकर, हरिश्चंद्र थोरात, वसंत आबाजी डहाके, राजन गवस डॉ. नागनाथ कोत्तापल्ले या जुन्या पिढीतील समीक्षकांचा ही आपल्याला समावेश करता येतो .एकूणच या विविध नियतकालिकातील काव्य समीक्षेमध्ये आजच्या काळातील साहित्यविचारांचे प्रतिबिंब आढळते. साहित्याच्या विविध दृष्टिकोनबरोबरच नव्या पिढीचे नवी संवेदनशीलता या नियतकालिकांनी जपलेली दिसते. वाङ्मयीन नियतकालिकांनी काव्य या वाङ्मय प्रकाराला व काव्य समीक्षेला समकाळाशी जोडणारी समग्र विचारदृष्टी दिली.


६ . वृत्तपत्रातून प्रकाशित झालेली नव्वदोत्तरी कवितेची समीक्षा:

 सकाळ, लोकमत, लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स या सारख्या वृत्तपत्रांमधून रविवार पुरवणीत  नव्वदोत्तरी कवींच्या काव्यसंग्रहाचा परिचय, परीक्षण  प्रकाशित झाले आहेत. सर्वसामान्य वाचकाला परिचय व्हावा म्हणून लिहिलेली ही परीक्षणे लेख काव्य समीक्षेत महत्त्वाचे आहेत. विशेष लेखांमध्ये आजच्या कवितेत काय घडत आहे याचा परिचयात्मक मांडणी या समीक्षेत केलेली दिसून येते. सर्वसामान्य वाचकांसाठी हे समीक्षापर लेखन महत्त्वाचे ठरते.

७ . कवितासंग्रहांना लिहिलेल्या प्रस्तावनामधील काव्यसमीक्षा :

मराठी वाङ्मय व्यवहारात काव्यसंग्रह प्रस्तावना लिहिण्याची प्रदीर्घ परंपरा आहे .कवी स्वतःच्या काव्यसंग्रहाला  प्रस्तावना लिहितात या प्रस्तावने मधून कवी आपली काव्यनिर्मिती प्रक्रिया उलगडून सांगण्याचा प्रयत्न करतात. आपली भूमिका, दृष्टिकोण अभिव्यक्त करण्यासाठी कवी प्रस्तावना लिहितात. ज्येष्ठ अभ्यासक ,कवींची प्रस्तावना काव्यसंग्रहासाठी घेतली जाते. या प्रस्तावनेत प्रस्तुत कवितेची बलस्थाने मांडली जातात .कवितेची पाठराखण केली जाते. कवितेचे स्वरूप आणि प्रेरणा सांगितल्या जातात. प्रस्तावनेमध्ये लेखनात मूल्यमापनाचा अभाव असतो. मर्यादा, दोष न सांगण्याचा प्रघात असतो. त्यामुळे उणिवा दोष कळत नाहीत .त्यांची पुनरावृत्ती होत राहते. एकूण कवितेचे वेगळेपण शोधत असताना परंपरेतील कविते स्थानही निश्चित केले जाते. नागनाथ कोतापल्ले , वसंत आबाजी डहाके, द. ता भोसले, मनोहर जाधव, यशवंत मनोहर, किसन पाटील  यासारख्या अभ्यासकांनी नव्वदोत्तरी कवींच्या कविता संग्रह प्रस्तावना लिहिल्या आहेत .या प्रस्तावनांचे स्वरूप मुख्यतः आस्वादक स्वरूपाचे असते . मूल्यमापनाच्या दृष्टीचा अभाव या प्रस्तावनेतील समीक्षेत
दिसतो.

८ . संस्था पातळीवरील नव्वदोत्तरी कवितेची समीक्षा :

संस्थात्मक पातळीवर वाङ्मयाचा अभ्यास करण्याची मराठी वाङ्मय विश्वात प्रदीर्घ परंपरा आहे .विशिष्ट लेखकाचा अभ्यास ,विशिष्ट कालखंडाचा अभ्यास ,विशिष्ट वाङ्मय प्रकारचा अभ्यास, विशिष्ट वाङ्मयीन प्रवाहांचा अभ्यास करण्याची परंपरा मराठीत आहे .सार्वजनिक वाचनालय नाशिक या संस्थेच्यावतीने मराठी साहित्यिकांची समीक्षा करणाऱ्या ग्रंथ प्रकाशित करण्यात आला . प्रदक्षिणा खंड -दुसरे प्रकाशित करण्यात आला. या ग्रंथातील 'स्वातंत्र्योत्तर कविता ' हा रवींद्र घवी यांचा लेख मराठी कवितेचा आढावा घेणार आहे. स्वातंत्र्योत्तर मराठी कवितेचा मागोवा या लेखात घेतलेलाआहे .तो मुख्यतः काव्यनिर्मितीच्या अंगाने घेतलेला व नव्या प्रवृत्ती दर्शवणारा आहे. नव्वदोत्तरी कवितेचा अंधुक उल्लेख  या लेखात आहे.
 ललित मासिकाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त कविता विशेषांक प्रकाशित करण्यात आला . 'बदलती मराठी कविता व काव्यसंस्कृती: काही परिमाणे ' असे या अंकाचे शीर्षक होते. या अंकात अतिशय गंभीरपणे मराठी कवितेच्या स्थितीगतीचा आलेख मांडण्यात आला आहे . वसंत आबाजी डहाके ,उदय रोटे ,रणधीर शिंदे, वैजंतीमाला जाधव -भोसले , निशिकांत मिरजकर, प्रवीण दशरथ बांदेकर ,आशुतोष पाटील ,निशिकांत ठकार या सर्व मान्यवर समीक्षकांचे लेख नव्वदोत्तरी काव्य समीक्षेला समृद्ध करणारे आहेत .  महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे यांनी मराठी वाङ्मयाचा इतिहासाचेखंड प्रकाशित केले आहेत .यामध्ये खंड सातवा इ.स. 1950 ते2000 -भाग दुसरा हा अतिशय महत्त्वाचा आहे .यामध्ये 1950 ते 1975 डॉ. प्रभा गणोरकर आणि इसवी सन 1975 ते 2000 हा डॉ.नीलिमा गुंडी यांचे प्रदीर्घ लेख महत्त्वाचा आहे. या लेखात मराठी कवितेचा इतिहास मांडला गेला आहे. या लेखात डॉ. नीलिमा गुंडी लिहितात, ''1975 ते 2000 हा कालखंड म्हणजे मराठी कवींसाठी एक गुंतागुंतीचा वास्तव होते. या वास्तवाचा अनुभव घेणे त्याचे संवेदन जाणून घेणे आकलन व चिंतन या पातळीवर ते संवेदन नेणे आणि त्याला कलात्म रूप देणे ही प्रक्रिया सोपी नाही " ३वरील विश्लेषणातून नव्वदोत्तरी कवितेच्या वास्तवाचे भान आपल्याला येते. नव्वदोत्तरी काव्यची अत्यंत पायाभूत माहिती देणारे असे लेखन प्रस्तुत खंडात डॉक्टर नीलिमा गुंडी यांनी केलेले आहे . अभ्यासकांना उपयुक्त माहिती देणारे लेखन असे या लेखाचे स्वरूप आहे .अशा प्रकारे आपल्याला संस्थात्मक पातळीवरील नव्वदोत्तरी कवितेच्या समीक्षेची वाटचाल मांडता येते .


९ वाङ्मयीन प्रवाहांच्या प्रेरणेने झालेली नव्वदोत्तरी कवितेची समीक्षा :

नव्वदोत्तरी कवितेचे वर्गीकरण करण्यासाठी कवितेतील वाङ्मयीन प्रवाहांचा आधार घेतला जातो .दलित, आदिवासी, महानगरी, ग्रामिण, स्त्रीवादी, मुस्लिम ,जनवादी अशा स्वरूपात वाङ्मय प्रवाहांचे वर्गीकरण केले जाते. यातील दलित वाङ्मय प्रवाहातील नव्वदोत्तरी कवितेची समीक्षा संख्यात्मकदृष्टया अधिक प्रमाणात झाल्याचे दिसून येते. नव्वदोत्तरी दलित कवितेची समीक्षा ग्रंथ रूपातून प्रकाशित झालेली आहे. नव्वदोत्तरी एकूणच मराठी कवितेची सैद्धांतिक व आस्वादक समीक्षा दलित साहित्याच्या अभ्यासकांनी केलेली आहे. नव्वदोत्तरी दलित कवितेची सैद्धांतिक ,मूल्यमापनात्मक, विस्तृत समीक्षा महेंद्र भवरे यांनी तीन ग्रंथांमधून केली आहे . 'दलित कवितेतील नवे प्रवाह ' , ' मराठी कवितेच्या नव्या दिशा ',
'दलित कविता आणि प्रतिमा ' या तीन ग्रंथातून एकूणच दलित कवितेची साक्षेपी समीक्षा महेंद्र भवरे यांनी केलेली आहे .दलित कवितेतील नवे प्रवाह आणि मराठी कवितेच्या नव्या दिशा या ग्रंथामधून नव्वदोत्तरी दलित कवींच्या काव्यसंग्रहाचे आस्वादक अंगाने समीक्षा केली गेली आहे. आस्वादप्रक्रिया बरोबरच नव्वदोत्तरी दलित कवितेच्या विशेषांवर या समीक्षेतून प्रकाशझोत टाकला आहे. नव्वदोत्तरी दलित कवितेचे स्वरूप, विशेष ,प्रेरणा महेंद्र भवरे यांनी स्पष्ट केले आहेत. नव्वदोत्तरी दलित कवितेचे वेगळेपण त्यातील वृत्ती-प्रवृत्तींचे विश्लेषण महेंद्र भवरे यांच्या समीक्षेतून येते . नव्वदोत्तरी दलित कवितेचा युगधर्म महेंद्र भवरे यांनी स्पष्ट केला आहे .
महेंद्र भवरे यांचा 'दलित कविता आणि प्रतिमा ' हा ग्रंथ नव्वदोत्तरी दलित कवितेच्या समीक्षेतील महत्त्वाचा ग्रंथ ठरतो .दलित कविता ही चळवळीची कविता आहे .या जाणिवेने सामाजिक अभिनिवेश बाळगत या कवितेची आस्वादक अंगाने समीक्षा केली गेली. परंतु या कवितेतील सामाजिक बांधिलकी बरोबरच कवितेतील कलातत्व, सैद्धांतिक वाङ्ममयीन मूल्यांचा शोध महेंद्र भवरे यांनी 'दलित कविता आणि प्रतिमा 'या ग्रंथातून घेतला आहे. हा ग्रंथ एकूणच नव्वदोत्तरी मराठी काव्य समीक्षा क्षेत्रातील महत्त्वाचा ग्रंथ आहे. नव्वदोत्तरी दलित कवितेच्या समीक्षाचा विचार करत असताना अनेक अभ्यासकांनी 'अस्मितादर्श 'या नियतकालिकातून नव्वदोत्तरी दलित कवितेची चिकित्सा केलेली दिसून येते. नव्याने कविता लिहिणाऱ्यांसाठी दिशा दिग्दर्शनाचे कार्य अस्मितादर्शने केले. नव्वदोत्तरी  दलित कवींच्या काव्यसंग्रहाला अनेक अभ्यासकांनी प्रस्तावना लिहिल्या आहेत .त्यांचे स्वरूप आस्वादक स्वरूपाचे आहे. मूल्यमापन न करता कवींच्या चांगल्या बाजू ठळकपणे मांडण्याचा प्रयत्न झालेला दिसतो. उणीवा ,मर्यादा यांचा ओझरता उल्लेख या प्रस्तावनावजा समीक्षेत  केलेला दिसतो.
 गंगाधर पानतावणे, यशवंत मनोहर, प्रा.केशव मेश्राम ,अर्जुन डांगळे , सदा कऱ्हाडे ,भालचंद्र फडके , रा .ग .जाधव, दत्ता भगत, डॉ.मनोहर जाधव या अभ्यासकांनी नव्वदोत्तरी दलित कवितेचे विश्लेषण निमित्तपरतत्वे केलेले आहे .प्रस्तावना, नियतकालिकातील काव्यसंग्रहाची समीक्षा ,पुस्तक परिचय या स्वरूपात हे लेखन आहे . यात सैद्धांतिक, विस्तृत ,मूल्यमापनात्मक असे या लेखनचे स्वरूप नाही. केवळ आस्वादकपर ,पाठराखण करणारे असे हे लेखन आहे .एकूण दलित साहित्याची सैद्धांतिक मांडणी अनेक ग्रंथातून केली गेलेली आहे .वरील काही अभ्यासकांनी वेगवेगळ्या काव्यसंग्रहांना लिहिलेल्या प्रस्तावनाची पुस्तके प्रसिद्ध केली आहेत .या ग्रंथांनामध्ये सुसूत्रता दिसून येत नाही. ते लेखन शेवटी नौमत्तीक ठरते .केशव मेश्राम यांनी संपादित केलेल्या 'विद्रोही कविता ' या पुस्तकाची प्रस्तावना समीक्षात्मक स्वरूपाचे आहे .यशवंत मनोहर यांनी लिहिलेल्या 'काही कविता संग्रहाच्या निमित्ताने 'या ग्रंथात नव्वदोत्तरी कालखंडातील काही कवींचे काव्यसंग्रह डोळ्यासमोर ठेवून केलेले लेखन समाविष्ट आहे. या लेखनाचे स्वरूप कसे आहे याविषयी या पुस्तकाच्या मलपृष्ठावरील मजकूरात लिहिलेले आहे की ''या ठिकाणी कवींना प्रोत्साहन देणे हे प्रस्तावनेचे प्रयोजन असले , तरी ते एकमेव प्रयोजन नाही दव्या संग्रहाकडे पाहण्याची एक निश्चित दृष्टी निर्माण व्हावी व त्यांच्या कवितेतील काव्य आणि विचार यांचा वाचकाला आस्वाद घेता यावा हा या प्रस्तावनेच्या उद्देश आहे .यशवंत मनोहर यांच्याकडे स्वागतशील ,साक्षेपी व कलात्मकतेने कवीला व वाचकाला बरोबर घेऊन जाण्याचे सामर्थ्य आहे .याचा प्रत्यय प्रस्तुत प्रस्तावनेतून येतो .

एकूणच प्रस्तावनापर लेखनातील सकारात्मक बाजू या विचारातून स्पष्ट होते .प्रस्तावनापर लेखनाचे मर्म सांगताना यशवंत मनोहर लिहितात "प्रस्तावना म्हणजे शास्त्रकाट्याची कसोटी लावून केलेली समीक्षा नव्हे. कवितासंग्रहाच्या प्रस्तावनेतून कवितेच्या आकलनाची एक दिशा साकार होते .कविता म्हणून अभिप्रेत असलेल्या मर्माचे प्रकाशन मात्र प्रस्तावना करते .प्रस्तावनेत दोषदिग्दर्शन नसतात असे नाही पण हे दोष दिग्दर्शन अत्यंत सूचक पद्धतीने आपुलकीच्या ओलाव्याने केलेले असते " ४ वरील विवेचनातून काव्यसंग्रहाच्या प्रस्तावनापर समीक्षेचे स्वरूप आपल्या लक्षात येते .

डॉक्टर मनोज जाधव यांच्या 'परीवर्तनाचे प्रवाह 'या पुस्तकाचे स्वरूपही वरील यशवंत मनोहर यांच्या विश्लेषणाला लागू ठरणारे आहे. या ग्रंथातील सैद्धांतिक चर्चा महत्त्वाची अशी आहे .वेगवेगळ्या निमित्तांनी लिहिलेले नव्वदोत्तरी कवितेवरील समीक्षा लेख महत्त्वपूर्ण असे आहेत.

 नव्वदोत्तरी दलित कवितेचा विचार करत असताना काही अभ्यासकांचे स्वतंत्र ग्रंथ महत्त्वाचे आहेत. यात 'मराठी दलित कविता: एक चिकित्सक अभ्यास ' डॉ. सुनील कुमार चंदनशिवे, 'दलित कवितेतील अस्मिता ' डॉ. बिरा पारसे या दोन ग्रंथांचा समावेश करावा लागेल. हे दोन्ही पुस्तके प्रबंधातून ग्रंथरूपात झालेली रूपांतर अशी आहेत .याबरोबरच 'आंबेडकरी कवितेच्या अंतरंग 'हे हरीश खंडेराव यांचा  ग्रंथही नव्वदोत्तरी दलित कवितेचे विश्लेषण करणारा आहे. अशा प्रकारे आपल्याला नव्वदोत्तरी दलित कवितेच्या समीक्षेचे स्वरूप सांगता येते .

नव्वदोत्तरी दलित कवितेबरोबरच विकसित झालेला आदिवासी कवितेचा प्रवाह होय. नव्वदोत्तरी आदिवासी कवींचा काही दलित अभ्यासकांनी दलित कवितेचा समावेश केला आहे. डॉ. विनायक तुमराम यांचे 'शतकातील आदिवासी कविता 'हा संपादित काव्यसंग्रह महत्त्वाचा असा आहे. या ग्रंथाला असलेली डॉ.विनायक तुमराम यांची जवळपास शंभर पानांची प्रस्तावना ही अत्यंत विस्तृतपणे आदिवासी कवितेचे सैद्धांतिक मांडणी करणारी आहे .  डॉ.तुकाराम रोंगटे   यांचे 'आदिवासी कवितेचा उषःकाल आणि सद्यस्थिती 'हा ग्रंथही नव्वदोत्तरी आदिवासी कवितेचे स्वरूप विशद करणारा आहे .

नव्वदोत्तरी स्त्रियांची  कविता या प्रवाहाचे सखोल विश्लेषण करणारा विस्तृत असा ग्रंथ उपलब्ध नाही. नियतकालिकांतील लेख हाच काय तो या प्रवाहाचे विश्लेषण करणारा ऐवज ठरतो . ' आधुनिक मराठी कवयित्रींची कविता ' हा रा.ग .जाधव यांचा ग्रंथ स्त्रियांच्या कवितेची चिकित्सा करणारा ग्रंथ आहे .या ग्रंथात इसवी सन 1980 ते 1995 या कालखंडातील स्त्रियांच्या कवितेचे विशेष स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे.

 नव्वदोत्तरी ग्रामीण कविता या प्रवाहाचे समीक्षा : लेख स्वरूपात, संपादित पुस्तकातून,नियतकालिकातून झालेली दिसून येते. ' मराठी ग्रामीण कवितेचा 'इतिहास - कैलास सार्वेकर यांच्या ग्रंथात 1990 पर्यंतच्या ग्रामीण कवितेचा इतिहास मांडला आहे. याबरोबरच आनंद यादव, नागनाथ कोतापल्ले ,द. ता .भोसले ,वासुदेव मुलाटे ,राजन गवस, माधव पुटवाड, चंद्रकुमार नलगे, भास्कर चंदनशिव, रवींद्र ठाकूर ,गणेश देशमुख यासारख्या समीक्षकांनी मराठी ग्रामीण कवितेची समीक्षा विविध वाङ्मयीन नियतकालिकातून, प्रस्तावना मधून, संपादित ग्रंथातील लेखांमधून केलेली दिसते .वसंत पाटणकर यांनी कवितारती मध्ये ' इंद्रजीत भालेराव यांची कविता 'या विषयी लिहिलेला लेख नव्वदोत्तरी ग्रामीण कवितेची सकस मूल्यमापनात्मक समीक्षा करणारा आहे .

महानगरी संवेदनेच्या नव्वदोत्तरी  कवितेवर ग्रंथ रूपातून समीक्षा झालेली दिसून येत नाही . त्रोटक स्वरूपात महानगरी कवितेवर समीक्षा झालेली दिसून येते .जनवादी ,मुस्लिम, ख्रिस्ती अशा प्रवाहांच्या स्वरूपात  मूल्यमापनात्मक साक्षेपी समीक्षा नव्वदोत्तरी कवितेची झालेली दिसून येत नाही.

१० . विद्यापीठीय संशोधन पदवीसाठी प्रबंध रूपातून झालेली नव्वदोत्तरी कवितेची समीक्षा :

महाराष्ट्रातील विविध विद्यापीठांमध्ये एम.फिल , पीएच्.डी  पदवीसाठी प्रबंध रूपातून नव्वदोत्तरी कवितेची समीक्षा झालेली दिसून येते .नव्वदोत्तरी  कालखंडातील मराठी कविता , कवितेला केंद्र ठेवणारी नव्वदोत्तरी वाङ्मयीन नियतकालिके, नव्वदोत्तरी कालखंडातील कवी, नव्वदोत्तरी कालखंडातील कवितेतील प्रवाह , नव्वदोत्तरी कवितांची शैली, नव्वदोत्तरी कवितेतील मिथके ,प्रतिमा यांची समीक्षणात्मक समीक्षात्मक मांडणी या प्रबंधातून झालेली दिसते. मुख्यत: नव्वदोत्तरी कवितेतील आशयसूत्रे वाङ्मयीन मूल्ये यांचे विश्लेषण या समीक्षेतून झालेली दिसते.

११ .  नव्वदोत्तरी काव्य समीक्षेचे विशेष :

१. नव्वदोत्तरी कवितेची समीक्षा विस्तृतपणे मूल्यमापनात्मक स्वरूपात अल्प प्रमाणात झालेली आहे.
 विस्तृता, सूक्ष्मता ,मूल्यमापनात्मकता यांचा अभाव ही नव्वदोत्तरी काव्य समीक्षेची मर्यादा सांगता येते.

२ . नव्वदोत्तरी कवितेविषयी तात्विक, सैद्धांतिक मांडणी करणारी समीक्षा कमी प्रमाणात झाली आहे.

 ३. नव्वदोत्तरी कवितेचे मूल्यमापन करून केवळ न थांबता नव्वदोत्तरी काव्य समीक्षा पूर्वकालीन मराठी कवितेचे पुनर्मूल्यमापन करते. विशेषता नवकविता व साठोत्तरी कवितेचे पुनर्मूल्यमापन नव्वदोत्तरी काव्य समीक्षा करते .
४. नव्वदोत्तरी कवितेची समीक्षा विविध पद्धतीने झालेले आहे. आस्वादक समीक्षा विपुल प्रमाणात झालेली आहे. मानसशास्त्रीय  रूपनिष्ठ, शैलीनिष्ठ , स्त्रीवादी मूल्यमापनात्मक समीक्षेचा अभाव नव्वदोत्तरी कवितेत दिसतो.

५. कविताकेंद्री वाङ्मयीन नियतकालिकांमुळे नव्वदोत्तरी काव्य समीक्षेला एक अभिव्यक्तीचे साधन उपलब्ध झाले .वाङ्मयीन नियतकालिकांमधून नव्वदोत्तरी काव्य समीक्षा गंभीरपणे प्रकट होताना दिसते. वाङ्मयीन नियतकालिकांनी नव्वदोत्तरी कवितेविषयी सैद्धांतिक मांडणी केली. विविध वाङ्मयीन नियतकालिकांनी नव्वदोत्तरी मराठी कविता विशेषांक प्रकाशित केले. ते अंक नव्वदोत्तरी कवितेची चिकित्सा करणारे आहेत .नव्वदोत्तरी काव्य समीक्षेत या विशेषांकाचे स्थान महत्त्वपूर्ण असेआहे .
६. नव्वदोत्तरी काव्यसंग्रहांना लिहिलेल्या प्रस्तावनांमध्ये मूल्यमापनाचा अभाव दिसून येतो. मर्यादा, दोष न सांगण्याचा प्रघात प्रस्तावना लेखनात दिसतो .केवळ कवितेची बलस्थाने मांडली जातात. त्यामुळे काव्यसंग्रहाच्या प्रस्तावनेतील समीक्षा ही परिपूर्ण ठरत नाही.


समारोप :

 थोडक्यात कवितेविषयी प्रत्यक्ष समीक्षणात्मक ऐतिहासिक किंवा सैद्धांतिक समीक्षा अल्प प्रमाणात झालेली दिसते. नव्वदोत्तरी काव्य समीक्षा विपुल प्रमाणात झालेलीआहे. या समीक्षेने कवितेविषयीची जाण विविधांगी व समृद्ध केले आहे. नव्वदोत्तरी काव्य समीक्षाही वाङ्मयीन अभिरुचीला वृद्धीगंत करणारी आहे. समकालीन काव्याभिरूचीला नव्वदोत्तरी काव्यसमीक्षेने  आकार दिला आहे .नव्वदोत्तरी काव्यसमीक्षेत काही जेष्ठ समीक्षकां बरोबरच नवोदित समीक्षकांची मांडणीही लक्षवेधी स्वरूपाचे आहे. नव्वदोत्तरी काव्य समीक्षे विविध स्वरूपात अविष्कृत होते .नव्वदोत्तरी काव्य समीक्षा ही नव्वदोत्तरी कवितेचे स्वरूप, विशेष , प्रेरणा यांना प्रकट करते .  नव्वदोत्तरी कवितेतील प्रतिमासृष्टी ,प्रतीके ,मिथके, रचनाबंध यांना नव्वदोत्तरी काव्य समीक्षेने स्पष्ट केले आहे.
नव्वदोत्तरी काव्यातील भाषाशैली, संवादात्मक , लयबद्धता , उपरोधिकता , उपहास , सूचकता , संवादात्मकता प्राक्कथा यांना नव्वदोत्तरी काव्य समीक्षेने सैद्धांतिक स्वरूप दिलेले दिसत नाही . नव्वदोत्तरी काव्य समीक्षा आस्वादक स्वरूपात मोठ्या प्रमाणात लिहिली गेली आहे .


संदर्भ टिपा:

 १.कुलकर्णी वा.ल .मराठी वाङ्मयकोश, खंड चौथा, (समन्वयक संपादनक-विजया राजाध्यक्ष ) महाराष्ट्र साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई ,प्रथमावृत्ती -2002, पृष्ठ- 391

२. पाटील अशुतोष, लेख -मराठी वाङ्ममयीन नियतकालिके आणि मराठी कविता ,ललित ,फेब्रुवारी 2013 (कविता विशेषांक )

 ३ . गुंडी नीलिमा ,मराठी वाङ्ममयाचा इतिहास,खंड सातवा : इ.स .1950 ते इ. स. 2000 भाग दुसरा, महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे ,पहिली आवृत्ती 2010 , पृष्ठ 132

४. मनोहर यशवंत ' काही कविता संग्रहाच्या निमित्ताने ', पद्मगंधा प्रकाशन, पुणे, प्रथमावृत्ती 2010, पृष्ट- मनोगत


डॉ. जी.आर .ढेंबरे
मराठी विभाग
श्री .व्ही. एस.नाईक महाविद्यालय रावेर, तालुका रावेर जिल्हा जळगाव पिन -4255O8
मोबाईल नंबर -9421O81270 ई-मेल -dhembregr@gmail.com

बबन चित्रपटाची आस्वादक समीक्षा

बबन जागतिकीकरणाच्या परिणामांची चर्चा करणारी कलाकृती !!

 नुकताच बबन हा भाऊसाहेब   क-हाडे दिग्दर्शित चित्रपट मध्यप्रदेशातील बऱ्हाणपूर शहरात अंकिता चित्रपटगृहात पाहिला सहाजिक हिंदी भाषिक शहर असल्यामुळे मराठी चित्रपट पाहण्यासाठी गर्दी कमी होती. मोजक्या दहा-पंधरा प्रेक्षकांसोबत हा चित्रपट पाहिला social media इलेक्ट्रॉनिक मिडीया मधून  बबन चित्रपटाची जाहिरात बऱ्यापैकी झाली होती .  मनात उत्सुकता ठेऊन हा चित्रपट पाहिला .शहर आणि गावाच्या अंधुक सीमारेषेच्या वास्तवातून हा चित्रपट साकारत जातो .मोठ्या शहराला लागून असलेल्या गावांमधून गेल्या वीस-पंचवीस वर्षांत जे काही बरेवाईट परिणाम, बदल झाले आहेत याची सूक्ष्मतेने मांडणी करणारा हा चित्रपट आहे .एकीकडे ही एक व्यक्तिगत असफल प्रेमाची शोकांतिका आहे .शहराला लागून असलेल्या गावांमध्ये उन्मादी, भोगवादी ,निरर्थक उत्सवी  मानसिकता जन्म घेत आहे. याची झलक या चित्रपटातून पाहायला मिळाली .या छोट्या गावांमध्ये शहर शिरू पाहते आहे .याची मांडणी या कलाकृतीतून येते. शहरातून हळूहळू खेड्याकडे विस्तारत जाणाऱ्या औद्योगिकीकरणाच्या प्रक्रियेचे सूक्ष्म चित्रण या चित्रपटातून येते. हा विषय तसा पाहिलं काहीसा उपेक्षितच म्हणावा लागेल. मराठी साहित्य ,नाटक ,चित्रपटातून या विषयावर मूलभूत असे लेखन काही अपवाद वगळता झालेले दिसत नाही .भाऊराव कऱ्हाडे यांनी चित्रपटातून हा विषय मांडला त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन ! कारण हा विषय मांडत असताना फार काळजी घ्यावी लागते या विषयातील नाट्य ,गतिशीलता इतकी जास्त आहे की त्यातून केवळ भपकेबाजपणा ,नटवी ,बेगडी चित्रण येण्याची शक्यता असते. भाऊरावने  ते नाकारले आहे. आणि चांगली कलाकृती जन्माला घातली आहे. बबन ही एक प्रेम कथा आहे या प्रेमकथेला पार्श्वभूमी सारखी असलेली समकालीन वास्तवाची जोड अधिक रेखीव आहे. जागतिकीकरणानंतर ग्रामीण अर्थव्यवस्था डबघाईला आली. यातून शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर कुटुंबाची गुजराण होऊ शकत नाही .त्यामुळे दुग्धव्यवसाय सारख्या शेतीला जोडधंदा म्हणुन नव्या उत्पन्न साधनांची गरज ग्रामीण भागात निर्माण झाली. काही काळाने मूळ शेती व्यवसाय बाजूला पडून दुग्ध व्यवसाय हाच प्रमुख व्यवसाय बनला .दुग्ध व्यवसायातील शोषण ,शासनाचे धोरण ,सहकारी संस्था, खाजगी संस्था यांची कार्यपद्धती यांच्यातील डाव प्रतिडाव पेच , संघर्ष या चित्रपटातून मांडला जातो. शहरालगतच्या गावांमधून एमआयडीसीचे नवे छोटे-मोठे कारखाने उभे राहिले .या नव्या अर्थव्यवस्थेत गावामधील अकुशल अर्धशिक्षित तरुणाईला काही संधी दिसू लागल्या .ज्यांना या नव्या व्यवस्थेत स्थान मिळवता आले नाही .त्यांनी गुन्हेगारीला जवळ केले .या गावांमधून टोळीयुद्ध सुरू झाले. दादा , भाई लोक ,पंटर, टोळीवाले यांनी या भागात दहशत बसवली. ही दहशत एमआयडीसीतील मालक, कामगार ,मजूर ,ठेकेदार यांनाही होती. व त्याचवेळी ती गावातील गरीब शोषित दलित भटके  यांनाही या दहशतीची जरब बसली .याचे अस्पष्ट चित्र बबन मधून येते . एमआयडीसीत जमीन गेल्यामुळे काही मोजक्या लोकांकडे अवेळी भरपूर पैसा आला .या पैशातून आणखी पैसा मिळवण्याचे हव्यास सुरू झाला. श्रीमंत वर्गाने पैशाने राजकारण उभे करण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात गावातील तरुण पिढी गोवली गेली .ती आपोआप व्यसनाधीनतेकडे वळाली .झटपट श्रीमंत बनण्याचे दिवास्वप्न या पिढीला खुणवू लागले बबन हा त्यांचा प्रतिनिधी आहे .ग्रामीण भागातील तरुणांची मानसिकता या चित्रपटातून मांडली जाते. हताश ,निराशावादी, पराभूत मानसिकता बबन  मधून चित्रित होतेे. स्वार्थ साधण्यासाठी मूल्यांशी तडजोड करणारी बबनची मानसिकता आता ग्रामीण भागात जोर धरू लागली आहे .आपले स्थान व्यवस्थेत टिकवण्यासाठी संघर्ष करणारी ग्रामीण भागातील तरुणांची मानसिकता बबन मधून उभी राहते. आजच्या ग्रामीण तरुणांची मानसिकता रोखठोक आहे. काहीही करून आपण उभे राहिले पाहिजे .  ही जाणीव बबन मधून व्यक्त होते. ग्रामीण तरुणाईचे गोंधळलेपण ,विस्कटून जाणं या कलाकृतीतून मांडले जाते .या चित्रपटातील स्त्री -पुरुष संबंधाकडे पाहण्याचा नवा वास्तववादी दृष्टिकोन व्यक्त होतो. बबन  एकाच वेळी दोन-तीन मुलींसोबत शरीरसंबंध ठेऊ पाहतो .तरीही त्याचं प्रेम कायम आहे .व्यावसायिक धीटपणे शरीरसंबंधकडे पाहण्याचा हा दृष्टिकोन वास्तवाला धरून असाच आहे .जागतिकीकरणाच्या नव्या साधनांमुळे स्त्री_ पुरुष संबंध बाधीत झाले आहेत .याचा वेध घेण्यात या कलाकृतीला यश येते. मूल्यांपेक्षा जगण्याच्या लढाईला महत्व देणारा दृष्टिकोन बबन मध्येआहे. वेळप्रसंगी विद्रोहाची वाट धरणारा बबन भाऊसाहेब कऱ्हाडे  यांनी छान उभा केला आहे .संघटित गुन्हेगारी पुढे  टिकाव न लागलेल्या ग्रामीण तरुणाची शोकांतिका म्हणजे हा चित्रपट होय. या चित्रपटातील गीते संवाद उत्तम आहेत .शिरूर परिसरातील मराठी बोली वेधक अशी आहे. प्रेक्षकांना खिळवून ठेवते . चित्रपटातील पटकथेमध्ये नायिकेच्या कुटुंबाची कथा, व्यक्तिरेखा नीटपणे उभी राहत नाही. त्यामुळे कथानकातून काहीतरी सुटले आहे .असा भास निर्माण होतो .असे असले तरी बबन चित्रपटाची पटकथा उत्तम आहे चित्रपटाच्या शेवटपर्यंत कळत नाही की पुढे काय होईल. एकूणच प्रेक्षकांच्या आकालनाला  आव्हान देणारी ही पटकथा आहे. हा चित्रपट म्हणजे विद्रोहाची कलात्मक आविष्कृती करणारा असा आहे . विशेषतः चित्रपटाचा शेवट अत्यंत निर्णायक, विस्फोटक व विचार करायला लावणारा आहे .शेवटी  चित्रपट पाहिल्यावर असं वाटलं की कुठेतरी ही कलाकृती सैराट च्या प्रभावात असणारी कलाकृती आहे. विशेषतः काही चित्रीकरण, संवादाची मांडणी , सूचकताआणि चित्रपटाचा शेवट यावर कुठेतरी सैराट चा प्रभाव आहे काय असे उगाच वाटत राहाते . असे माझे व्यक्तिगत मत आहे .सैराट मराठी चित्रपट सृष्टीतील यशस्वी मैलाचा दगड आहे .त्याचा प्रभाव दहा वीस वर्षे कायम राहील शेवटी कसं  बबन म्हणीन  तसं .भाऊसाहेब ला पुढील वाटचालीत हम जहॉं खडे  सगळ्यापेक्षा बडे  हा सूर मिळो ! भाऊसाहेब कऱ्हडे या तरुण दिग्दर्शकाला मनःपूर्वक शुभेच्छा !!

शुभेच्छुक             
  डॉ . जी .आर. ढेंबरे मराठी विभाग
श्री .व्ही.एस. नाईक महाविद्यालय रावेर ता.रावेर जि. जळगाव
पिन-425508    मोबा . _ 94 21 0 8 12 70

कीर्तन परंपरा इतिहास आणि वास्तव

"इंदुरीकर कीर्तन प्रबोधन, अध्यात्म की सनातनता "

महाराष्ट्रातील कीर्तन परंपरेला काही शतकांची परंपरा आहे. काळानुसार कीर्तन सादरीकरणात अमुलाग्र बदल झाले. कीर्तन ही समुहाने समूहासमोर सादर करण्याची एक कला आहे. कीर्तनाला प्रारंभ, मध्य आणि शेवट अशा तीन भागांमध्ये विभाजित करता येते. गायन-वादन आणि वक्तृत्व या कलांच्या एकत्रीकरणातून कीर्तनाचे सादरीकरण होते. नारदीय कीर्तन आणि रामदासी कीर्तन असे कीर्तनाचे दोन प्रकार मानले जातात.या दोन्ही कीर्तन परंपराच्या सादरीकरणत काही प्रमाणात भिन्नत्त्व आहे. कीर्तनातील  अभंगाच्या चाली ,रागदारी ,वाद्य यामध्ये भेद आहेत. काही कीर्तनकार तबला वाद्य कीर्तनात वापरतात. तर काही मृदुंग या वाद्याचा साथीसाठी उपयोग करतात. काही कीर्तनकार तबला आणि मुर्दुंग यांचा संयुक्तपणे उपयोग करतात. काही कीर्तनकार हार्मोनियमचाही  वापर करतात. कुठे तो केला जात नाही. आज मनोरंजनाची साधने बदलली आहेत. वाद्यांची गुणवत्ता कमालीची सुधारली आहे. एक काळ होता जेव्हा अत्यंत साधेपणाने कीर्तन केले जात होते. मोजकी साधने कीर्तनासाठी वापरली जात होती. कमीतकमी वाद्य, टाळ, मृदुंग, वीणा यांचा उचित वापर करून कीर्तन केले जात होते. लोकांना या कीर्तनात गोडवा वाटत होता. लोकांना हे कीर्तन आनंद देत होते. मागील पंचवीस तीस वर्षात कीर्तन परंपरेत आमूलाग्र बदल झाला. वारकरी संप्रदायाच्या इतिहासामध्ये कीर्तन कुणी सादर करावे याबद्दलचे अलिखित नियम आहेत. अध्यात्माचे उचित ज्ञान, प्रचंड वाचन असलेला, पाठांतर असलेला ,गायन कलेचे मुलभूत ज्ञान असणारा व्यक्ती, अभंगाचे पाठांतर असणारा जबाबदार व्यक्ती, भक्ती साधनेची माहिती असणारा व्यक्ती कीर्तनाला उभा राहत असे. या कीर्तनकाराकडे उच्च कोटीची नीतिमत्ता, नैतिकता, साधेपणा, निस्वार्थीपणा असे .फारसे जातीय बंधन कीर्तन परंपरेत पूर्वीपासूनच नव्हती. वारकरी संत अठरापगड जातीतले होते. अध्यात्मिक लोकशाहीच्या मार्गक्रमणात कीर्तन परंपरेचे स्थान महत्त्वाचे असे होते. नामदेव महाराज, तुकाराम महाराज , तसेच विविध संत अठरापगड जातीतून आले होते .  अध्यात्मिक क्षेत्रात उंची गाठलेली ही माणसे होती.  परंपरेत शूद्र जातींना कीर्तन करण्याचा अधिकार मिळवा ही क्रांतीकार गोष्ट होती. सनातन धर्म परंपरेला यातून शह दिला गेला होता. काळानुसार कीर्तन सांगणारा व ऐकणारा दोघेही बदलत गेले. समाजप्रबोधनाचे अत्यंत महत्त्वाचे साधन म्हणून कीर्तनाकडे पाहता येते. समाजात प्रबोधन करण्यासाठी कीर्तनासारखे माध्यम नाही. अगदी सहजपणे मोठा समुदाय कीर्तनासाठी उपलब्ध होतो. समाजाला दिशा देण्यासाठी या साधनाचा वापर केला गेला. संत तुकारामांनी कीर्तन परंपरेचा अत्यंत सहजपणे वापर केला. धर्मातील चुकीच्या गोष्टी, अनिष्ट परंपरा, प्रथा यांच्याबद्दल प्रचार करण्यासाठी ,प्रबोधनासाठी संत तुकारामांनी कीर्तन या साधनाचा उपयोग केला. आज महाराष्ट्रामध्ये बहुतांश जातीतील कीर्तनकार आहेत. यामध्ये ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर जातीतील कीर्तनकार असा भेद करण्यासाठीची कारणे फारशी उपलब्ध नाहीत. महाराष्ट्राच्या सर्व भागांमध्ये वेगवेगळ्या कीर्तनकारांचे वर्चस्व आहे. अनेक महापुरुषांच्या , साधूंच्या नावाने, संप्रदायांच्या छत्राखाली कीर्तनकार आपली सेवा बजावत आहेत. कीर्तन परंपरेत अनेक वाईट प्रवृत्तीचा शिरकाव झाला आहे. काही कीर्तनकारांनी स्वत : स्वतःचे काही भक्तगण, मित्रपरिवार निर्माण करून दबदबा तयार केला आहे. कीर्तन व हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने लाखो रुपयांची उलाढाल होते. आर्थिकदृष्टया सर्वांचा सखोल अभ्यास करता येऊ शकतो. काही कोटींच्या घरातील उलाढाल कीर्तन सप्ताह ,सत्संगच्या निमित्ताने होत आहे. कीर्तनकारांना या आर्थिक उलाढालीमुळे ग्लॅमर प्राप्त झाले आहे. काही छोट्या सावलीच्या लोकांनी पैशासाठी या परंपरेला व्यवसयाचे रूप प्राप्त करून दिले आहे. धर्मामध्ये जसा अपप्रवृत्तींचा शिरकाव होतो, आणि मग सत्य धर्म कोणता? असा प्रश्न निर्माण होतो. तसाच खरी कीर्तन साधना कोणती व बाजारू कीर्तनकार कोणते? याबद्दल संभ्रम निर्माण होतो. कीर्तन ही जिवंत सादरीकरणाची कला आहे . 1990च्या दशकापासून कीर्तनाच्या कॅसेट उपलब्ध झाल्या. या कॅसेटच्या सहज उपलब्धतेमुळे कीर्तनातील लाईव्ह ऐकण्याचा आनंद या तंत्रज्ञानाने हिरावून घेतला. इसवी सन 1990 च्या दशकात अनेक कीर्तनकारांनी स्वतःच्या कीर्तन सादरीकरणाच्या कॅसेट तयार केल्या. या प्रयोगामध्ये एक नाव  फार प्रसिद्ध पावले ते म्हणजे बाबा महाराज सातारकर यांचे होय. संगीत ,गायन ,भाषा यांचे उत्तम ज्ञान ,सादरीकरणाची तांत्रिकता अवगत असल्यामुळे बाबा महाराज सातारकर यांना अवघ्या महाराष्ट्रातून लोकप्रियता मिळाली. लाखो रुपयांच्या कॅसेट महाराष्ट्रभर विकल्या गेल्या. जागतिकीकरणाच्या प्रारंभीच्या काळातील ही घटना महत्त्वपूर्ण होती. स्वतःची कला विकण्याचे, मार्केटिंगचे तंत्र बाबा महाराज सातारकर यांनी उत्तम पद्धतीने वापरले. एका कीर्तनाची फी -मानधन , बिदागी काही हजारांपासून लाखांपर्यंत पोहोचली. बाबा महाराज सातारकर 2005 सालापर्यंत अगदी प्रसिद्धीच्या उत्तुंग शिखरावर होते. महाराष्ट्राचा समाज ऑडिओ कॅसेट कडून व्हिडीओ कडे वळला होता. परंतु बदलत्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे तंत्र अजून कीर्तनकारांना गवसले नव्हते. व्हिडीओ कॅसेटचा प्रयोग बाबा महाराज सातारकर यांनी यशस्वीपणे हाताळला नाही. याला तांत्रिक कारणाबरोबरच त्यांचे वयही अधिक जबाबदार होते. बाबा महाराज सातारकर यांनी निर्माण केलेली कीर्तनाची लोकप्रियता शिखराला गेली होती. परंतु त्यांचा पुढील वारसदार अजून ठरला नव्हता. महाराष्ट्रात 2000 सालापासून इंदुरीकर नावाचे वादळ कीर्तन परंपरेत निर्माण झाले. सुमार गायनकला, बेताचे अध्यात्मिक ज्ञान, वारकरी संप्रदायाचे अपूर्ण ज्ञान ,इतिहासाचे चुकीचे आकलन सनातन धर्मप्रियता असूनही इंदुरिकर हा ब्रँड महाराष्ट्राने स्विकारला. इंदुरीकर यांच्या जमेच्या बाजूचा विचार केला तर  वास्तवाचे अचूक आकलन ,भाषेतील नगरी गोडवा, हजरजबाबीपणा, उत्तम विनोद सादर करण्याची कला, बोलण्यातील रंजकता,शिक्षण , इंदुरीकर घराण्याची परंपरा,अध्यात्म सामाजिक स्थितीशी जोडण्याचे कसाब,उत्तम मार्केटिंग करण्याचे तंत्र,तंत्रज्ञानाचा अचूक वापर, व्हिडिओ  तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर ,युट्युब ,फेसबुक यांचा प्रभावी वापर करण्याचे कसब , अध्यात्माला समाजसेवेचा मुलामा देण्याची शैली या सर्व इंदुरीकर यांच्या जमेच्या बाजू आहेत. यातूनच महाराष्ट्राने इंदुरीकर हा पर्याय स्वीकारला, डोक्यावर घेतला. इंदुरीकरांकडे संत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा प्रबोधनाचा स्वच्छ स्पष्ट दिशा देणारा प्रशस्त मार्ग होता.परंतु इंदुरीकर या मार्गाने गेले नाहीत. त्यांनी गाडगेबाबा, तुकडोजी महाराजांचा मार्ग जाणीवपूर्वक नाकारला. इंदुरीकर यांनी आपली प्रतिभा सनातन विचारांना ठसवण्यात वाया घालवली. स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय या घटनेच्या मूल्यांना समाजामनावर ठसवण्याची संधी इंदुरीकर यांनी घालवली. सनातन धर्मातील, मनुस्मृतीतील कालबाह्य गोष्टी जाणीवपूर्वक समाजावर थोपवणे इंदुरीकर यांना महत्त्वाचे वाटले. विनोदातून कर्मठ रूढी-परंपरा, सनातन धर्माचा पुरस्कार त्यांनी कधी जाणीवपूर्वक तर कधी नकळतपणे  केला. इंदुरीकर यांच्या कीर्तनातील घातक गोष्टींचा विचार केला तर त्यांच्या कीर्तनातून बुरसटलेले जुनाट विचार , स्त्रियांचा अनादर करणारी विधाने येतात.जातीव्यवस्थेचे नकळतपणे समर्थन येते . कधीकधी व्यसनाधीनतेचे अनावश्यक आंबट वर्णन येते . भाषेतील अश्लीलता ,नको तितक्या थेटपणे कीर्तनातून अनुभवाला येतो. मुळात आपल्याला काय स्वीकारायचे आहे? आणि काय नाकारायचे आहे? यात स्पष्टता नसल्यामुळे इंदुरीकरांचे वैचारिक गोंधळलेपण  स्पष्टपणे अधोरेखित होते. वारकरी संप्रदायाची उत्तम जीवन मूल्य ,अध्यात्मिक लोकशाहीतील तत्वे इंदुरीकरांनी जास्त अवगत केली असती तर महाराष्ट्राचे अधिक बरे झाले असते. इंदुरीकरांच्या स्पष्टवक्तेपणाला लोकशाही मूल्यांची जोड मिळाली असती तर फार उचित झाले असते. मागील वीस पंचवीस वर्षात इंदुरीकर यांची लोकप्रियता वाढत गेली. याला आधुनिक तंत्रज्ञानही जबाबदार आहे. अजूनही वेळ गेलेली नाही इंदुरीकरनी स्वातंत्र्य, समता, बंधुता,न्याय या मूल्यांचा मनापासून स्वीकार करावा. संत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या परंपरेला इंदुरीकरांनी पुढे न्यावे .ही काळाची गरज आहे. यातच समाजाचे भले आहे. असे मनापासून वाटते.

वरील लेखाचा उद्देश इंदुरीकरांची समीक्षा करणे हा नसून प्राप्त परिस्थितीचे आकलन मांडणे हा आहे.संत तुकारामांनी कीर्तन परंपरेतील प्रबोधन मार्ग जाणीवपूर्वक मोठा केला. समाजाला नीतीमार्ग  सांगण्याचे एक साधन म्हणून कीर्तन परंपरा महत्त्वाची आहे. संत तुकाराम महाराजांची परंपरा पुढे घेऊन जाणे काळाची गरज होती. संत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी संत तुकाराम महाराजांच्या विचारांना, परंपरेला पुढे नेण्याचा अथक प्रयत्न केला. आज इंदुरीकरांचे जेवढी लोकप्रियता आहे, त्यापेक्षा अधिक लोकप्रियता संत गाडगेबाबा ,राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची होती. संत गाडगेबाबांनी महाराष्ट्र ,मध्य प्रदेश, गुजरात, तेलंगणा राज्यात कीर्तने केली . मराठी, हिंदी भाषेचा वापर संत गाडगेबाबा आपल्या कीर्तनातून करत असत. संत गाडगेबाबांच्या कीर्तन परंपरेचा मधुकर केचे यांनी आपल्या लेखातून उत्तम परिचय करून दिला आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ग्रामगीता आजही गावाच्या उद्धारासाठी नवी व्यवस्था सांगते. संत गाडगेबाबा ,राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे नाव ,स्मृती ,विचार समाजाला आजही प्रेरणा देतात. समाजमनावर गाडगेबाबांचे, तुकडोजी महाराजांचे नाव अढळपणे कोरले गेले आहे. यामागील कारण मीमांसा तपासले असता एक गोष्ट लक्षात येते. ती म्हणजे संत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारातील शाश्वत विचार समाजाला गती व दिशा देतात. शाश्वत विचार स्थळ काळ ,समाज यांच्या मर्यादा ओलांडून जातात. सवंग लोकप्रियता इंदुरीकर यांना मिळाली आहे.केवळ तात्कालिक गोष्टी ,घटना-प्रसंग ,विनोदातून इंदुरीकर सांगतात.हे विचार शाश्वत असत नाहीत. इंदुरीकर यांच्या कीर्तनाला मनोरंजनाचे व्हॅल्यू अधिक आहे. इंदुरीकर कुठलेही ठाम विचार कीर्तनातून सांगत नाहीत. तसा ते फक्त भास निर्माण करतात. शाश्र्वत विचार, मूल्य इंदुरीकर कीर्तनातून सांगत नाहीत. कारण विचारांची दृष्टी, पुरोगामित्व नाकारणारे इंदुरीकर हे एका सोंगाड्या पेक्षा कमी नाहीत. कीर्तन परंपरेतील अभिजातता ,गांभीर्य, उच्च आध्यात्मिक मूल्य इंदुरीकर यांनी घालून टाकले. केवळ कीर्तन परंपरेचा आधार घेत टिंगल-टवाळी, विनोद निर्मिती यातून वारकरी संप्रदायाच्या कीर्तन परंपरेतील पावित्र्य नष्ट झाले. काळाच्या ओघात इंदुरीकर म्हणजे कीर्तन हा भ्रम समाजात निर्माण झाला.  भविष्यकाळातील वारकरी संप्रदायाच्या कीर्तन परंपरेचेनुकसान झाले.युवा कीर्तनकार इंदुरीकर शैली आत्मसात करत आहेत. ही शैली कीर्तन परंपरेचे महत्त्व कमी करून तिला एकपात्री प्रयोगाच्या सादरीकरणाकडे घेऊन जाईल का? अशी शंका वाटते. इंदुरीकर स्वतःला समाजप्रबोधनकार म्हणून घेतात. त्यांच्या विचारांमध्ये, विनोदांमध्ये, शैलीमध्ये ताकद असेल तर त्यांनी कीर्तन परंपरेचा त्याग करावा. स्वतःची व्याख्याने गावोगाव लावावीत. तेव्हा किती प्रेक्षक त्यांच्या व्याख्यानाला येतील, त्यांची लोकप्रियता वाढते की कमी होते हे तपासून घेता येईल. देव, धर्म ,वारकरी संप्रदायाची हजारो वर्षांपासूनची परंपरा यांचा आधार घेऊन स्वतःचा विस्तार करणारे इंदुरीकर वृत्ती ही बांडगुळापेक्षा कमी नाही.
 हिणकस विनोद, हेडस नृत्य, अश्लील हावभाव सादर करण्याची कीर्तन ही जागा नव्हे. कीर्तन परंपरेतील पावित्र्य इंदुरीकर यांनी घालवले. याबद्दल वारकरी संप्रदायातील अभ्यासकांनी, संप्रदायाच्या नेतृत्वाने इंदुरीकरांना  थांबवणे गरजेचे होते. पण तशी हिंमत कुणीच दाखवली नाही. प्रचंड मोठी कीर्तन परंपरा रसातळाला जाते आहे. पण कुणीच किंमत करत नाही. हा अभ्यासकांचा ,वारकरी संप्रदायातील नीतिमूल्यांची चाड असणाऱ्या नेतृत्वाचा पराभव आहे. परंतु बोटचेपेपणाची भूमिका हा समाजाचा स्थायीभाव झाला आहे. आणि यातूनच इंदुरकरांसारखी माणसे व्यवस्थात जन्माला येत  आहेत . इंदुरीकर यांनी राजकारणी लोकांशी संबंध प्रस्थापित केले. राजकारणी मंडळींना इंदुरीकर यांची लोकप्रियता खुणावत होती. राजकारणी स्वार्थातून त्यांच्याजवळ गेले. पब्लिकला मूर्ख बनवणारा एका बाबाला राजकारणी सांभाळू लागले. मागील वीस पंचवीस वर्षातील इंदुरीकर यांच्या कीर्तनाच्या आयोजकांचा शोध घेतला तर आपल्या काय लक्षात येते. गावातील, पंचक्रोशीतील धनदांडगे आपल्या मायाविश्वातून निर्माण केलेल्या काळ्या  पैशातून इंदुरीकरांचे कीर्तने ठेवू लागली. दहावे , वर्षश्राद्ध त्यांचे पावित्र्य पुन्हा समाजमनावर ठसवले गेले. इंदुरीकरांचे कीर्तन ठेवून सहज प्रसिद्धी मिळवणाऱ्या राजकारणी, दोन नंबर पैसेवाले, मस्तवाल आणखीन गब्बर झाले. धर्म ,देव यांचा आधार घेऊन स्वतःला पवित्र करून घेऊ लागले अशी बाजारबुनगे  तुम्हाला कोसा-कोसांवर नक्कीच भेटतील. कधी कधी इच्छा नसतानाही, बळजबरीने सप्ताच्या , सत्संगाच्या पावती फाडण्यासाठी गोरगरिबांना मजबूर करणारे चेहरे डोळ्यासमोर उभे राहतात. मन अस्वस्थ होते. या पैशातून इंदुरीकर यांना बोलवण्याची स्पर्धा गावागावांमध्ये लागते. यातून अध्यात्माची पवित्रता नष्ट होते.  अध्यात्माचा बाजार भरू लागतो. या बाजारातील भणंग शिरोमणी म्हणजे इंदुरीकर होय.
 संत तुकारामांच्या परंपरेला पुढे नेणारे अनेक संत महंत महाराष्ट्रात आहेत. परंतु ते शाश्वत विचार, मूल्य सांगतात. त्यांना समाज किंमत देत नाही. समाजाला विकृतीच्या भिकेचे डोहाळे लागले आहेत. संत तुकाराम यांच्या विचारांना पुढे नेणारे संत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज महत्त्वाचे आहेत.ही पुरोगामी विचारांची परंपरा महाराष्ट्राला नवे भान देणारे आहे. संत तुकाराम ,संत गाडगेबाबा ,राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुरोगामी विचारांना पुढे नेणारे सत्यपाल महाराज समाजप्रिय आहेत.  सत्यपालांचे अस्सल खंजिरी वादन मनाला मोहिनी घालणारे आहे. कीर्तन परंपरेतून छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार स्पष्टतेने मांडणारे सत्यपाल महाराज समाजाला शाश्वत मूल्यांचा मार्ग सांगतात. ठाम नीतीतत्वे समाजाला देतात. विचारांची स्पष्टता असल्यामुळे सत्यपाल महाराज रोखठोक ठरतात. इंदुरीकरांनी सत्यपाल महाराजांचे विचार स्वीकारून प्रबोधनाचा मार्ग निवडल्यास तो महाराष्ट्रासाठी सुदिन ठरेल.

 डॉ. गणपतराव ढेंबरे,
मराठी विभाग
श्री .व्ही.एस. नाईक महाविद्यालय रावेर , ता . रावेर, जि . जळगाव
पिन-425508
मोब .नं. -9421081270
dhembregr@gmail.com

वैशिष्ट्यीकृत पोस्ट

भाषा , साहित्य निर्मिती आणि कृत्रिम बुद्धिमत्ता

 भाषा, साहित्य निर्मिती आणि कृत्रिम बुद्धिमत्ता डॉ. गणपतराव ढेंबरे  मराठी विभाग श्री.व्ही.एस. नाईक महाविद्यालय, रावेर,ता.रावेर,जि. जळगाव पिन...