बुधवार, १२ जुलै, २०२३

भुरा -

 भुरा एक आत्मशोधाचा प्रवास ॥



 ऑगस्ट 2021 मध्ये लोक वाङ्मय गृहाने प्राध्यापक शरद बाविस्कर यांचे भुरा हे आत्मकथन प्रकाशित केले. जवाहरलाल नेहरू विद्यापीठ नवी दिल्ली यांच्या फ्रेंच भाषा विभागात प्राध्यापक शरद बाविस्कर प्राध्यापक म्हणून नोकरी करत आहेत. जवाहरलाल नेहरू विद्यापीठ हे भारतातील अतिशय प्रतिष्ठित विद्यापीठ आहे. या विद्यापीठात शिकावं हे अनेकांचे स्वप्न असते. प्राध्यापक शरद बाविस्कर या विद्यापीठात शिकून त्याच विद्यापीठात अध्यापन करत आहेत. त्यांचा हा प्रवास धुळे जिल्ह्यातील रावेर या गावातून सुरू होतो. रावेर ते नवी दिल्ली या प्रवासात भुराकडून शरद कडे झालेला हा प्रवास अतिशय संघर्षमय असा आहे.  भुराच्या वाटेला अतिशय जीवघेणा  दुखरा  भोगवट आला आहे. हा भोगवटा अतिशय संवेदनशीलपणे या आत्मकथनातून उलगडत जातो. भुरा ते शरद हा प्रवास विविध अंगी स्वरूपाचा आहे. केवळ भौतिक बदल म्हणून या प्रवासाकडे पाहता येत नाही. हा प्रवास मानसिक , तात्त्वीक , वैचारिक परिवर्तनाचा प्रवास आहे. दैववादी , नियतिशरण भुराकडून पुरोगामी विवेकवादी विज्ञानवादी शरदकडे झालेला हा प्रवास अतिशय सुंदर असा आहे. इसवी सन 1980 नंतरच्या दशकात जन्मलेल्या पिढीचे हे आत्मकथन आहे. या आत्मकथनातून शेतकरी ,मजूर ,उपेक्षित वर्गातील  एका हजारातून स्वतःला सिद्ध करणार्‍या भुराची ही कथा मनोवेधक अशी आहे. त्याची सिद्ध होण्याची ही व्यथा आहे. सफल परिक्रमा पूर्ण करण्याचा प्रवास भुरातून मांडला जातो. या आत्मकथनातून जगभरातील तत्त्ववेत्यांच्या तत्त्वज्ञानाचा सार  मांडला जातो. भुराच्या जगण्यातले वास्तव मांडत असताना जगण्याची विविध पैलू तत्त्वज्ञानातून मांडले जातात.हे आत्मकथन अंतर्मुख करणारे आहे. या आत्मकथनातून केवळ भावनिक आव्हान येत नाही तर स्वतः ला सिद्ध करण्याची सर्जनशील निर्मीतीप्रक्रिया अलगदपणे उभी राहते.


या आत्मकथेतून  केवळ सहानुभूतीचा फार्स उभा राहत नाही. ही आत्मकथा लढण्याचे प्रेरक तत्व घेऊन उभी राहाते. ही आत्मकथा भान हारपलेल्या माणसासाठी प्रेरणादायी ठरते. त्याला जगण्यासाठी , लढण्यासाठी सिद्ध करते. शिक्षण म्हणजे स्वातंत्र्य होय. भुरा या आत्मकथनातील हे अतिशय महत्त्वाचे वाक्य आहे. बहुजन समाजाला खरं स्वातंत्र्य शिक्षणातून मिळू शकते. शिक्षण हे व्यवस्था परिवर्तनाचे माध्यम आहे. या मांडणीला भुरा या आत्मकथनातून मान्यता मिळते. दहावी इंग्रजी विषयात नापास झालेला भुरा त्याच विषयात विशेष प्राविण्य मिळवतो. जगाचा प्रवास करून येतो. ही झेप वाचकाला थक्क करणारी आहे. 12 ते 15 तास अभ्यास करून एखादी भाषा ,विषय आत्मसात करणं यातून भुराची जिद्द पराकोटीचे असल्याचे दिसून येते. एखादी भाषा आत्मसात कशी करावी ? भाषा शिकणे म्हणजे काय ? या प्रक्रियेतील भुराला सापडलेले सत्व या आत्मकथनाचा गाभा आहे. केवळ भाषा हे शोषणाचे साधन ठरू शकत नाही. कोणतीही भाषा आत्मसाथ करत येते.फक्त त्यासाठी तुमच्याकडे असावी लागते जिद्द. ही जिद्द तुम्हाला यशाच्या शिखरावर घेऊन जाते. या यशाची प्रचिती भुरातून होते. 

 व्यसनाधीन असलेले वडील ,मोठा भाऊही त्याच वाटेने निघालेला ,गरिबी , दारिद्र्य , समाजातील उपेक्षित स्थान . यातून भुराच्या वाट्याला प्रचंड अवहेलना येते. ही अवहेलना प्रेरणा मानून भुरा स्वतःला घडवत जातो. किंबहुना जास्त त्वेशाने या परिस्थितीवर हल्ला चढवतो. स्वतःला सिद्ध करतो.  हे आत्मकथन रस्ता भटकलेल्या , दिशाहीन ,उपेक्षित तरुण विद्यार्थ्यांसाठी प्रेरक  ठरू शकते. अति भव्यता ,उच्चतेचा आग्रह माणसाला निर्मितीचा पराकोटीचाआनंद देत असतो. हा आनंद , ही स्वतःची घडण प्रक्रिया , निर्मिती प्रक्रिया या आत्मकथनातून उभी राहते. जीवनातील एक महत्त्वाचे तत्व भुराला लहानपणी आई सांगते. 'झिजिन मरणं , पण थिजी न नही मरणं ' या तत्त्वातून भुरा स्वतःला घडवत राहतो. या आत्मकथनातील काही वाक्य अतिशय तात्विक आहेत. मानवी जीवनाबद्दलचे ,नातेसंबंधबद्दलचे व्यवस्थेबद्दलचे  अतिशय महत्त्वपूर्ण विधाने या आत्मकथेतून येतात. याला कारण  लेखकाचा चिंतनाचा विषय तत्त्वज्ञान हे आहे.ही विधाने , ही मांडणी या आत्मकथनातून प्रभावीपणे येते . वाचकाला  विचार प्रवृत्त करते. भुराकडे असलेल्या अंतर्मुख वृत्तीमुळे तो स्वच्छ स्वतःकडे ,समाजाकडे , जीवनाकडे ,व्यवस्थेकडे तटस्थने पाहतो. सम्यक आकलनातून भुरा शाश्वत सत्याकडे जातो.


 कळपापासून वेगळं राहण्याची किंमत भुराला जास्त मोजावी लागते. भुरा बालपणात ती किंमत जास्त देतो.  ती किंमत मोजण्याच्या प्रक्रियेतच भुराला जगण्याचे प्रेरक तत्व सापडतात.


 1990 च्या दशकात  ग्रामीण भागात मनोरंजनाचे साधने फार कमी होती. त्यातून प्रत्यक्ष माणसांच्या जगण्यात , वागण्यात ,शोषणात मनोरंजन शोधण्याची मानसिकता खेड्यात होती. या मानसिकतेतून  कुणाची आपण अवहेलना करतो आहोत याचे भानच लोकांकडे नव्हते. यातून कोणाचे तरी भावविश्व उध्वस्त होत आहे. ही जाणिवचं लोकांना नव्हाती.  या सगळ्या प्रक्रियेतून लेखक शरद बाविस्कर यांना  भुरा हे नाव मिळते. असे शोकात्म  जगणं वाट्याला आलेला भुरा त्याची फार मोठी किंमत देतो. स्वतःचा शरदचा प्रवास निश्चित करतो. व्यवस्थेत शिरल्यानंतर स्वतःच्या स्वार्थासाठी तडजोड करणारे हजारो भेटतात. भुरा व्यवस्था प्रवेशानंतरही आपली पार्श्वभूमी विसरत नाही. तो वैचारिक भूमिकेवर ठाम राहातो. प्रसंगी त्याची किंमत मोजण्यासाठी भुरा सज्ज होतो.


 जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील संघर्षात आपल्या भूमिकेवर ठाम राहणारा भुरा अतिशय मोठा वाटतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर , महात्मा फुले ,छत्रपती राजश्री शाहू महाराज यांचा वैचारिक वारसा घेऊन जीवनातील मार्गक्रमण करणारा भुरा वाचकाला वैचारिक ऊर्जा व भान देतो.  भुरा या आत्मकथनात एक गोष्ट प्रकाशाने जाणवते आणि ती म्हणजे नायकाला सापडलेले वैचारिक सूत्र ही होय. वैचारिक गुलामगिरीतून बाहेर पडून सम्यक वैचारिक दृष्टिकोन घेऊन भुरा पुढील वाटचाल करतो. वैचारिक स्पष्टतेतून आलेले सम्यक भान या आत्मकथनातून अभिव्यक्त होते.


 दहावी नापास झाल्यावर भुरांमध्ये विद्रोह जन्म घेतो. हा विद्रोह सृजनशील निर्मितीचा आहे. दैववाद , नियतीशरणता नाकारून भुरा विवेकवादी होतो. या आत्मकथनातून ग्रामीण भागातील हजारो विद्यार्थ्यांचा शिक्षण प्रवाहातून बाहेर पडण्याचा प्रवास ही अधोरेखित होतो. स्वाध्याय , आसाराम ,रामदासी बैठका या प्रकारांमधून समाजाला मानसिक गुलामगिरीत ढकलले जाते. या वास्तवावर लेखक शरद बाविस्कर यांनी प्रकाश टाकला आहे. ग्रामीण भागातील पोरं-पोरी मागे पडत असतील तर त्यासाठी बऱ्याच दृष्टीने आपली विषमतावादी व्यवस्था जबाबदार आहे. ग्रामीण भागातील तकलादू  शिक्षण तर 99% विद्यार्थ्यांना निकामी करतं असं वाटतं. हे लेखकाचे चिंतन शिक्षण व्यवस्थेच्या समग्र प्रक्रियेवर भाष्य करणारे आहे. आजच्या समकालीन वास्तवावरती , शिक्षण व्यवस्थेतील एकूण व्यवस्थेवरती हे चिंतन प्रहार करते. असे आपल्याला म्हणता येईल. शिक्षणाचे लोकशाहीकरण केले पाहिजे. असे लेखकाला मनापासून वाटते. आज वास्तवात मात्र शिक्षणाची विषमतावादी  व्यवस्था स्थिर रूप धारण करत आहे. यातून बहुजन समाजातून एखादाही भुरा पुढे येईल की नाही ? याबद्दल शंका वाटते. जीवनातील निरार्थकता टाळून एक निश्चित दिशेने मार्गक्रमण करण्यासाठी एक संकल्प जवळ असावा लागतो. भुराने निरर्थकतेवरती मात केली आहे. भुराचा संकल्प अतिशय संघर्षमय असा आहे. भुरा आत्मकथनातील सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे सांस्कृतिक ,सामाजिक ,आर्थिक , राजकीय ,शैक्षणिक ,धार्मिक ,जातीय व्यवस्थेचे आकलन अतिशय उच्च कोटीचे आहे. या आकलनातील चिंतन चिरस्थायी स्वरूपाचे आहे. लेखक म्हणतो , 'आपल्या समाजात आढळणारी वाईट गोष्ट अशी की , नियोजित पद्धतीने हस्तक्षेप करून सांस्कृतिक ठेकेदार त्यांच्या बैठकांच्या माध्यमातून छुपा पद्धतीने दैववादाला आणि आपआप वादाला सतत खत पाणी घालत असतात. त्यामुळे बहुसंख्या समाज बंदिस्त आणि अपरिवर्तनीय जीवनाविषयी चीड न येता निमूटपणे त्याचा स्वीकार करत असतो. अशी निरर्थक कर्मकांडे मला मुक्तीच्या मार्गातील अडथळे वाटतात.' हे लेखकाचे आकलन अतिशय सत्यनिष्ठ स्वरूपाचे आहे. संपूर्ण भारतभर सांस्कृतिक ठेकेदार मानसिक गुलामगिरी उत्साहात पेरत आहेत. राजकीय सत्तेच्या आश्रयामुळे या ठेकदारांचे बळ प्रचंड वाढले आहे. विवेकवादी ,विज्ञानवादी दृष्टिकोनाची , सम्यकवादी विचारांची पिछेहाट मोठ्या प्रमाणात होत आहे. या वास्तवावर हे आत्मकथन अचूकपणे भाष्य करते.


समकालीन राजकीय , सामाजिक , आर्थिक ,धार्मिक सांस्कृतिक पर्यावरणात समाजाला दिशा दिग्दर्शन करण्याची ताकद असलेले हे आत्मकथन आहे. याआत्मकथनातून समकालीन अनेक प्रश्नांची उत्तरे अगदी अचूकपणे मिळतात. हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. भुरा हे एक अतिशय वैचारिक अशी आत्मकथन आहे. प्रा. शरद बाविस्कर यांच्या लेखन कार्याला खूप खूप शुभेच्छा !!!


धन्यवाद !


 डॉक्टर गणपत रामदास ढेंबरे , 

रावेर तालुका रावेर जिल्हा जळगाव पिनकोड 425508

 मोबाईल नंबर 9421081270 ई-मेल - dhembregr@gmail.com

1 टिप्पणी:

वैशिष्ट्यीकृत पोस्ट

भाषा , साहित्य निर्मिती आणि कृत्रिम बुद्धिमत्ता

 भाषा, साहित्य निर्मिती आणि कृत्रिम बुद्धिमत्ता डॉ. गणपतराव ढेंबरे  मराठी विभाग श्री.व्ही.एस. नाईक महाविद्यालय, रावेर,ता.रावेर,जि. जळगाव पिन...