मंगळवार, ११ जून, २०२४

तसनस चळवळीच्या पराभवाची झाडाझडती

 चळवळीच्या पडझडीची झाडाझडती अर्थात तसनस 



प्रस्तावना : - पत्रकार,कथाकार म्हणून आसाराम लोमटे आपणास परिचित आहेत.शब्द पब्लिकेशन मुंबई यांनी डिसेंबर 2020 मध्ये आसाराम लोमटे यांची तसनस कादंबरी प्रकाशित केली.ही कादंबरी वाचकांच्या पसंतीला अग्रक्रमाने उतरली.म्हणून नोव्हेंबर 2021 मध्ये या कादंबरीची दुसरी आवृत्ती प्रकाशित झाली.शेतकऱ्यांच्या,कष्टकऱ्यांच्या चळवळीचा इतिहास एका कार्यकर्त्याच्या मुखातून या कादंबरीतून मांडला गेला. इसवी सन १९८० नंतर स्थापन झालेल्या शेतकरी संघटनेचा इतिहास कादंबरीतून उलगडत जातो. या कादंबरीच्या पटातून वास्तवातील अनेक व्यक्ती ,संघटना यांचे चित्र उभे राहते. कादंबरी हा वास्तव आणि कल्पित यांचा उत्तम मेळ घालणारा वाङ्मय प्रकार आहे.तसनसमध्ये कल्पितापेक्षा वास्तवाचा भार अधिक आहे. वास्तवात घडून गेलेल्या व्यक्ती,घटना,प्रसंग,राजकारण अगदी सत्यपणे कादंबरीतून चित्रित होते.या कादंबरीला वास्तवाचा,सत्याचा गंधीत स्पर्श आहे. प्रत्यक्षात शेतकरी चळवळीतील निष्ठावान कार्यकर्त्यांच्या जगण्याचा हा इतिहास आहे. शेतकरी चळवळीतील राजकारण या कादंबरीतून सूक्ष्मपणे चित्रित होते.शेतकरी चळवळ उभी करणाऱ्या संस्थापकांचे अचूक मूल्यमापन कादंबरीत केले जाते.सत्यात घडून गेलेल्या संस्थापकांचे पायही शेवटी मातीचे होते. हा निष्कर्ष ही कादंबरी अलगदपणे मांडते. संस्थापकांचे आर्थिक प्रश्नांकडून अध्यात्माकडे झालेली वाटचाल अस्वस्थ करणारी आहे. एखादी संघटना स्थापन होते.तिच्यात निष्ठेने जीव ओतून काम करणारे सर्वसामान्य कार्यकर्ते जोडले जातात. क्रियाशील कार्यकर्त्यांचे जाळे विणले जाते. चळवळ बाल्यावस्थेतून तारुण्यात प्रवेश करते.भरात येते.चळवळ लोकांच्या मनात घर करते.

चळवळ लोकांच्या जगण्याचा श्वास बनते. व्यवस्थेच्या केंद्रस्थानी चळवळ येते.ज्या प्रश्नांसाठी,समस्येसाठी चळवळ उभी राहते.ती प्रश्न ,समस्या काही प्रमाणात सोडवण्यात चळवळीला यश येते.चळवळ अर्थकारण,राजकारण,समाजकारण,संस्कृती,जातीव्यवस्था ,धर्मकारण यांच्या केंद्रवर्ती ठिकाणी कार्य करू लागते.व्यवस्था परिवर्तनासाठी चळवळ कार्य करते.हळूहळू चळवळ प्रस्थापित होते. चळवळीतून काही लाभार्थी उभे राहतात. चळवळीतून काही लाभाची पदे,जागा निर्माण होतात. लाभार्थी होण्यासाठी चळवळीत चढाओढ लागते. राजकारण चळवळीत शिगेला पोहोचते. चळवळीत जुने आणि नवे असा संघर्ष उभा राहतो. निष्ठावान आणि लबाड ,दलबदलू कार्यकर्ते यांच्यात संघर्ष घडू लागतो. चळवळीत गट तट पडतात. मूल्य,निष्ठा,श्रद्धा यांची चाड असलेले लोक चळवळीतून बेदखल होतात.चळवळीतून स्वार्थ साधणारे लोकचं चळवळ चालवू लागतात. चळवळीतील सत्तांतर कधी सहजपणे तर कधी रक्तरंजित होऊन घडते. बेगडी ,झूल पांघरलेले लोक चळवळीचे नेतृत्व करू लागतात. केवळ स्वार्थासाठी चळवळ ,कार्यकर्ते वापरले जातात. मूळ उद्दिष्टांपासून चळवळ भरकटते. साध्यापेक्षा साधनांना मोडून खाण्यात कार्यकर्त्यांना आनंद मिळतो. शेकडो, हजारो ,लाखो लोकांच्या त्यागातून,कार्यातून समर्पणातून उभी राहिलेली चळवळ मूठभर लोकांच्या स्वार्थासाठी निकाली निघते. यातील अस्वस्थ रक्ताळलेल्या माणसांची अगतिकता तसनस मधून चोखपणे मांडली जाते. चळवळीसाठी अख्ख आयुष्य उधळलेल्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या दुःखावर वेदनेवर तसनस फुंकर मारते.

सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या एकाकी, एकटेपणातील चिंतन तसनसला विशेषत्व देते. आपण काय जगलो ? का? कशासाठी? कुणासाठी ? जगलो? भांडलो? याचा आत्मशोध म्हणजे तसनस ही  कादंबरी होय. कादंबरीचा कालपट गेल्या ३० ते ४० वर्षांचा आहे. विशेषतः इ.स.1980 ते इ.स 2020 या वर्षातील ग्रामीण जीवन कादंबरीच्या केंद्रस्थानी आहे. कादंबरीतील व्यक्ती,घटना,प्रसंग ,भाषा ही मराठवाड्यातील आहे. मराठवाडा हा चळवळीसाठी सुपीक असलेला प्रदेश आहे. शेतकरी चळवळीच्या वाटचालीतील प्रमुख टप्पे या कादंबरीतून मांडले जातात. शेतकरी संघर्ष समितीने गेल्या पन्नास वर्षात काय मिळवलं? आणि काय गमावलं ? याचा लेखाजोखा कादंबरीतून अचूकपणे मांडला जातो. शेतकरी चळवळीच्या ऱ्हासाची ,पराभवाचे कारणमीमांसा तसनस मधून बेधडकपणे मांडली जाते. या कारणमीमांसाला अतिशय सखोल चिंतनाची जोड आहे. कुठेही उथळपणा जाणवत नाही. 

जीवनातील वास्तव त्यातील विविध बाजूंची तपासणी वाचकाला कथानकाशी जोडून ठेवते. विविध वैचारिक सिद्धांत ,तत्वज्ञान ,परंपरा यांचे विविधांगी दर्शन कादंबरीतून घडते. या मांडणीत अतिशय गांभीर्य आहे. लेखकाचे चिंतन,कादंबरीच्या विषयासंदर्भातील आकलन अतिशय सखोल,परिपूर्ण आहे. कादंबरीतून ते अतिशय सकसपणे मांडले जाते. कादंबरीतून ग्रामीण जीवनाचा पट बहुविध स्तरीय स्वरूपात मांडला जातो. कादंबरीतून खेड्यातील राजकारण ,अर्थकारण ,शेतीचे विविध पैलू उलगडले जातात. समकालीन वास्तवाचे चित्र उभे करण्यात लेखकाला यश येते. कादंबरीचा अवकाश अतिशय व्यापक आहे. जीवनाचे विविध स्तर कादंबरीतून उभे राहतात. गाव खेड्यापासून ते तालुका जिल्ह्यातील जीवनपट कादंबरीतून मांडला जातो. कादंबरीतून शेतकरी चळवळ ,असंघटित मजूर हमाल मापाडी कामगार चळवळ ,शेतकरी चळवळीतील स्त्रियांच्या सहभागाचे चित्रण येते. शेतकरी संघटना ,चळवळ मोडीत का निघाली? याचे कारणमीमांसा  कादंबरीचा मुख्य गाभा आहे. कादंबरी केवळ कारणमीमांसे पर्यंत थांबत नाही तर ती चळवळीच्या पराभवाची सैद्धांतिक मांडणी करते. चळवळ का संपली ? याचे उत्तर कादंबरीतील क्षीरसागर वकील हे पात्र देते.ते म्हणतात," तुमच्या आंदोलनांना गर्दी जमते मात्र त्यात ठोस संदेश आणि राजकीय भूमिकांचा अभाव असतो. त्यामुळे अशा आंदोलनांना परिणामांचे टोक येत नाही. तुमच्या समितीची मांडणी प्रभावी असते,आंदोलनतंत्र कल्पक असतात आणि कार्यक्रम प्रतिकात्मक असतो. अशा त्रिवेणी धाग्यातून तुम्ही जो गोफ विणता तो सभेपुरता आकर्षक दिसतो पण तो गोफच राहतो. त्याचा 'शेतकऱ्याचा असूड 'होत नाही. तुमच्या राजकीय भूमिका स्पष्ट असत्या तर कदाचित या आसुडाचे फटके शेतकऱ्यांना लुटणाऱ्यांच्या पाठीवर नेमके बसले असते.

वरील विश्लेषण शेतकरी चळवळीच्या अपयशाबद्दल चिंतन मांडणारे आहे. किंबहुना शेतकरी चळवळीच्या अपयशाचे मर्म वरील विवेचनातून उलगडले जाते. सुरुवातीच्या काळात शेतकरी व शेतकरी चळवळी पुढील शत्रू स्पष्ट होते. शासन,प्रशासन,व्यापारी या शत्रूला एक चेहरा होता. इसवी सन 1990 नंतर जागतिकीकरणाच्या पर्वात शेतकऱ्यांच्या शत्रूने बहुविध रूपे धारण केले.धर्म,राजकारण,व्यापार, शासन,प्रशासन,सांस्कृतिक जगत,प्रसारमाध्यमे यातून नानाविध चेहऱ्यांचे शत्रू शेतकऱ्यांसमोर बेसूर रूपात उभे राहिले.

शेतकरी चळवळीला या शत्रूंचा चेहरा नीट ओळखता आला नाही. राजकारणाने पातळीचा निच्चांक गाठला. शेतकरी चळवळ त्यांचे प्रश्न,कार्यकर्ते कसे वापरायचे याचे एक नवेच नीतिशास्त्र विकसित झाले.जाती,धर्म,आर्थिक प्रलोभणे यातून शेतकरी चळवळीतील कार्यकर्ते फोडले गेले.चळवळीजवळ ठाम राजकीय अजेंडा नसल्यामुळे चळवळीला उतरती कळा लागली. ही सगळी शोकांतिका कलात्मक पद्धतीने तसनस कादंबरीतून उभे राहते.शेतकरी चळवळीबद्दलचे लोकमानस मांडताना कादंबरीत एक विधान येते. ते म्हणजे " हे शेतकरी संघर्ष समितीचे कार्यकर्ते शेतीमालासाठी भांडायपुरते बरेहेत. कुठं आडल्यानडल्याला धावून येतात. पण बदामरावची सत्ता उलथायची आसंन तर नारायणशिवाय हे काम होणारच नाही."ही मीमांसा कादंबरीला अभिजातपण प्रदान करते. लोकमानस बदलले.चळवळीबद्दलचा लोकांचा दृष्टिकोन ठाम बनत गेला.चळवळीच्या हातातून यश सुटत गेले. चळवळीला राजकारणात यश आले नाही. निवडणुकांमध्ये शेतकरी चळवळीला यश मिळवता आले नाही. धूर्त राजकीय पक्षांनी चळवळीला सोयीने वापरले. चळवळीची क्षमता क्षीण होत गेली.हजारो लोकांच्या जगण्याशी निगडित असणाऱ्या चळवळीला अपयश आले. यातून नवीन गुंतागुंत उभी राहिली. या गुंतागुंतीला तसनस सोडवण्याचा प्रयत्न करते.

तसनस कादंबरीचे स्वरूप आणि विशेष :-

तसनस ही कादंबरी एका अल्पभूधारक शेतकऱ्याची कथा आहे. नामा उर्फ नारायण माधव चिलवंत या शेतकरी चळवळीतील कार्यकर्त्याची ही गोष्ट आहे. नामा म्हणजे संपूर्ण जीवन शेतकरी चळवळीला वाहिलेला माणूस होय.चळवळ म्हटलं की ती एकट्याची असत नाही. हजारो लोकांचा श्वास एकाच लईत सुरू राहतो. त्याला पण चळवळ म्हणतो. ही कादंबरी व्यक्तिगत नायकाच्या जीवनापेक्षा काळाच्या कसोटीवर घडलेल्या हजारो कार्यकर्त्यांच्या मनाची तडफड व्यक्त करणारी आहे.कादंबरीची सुरुवात भास्कर लुंगारे या पात्रापासून होते. भास्कर लुंगारे सुरज मोरेच्या घरी जातो. घरात सुरजची म्हातारी आई राहते.भास्करला आठवते शेतकरी आंदोलन - शेतकरी संघर्ष समितीच्या पिकांच्या दरवाढीचे आंदोलन सुरू आहे. शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. रस्ता अडवला गेला आहे. शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तरुण ,वृद्ध यांच्या मनात शेतीमालाच्या दरवाढीचे युद्ध पेटवले आहे. एक स्वप्न उरात घेऊन माणसं रस्त्यावर उतरली आहेत. या जनसमुहापुढे प्रशासन काही वेळे हातबल होते. मग पोलीस प्रशासन गोळीबार करते. या गोळीबारात तरुण  सुरज मोरे बळी पडतो. 30-40 वर्षानंतर भास्कर हा सुरजच्या घरी आलेला आहे. आणि तो आत्मशोध घेतो.आपण काय कमावलं ? आणि काय गमावलं ? यातून या कादंबरीचे कथानक उभे राहते.नामा आत्मशोध घेतो -आमची तरणीबांड पोरं तुम्ही बंदुकीच्या गोळीने टिपली,काय गुन्हा होता त्यांचा?सुरज मोरे एकटा थोडाचयं ?काहींच्या अंगावर आजही जखमांचे वण आहेत.काहींचे पाय जायबंदी झाले.दोन्ही हातांना कुबड्या लावून चालताना खडखड आवाज करीत एखादा भेटायला येतो तेव्हां वाटतं काय मिळालयं माणसांना? या उद्वेगातून आत्मशोधाची सुरुवात होते. शेतकरी चळवळीचे मूल्यमापन सुरू होते. आपण गेल्या 30 ते 40 वर्षात काय कमावलं आणि काय गमावलं ? याचा लेखाजोखा तथस्थपणे तसनस मधून मांडला जातो.ही एक चळवळीच्या उभारणीची व लयाची कथा आहे. शेतकरी संघटना मोडकळीला का आली ? या प्रश्नाचा शोध म्हणजे तसनस ही कादंबरी होय. नायक कुठेही भावूक न होता तटस्थ ,वस्तुनिष्ठपणे चळवळीचे,चळवळीतील कार्यकर्त्यांचे,नेतृत्वाचे व स्वतःचे मूल्यमापन करतो.हे मूल्यमापन करताना लेखकाला अनेक कच्चे दुवे सापडतात. काही क्षमतांच्या बाजूही हाती लागतात.शेवटी मानवी वृत्ती प्रवृत्तींचा शोध घेऊन ही कादंबरी संपते.माणसं अशीच का वागत असतील ?याचे उत्तर नामाला स्वतःच्या पातळीवर मिळते.काही प्रश्न,प्रवृत्ती उलगडता येत नाहीत. त्याबद्दलचे काही प्रश्न मागे ठेवून कादंबरी वाचकाला विचारप्रवृत्त बनवते. हे या कादंबरीचे यश म्हटले पाहिजे. ज्यांची इतिहासात कुठेही नोंद सापडत नाही.अशा हजारो शेतकऱ्यांच्या संघर्षाची गाथा तसनस मधून अभिव्यक्त होते.शशांक धानोरकर शेतकरी चळवळीत काम केलेल्या निवडक लोकांच्या आठवणींचे एक पुस्तक काढतो.सखाराम धानोरकर शशांक धारूरकरचा काका आहे.शेतकऱ्यांना चढया भावात कृषी उत्पादने विकणारा सखाराम शोषक आहे.परंतु तो या शेतकरी चळवळीवर आधारित असलेल्या पुस्तकाला प्रस्तावना लिहितो.नामा,राम यांनी शेतकरी चळवळीसाठी खरा लढा दिला.परंतु या पुस्तकात साधा नामाचा व रामचा नामउल्लेख ही येत नाही. शोषण करणाऱ्यांच्या नावे इतिहास लिहिला जातो. या सत्त्यावर ही कादंबरी प्रकाश  टाकते. लेखक इतिहासाविषयीचे सत्य फार प्रभावीपणे मांडतो. "एक इतिहास असतो पुस्तकाच्या पानात दडलेला. दुसरा इतिहास सांगितला जातो अगणित जीभांमधून पिढ्यानपिढ्या .... पण अशा इतिहासातले कैक श्वास विरतात हवेतच. तर कधी मिसळले जाते त्यात सांगणाऱ्याची नियत.तुम्ही इतिहास घडवता;पण लिहीत नाही. हळूहळू मग तुमची जागाघेतात तुमची जीभ लावून बोलणारे सगळे अन् मग अगणित जीभांमधून सांगितला जाणारा इतिहासही होऊ लागतो त्यांच्या मालकीचा. "

लेखकाने इतिहास लेखनातील सत्य अतिशय मार्मिकपणे वस्तुनिष्ठपणे व्यक्त केले आहे. अशी शाश्वत विधाने कादंबरीला उच्च कोटीचे श्रेष्ठत्व बहाल करतात.जगण्याच्या लढाईतून,आकलनातून ,शहाणपणातून गवसलेली सूत्रे कादंबरीत मांडली जातात. भारतीय परंपरा,तत्त्वज्ञानातील चांगल्या बाजू व उणीवा लेखक अतिशय अचूकपणे टिपतो. कादंबरीचा नायक म्हणतो, " ज्यांना लिहायचा इतिहास ते लिहीतील ,आपण काम करत राहयलं पाहिजे,आणि आपण एकटेच असे कोण टिकोजीराव लागून गेलो ? आपल्यासोबत इतकी सारी माणसं चळवळीत होती.उद्या त्यांच्यातलाच एखादा तरुण लिहीलसुद्धा.कधी कधी वाटतं जे जिंकतात त्यांचा इतिहास होतो. त्यांच्या सत्तेच्या उजेडात लिहिणारी माणसंही असतात. जिंकणाऱ्यांच्या बाजूने बोललं पाहिजे,लिहिलं पाहिजे असं वाटणारीही माणसं या लिहिण्याच्या धंद्यात आहेतच की.आपण तर कायम हरणाऱ्यांसोबत आहोत. निसर्गासोबत हरणाऱ्या ,व्यवस्थेसोबत हरणाऱ्या, सरकारसोबत हरणाऱ्या माणसांसाठी आपण भांडतो.आपला इतिहास कोण लिहिणार ? राबणाऱ्या, रस्त्यावर उतरणाऱ्या, उपाशीतापाशी असतानाही अवसान गोळा करून मूठ आवळणाऱ्या माणसांना पुस्तकांच्या पानात थोडीच जागा मिळते ?

तसनस ही कादंबरी अशा इतिहासात नोंद नसणाऱ्या माणसांची कथा आहे. ज्यांनी आपल्या घामाने रक्तानं खरा इतिहास घडवला अशा गुमनाम लोकांना सुवर्ण अक्षरांनी सजवणारा ऐवज म्हणजे तसनस ही कादंबरी होय. सगळीकडून पराभूत झालेल्या माणसांचा इतिहास तसनस मधून येतो. प्रस्थापित व्यवस्था,जाती नेहमी कार्यापेक्षा डॉक्युमेंटेशनला महत्त्व देतात.कार्य छोटे असले तरी त्याची लिखित नोंद ठेवणे गरजेचे मानतात. बहुजन समाज डॉक्युमेंटेशनला महत्त्व देत नाही.आळस केला जातो.किंबहुना नोंद करणारी माणसं बहुजनांकडे असत नाही.या गुमनाम लोकांना अक्षररूपात नोंदवण्याचं काम तसनस ही कादंबरी करते.

तसनस या कादंबरीतून ग्रामीण माणसांच्या अस्थेविषयी ,श्रद्धेविषयी मांडणी होते. ग्रामीण भागात आजही देव,धर्म,श्रद्धा,भजन,कीर्तन यांना मानणारा मोठा वर्ग आहे. किंबहुना नियतिशरण जगण्याचे सूत्र या वातावरणातून लोकांना सापडते.आजच्या काळात तर देव ,धर्म,उत्सव,श्रद्धा यांचा बाजार मांडला गेला आहे. राजकारणी लोकांनी देव,धर्म,श्रद्धा ,उत्सव हॅजेक केले आहेत. कादंबरीत आमदार बदामराव निवडणूक जिंकण्यासाठी या सर्वांचा खुबीने वापर करतो. सखाराम धानोरकर,भागचंद पोखरदास ही मंडळी अध्यात्म तेजीत राहण्यासाठी प्रयत्न करतात.या कादंबरीतील त्रिवेणीबाई नंद आणि शेतकरी चळवळीचे संस्थापक भाऊसाहेब महाजन यांचा जीवन प्रवास विरोध दिशेने सुरू होतो. त्रिवेणीबाईंचा जन्म खेड्यात होतो. वडिलांचे धार्मिक ,अध्यात्मिक संस्कारांमुळे त्रिवेणीबाई परमेश्वर भक्तीकडे आकर्षित होतात.भजन,प्रवचन ,कीर्तन या माध्यमांची निवड करतात. परंतु एक दिवस एका गावात प्रवचनाला गेले असता त्यांना गरिबीची ,दारिद्र्याची नव्याने ओळख होते. गरीबीमुळे शेतकरी घरातील मुलाबाळांना दूध प्यायला देत नाहीत. या प्रसंगा नंतर त्यांना प्रचिती झाली. तेच शब्द पुन्हा पुन्हा डोक्यात घुमू लागले. त्या सरशी एक पोकळी निर्माण झाली. आणि मंदिरात सांगितलेलं सगळं जणू तवंग आल्यासारखं वरच्या वर तरंगू  लागलं. ज्याला कशाचाच आधार नाही... आपण मोक्षाच्या गोष्टी करतोय. हे तर सगळं पोट भरल्यानंतर आहे. या आत्मज्ञान नंतर त्रिवेणीबाई शेतकरी चळवळीत उतरतात. रस्त्यावरची लढाई लढतात.याउलट भाऊसाहेब महाजन यांचे होते. शेतीचा अर्थशास्त्र ऐन तरुणपणात भाऊसाहेबांनी मांडले. अध्यात्म ही गोष्ट भाऊसाहेबांसाठी फिजूल होती.ते अध्यात्म बद्दल शेतकऱ्यांना सांगतात ," हे सारं तुम्हाला जाळ्यात अडकवण्यासाठी आहे. तुमच्या प्रश्नांपासून तुम्हाला दूर नेणारं आहे. दारिद्र्याचा प्रश्न सुटला म्हणजे तुम्हाला माणसासारखं जगता येईल. देवाधर्माचे कोंडवाडे हे माणसाला बधिर करण्यासाठी आहेत. असे स्पष्ट मत मांडणारे भाऊसाहेब विरक्त होतात.अध्यात्मात शांती शोधू लागतात.शेतकरी चळवळीतून निवृत्ती घेतात.या सगळ्या मागील तर्क नामाला सोडवता येत नाही. मानवी प्रवृत्ती का बदलत असतील? असा प्रश्न नामाला व वाचकालाही पडतो. अशा प्रकारे ग्रामीण जीवनाच्या मुळापर्यंत जाण्याचा लेखकाचा शोध हा नाविन्यपूर्ण असा आहे.

कॉम्रेड रुस्तम सत्त्वधर हे तसनस मधील महत्त्वपूर्ण असे पात्र आहे. शेतमजूर ,दलित ,शोषित ,असंघटित कामगारांचे लढे लढणारे डाव्या चळवळीतील संवेदनशील सक्रिय पात्र आहे. नारायण धुळे या दलिताचे शेत जमिनीच्या वादातून डोळे काढले जातात.रुस्तम नारायणची साथ देतात. रुस्तमचे विचार अतिशय परिपक्व आहेत. शेतकरी चळवळीच्या मर्यादा सांगताना रुस्तम म्हणतो, "शेतकरी तितका एक ! हे विधान मला मान्य नाही. हे विधान बरोबर नाही. आणि खरंही नाही. सारे शेतकरी सारखेच आहेत असं नाही. त्यात अनेक भेद आहेत. कोरडवाहू शेतीच्या चार दोन एकरात राबणारा फाटका शेतकरी वेगळा आहे. तीन दिवस स्वतःच्या जमिनीत राबून आणखी तीन-चार दिवस दुसरीकडे शेतमजुरी करणारा शेतकरी वेगळा आहे. तुम्ही साऱ्या शेतकऱ्यांचं एकाचं पारड्यात वजन करताय हे बरोबर नाही. "हे वरील रुस्तमचे विचार शेतकरी चळवळीच्या अपयशाचे मर्म सांगतात. शेतकरी चळवळ महाराष्ट्रातील विविध प्रांतात उभी राहिली. प्रदेशानुसार शेतकऱ्यांचे प्रश्न भिन्न आहेत. राज्य, देश पातळीवर संपूर्ण ऐक्य शेतकरी चळवळीत घडू शकले नाही.

डाव्या विचारांच्या ज्या चळवळी आहेत. यांच्याशी शेतकरी चळवळीचे नाते घट्ट झाले नाही. शत्रू एकच असूनही कष्टकऱ्यांच्या चळवळी एकत्र आल्या नाहीत. या वास्तवावर तसनस कादंबरी अचूक बोट ठेवते. संपूर्ण चळवळीची ही चिकित्सा कलात्मकपणे सोप्या पद्धतीने तसनस मधून मांडली गेली आहे. रुस्तमच्या चळवळीतील प्रश्नांबाबत शेतकरी चळवळ अंग चोरून उभी राहते. हे वास्तव कादंबरीतून अचूकपणे येते. तसनस ही कादंबरी मानवी वृत्ती- प्रवृत्तींचे वर्णन करते.नामा,राम,रुस्तम,त्रिवेणीबाई,क्षीरसागर वकील,लक्ष्मण निरस, अनंतराव,भास्करराव लुंगारे,सुरज मोरे,सुभान गरड ही पात्र सदवृत्तीचे आहेत.आमदार बदामराव अस्वले,पिंटू शिंदे,आमदार बजरंग देसाई ,आमदार नारायण सावंत,सखाराम धानोरकर,शशांक धानोरकर ,भागचंद पोखरदास,कांचन थोरात,वल्लभ जयस्वाल,मेहबूब पैलवान ही खलवृत्तीची पात्र आहेत.ही कादंबरी केवळ या मर्यादित पात्रांवर अवलंबून राहत नाही.तसनस मानवी आदिम वृत्ती प्रवृत्तींचा शोध घेते. म्हणून ही कलाकृती विशेष ठरते.

शेतकरी चळवळीचा ऐतिहासिक दस्तऐवज म्हणून तसनस महत्त्वाची कादंबरी आहे.उपरोध,उपहासात्मक,परभणीच्या भाषेतून ही कादंबरी साकारा होते.तरी संघटनेच्या कार्याचे ,रचनेचे ,कार्यकर्त्यांचे सूक्ष्म आकलन ही कादंबरी मांडते.ग्रामीण जीवनातील कथात्मकता वर्णनामध्ये येते.काही गोष्टी पटवून सांगण्यासाठी कादंबरीत छोट्या छोट्या कथा,किस्से,गोष्टी सांगितल्या जातात. त्या फार रंजक असल्यामुळे कादंबरीच्या कथानकामध्ये रंगत निर्माण होते.भूतकाळ आणि वर्तमानाचे प्रज्ञाचक्षु भान कादंबरीतून अभिव्यक्त होते.गाव खेड्यातील नदी,डोंगर,घाट,रस्ते यांचे वर्णन सूक्ष्मपणे येते.विशेषतः नामाचे एकांतातील स्वागतपर विचार वाचकाला अंतर्मुख करतात. कादंबरीचा शेवट निर्णायक न करता मानवी प्रवृत्तीच्या सम्यक आकलनातून शेवट होतो. तो वाचकाला विशेष भावणार आहे.

तसनस कादंबरीची भाषाशैली :-

तसनस ही कादंबरी मराठवाड्यातील बोली भाषेतून आकाराला येते. विशेषतः परभणी जिल्ह्यातील बोलीचे उपयोजन तसनससाठी केले आहे. बोली भाषेतील असंख्य म्हणी,वाक्प्रचार यांचा वापर कादंबरीत केला आहे. विशेषतः संवादात्मकता हे या कादंबरीचे वैशिष्ट्ये सांगता येईल. नामा-राम ,नामा-त्रिवेणीबाई ,त्रिवेणीबाई-अनंतराव,राम-कार्यकर्ते या वेगवेगळ्या पात्रांमध्ये अत्यंत चांगला संवाद घडतो. विशेषतः राम काही वेळा विचार पटवून देण्यासाठी छोट्या छोट्या कथांचा उपयोग करतो. परभणीकडे लोक संवादामध्ये आपले म्हणणे पटवून देण्यासाठी कथांचा उपयोग करतात. या कथांना तर्काची जोड असते. तर्क मांडणीतील भाषा अस्सल ग्रामीण पद्धतीचे असते. ती कादंबरीत रंगत निर्माण करते. छोटी छोटी वाक्य कादंबरीत वापरली जातात. वाचकाला छोट्या वाक्यातून मोठा आशय सापडतो. कादंबरीत अनेक ठिकाणी उपहास,उपरोधात्मक भाषेचा वापर केला गेला आहे. विशेषतः राम आपल्या बाजूने संवाद साधताना उपहास उपरोधाचा अचूक उपयोग करतो.कादंबरीची भाषा शांत,संयत आहे. कधी कधी नकळत तसनसमध्ये आक्रमक भाषा वापरली जाते. उदाहरणार्थ -" हे आभाळ नादी लावणारं अन् डेंगणं दाखवणारं , ही माती पावली तं मावली नाही तं शिंदळभावली अन् ही जिनगानी... वाळूत मुतलं फेस ना पाणी? अशी आक्रमक भाषाशैली कादंबरीत अपवादाने येते. कादंबरीतील आशयातील उद्वेग,राग अभिव्यक्त करण्यासाठी अशी भाषा वापरली जाते.कुठे कुठे तसनसमधील भाषा काव्यात्मक होते. उदाहरणार्थ-

 त्रिवेणीबाई ....

 तू सहजासहजी न उडणारा पळसाच्या फुलांचा रंग

 तळहातात घेतल्यानंतर बोटांना माखावी हळद 

असा पिवळ्या जर्द बाभळीच्या फुलांचा घमघमता वास 

धनगर्द झाडातून थेट डोळ्यांवर आलेली तिरीप

 गोगलगाय निघून गेल्यानंतर मऊ वाळूवर उरलेली ओलसर चमकदार रेघ....

 अशा काही ओळी कवितेचा आनंद देतात. तसनसमध्ये नामा या पात्राचे आलेले स्वागत अतिशय भावस्पर्शी झाले आहे. पात्राच्या मनातील गाळ अचूकपणे कागदावर उभा राहतो. अशा प्रकारे आपल्याला तसनस कादंबरीच्या भाषाशैलीचा विचार करता येतो.

तसनस कादंबरीच्या मर्यादा : -

ही कादंबरी मराठवाड्यातील एका तालुक्यात घडते. केवळ मराठवाड्यापूर्ती ही कादंबरी मर्यादित राहते. विदर्भ,उत्तर महाराष्ट्र,पश्चिम महाराष्ट्र या प्रदेशातील शेतकरी चळवळीचे संदर्भ कमी येतात. शेतकरी चळवळीचे वर्णन कादंबरीत जे येते ते व्यापकपणे येत नाही. मराठवाड्यातील एका खेड्यात हे घडत असल्याची जाणीव होते. शेतकरी चळवळ व्यापक होती. महाराष्ट्र राज्यभर होती. कधी काळी महाराष्ट्र शासनाला धडकी भरवणारी होती. याचे चित्रण कादंबरीत येत नाही. कादंबरीच्या पटावर व्यापक आशयाचा कॅनव्हास उभा राहत नाही. पार्श्वभूमीला हा कॅनवास घेतला गेला असता तर कादंबरी व्यापक झाली असती. कादंबरीत दलित संघर्षाचे चित्रण नारायण धुळे व दलित तरुणाची आत्महत्या या घटनांपुरते त्रोटक स्वरूपात येते. नामांतराच्या चळवळीचा उल्लेख कादंबरीत येत नाही. कादंबरीच्या अवकाशात नामांतर चळवळ व शेतकरी चळवळीच्या संदर्भात वर्णन येत नाही. कादंबरीत स्त्रीपात्रांची संख्या मर्यादित आहे. त्रिवेणीबाई हे एकच कादंबरीतील ठळक स्त्री पात्र आहे. कांचन थोरात हे पात्र विनोद निर्मितीसाठी येते. तसनसमध्ये शेतकरी चळवळीतील स्त्रियांच्या सहभागाचे चित्रण प्रभावीपणे येत नाही.राम,नामा यांच्या घरातील स्त्रिया-पुरुष यांचे चित्रण अल्प प्रमाणात येते. कादंबरीचा नायक नामा याचे व्यक्तिगत जीवन ठळकपणे कादंबरीत येत नाही.त्यामुळे ते पात्र वाचकाच्या मनावर नीटपणे ठसत नाही.जिल्हा,तालुका,गाव यातील विविधता नीटपणे कादंबरीत येत नाही. शेतकरी संघटनेतील नेतृत्व भाऊसाहेब महाजन व प्रदेशाध्यक्ष लक्ष्मण निरस यांच्यातील संघर्ष कादंबरीत अंधुकपणे येतो.सखाराम धानोरकरचे भाऊसाहेब महाजन सोबत नेमके काय संबंध होते ? ते स्पष्ट होत नाही. कादंबरी ही शेतकरी चळवळीच्या ३० ते ४० वर्षांवर बेतलेली आहे. त्या तुलनेत कादंबरीत कार्यकर्त्यांची पात्र ,उपकथनके कमी येतात. केवळ नामा आणि राम या दोन पात्रांभोवतीचं ही कादंबरी फिरत राहते.निवडणुकांचे चित्रण व्यवस्थितपणे येत नाही.नवीन आमदार नारायण सावंत यांच्या मागे जनमत का गेले? याचे विश्लेषण कादंबरीत येत नाही.शिवसेना व शेतकरी चळवळ यांच्यातील सहसंबंध कादंबरीतून उभा राहत नाही. वरील सर्व मर्यादा असूनही तसनस ही महत्त्वाची कादंबरी आहे.हेआपणास मान्य करावे लागते.

समारोप :-

तसनस ही मराठी कादंबरी विश्वातील एक महत्त्वाची कादंबरी आहे. शेतकरी चळवळी सारख्या विषयाला कादंबरीतून मांडणे हे एक आव्हान होते.ते आव्हान आसाराम लोमटे यांनी अतिशय समर्थपणे पेलले आहे. मराठवाड्यातील शेतकरी संघटनेचा इतिहास तसनसमधून अभिव्यक्त होतो. ग्रामीण कादंबऱ्यांमध्ये तसनस ही एक स्वतःची वेगळी दिशा असलेली कादंबरी आहे. आसाराम लोमटे यांना भावी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा !!!

 डॉ.गणपतराव ढेंबरे ,

मराठी विभाग 

श्री.व्ही.एस.नाईक महाविद्यालय रावेर, 

तालुका-रावेर, जिल्हा जळगाव 

पिन 425508,

 मोबईल क्रमांक 942108 12 70 

ई-मेल-dhembregr@gmail.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

वैशिष्ट्यीकृत पोस्ट

भाषा , साहित्य निर्मिती आणि कृत्रिम बुद्धिमत्ता

 भाषा, साहित्य निर्मिती आणि कृत्रिम बुद्धिमत्ता डॉ. गणपतराव ढेंबरे  मराठी विभाग श्री.व्ही.एस. नाईक महाविद्यालय, रावेर,ता.रावेर,जि. जळगाव पिन...