रविवार, २५ फेब्रुवारी, २०२४

राष्ट्रीय भावनेने प्रेरित साहित्य स्वरूप आणि मर्यादा

राष्ट्रीय भावनेने प्रेरित साहित्य स्वरूप आणि मर्यादा

 डॉ. जी आर .ढेंबरे  ,रावेर

 प्रस्तावना :

राष्ट्रप्रेम आणि राष्ट्रद्रोही या संकल्पना अगदी निसरड्या झाल्या I आहेत .कोणती कृती राष्ट्रद्रोही ठरवली जाईल याचा काही अंदाज बांधता येत नाही. जगभर राष्ट्र प्रेमाचे भरते आले आहे .सत्तांध  लोकांनी राष्ट्रप्रेमाची नवी व्याख्या तयार केली आहे. धर्मांध मनोवृत्तीच्या नेतृत्वाला ,धोरणाला विरोध केल्यास तुम्ही राष्ट्रद्रोही ठरू शकतात. किंबहुना आसपास राष्ट्रप्रेमाचा दबाव प्रचंड आहे. बेगडी राष्ट्रप्रेम असणाऱ्या झुंडी तुम्हाला राष्ट्रद्रोही ठरवू शकतात. त्यामुळे 'सामील व्हा ' या मनोवृत्तीचा जोर मोठा आहे. सगळ्या क्षेत्रात या वृत्तीने दबदबा निर्माण केला आहे. संस्कृती ,धर्म ,कला, अर्थव्यवस्था ,साहित्य क्षेत्रात या प्रवृत्तीचे विकसन मोठ्या प्रमाणात होत आहे .याला विरोध करणारे जगभर विविध देशात नजरकैदेत ,तुरुंगात, संशयी वातावरणात घुसमटून जगत आहेत .राष्ट्रद्रोही शिक्का बसू नये म्हणून लोक कातडीबचाव धोरण घेत आहेत. या दोन्ही वृत्तीच्या शोषक व शोषित वर्गाला  अस्सल  राष्ट्र भावनेची ओळख होणे अत्यंत गरजेचे  आहे.

  काव्यांकुर मधील  राष्ट्र भावनेची कविता या दृष्टीने महत्त्वाची आहे .भारताच्या इतिहासाचे आकलन करत असताना काही ठळक बाबी आपल्या लक्षात येतात .भारतीय स्वातंत्र्यलढ्यात वेगवेगळ्या घटकांनी अतुलनीय योगदान दिले आहे .यात सर्वसामान्य जनता, प्रतिभावान कलाकार, शाहीर ,पत्रकार, लेखक यांचे योगदान आपल्याला लक्षात घ्यावे लागते .लेखक कवींनी आपल्या लेखनातून जाज्वल्य राष्ट्रप्रेमाचे स्फुल्लिंग पेटवले होते.केशवसुत, कवी विनायक, वि. दा. सावरकर ,कुसुमाग्रज, वसंत बापट ,कवी गोविंद, सेनापती बापट ,दुर्गाप्रसाद आसाराम तिवारी, ग दि माडगूळकर ,साने गुरुजी, शांता शेळके ,राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या कवितेतून राष्ट भावना प्रेरणा प्रकट होते. किंबहुना या कवींच्या वेगवेगळ्या कवितांना राष्ट्र प्रेमाच्या गीताचे  स्वरूप प्राप्त झालेले दिसते. स्वातंत्र्यलढ्यातील नेतृत्वाला, सर्वसामान्य माणसाला या कवितांमधून लढण्याचे बळ मिळाले .यातील अनेक कविता समाजाच्या मुखातील क्रांतिकारी मंत्र म्हणून प्रकट झाल्या .सर्व सामान्यांच्या तोंडातून सहजपणे या कविता बाहेर पडत .यातील कित्येक कविता त्या काळातील पिढीला मुखोद्गत होत्या .या सर्व व्यवस्थेमधून आपल्याला राष्ट्रभावनेच्या कवितेचे महत्त्व लक्षात येते. 


   राष्ट्र भावनेची कविता स्वरूप आणि प्रेरणा

स्वातंत्र्याची जाणीव, राष्ट्रविषयक भक्ती आणि राष्ट्रासाठी वीरांनी केलेले अपूर्व बलिदान हा चिरंतन प्रेरणा देणारा विषय असल्याने राष्ट्र भावनेची कविता कालबाह्य होत नसते . राष्ट्रप्रेम आणि उत्तम वाङ्मयीन रचनातत्त्व  यांच्यातून राष्ट्र भावनेची कविता आकार घेते. भारतीय स्वातंत्र्यलढा सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचविण्याचे एक साधन म्हणून राष्ट्रभावना ची कविता आकाराला आली. लोकजागृतीचे माध्यम म्हणून राष्ट्रभावनेच्या कवितेकडे पाहता येते .1885 ते 1947 या कालखंडात उत्कट राष्ट्र प्रेमाची कविता मोठ्या प्रमाणात निर्माण झाली. क्रांतिकारकांना सर्वसामान्य ,माणसांना स्फूर्ती देण्याचे सामर्थ्य या कवितेत होते . राष्ट्रासाठी त्याग, सर्मपणाची वृत्ती या कवितेतून व्यक्त होते . राष्ट्रविषयक भावनांची उत्कट अभिव्यक्ती या कवितेतून घडलेले दिसते .राष्ट्रीय भावना जागृत करण्यासाठी वाङ्मयाचे नेहमीच साधन म्हणून उपयोजन केलेले   दिसते .भारतीय स्वातंत्र्यलढ्यात राष्ट्र भावनेची कविता अत्यंत महत्त्वपूर्ण ठरते. भारतीय स्वातंत्र्यसंग्रामात लोकमत घडविण्याचे एक हत्यार म्हणून या कवितेचा वापर झाला .या संषर्घकालातील कविता वीररस प्रधान अशी होती .या कवितेतून अत्यंत ओजस्वी तेजस्वी आव्हान जनसमुदायाला केले गेले . मराठीमध्ये शाहिरी काव्य ची मोठी परंपरा आहे .विशेष पोवाड्यामधून वीररस प्रधान अशी रचना केलेली दिसून येते. राष्ट्रभावनेच्या कवितेला पोवाडा वाङ्मयाची प्रेरणा होती असे म्हणता येईल . राष्ट्रभावनेच्या कवितेतून त्याग ,समर्पण, बलिदान यांचे महत्त्व सांगितले जाते .स्वातंत्र्यासाठी मुल्यांसाठी मरण स्वीकारण्याची वृत्ती या कवितेतून व्यक्त होते. राष्ट्र उभारणीमध्ये या वाङ्मयाचे, कलाकृतीचे एक अपूर्व स्थान असते .म्हणून राष्ट्र भावनेची कविता श्रेष्ठ असते. अशा प्रकारे आपणाला राष्ट्रभावनेच्या कवितेचे स्वरूप सांगता येते.


 काव्यांकुर मधील राष्ट्र भावनेची कविता स्वरूप आणि वैशिष्‍ट्ये


 भारतीय स्वातंत्र्यलढा संपून गेला .आता कुणाच्या विरोधात लढ्याचे ?असा प्रश्न पडू शकतो. राष्ट्र भावनेची कविता आता कालबाह्य झाली आहे. असेही मत मांडले जाऊ शकते. या पार्श्वभूमीवर राष्ट्रभावनेच्या कवितेचे अध्ययन-अध्यापनाची गरज काय ?असा प्रश्न निर्माण होऊ शकतो .स्वातंत्र्य मिळाले राष्ट्रा पुढील सर्व प्रश्न संपले   आहेत .असे मुळीच म्हणता येत नाही .किंबहुना गेल्या सत्तर वर्षात राष्ट्र विघटनाचे पुष्कळ प्रयत्न झाले .फुटिरतावादाने नवे रूप धारण केले आहे. परकीय शत्रूपेक्षा अंतर्गत शत्रूंनी राष्ट्र  पोखरून टाकले आहे. याला कारण भारत या राष्ट्राची विविधता आहे . राष्ट्राची व्याख्या करताना स्टॅलिन म्हणतो - 'एका समान भूप्रदेशात समान भाषा बोलणारे ,समान इतिहास असणारे ,समान संस्कृती असणारे समान मानसिकता व समान आर्थिक हितसंबंध असणारे त्या भूप्रदेशातील लोकसमूह म्हणजे राष्ट्र ' स्टॅलिनची वरील व्याख्या भारताला लागू करता येत नाही. किंबहुना वरील व्याख्या भारताला लागू करता येत नाही . वरील व्याख्याच्या अगदी उलट बाजू भारतात आहे .भारत हा असमान भूप्रदेश असणारा, विविध भाषा बोलणारा, असमान इतिहास असणारा ,विविधतापूर्ण संस्कृती असणारा ,असमान मानसिकता व असमान आर्थिक हितसंबंध असणारे खंडप्राय भूप्रदेशातील लोकसमूह असणारे राष्ट्र म्हणजे भारत होय .भारताच्या वरील व्याख्येत अनेक प्रश्नांचे उत्तर दडलेले आहेत. विविधतेत एकता हे भारताचे रूप आहे. समता ,बंधुता , न्याय , स्वातंत्र्य, मानवता या मूल्यांची जपणूक करून राष्ट्रउभारणी ही काळाची गरज आहे .भारत हे राष्ट्र म्हणून कसे असावे याचे आदर्श चित्र काव्यांकुर मधील राष्ट्रभावनेच्या तीन कवितेतून मांडले आहे.


 'बलसागर भारत होवो ' ही कविता म्हणजे कवीचे आदर्श स्वप्न आहे . आदर्श, सशक्त, बलवान राष्ट्र म्हणून भारत आकाराला यावे असे कवीचे स्वप्न आहे .जनसेवेसाठी कटिबद्ध राहण्याचे आव्हान कवी करतो .स्वार्थ सोडून राष्ट्रासाठी प्राण देण्याची तयारी ठेवली पाहिजे असे कवीला वाटते .त्याग आणि समर्पणातून देशाला वैभव प्राप्त करून देण्याचा निश्चय कवी करतो. अंधारामध्ये, अज्ञानामध्ये खितपत पडलेल्या देशबांधवांसाठी कार्य करण्यास सज्ज होण्याची भाषा कवी करतो .सर्वांना समान पातळीवर आणण्याची घोषणा कवीने या कवितेतून केली आहे. सर्वांना सोबत घेऊन शाश्वत विकासासाठी वाटचाल करणे महत्त्वाचे आहे .असे मत या कवितेतून मांडले आहे .राष्ट्र कार्य करत असताना प्रयत्नांची शर्थ करावी लागते .या कसोटीच्या क्षणांमधून दिव्य पुरुषार्थ घडेल असे कवीला वाटते .भारत मातेचे वैभव दिव्य शोभेल असा कवीचा विश्वास आहे . ही शक्ती ,ताकद, सामर्थ्य कशासाठी ?तर जगाला शांती देण्यासाठी आहे .एक राष्ट्र म्हणून आम्ही कार्य करू अशी प्रतिज्ञा कवी म्हणतो. प्रस्तुत कवितेतून कवीने राष्ट्राच्या उभारणीचे नवे स्वप्न पाहिले आहे .राष्ट्राच्या जडणघडणीमध्ये काय काय अडचणी येऊ शकतात याची तीव्र जाणीव कवीला आहे .या सर्वांवर मात करण्यासाठीचा मंत्र म्हणून ही कविता श्रेष्ठ ठरते. प्रस्तुत कविता गीताचा रचनाबंध घेऊन आकाराला येते. ही कविता गेय स्वरूपाचे आहे. या कवितेला उत्तम उत्तम चाली लावल्या गेल्या आहेत .प्रस्तुत रचना ही संगीतबद्ध केली गेली आहे .किंबहुना संगीत अनुकूलता हे या कवितेचे वैशिष्ट्य सांगता येईल .सरळ साधी सोपी भाषा या कवितेचे वैशिष्ट्य म्हणून सांगता येईल. कवितेतील लय मनाचा ठाव घेणारी आहे .चढत्या क्रमाने कवितेतील  गतिमानता आकार घेते. वीररसप्रधान अशी ही रचना आहे . 'बलसागर भारत होवो ' ही लोकप्रिय, सर्वश्रुत रचना आहे .वेगवेगळ्या पिढीतील लोकांना ही रचना प्रिय आहे .ही रचना अत्यंत लोकप्रिय आहे . ही कविता स्फूर्तीदायी स्वरूपाचे  अशी आहे. यमक रचनाअत्यंत सहज अशी आहे . उपमा अलंकाराचे उचित उपयोजन या कवितेतून दिसते .या कवितेचे पहिले कडवे तीन ओळींचे आहे .बाकी सर्व कडवी दोन ओळींची आहेत .एकूण सहा कडव्यांमधून ही कविता आकाराला येते.


काव्यांकुर मधील

' या भारतात ' ही राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची राष्ट्र भावनेची कविता आहे .भारत हे एक राष्ट्र म्हणून कसे असावे? याबद्दलचा आशावाद या कवितेतून अभिव्यक्त होतो. भारतीय समाज व्यवस्थेचे उत्तम आकलन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना होते. या आकलनातून व राष्ट्र प्रेमातून या कवितेची निर्मिती झाली आहे . समता ,स्वातंत्र्य,बंधुता ,न्याय या मूल्यांची मागणी प्रस्तुत कवितेतून करण्यात आली आहे .भारतात विविधतेतुन एकता नांदण्याचे स्वप्न  कवी पाहतो .या राष्ट्रउभारणीत येणाऱ्या अडथळ्यांचे कवीला भान आहे .पंथ, संप्रदाय श्रीमंती, गरीबी ,विविध धर्म यांच्यात बंधुभाव असावा असे कवीला वाटते .मानवता हीच राष्ट्र भावना असावी .सर्वांनी मिळून मानवतेचे गीत गावे. तरुण राष्ट्राचा कणा असतो. हा तरुण शीलवान असावा अशी कवीची धारणा आहे .समाजातून जातीयता नष्ट व्हावी अशी कवीची अपेक्षा आहे .वेगवेगळ्या प्रकारची अस्पृश्यता समूळ नष्ट व्हावी असा कवीचाआशावाद आहे. सत्य आणि न्याय या मूल्यांची उभारणी राष्ट्रासाठी आवश्यक आहे .किंबहुना सत्य आणि न्याय या मूल्यांवर राष्ट उभे असते म्हणून कवी सत्य आणि न्यायाची मागणी करतो. घराघरात स्वर्गभाव  निर्माण होवो ,विपत्ती ,भीती नष्ट होऊ दे असा विश्वास कवी कवितेतून व्यक्त करतो .जगाच्या सेवेत आपला देह पडावा असे स्वप्न कवीला पडते .वरील रचनाही गीतात्मक स्वरूपाची आहे .ही कविता चार कडव्यांचे आहे. पहिले कडवे सहा ओळींचे आहे. उरलेले तीन कडवे प्रत्येकी चार ओळींचे आहेत . गेयता हे या कवितेचे प्रधान वैशिष्ट्य आहे .या कवितेला उत्तम चालवता येते .ही कविता उत्तम चालीत संगीतबद्ध केलेली आहे. यमकप्रधानता हे या कवितेचे रचना वैशिष्ट्य म्हणून सांगता येईल .वर मागणे आणि स्वर्ग या प्रक्कथांचे  उपयोजन कवीने आपल्या कवितेत केले आहे .सरळ साधी सोपी अशी ही रचना आहे. सर्वसामान्य माणसाला समजेल आवडेल अशी कवितेची भाषा आहे .प्रतिमा प्रतीके यांच्या उपयोजनापेक्षा साधेपणाने काव्यानुभव कवीने कवितेत मांडला आहे .लयबद्धता हा या कवितेचा विशेष म्हणून सांगता येईल .अंतर्गत व बाह्य लय , दोन्हींचा प्रत्यय या कवितेत येतो .


'शूर आम्ही सरदार , ही कवयित्री शांता शेळके यांची कविता आहे . वीर रस प्रधान अशी ही रचना आहे .या कवितेची भाषा अत्यंत ओजस्वी तेजस्वी स्वरूपाची आहे .देशासाठी सर्वस्व अर्पण करण्याची  भाषा या कवितेतून मांडली गेली आहे. शूर सरदराला मरणाची भीती किती असणार आहे ?मरण हाच त्याचा धर्म आहे .देशासाठी देवासाठी धर्मासाठी प्राण हातात घेतले आहे .कधीही आपला प्राण देण्यासाठी सज्ज झालेल्या सैनिकाचे हे आत्मवृत्त आहे .आम्हाला कुणीही संघर्ष काय आहे ?हे शिकवू नये. आईच्या गर्भातूनच अभिमन्यूसारखी संघर्षाची करण्याची रीत आम्ही शिकलेलो आहोत . या कवितेतील सैनिकाचे आपल्या तलवारीवर प्रेम आहे .त्याचे सर्वस्व ती तलवार आहे .संघर्ष करणे हिच्या सैनिकाची परिभाषा आहे .लाख संकट झेलण्यास पहाडी छातीचा हा सैनिक तयार आहे .मरणाचाही सोहळा होईल असे वीर मरण हा सरदार मागतो आहे .देशापुढे माया ,ममता , नाती सारेशुल्लक आहेत .  ही कविता म्हणत  असताना अंगात वीरश्री संचारते. या कवितेची रचना ही आकलनास साधी सोपी अशी आहे .तीन कडवे असणारी कविता आहे. पहिल्या कडव्यात दोनच ओळी आहेत. उरलेल्या दोन कडव्यात प्रत्येकी तीन ओळी आहेत .गीतात्मक रचना असल्यामुळे यमक प्रधान अशी या कवितेची बांधणी आहे. या कवितेला चाल लावता येते .या कवितेला संगीतबद्ध अशी चाल लावली गेली आहे .ही कविता म्हणजे लोकमानसात अजरामर झालेली गीतात्मक रचना आहे. येडी प्रीत ,पहाडी छाती या प्रतिमांमधून काव्यानुभवाची इंद्रिय संवेदना प्रत्ययाला येते. वरील कविता गीत स्वरूपाची आहे .लयबद्धता हा या कवितेचा ठळक विशेष आहे .ही कविता म्हणजे लोकप्रिय ,सर्वश्रुत असे गीत आहे .



राष्ट्रीय भावनेने प्रेरित साहित्याच्या मर्यादा :-

15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. एक प्रदीर्घ काळ सुरू असलेला लढा संपला. नवराष्ट्र निर्मितीचे गुलाबी स्वप्न भारतीय जनतेच्या मनात जन्म घेत होते. इंग्रजांची सत्ता संपुष्टात आली. भारतीय लोक सत्तेत आले. सर्वसामान्य माणसाच्या जीवनात फारसा फरक पडला नाही. भ्रमनिरास झालेला समाज दुःखात,कष्टात जीवन जगत होता. मराठी साहित्यात रंगनाथ पठारे यांनी 'ताम्रपट' या कादंबरीतून हे दुःख,व्यथा,अवहेलना अतिशय तरलपणे मांडली आहे. 'उषःकाल होता होता काळरात्र झाली 'या कवितेतूनही हे चित्र सशक्तपणे येते. मराठी साहित्यात स्वतंत्र्योत्तर कालखंडात राष्ट्रभावनेने प्रेरित साहित्य निर्मिती अल्प प्रमाणात दिसते. केवळ 15 ऑगस्ट ,26 जानेवारीला भारतीय लोकांच्या मनात जाज्वल्य राष्ट्रप्रेम जन्माला येते. परंतु हे दिन संपल्यानंतर राष्ट्र प्रेमाला आहोटी लागते. मराठी साहित्यात राष्टीय भावनेने प्रेरित साहित्यकृती कमी प्रमाणात का निर्माण होतात? यावर चिंतन करण्याची गरज वाटते. राष्ट्र भावनेने प्रेरित असणाऱ्या साहित्यात वीर रस येतो. वीर रसात उत्साह हा स्थायीभाव असतो. राष्ट्रप्रेम निर्माण करण्यासाठी वीर रस प्रधान कलाकृती महत्त्वाची ठरते. राष्ट्रीय भावनेने प्रेरित कलाकृती चिरकाल उत्साह देऊ शकत नाही. राष्ट्रप्रेम,मातृभूमी निष्ठा यासारख्या उदात्त्य भावना निरंतर प्रेरित करू शकत नाही. एका विशिष्ट काळानंतर रसिकाला,वाचकाला या भावना कृतार्थ करतात. हे साहित्य निरंतर आनंद देऊ शकत नाही. राष्ट्रीय भावनेने प्रेरित साहित्याच्या विषयामध्ये ,आशयात तोच तोपणा येतो. पुनरावृत्तीमुळे हे साहित्य रसिकाच्या अभिरुचीवर परिणाम करते. पुनरावृत्तीमुळे वाचक कंटाळून जाण्याची शक्यता असते. राष्ट्रीय भावना कलाकृतीच्या सतत केंद्रस्थानी ठेवणे अवघड बाब आहे. राष्ट्रीय भावनेच्या अभिव्यक्तीसाठी कथानाकात शृंगार ,विरह ,विनोद या रसभावनांची पेरणी करावी लागते.ही राष्ट्रीय भावनेने प्रेरित साहित्याची मर्यादा सांगता येते. राष्ट्रीय भावनेने प्रेरित साहित्याच्या निर्मिती प्रक्रियेत सहजता असत नाही. जाणीवपूर्वक राष्ट्रप्रेम,राष्ट्रासाठीचा त्याग यासारख्या भावनांची अभिव्यक्ती करावी लागते. यातील प्रयत्नपूर्वक्ता, जाणीवपूर्वक्ता कलाकृतीच्या अभिजातपणाबद्दल शंका उपस्थित करते. राष्ट्रीय भावनेने प्रेरित साहित्याच्या वरील काही मर्यादा सांगता येतील .


डॉ .जी.आर. ढेंबरे

मराठी विभाग प्रमुख

श्री .व्ही.एस. नाईक महाविद्यालय रावेर , जि . जळगाव पिन_425508

मोब-9421081270

ई - मेल -dhembregr@gmail.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

वैशिष्ट्यीकृत पोस्ट

भाषा , साहित्य निर्मिती आणि कृत्रिम बुद्धिमत्ता

 भाषा, साहित्य निर्मिती आणि कृत्रिम बुद्धिमत्ता डॉ. गणपतराव ढेंबरे  मराठी विभाग श्री.व्ही.एस. नाईक महाविद्यालय, रावेर,ता.रावेर,जि. जळगाव पिन...