" शेतकऱ्यांचे प्रश्न आणि महात्मा फुले "
शेतकऱ्यांचे प्रश्न हे न संपणारे आहेत. राजवटी बदलतात. शासनव्यवस्था बदलते, नेतृत्व बदलते; परंतु शेतकऱ्यांचे प्रश्न बदलत नाहीत. भारतीय इतिहासाचा गंभीरपणे मागोवा घेतल्यास आपल्या लक्षात येते की, कितीतरी राजवटी, शासनव्यवस्था बदलल्या; परंतु शेतकऱ्यांचे शोषण झाले नाही, अशी दुर्मिळच राजवट आपल्याला सापडते. भारताला कधी काळी सोन्याचा धूर निघणारा देश म्हटले जायचे. आजही भारत शेतीप्रधान देश आहे. स्वातंत्र्यानंतरच्या गेल्या ७० वर्षांत भारतीय शेतकऱ्यांवर कोणते परिणाम झाले याचा विचार केल्यास शेतकरीहिताच्या कमी व अहिताच्या अधिक गोष्टी घडल्याचे आपल्या लक्षात येते. आता मुक्त अर्थव्यवस्थेत भारतीय शेतकऱ्यांवर काय परिणाम होणार आहेत याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. भारताच्या संपन्नतेने अनेकांना आकर्षित केले होते. या देशातील माती, पर्यावरण, पाणी, सूर्यप्रकाश, भूगर्भातील संपत्तीने मोघल, इंग्रज यांना आकर्षित केले. मुघल व इंग्रजांनी या देशात शतकानुशतके राज्य केले. या संदर्भात विनोबा भावे यांनी फार समर्पक शब्दांत विश्लेषण केले आहे. ते म्हणतात, “मोघल इथं येण्यापूर्वी भारत स्वतंत्र गावांचा स्वतंत्र देश होता. मोघल आल्यानंतर भारत स्वतंत्र गावांचा गुलाम देश झाला. इंग्रज आल्यानंतर भारत गुलाम गावांचा गुलाम देश झाला. इंग्रज गेल्यानंतर भारत गुलाम गावांचा स्वतंत्र देश झाला." या सगळ्या कालखंडात शेतकरी गुलामच होता. आज भारत हा बहुराष्ट्रीय कंपन्यांचा गुलाम देश आहे. या गुलाम देशातील गुलामांचा गुलाम म्हणून शेतकऱ्यांचे स्थान आहे.
या पार्श्वभूमीवर एकोणिसाव्या शतकातील समाजसुधारक महात्मा फुले यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नाबद्दल अचूक विश्लेषण केल्याचे आपल्या लक्षात येते. आतापर्यंतच्या एकूण भारतीय परंपरेत शेतीचा एवढ्या गंभीरपणे कोणी विचारच केला नव्हता. फुले यांच्या समकालीन सुधारकांनाही कधी शेतीबद्दल, शेतकऱ्यांबद्दल विचार करावा असे वाटले नाही. या देशातील एकूण परंपराच अशी की पुस्तकी, शाब्दिक ज्ञानाची ओझी वाहणारे श्रेष्ठ आणि संबंध अर्थव्यवस्थेचा कणा वाहणारा कष्टकरी समाज मात्र उपेक्षित! अप्रतिष्ठित ! महात्मा फुले यांनी शेतकरी कष्टकरी हा प्रतिष्ठित असला पाहिजे आणि शेती ही उत्तम केली पाहिजे यादृष्टीने प्रथमतःच विचार मांडले.महात्मा फुले यांनी आपली बांधिलकी सतत उपेक्षित वर्गाबरोबर जाहीर केली. सर्वसामान्यांचे प्रबोधन, शूद्रांतिशूद्रांच्या मुक्तीचा प्रचार आणि शिक्षण प्रसारातून समाजोद्धार ही महात्मा फुले यांच्या वाङ्मयनिर्मितीमागील प्रधान प्रेरणा होती. महात्मा फुले यांच्या समकालीन कालखंडात बहुजन समाजाचा मुख्य व्यवसाय 'शेती' हाच होता. अठरापगड जातीचे सर्व लोक शेती व्यवसायाशी निगडित होते. शेती व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांचे दुःख, दैन्य, कुचंबणा, शोषण महात्मा फुले यांच्या अनुभवांचा भाग होता. या सर्वांच्या दुःखाला कोण जबाबदार आहे? हा प्रश्न महात्मा फुले यांना नेहमी पडत होता. या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी महात्मा फुले यांनी चिंतन केले. या चिंतनाचा भाग म्हणजे फुलेंच्या साहित्यकृतीतून व्यक्त होणारा शेतकऱ्यांचा प्रश्नविषयक विचार होय. महात्मा फुलेंच्या साहित्याला सामाजिक संदर्भ आहे. तो संदर्भ लक्षात घेऊन महात्मा फुलेंच्या साहित्याचा विचार करावा लागतो.
आपल्या आजूबाजूच्या समाजाची स्थिति-गती नेमकी कशी आहे याचे अचूक भान महात्मा फुल्यांना होते. शेतकऱ्यांच्या अधोगतीस त्यांचे अज्ञान, अशिक्षितपणा जसा कारणीभूत आहे; तशा अनेक गोष्टीही कारणीभूत आहेत. यातील एक भाग म्हणजे येथील सरकार किंवा शासनप्रणाली. दुसरे कारण म्हणजे लहरी निसर्ग आणि तिसरे महत्त्वाचे कारण म्हणजे येथील धर्मव्यवस्था. शेतकऱ्यांचे धर्माच्या नावाखाली शोषण केले जाते. वरील सर्व घटकांच्या शोषणव्यवस्था महात्मा फुले यांनी त्यांच्या साहित्यात उलगडून दाखविल्या आहेत. उच्चभ्रू समाजाचा शेतकऱ्यांकडे पाहण्याचा नेहमीच उदासीन दृष्टिकोण असतो. किंबहुना विरोधच करण्याकडे उच्चभ्रू समाजाचा कल असतो. हा असा दृष्टिकोण असण्यामागे उच्चभ्रू समाजाची मानसिकता व आर्थिक हितसंबंध असतात. याचे परखड विश्लेषण महात्मा फुले यांनी 'शेतकऱ्याचा आसूड' या ग्रंथात केले आहे. महात्मा फुले यांनी शेतकऱ्यांबद्दल अतिशय पोटतिडकीने लिहिले आहे. फुले हे एकमेव असे समाजचिंतक आहेत की, ज्यांनी प्रथमत:च शेतकऱ्यांचे प्रश्न समजावून घेतले. नुसते समजावून घेतले असे नाही तर या प्रश्नांबद्दल एक सहानुभूतिपूर्वक मानवतावादी दृष्टिकोण त्यांनी प्रगट केला. योग्य त्यादृष्टीने ते या प्रश्नांकडे पाहू शकले. महात्मा फुले यांच्या शेतकऱ्यांच्या आस्थेविषयी डॉ. नागनाथ कोत्तापल्ले म्हणतात की, "खरे म्हणजे महात्मा फुल्यांचे एकूण लेखनच मुळी शेतकरी, कष्टकरी यांचा आक्रोश शब्दांकित करणारे आहे. 'शेतकऱ्याचा आसूड'मध्ये तर अधिक धारदार, अधिक टोकदार, अधिक स्फोटक आणि विस्तारित स्वरूपात आहे. यादृष्टीने 'शेतकऱ्याचा आसूड' हा ग्रंथ एकूण महात्मा फुले यांच्या वाङ्मयसंभारात मोलाचा ठरावा." वरील विचारात डॉ. कोत्तापल्लेंनी महात्मा फुलेंच्या लेखनाचे मर्म उलगडून दाखविले आहे. महात्मा फुले यांच्या साहित्यामध्ये उपेक्षित कष्टकरी समाज केंद्रस्थानी होता हे यातून लक्षात येते.महात्मा फुले समकालीन कालखंडातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा जसा विचार करतात तसे ते इतिहासातही शेतकऱ्यांच्या दुःखाची मुळे शोधतात. अनेक शतकांपासून शेतकरी दैन्यावस्थेतच जगतो आहे. ऐतिहासिक काळातील त्यांच्या दैन्याचे आणि त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाचे चित्रण महात्मा फुले यांनी अनेक ठिकाणी केले आहे. त्यांच्या 'इशारा' या ग्रंथात महात्मा फुले यांनी इतिहासामधील शेतकरी जीवनाचा शोध घेतला आहे. 'शेतकऱ्याचा आसूड' हा ग्रंथ जोतीरावांनी १८८३ साली लिहिला. शेतकऱ्यांच्या खालावलेल्या परिस्थितीचे प्रत्यक्ष अवलोकन करून आपल्यापरीने त्याची कारणमीमांसा करणारा ग्रंथ पाच प्रकरणांत विभागलेला आहे. मुंबई, ठाणे, पुणे, जुन्नर, ओतूर वगैरे भागांत प्रत्यक्ष हिंडून या ग्रंथाचे जाहीर वाचन आपण केले आणि त्यातील तथ्यांश पडताळून पाहिला अशी माहिती लेखकानेच लिहून ठेवली आहे. चक्षुर्वैसत्यम माहितीवर आधारित असे वर्णन असल्यामुळे ते अत्यंत प्रत्ययकारी उतरले आहे. 'शेतकऱ्याचा आसूड' या ग्रंथाविषयी भा. ल. भोळे म्हणतात की, “शेतकरी वर्गाचा जीवनक्रम आणि शेतीविषयक प्रश्न यांचे इतके समग्र, सखोल आणि आस्थेवाईक चित्रण जोतीरावांपूर्वी बहुधा कोणीच केले नसावे. विशेषत: मध्यम व कनिष्ठ शेतकऱ्यांच्या आर्थिक, सामाजिक आणि मानसिक वस्तुस्थितीचे असंख्य तपशील या ग्रंथाच्या पानोपानी शब्दांकित केले आहेत. या शेतकऱ्यांची दुरावस्था किती भीषण आहे, ती तशी होण्याची कारणे कोणती आहेत आणि त्यांचे निराकरण कोणत्या उपायांनी होऊ शकेल, याचा ऊहापोह जोतीरावांनी या ग्रंथात केला आहे."
या मतावरून आपल्या लक्षात येते की, शेतकरी जीवन हा महात्मा फुलेंचा आस्थेचा व चिकित्सेचा भाग होता. शेतकऱ्यांसमोरील आर्थिक, सामाजिक, धार्मिक प्रश्नांचा विचार महात्मा फुले या ग्रंथात करतात. केवळ प्रश्न मांडून महात्मा फुले थांबत नाहीत तर या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी ते उपाय सांगतात. या ग्रंथात महात्मा फुले यांनी शेतकऱ्यांचे जीवन सुधारण्यासाठी सांगितलेले उपाय आजही उपयुक्त असल्याचे आपल्या लक्षात येते. भारतातील शेती ही राज्यकर्त्यांच्यादृष्टीने नेहमीच लुटीचे साधन असलेली दिसते. मुगल राजवट, इंग्रजांच्या राजवटीत शेतकऱ्यांची युद्धकाळात प्रचंड लूट केली गेली. तसेच शेतीवर प्रचंड 'कर' लावून शेतकऱ्यांचे अप्रत्यक्ष शोषणकरण्याचे काम राज्यकर्ते करत होते. स्वातंत्र्यानंतरही शेतकऱ्यांची ही लूट सुरूआहे. भारतातील अनेक कायदे हे शेतकऱ्यांचे शोषण करणारे आहेत.शेतकऱ्यांसमोरील प्रश्नांचे स्वरूप आपण लक्षात घेतले तर असे दिसते की, आर्थिक प्रश्न, राजकीय प्रश्न, धार्मिक प्रश्न, सामाजिक प्रश्न, सांस्कृतिक प्रश्न, मानसिक प्रश्न यांत शेतकरी दबून गेल्याचे आपल्या लक्षात येते. शेती हा व्यवसाय आहे. अशा दृष्टीने भारतीय शेतकरी शेतीकडे पाहत नाहीत. शेतकरी शेतीला मातेच्या श्रद्धेने पूजत आला आहे; यामुळे तोटा झाला तरी तो शेतीपासून अलिप्त होत नाही. पुनःपुन्हा तोच तोट्याचा व्यवसाय तो करत राहतो. यातून शेतकरीवर्गाला असहाय्यतेचे पराभूत जीवन जगावे लागते.वरील सर्व प्रश्नांचा विचार महात्मा फुले अतिशय गंभीरपणे करतात. शेतकऱ्यांच्या ठिकाणी असणारे अज्ञान, अडाणीपण यांच्यामुळे तो नडला जातो, तो भरडला जातो. यातून शेतकऱ्यांनी बाहेर पडले पाहिजे.असे मत महात्मा फुले मांडतात. आजही धर्मव्यवस्था टिकून आहे. ती अप्रत्यक्षरीत्या शेतकऱ्यांच्या शोषणास जबाबदार आहे. स्वातंत्र्योत्तर कालखंडात राजकीय नेतृत्वाने शेतकऱ्यांच्या रक्ताचा दाखला देऊन मते मागितली व ते विजयी झाले; पण या राजकीय नेतृत्वाने आपल्या बापाचा म्हणजे शेतकऱ्यांचा विश्वासघात केला. घराबाहेरील लोकांशी दोन हात करणे सहज शक्य असते; परंतु घरभेदी मंडळींशी सामना करणे अतिशय कठीण असते. महात्मा फुलेंच्या कालखंडात शेतकरी विरोधकाची जी भूमिका भट, ब्राह्मण बजावत होते तीच भूमिका आज शेतकऱ्यांच्या रक्तांच्या वंशजांनी बजवावी ही खरी शोकांतिका आहे. घरभेदीशी लढताना शेतकरीवर्गापुढील संघर्ष अतिशय तीव्र झाला आहे. महात्मा फुले यांच्या विचारांचे अधिष्ठान स्वीकारून पुढील काळात शेतकऱ्यांनी लढा लढल्यास नवनिर्माण, विधायक विजय फार दूर नाही. महात्मा फुल्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांची वास्तव चिकित्सा केली. 'शेतकऱ्याचा आसूड' हा ग्रंथ शेतकऱ्याच्या स्वातंत्र्याचा मुक्तिग्रंथ आहे. या ग्रंथाची चिकित्सा करताना तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी म्हणतात, "माणसाच्या भौतिक जीवनाचा अन्न, वस्त्र उत्पादन हा आधार आहे. म्हणून मानवी समाजातील शेतकरी समाज निरोगी व बळकट असला पाहिजे. आधुनिक समाज हा औद्योगिक क्रांतीच्या आधारावर उभारलेला असतो; परंतु शेतकरी समाजाचे बळ त्याला आवश्यक असते. हा समाजशास्त्रीय तात्त्विक दृष्टिकोण जोतीरावांनी ध्यानात धरून 'शेतकऱ्याचा आसूड' हा ग्रंथ लिहिला व प्रसिद्ध केला." तर्कतीर्थ जोशींच्या या मतातून फुलेंच्या लेखनाचे स्वरूप आपल्या लक्षात येते. आपले लेखन हे समाजाच्या हितासाठी असावे हे महात्मा फुलेंचे आग्रही मत होते. आपले लेखन हे केवळ साधन आहे, साध्य नव्हे ! या विचारांनी महात्मा फुल्यांनी लेखन केले. समाजाला योग्य दिशा दाखवून प्रश्न मांडण्यासाठी, समस्या सोडवणुकीसाठी महात्मा फुले लेखन करत. वैश्विक पातळीवरील शेतकऱ्यांचे महत्त्व महात्मा फुल्यांनी लक्षात घेतले होते. माणसाच्या भौतिक जीवनाचा आधार शेतकरी हाच आहे. या शेतकऱ्याचे समाजातील स्थान हे महत्त्वाचे असते; परंतु दुर्दैवाने शेती व शेतकऱ्यांकडे प्रचंड दुर्लक्ष झाले आहे. महात्मा फुल्यांनी शेतकऱ्यांचे जीवन सुधारण्यासाठी काही उपाय सुचविलेले आहेत. महात्मा फुले ह्या सुधारणांविषयी म्हणतात, खरोखर या देशातील सर्व लोकांची एकी करून या देशाची उन्नती करणे आहे तर प्रथम त्यांनी आपल्या विजयी व पराजितांमधील चालत आलेल्या दुष्ट धर्मास जलसमाधी देऊन त्या जुलमी धर्माने नीच केलेल्या शूद्रादी, अतिशूद्र लोकांसमक्ष उघडरीतीने आपल्या वेदान्त मतासह जातीभेदाच्या उरावर थयथया नाचून कोणाशी भेदभाव न ठेविता, त्यांच्याशी कृत्रिम करण्याचे सोडून निर्मळपणे वागू लागल्याशिवाय सर्वांची खरी एकी होऊन या देशाची उन्नती होणे नाही." या विचारांमधून महात्मा फुले 'धर्म' या गोष्टीला शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी जबाबदार मानतात. शेतकऱ्यांची स्थिती सुधारण्यासाठी महात्मा फुले खालील उपाय सांगतात. शेतकऱ्यांनी आचरण सुधारावे. उदा. बहुपत्नीत्व, बालविवाहाला नकार, शूद्र शेतकऱ्यांच्या मुलांना शिकविण्यासाठी कष्टकरी वर्गातून पुढे आलेले शिक्षक नेमावेत. शेतकऱ्यांच्या मुलांना सरकारी नोकऱ्या द्याव्यात. तसेच ते शेतीची अवस्था सुधारण्यासाठी काही उपाय सांगतात. त्यामध्ये शेतकऱ्यांना यंत्राद्वारे शेती करण्याचे शिक्षण देणे. शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन करणे. जमिनीची धूप थांबण्याचा बंदोबस्त करणे. पाणलोटाच्या बाजूने नालीबंधारे बांधणे. तलाव तळी बांधणे. धरणे बांधणे. पाण्याच्या स्रोतांचा शोध घेणे. वनखात्याच्या अतिरिक्त जमिनी कसण्यासाठी देणे. शेतीविषयक प्रदर्शन भरविणे. शेतकऱ्यांमध्ये विविध पिकांसंदर्भात स्पर्धा घेणे. त्यांना बक्षीस देणे. शेतकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेणे. शेतीसंदर्भातील उपयुक्त ग्रंथांची निर्मिती करणे. सैन्य व पोलिस दलातील मनुष्यबळ शेतीसाठी वापरणे. शासनातील अनुत्पादक घटकांवरील खर्च कमी करून शेतीसाठी वापरणे. यासारखे उपाय महात्मा फुले सुचवितात. हे सगळे उपाय आजही फार उपयुक्त असल्याचे आपल्या लक्षात येते. स्वातंत्र्यानंतर गेल्या ७o वर्षांत शासनाच्या वेगवेगळ्या योजनांमध्ये महात्मा फुले यांनी सांगितलेल्या उपायांचा अवलंब केल्याचे लक्षात येते. पाणलोट क्षेत्र विकासाचा कार्यक्रम, पाटबंधारे विभागाचे काम, पशुपालनाच्या विविध शासकीय योजना यातून महात्मा फुले यांनी सांगितलेले विचारच स्वीकारल्याचे आपल्या लक्षात येते. यातून महात्मा फुलेंच्या दूरदृष्टीपणाचे महत्त्व आपल्या लक्षात येते.
भारतातील मागील काही वर्षांतील राजकीय नेत्यांच्या भाषणांचा अभ्यास केल्यास आपल्या हेच लक्षात येते की, महात्मा फुले यांनी शेतकऱ्यांच्या विकासासाठी जे उपाय सांगितले आहेत तेच उपाय राजकीय नेते पुन्हा नव्याने सांगताना दिसतात. हे उपाय सांगत असताना थोडाफार तपशील इकडे तिकडे होत असला तरी नेत्यांच्या विचाराला महात्मा फुल्यांनी सांगितलेले उपाय दिशा देत असावे असे वाटते. यात महात्मा फुल्यांच्या विचारांची त्रिकालाबाधित सत्यता आपल्या लक्षात येते.
शेतकऱ्यांचे प्रश्न, त्यांचे जीवन गंभीरपणे समजावून घेणे गरजेचे आहे. शेतीकडे केवळ एक व्यवसाय म्हणून न पाहता एक सामाजिक गरज म्हणून लक्ष देणे आवश्यक आहे. आजही भारतातील साठ ते पासष्ठ टक्के जनता शेतीवर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष अवलंबून असताना शेतीकडे दुर्लक्ष केले जाते. शेतकऱ्यांचे जीवन अस्थिर करण्यामध्ये सामाजिक व्यवस्था व मतलबी शासनप्रणालीचा हात आहे. या दोन्हींच्या भूमिका स्वार्थकेंद्रित असल्यामुळे शेतकरी भुकेकंगाल झाला आहे. एकोणिसाव्या शतकात महात्मा फुले या दोन्ही व्यवस्थांचा भ्रष्ट चेहरा समोर आणतात. या समाजसुधारकाच्या विचारांचे हत्यार पुन्हा उपसण्याची वेळ आली आहे. शेतकऱ्याच्या शिक्षित झालेल्या पिढीने बंड करण्याचे दिवस फार लांब नाहीत. हे बंड विनाशक नसून विधायक असेल. जगाच्या पोशिंद्याला न्याय मिळवून देणारे असेल. ते सकारात्मक सर्जनशील बंड असेल. त्याला समाजातील सर्व घटकांचा पाठिंबा असेल असे वाटते. महात्मा फुले यांच्या स्मृतिदिनामिमित्त त्यांच्या विचाराला व कार्याला शतश: अभिवादन करतो..
डॉक्टर गणपतराव ढेंबरे
मराठी विभाग श्री. व्ही. एस. नाईक महाविद्यालय, रावेर, मोबाईल क्रमांक : - ९४२१०८१२७० ई-मेल : -dhembregr@gmail.com
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा