'' मराठा इतिहासातील अद्वितीय व्यक्तिमत्त्व : अहल्यादेवी होळकर ''
प्रास्ताविक :-
श्री. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर संपूर्ण भारत वर्षाच्या लोकमानसात श्रद्धेचे व आदराचे स्थान लोकमाता अहल्यादेवी होळकर यांनी निर्माण केले. भारतामध्ये स्त्रीने राज्यकारभार करण्याची अत्यंत प्राचीन परंपरा आहे. या स्त्री राज्यकर्त्या वेगवेगळ्या कार्यासाठी इतिहासात प्रसिद्ध आहेत. मध्ययुगीन इतिहासात 'स्त्री' राजकारणात वेगवेगळ्या भूमिकेत वावरताना दिसते. माता, पत्नी, बहीण या भूमिकांमध्ये राहून राजकारण करणाऱ्या अनेक स्त्रिया दिसतात. संपूर्णपणे राज्यकर्ती स्त्री म्हणून अहल्यादेवी होळकरांचा विचार करावा लागतो. राजकारणाच्या पटावर मुख्य भूमिकेत अहल्याबाई होळकर यांचे अस्तित्व होते. त्या राजकारणात होत्या; परंतु सत्तेच्या जीवघेण्या स्पर्धेत त्यांचा सहभाग कधीच नव्हता. पडद्यामागील राजकारणात अहल्याबाई होळकर महत्त्वाची कामगिरी बजावत. युद्धात सहभागी न होताही युद्ध जिंकण्याची कला अहल्याबाईंनी अवगत केली होती.
ज्या मनगटात बळ, बुद्धी आणि चातुर्य आहे तोच स्वकर्तृत्वावर लोकाभिमुख राजा बनू शकतो. या सर्व गुणांनी संपन्न अशा अहल्याबाई होळकर होत्या. भारतवर्षात अनेक महान राजे-महाराजे झाले. त्यांपैकी खूपच कमी लोकाभिमुख राजे झाले. या संख्येने कमी पण गुणवत्ता अधिक असणाऱ्या राज्यकर्त्यांपैकी अहल्याबाई होळकर या एक होत. अठरावे शतक हे मराठ्यांच्या इतिहासातील महत्त्वाचे शतक होय. या शतकात मराठा सत्ता दिल्लीचे तख्त सांभाळत होती. अत्यंत उत्कर्षाचा काळ या शतकात मराठा सत्तेने अनुभवला. ७५% भारत देशावर हुकूमत करण्याची जादू या शतकात घडली. याच शतकात मराठा राजसत्तेला उतरती कळा लागली. या संपूर्ण शतकाची सक्रिय साक्षीदार म्हणून आपल्याला अहल्यादेवी होळकर यांचा विचार करावा लागतो.इ.स. १७३३ मध्ये अहल्याबाई होळकर ह्या होळकर घराण्यात विवाह होऊन इंदूर येथे आल्या. तो पहिले बाजीराव पेशव्यांच्या कर्तृत्वाचा काळ होता. बाजीराव पेशव्यांना माणसाची चांगली ओळख होती. बाजीराव पेशव्यांनी मल्हारराव होळकर यांना संधी दिली. पुढे त्यांचे इंदूरला राज्य निर्माण झाले. या परंपरेला अतिउच्च शिखरावर नेऊन ठेवले.
लोकमाता अहल्यादेवी होळकरांचा जीवनपट :
अहल्यादेवी होळकर यांचा जन्म ३१ मे इ.स. १७२५ ला 'चौंडी' या गावी झाला. त्यांच्या वडलांचे नाव माणकोजी शिंदे होते. मल्हारराव होळकरांनी आपला मुलगा खंडेराव होळकर यांच्यासाठी विवाहाची तयारी सुरू केली. अहल्यादेवींना सून म्हणून मल्हाररावांनी पसंत केले. इ.स. १७३३ मध्ये खंडेराव होळकर यांचा अहल्यादेवींशी विवाह झाला. या काळात पहिले बाजीराव पेशवे राजकारणाच्या शिखरावर होते. एक अल्लड मुलगी ते यशस्वी शासनकर्ती स्त्री हा प्रवास अहल्यादेवींनी पूर्ण केला. या प्रवासात अनेक चढउतार आले. तरुण वयात आलेले विधवापण त्यांनी नेटाने सोसले. खंबीरपणे अहल्याबाई उभ्या राहिल्या. मालेराव व मुक्ताबाई या मुलांच्या संगोपनात व जनतेचा संभाळ करण्यात अहल्याबाईंचा जीवनप्रवास सुरू होता.
भालेराव एक सर्वसामान्य वकूब असणारा व्यक्ती होता. त्यांचा मृत्यू वयाच्या बाविसाव्या वर्षी झाला. हा आघात अहल्याबाईंनी सहन केला. या प्रसंगामध्ये अहल्याबाई स्थितप्रज्ञ राहिल्या. कौटुंबिक सुखाचा विचार न करता अहल्याबाई प्रजेच्या सुखासाठी झटू लागल्या. आपल्या प्रजेला शांत, स्थिर, वैभवशाली राजवट अहल्यादेवींनी बहाल केली. एकूण अहल्यादेवींचा जीवनपट लक्षात घेतल्यास असे दिसते की त्या संपूर्ण राजवटीच्या साक्षीदार होत्या. राज्यकारभार चालवत असताना त्यांना कडू गोड अनुभवांना सामोरे जावे लागले. परकीय शत्रूंबरोबरच घरभेदींच्या हल्ल्यालाही तोंड द्यावे लागले.
तुकोजी होळकरांशी कधी संघर्ष करत तर कधी जुळवून घेत अहल्यादेवींनी राज्यशासन केले. तुकोजी व अहल्यादेवी कधी दूर गेले तर कधी एकत्र आले. अहल्यादेवींचा स्वभाव हा अत्यंत मनमिळाऊ, सर्वांना बरोबर घेऊन चालणारा, श्रद्धाळू, कनवाळू स्वरूपाचा असल्यामुळे त्यांना शिलेदार तुकोजी होळकरांशी जुळवून घेता आले. अहल्यादेवींच्या जीवनप्रवासात मल्हारराव होळकर, महादजी शिंदे, नाना फडणीस, माधवराव पेशवे यांचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. मल्हाराव होळकर हे गुरूच्या रूपात त्यांना होते. मार्गदर्शक म्हणून मल्हाररावांचे योगदान मोठे होते. महादजी शिंदे हे शिंदेच्या राज्याचे वारसदार होते. पानिपतच्या युद्धात जीव वाचलेले महादजी शिंदे अहल्याबाईंच्या समकालीन होते. महादजी शिंदेंनी जीवनभर अहल्यादेवींशी स्नेह ठेवला. उत्तरेतील राजकारणात परस्परांना पूरक अशी भूमिका अहल्याबाई व महादजी शिंदे यांनी स्वीकारली. जीवनाच्या शेवटच्या टप्प्यात महादजी शिंदे व अहल्यादेवी होळकरांच्या मनात एकमेकांविषयी संदेह निर्माण झाला. नाना फडणवीसांनी अहल्याबाईंशी कधी नमते घेतले तर कधी चढेल भूमिका घेतली. वाद विकोपाला न जाऊ देण्याचे उपजत शहाणपण अहल्यादेवींच्या जवळ होते. अहल्यादेवींच्या जीवनाचा आपण गंभीरपणे अभ्यास केल्यास त्यांच्या जीवनपटावर एवढेच म्हणता येईल की, “अहल्यादेवींचे जीवन ही एक संघर्षगाथा होती. तो एक अखंडितपणे सुरू असलेला 'आहुती यज्ञ' होता."
स्वकर्तृत्वावर लोकाभिमुख शासनकर्त्या झालेल्या अहल्याबाई होळकरः -
अठरावे शतक हे तसे स्त्रियांना बंधनात ठेवणारे शतक होते. स्त्री आणि शूद्र यांच्या जीवनाला फार कमी मूल्य होते. अहल्याबाई होळकर जन्माने 'स्त्री' आणि जातीने 'शूद्र' होत्या. या दुहेरी शोषणव्यवस्थेवर मात करीत अहल्यादेवी राज्यकर्त्या बनल्या. राघोबादादांशी दोन हात करण्याची तयारी दाखवत अहल्याबाईंनी स्वतःचे कर्तृत्व सिद्ध करून दाखविले. अठराव्या शतकाच्या एकूण वाटचालीत आपल्या असे लक्षात येते की, अहल्यादेवींच्या मागच्यापुढच्या काळात मराठेशाहीत अनेक कर्तृत्ववान स्त्रिया राजकारणात होत्या. त्या सर्व स्त्रिया सत्तेच्या केंद्राभोवतीच घुमत राहिल्या होत्या. अहल्याबाईंचे राज्यकारभारात येणे फार वेगळे होते. त्यांची गुणवत्ता लक्षात घेऊन त्यांच्या सासऱ्यांनी त्यांना राजकारणात आणले होते. त्यांच्या उपजत गुणांची दखल घेणारे सासरे अहल्याबाईंना लाभले होते. त्यामुळे त्यांचा राज्यकारभारात फार सहजपणे प्रवेश झाला आणि कारभाराचे शिक्षणही मिळाले.
अहल्याबाईंच्या राज्यकारभाराची प्रेरणा ही स्वार्थी कधीच नव्हती. जनकल्याणासाठी शासन ही गोष्ट त्यांनी महत्त्वाची मानली. अहल्याबाईंनी राज्यकारभार हाती घेतला त्यावेळी एक प्रतिज्ञा केली होती ती अशी, "माझे कार्य प्रजेला सुखी करणे आहे.माझ्या प्रत्येक कृतीला मी स्वतः जबाबदार आहे.सत्तेच्या अधिकारामुळे मी येथे जे जे काही करत आहे त्या प्रत्येक कृत्याचा जाब मला परमेश्वरापुढे देणे आहे. परमेश्वराने ज्या जबाबदाऱ्या माझ्यावर सोपविल्या आहेत, त्या मला पार पाडावयाच्या आहेत."
ही प्रतिज्ञा अहल्यादेवींनी जीवनभर पाळली. या प्रतिज्ञेच्या आधीन राहून त्यांनी राज्यकारभार केला. प्रजेला सुखी करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत हे त्यांनी महत्त्वाचे मानले. सामाजिक बांधिलकी अहल्याबाईंनी महत्त्वाची मानली. अहल्याबाईंनी राज्यकारभार केला. परमेश्वराच्या सत्तेला त्यांनी फार महत्त्व दिले. परमेश्वराची सत्ता सर्वश्रेष्ठ सत्ता मानली. त्याच्यापुढे आपल्या कृतीचा लेखाजोखा देण्याची तयारी ठेवून त्या लोककल्याणकारी कार्य करत गेल्या. लोकाभिमुख राजकारण त्या करत गेल्या. म्हणून आजही भारतीय लोकमानसात अहल्याबाईंची प्रतिमा कायम आहे.
अहल्याबाई होळकर यांची लोकविधायक कार्ये : -
संपूर्ण भारतवर्षाला आदर्श वाटावे असे सुंदर रचनात्मक, सेवाभावी काम करून अहल्यादेवींनी भारताच्या इतिहासात अलौकिक स्थान निर्माण केले. श्री. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर सामान्य लोकांना पोटाशी धरून त्यांच्यासाठी हे राज्य आहे, या भावनेतून राज्य उभे करणारी अहल्यादेवी होळकर ही अद्वितीय स्त्री होय. श्री. छत्रपती शिवाजी महाराजांनी लोकांच्या सेवेचा घालून दिलेला मार्ग ज्यांनी त्याच पद्धतीने पुढील काळात अंगीकारला व खऱ्या अर्थाने पुढे नेला. अशा राज्यकर्त्यांमध्ये पुण्यश्लोक अहल्याबाई होळकरांचे नाव आपल्याला घ्यावे लागेल. नुसती महाराष्ट्र, मध्य प्रदेशालाच नव्हे तर संपूर्ण भारत वर्षाला आदर्श वाटावी अशी सुंदर रचनात्मक सेवाभावी कामे करून अहल्यादेवींनी भारताच्या इतिहासात अलौकिक स्थान निर्माण केले. स्वतःच्या महसूलाचा पैसा अहल्यादेवींनी राज्याच्या उभारणीच्या लोकोपयोगी कामात अधिक गुंतवला. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी मोठमोठ्या विहिरी, बारवा खोदल्या.
त्याकाळी दिल्ली ते कलकत्ता या रस्त्याचे मोठे काम त्यांनी पूर्ण केले. दळणवळणाचे महत्त्व अहल्याबाईंनी जाणले होते. रस्ते हे विकासासाठी गरजेचे असतात, हे ओळखून त्यांनी कितीतरी रस्ते तयार केले. सर्व देशभरातील मंदिरे त्यांनी आपली मानली व त्यांचा जीर्णोद्धार केला. त्यांची कायमची व्यवस्था करण्यासाठी दीर्घकालीन उत्पन्नाचा आधार त्यांनी दिला. गुणी माणसांना अहल्यादेवींनी राज्यात चांगली कामे दिली. त्यांचा आदर केला. स्वतःच्या राज्यातील नव्हे तर महाराष्ट्रातील अनंतफंदी, सगनभाऊ यांच्यासारखे शाहीर, चित्रकार, शिल्पकार, स्थापत्यशास्त्रातील कलावंत यांना मोठा आश्रय देऊन मोठे करण्यासाठी त्यांनी बळ दिले. असे कार्य देशभराच्या लोकांसाठी, कलावतांसाठी केले. त्यांचा खरा इतिहास अजूनही पाहिजे त्या प्रमाणात लोकांसमोर आलेला नाही. येणे महत्त्वाचे आहे. कितीतरी मोठ्या गोष्टी योजनाबद्ध नियोजनाने अहल्याबाईंनी केल्या.
अहल्याबाईंचे फिरणे इंदूर, महेश्वर, उज्जैनच्या परिसरात होते; पण त्यांचे हिमालयाच्या केदारनाथापासून दक्षिणेच्या रामेश्वरापर्यंत आणि पूर्वीच्या जगन्नाथपुरीपासून पश्चिमेच्या द्वारकेपर्यंत चालू त्यांचा प्रवास होता.त्यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणावर माणसे जोडली होती. एकूण त्यांच्या कार्याची प्रेरणाच मुळी लोककल्याण ही होती. लोकांच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी अहल्यादेवींनी जीवन वेचले. या त्यागाचे स्मरण भारतवर्षाला कायम ठेवावे लागेल. भारतभर आपण भ्रमण केल्यास आपल्याला असे लक्षात की, अहल्यादेवी होळकरांविषयी अनेक लोककथा आहेत. लोकमानसात त्यांच्या कार्याची मुळे खोलवर रुजली आहेत. ते या कथांमधून आपल्या लक्षात येते. राजमाता अहल्यादेवींचा इतिहास लोकमानसात रुजला गेला आहे. अनेक आख्यायिका संपूर्ण भारतभर अहल्यादेवींविषयी पसल्याचे लक्षात येते.उत्तर भारतामध्ये हिंदी भाषक समाजामध्ये अहल्याबाईंच्या कार्याचा अमीट ठसाउमटलेला आपणांस जाणवतो. विधायक कार्यांतून अहल्याबाई जिवंत राहिल्या. त्यांच्या कार्याचे समाजमानसाने कायम स्मरण ठेवले आहे. विविध धार्मिक क्षेत्रांवर अहल्याबाईंनी केलेले कार्य आजही आपल्या नजरेत येते. तसे काही शेष -अवशेषांच्या खुणाआपल्या लक्षात येतात.
समारोप : -
अहल्याबाई होळकर यांचे जीवन म्हणजे सत्तर वर्षांचे सुफळ संपूर्ण आयुष्य होय.दुःखाचे आघात सोसत मोठ्या धैर्याने पुढे गेलेले व्यक्तिगत जीवन होय.स्वकीयांकडून सन्मान घेत घेत त्यांच्याशी सामनाही देत देत पुढे गेलेले राजकीय जीवन असा हा जीवनाचा त्रिपदरी गोफ आहे.
संपूर्ण आयुष्यामध्ये अहल्याबाई होळकरांनी कपट कारस्थानी राजकारण केले नाही. त्यांची ओढ ही जनकल्याणकारी कार्ये करण्यात अधिक होती.सत्तेच्या चढाओढीत सहभागी न झाल्यामुळे शांत स्थिर राज्य अहल्याबाईंनी जनतेला दिले. अहल्याबाईंच्या जीवनदायिनी प्रेरणेने तळी, अन्नछत्रे, धर्मशाळांचे रूप घेतले व त्यांच्या अनाक्रमक धर्मशीलतेने माणुसकीचे कार्य केले. लोकांना चांगल्या कामासाठी प्रवृत्त केले.
अहल्याबाईंच्या चरित्राचा आढावा घेतल्यास आपणास असे लक्षात येते की, त्यांना समकालीन राजकारणाचे पूर्णपणे भान होते. परंतु त्यांनी राजकारणात रस घेतला नाही. किंबहुना त्यांना महादजी शिंदे, नाना फडणवीस, पवार, भोसले यांनी सहभागी करून घेतले नाही. याचे कारण होळकरांच्या वतीने तुकोजी होळकर युद्धाची, सैन्याची आघाडी सांभाळत होते. दुसरे कारण असे की, अहल्याबाई होळकर या स्त्री असल्यामुळे त्यांचा सहभाग न उतरता त्या जनकल्याणात सहभागी झाल्या.
अहल्याबाई होळकरांनी स्वतःच्या राज्याचे संरक्षण करण्यासाठी फ्रेंच सेनानी ड्युडूनेक याला फौजेत ठेवले होते. आधुनिक युद्धकला अवगत असणारे सैन्य उभारण्याचा मानस अहल्यादेवींचा होता. इंग्रजी सत्ता भारतवर्षाला गिळंकृत करीत असल्याचे भान अहल्यादेवींना होते. समकालीन राजकारणात मराठा सत्ताकेंद्रामध्ये सुरू असलेल्या संघर्षामुळे इंग्रजांचे आगमन व त्यांची चढाई बाकी नेतृत्वांच्या लक्षात आली नाही. पुढील काळात त्याचे परिणाम अखंड भारतवर्षाला भोगावे लागले.
अहल्याबाई होळकर या काही सर्वगुणसंपन्न देवता नव्हत्या. त्यांनाही माणूसपणाच्या सगळ्या मर्यादा होत्या. अठराव्या शतकातील मराठा इतिहासातील त्या एक अद्वितीय व्यक्तिमत्त्व होत्या. असेच आपणाला म्हणावे लागेल.
"कुणी म्हणे लोकमाता; कुणी म्हणे तिज आई
पुण्यश्लोक अहल्यादेवी, समाजाची समई.”
डॉ. गणपतराव ढेंबरे ,
मराठी विभाग , श्री. व्ही. एस. नाईक महाविद्यालय, रावेर, मोबाईल क्रमांक : - ९४२१०८१२७० ई-मेल :-dhembregr@gmail.com
Nice
उत्तर द्याहटवाNice
उत्तर द्याहटवाVery nice work
उत्तर द्याहटवाअभ्यासपूर्ण उत्तम लेखन
उत्तर द्याहटवा