रविवार, २ जानेवारी, २०२२

आंबेडकरी चळवळ : इतिहास आणि भवितव्य डॉ. गणपतराव ढेंबरे

 आंबेडकरी चळवळ : इतिहास आणि भवितव्य

डॉ.गणपतराव ढेंबरे


ज्या चळवळी लोकांमध्ये सामाजिक परिवर्तन घडवून आणतात त्यांना समाजशास्त्रीयदृष्ट्या सामाजिक चळवळी' म्हणतात. समाज घटकांच्या सामुदायिक प्रश्नांना घेऊन चळवळी आकार घेत असतात. या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी सामुदायिक कृतीच्या स्वरूपात जेव्हा संप, मोर्चे, घोषणा, सभा मिरवणुका अशा कृती होऊ लागतात तेव्हा सामाजिक चळवळीचे दृश्य स्वरूप पुढे येते. मात्र या दृश्य स्वरूपाच्या सामुदायिक कृतींच्या आधी परिवर्तनाचा विचार अस्तित्वात असतो. हा विचार एखाद्या व्यक्तीने दिलेला असतो. अशा चळवळींना त्या व्यक्तीचे वैचारिक नेतृत्व लाभते. ती व्यक्ती आपल्या वैचारिक तत्त्वज्ञानातून आणि कृतियुक्त कार्यक्रमातून अशा चळवळींचे प्रतिनिधित्व करते. ही चळवळ जेव्हा पसरते तेव्हा या व्यक्तीला अनेक अनुयायी लाभतात व ते या चळवळीचा प्रसार करतात. वरील सर्व विश्लेषण हे सामाजिक चळवळीची निर्मितिप्रक्रिया उलगडून दाखवते. आंबेडकरी चळवळीची निर्मिती ही समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय या मूल्यांच्या आधीन राहणाऱ्या समाजव्यवस्थेच्या निर्मितीसाठी झाली आहे.

उपेक्षित, मागासलेल्या समाजाच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आंबेडकरी चळवळीची निर्मिती झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या समग्र जीवनातूनच एक तत्त्वज्ञान निर्माण केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नेतृत्व लाभल्यामुळे खऱ्या अर्थाने आंबेडकरी चळवळीला रंग, रूप, आकार प्राप्त झाला आणि ती विलक्षण गतिमान होत गेली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी वृत्तपत्रीय लेखन, ग्रंथलेखन करून, सभासंमेलनांतून प्रभावी भाषणे करून मुंबई, नागपूर, औरंगाबाद अशा ठिकाणी शाळा-महाविद्यालये सुरू करून वृत्तपत्रे चालवून आंबेडकरी समाजाला जागृत केले, त्यांना संघटित केले. आपल्या समाजाला स्वाभिमानाने जगण्यास प्रवृत्त केले. आंबेडकरी चळवळीला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे वैचारिक नेतृत्व लाभले. त्यांनी आपल्या वैचारिक तत्त्वज्ञानातून आणि कृतियुक्त कार्यक्रमातून चळवळीची निर्मिती केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना लाखो अनुयायी लाभले. या अनुयायींनी बाबासाहेबांचा विचार प्राणपणाने जिवंत ठेवला.

मला या संस्कृतीचा कंटाळा आला आहे, असे नमूद करून 'आय एम ॲट  वॉर विथ सिव्हिलायजेशन', 'या संस्कृतीबरोबर माझे सतत युद्ध सुरू आहे' असे जाहीर करीत डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी, विषमतावादी, अन्यायकारक संस्कृतीबरोबर सतत युद्ध केले. किंबहुना त्या संस्कृतीला परिपूर्णपणे बदलण्याची साधने बाबासाहेबांनी निर्माण केली. समाजव्यवस्थेत परिवर्तन घडवून आणण्यात सत्यशोधक चळवळीइतकीच आंबेडकरी चळवळीनेदेखील महत्त्वाची भूमिका बजावली आहे. भारतीय समाजात शेकडो वर्षांपासून उपेक्षितांचे जीवन नशिबी आलेल्या दलित जातींच्या लोकांना जागृत करून त्यांना नवा आत्मविश्वास प्राप्त करून देण्याचे अत्यंत कठीण असे कार्य आंबेडकरी चळवळीने केले आहे. या चळवळीच्या मुशीतून तयार झालेल्या कार्यकर्त्यांनी दलितांना आत्मनिर्भर बनविले आणि सामाजिक विषमता व भेदभाव यावर आधारित असलेल्या येथील समाजात ताठ मानेने व सन्मानाने जगण्याचे तत्त्वज्ञान दिले.

आंबेडकरी चळवळीचा इतिहास : -

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीला इ.स. १९२४ पासून व्यापक स्वरूप प्राप्त होत गेले. असे समजले जात असले तरी प्रत्यक्षात त्याच्याही अगोदर त्यांनी समाज जागृतीच्या आपल्या कार्याला सुरुवात केली होती. ३० जानेवारी १९२० रोजी त्यांनी 'मूकनायक' या नावाचे पाक्षिक सुरू केले होते. 

अस्पृश्यांच्या व्यथा-वेदना बोलक्या करणे, त्यांची दुःखे वेशीवर टांगणे आणि त्यांच्यात जागृती घडवून आणणे हा 'मूकनायक' सुरू करण्यामागील त्यांचा मुख्य उद्देश होता. या पत्राच्या पहिल्याच अंकात त्यांनी असे म्हटले होते की, “युगानुयुगे चालत आलेले दास्य, दारिद्र्य यांपासून बहिष्कृत वर्गाची मुक्तता करण्यासाठी आकाश-पाताळ एक केले पाहिजे. त्यांच्या डोळ्यांत ज्ञानाचे अंजन घालून त्यांना आपल्या हीन परिस्थितीची जाणीव करून दिली पाहिजे.” यातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे 'मूकनायका'च्या निर्मितीचे प्रयोजन स्पष्ट होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी २० जुलै १९२४ रोजी 'बहिष्कृत हितकारिणी सभा' या संस्थेची स्थापना केली. महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह हा भारतीय इतिहासात न्याय मागणीसाठी सर्वात प्रदीर्घ केला गेलेला सत्याग्रह होय. दि. २७ मार्च १९२७ मध्ये बहिष्कृत परिषदेचे अधिवेशन बाबासाहेबांच्या अध्यक्षतेखाली महाड येथे भरविण्यात आले होते. त्या अधिवेशनाच्यावेळी उपस्थित प्रतिनिधींनी २० मार्च १९२७ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली चवदार तळ्यावर एक विशाल मोर्चा काढला. त्यानंतर अस्पृश्यांचा हक्क प्रस्थापित करण्यासाठी बाबासाहेबांनी त्या तळ्याचे ओंजळभर पाणी प्राशन केले. बाबासाहेबांच्या अनुयायांनीदेखील त्यांच्या कृतीचे अनुकरण केले.

महाडच्या चवदार तळ्याच्या सत्याग्रहाच्या एकूण अनुभवातून बाबासाहेबांनी चिंतन केले. या चिंतनातून त्यांनी एक क्रांतिकारी कृती केली ती म्हणजे दि. २५ डिसेंबर १९२७ रोजी 'मनुस्मृती'चे जाहीररीत्या दहन करण्यात आले. 'मनुस्मती' या हिंदूंच्या धर्मग्रंथात अस्पृश्यतेच्या प्रथेचे आणि अस्पृश्यांवर घालण्यात आलेल्या निर्बंधांचे समर्थन करण्यात आले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी असे म्हटले होते की, "मनुस्मृतीत शूद्र जातींची निंदा करणारी, त्यांचा उपमर्द करणारी, कुटाळ उत्पत्तींचा कलंक त्यांच्या माथी मारणारी व त्यांच्याविषयी समाजात अनादर वाढविणारी वचने ओतप्रोत भरली आहेत. त्यात धर्माची धारणा नसून असमतेची धुळवड मात्र घातलेली आहे." हा बाबासाहेबांचा विचार मनुस्मृतीचे दहन करण्यापाठीमागचा कार्यकारणभाव स्पष्ट करतो.

हिंदुत्वावरील आपला अधिकार प्रस्थापित करण्यासाठी बाबासाहेबांनी मंदिरप्रवेशाचा सत्याग्रह करण्याचे ठरविले. त्यानुसार बाबासाहेब व त्यांचे अनुयायी यांनी अमरावतीचे अंबाबाई मंदिर, पुण्याचे पर्वती मंदिर, नाशिकचे काळाराम मंदिर अशा निरनिराळ्या ठिकाणी मंदिरप्रवेशासाठी सत्याग्रह केला. यांपैकी नाशिक येथील काळाराम मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश मिळविण्यासाठी झालेला सत्याग्रह खूपच गाजला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या हजारो अनुयायांनी ३ मार्च १९३० रोजी काळाराम मंदिराच्या ठिकाणी सत्याग्रह केला. हा सत्याग्रहदेखील प्रदीर्घ काळ चालला. या सगळ्या संघर्षातून बाबासाहेबांच्या मनात धर्मांतराचा निर्णय ठाम होत गेला.

दि. १३ ऑक्टोबर १९३५ रोजी नाशिक जिल्ह्यातील येवला येथे डॉ. आंबेडकर यांच्याच अध्यक्षतेखाली अस्पृश्यांची एक परिषद भरविण्यात आली होती. या परिषदेत बोलताना बाबासाहेबांनी असे उद्गार काढले की, "दुर्दैवाने मी हिंदू म्हणून अस्पृश्य जातीत जन्माला आलो, हा काही माझा अपराध नाही, परंतु मरताना मात्र मी हिंदू म्हणून मरणार नाही." या घोषणेनुसार दि. १४ ऑक्टोबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेबांनी आपल्या हजारो अनुयायांसह नागपूर मुक्कामी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. या सर्व आणि सांस्कृतिक चळवळींबरोबरच बाबासाहेबांनी राजकीय स्वरूपाच्या चळवळींना सुरुवात केली होती.

इंग्लंडच्या सरकारने भारताच्या घटनात्मक प्रश्नासबंधी विचारविनिमय करण्यासाठी इ.स. १९३० ते १९३२ च्या दरम्यान तीन गोलमेज परिषदांचे आयोजन केले होते. या परिषदांना अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून बाबासाहेब उपस्थित राहिले होते. यावेळी त्यांनी अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली. अस्पृश्यांसाठी वेगळे मतदारसंघ असल्याखेरीज अस्पृश्यांना कायदेमंडळावर प्रतिनिधित्व मिळणार नाही, असे त्यांचे प्रतिपादन होते. इ.स. १९३२ इंग्लंडचे त्या वेळचे पंतप्रधान रॅम्से मॅकडोनाल्ड यांनी 'जातीय निवाडा' घोषित केला. त्यामध्ये भारतीय समाजातील इतर काही विभागांप्रमाणे अस्पृश्यांसाठीही स्वतंत्र मतदारसंघाच्या निर्मितीची तरतूद करण्यात आली होती. अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघ निर्माण करण्याच्या घोषणेविरुद्ध महात्मा गांधींनी ‘'येरवडा’ जेलमध्ये आमरण उपोषण सुरू केले. हे उपोषण थांबविण्यासाठी बाबासाहेब व महात्मा गांधींमध्ये एक करार झाला; तो 'पुणे करार' या नावाने प्रसिद्ध आहे.

पुणे कराराच्या निमित्ताने बाबासाहेबांच्या मागण्यांना राष्ट्रीय पातळीवर व्यापक पाठिंबा मिळाला होता. अखिल भारतीय पातळीवर बाबासाहेबांचे नेतृत्व प्रकाशझोतात आले होते. देशाचे स्वातंत्र्य जवळ आल्याची चाहूल बाबासाहेबांना लागली होती. लोकशाहीप्रधान राष्ट्रामध्ये राजकीय पक्ष ही एक अपरिहार्य गरज आहे. हे बाबासाहेबांनी ओळखले होते. यातून बाबासाहेबांनी राजकीय पक्षाची स्थापना केली. इ. स. १९३६ मध्ये बाबासाहेबांनी 'स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली. आपल्या पक्षाच्या जाहीरनाम्यात त्यांनी असे म्हटले होते की, “सनातनी व प्रतिगामी स्वरूपाच्या सर्व शक्तींना आळा घालण्याची अत्यंत आवश्यकता आहे." या विचारातून बाबासाहेबांचे राजकीय पक्ष स्थापन करण्यापाठीमागचे उद्दिष्ट आपल्या लक्षात येते. इ.स. १९४२ मध्ये बाबासाहेबांनी पुन्हा एकदा नव्या पक्षाच्या स्थापनेची घोषणा केली. 'शेड्युल्ड कास्ट फेडरेशन' असे नाव या नवीन पक्षाचे ठेवण्यात आले. या पक्षाने अस्पृश्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याचे उद्दिष्ट ठेवले होते.

इ.स.१९५४ साली झालेल्या निवडणुकांतील पराभवानंतर बाबासाहेबांनी “मी लावलेले रोपटे जरी कोमेजून गेले असले तरी त्याची मुळे शाबूत आहेत" असे विधान केले. या विधानामधून बाबासाहेब पराभवाने खचून न जाता पुन्हा नव्याने पक्षाच्या पुनर्बांधणीसाठी सज्ज झाले होते हे आपल्या लक्षात येते. इ.स. १९५२ व १९५४ मध्ये झालेल्या निवडणुकांत पराभव झाल्यानंतरसुद्धा इ.स. १९५७ साली होणाऱ्या निवडणुका नव्या उमेदीने लढविण्यासाठी व संसदीय लोकशाहीला आणखी समृद्ध करण्यासाठी 'रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया' या पक्षाची संकल्पना बाबासाहेबांनी मांडली व तशा प्रकारचा ठराव ३० सप्टेंबर १९५६ रोजी दिल्लीत त्यांच्या घरी झालेल्या फेडरेशनच्या कार्यकारिणीत पास करण्यात आला होता; परंतु दुर्दैवाने ६ डिसेंबर १९५६ रोजी बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण झाले आणि आंबेडकरी चळवळीची दिशा बदलली.

बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर त्यांच्या सहकाऱ्यांनी ३ ऑक्टोबर १९५७ ला 'रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया' या पक्षाची रितसर स्थापना केली. पक्षाच्या अनुयायांमध्ये ऐक्य फार काळ टिकले नाही. पक्ष स्थापनेनंतर एका वर्षाने पक्षात उभी फूट पडली. पक्ष दोन ध्रुवांमध्ये विभागला गेला. एका बाजूला कर्मवीर दादासाहेब गायकवाड, डॉ. आर. डी. भंडारे, बॅरिस्टर राजभाऊ खोब्रागडे, एन. शिवराज इ. तर दुसऱ्या बाजूला ॲड.बी.सी.कांबळे, दादासाहेब रूपवते, प्रा. एन. एम. कांबळे, आवळे बाबू, ए.जी. पवार इ. अशी नेत्यांची वाटणी झाली आणि रिपब्लिकन पक्षाची घडी बसण्याआधीच विसकटली. रिपब्लिकन पक्षाची शकले उडाली. पुढच्या काळात पक्ष वेगवेगळ्या गटा-तटांत विभागला गेला. बाबासाहेबांनी रिपब्लिकन पक्ष स्थापनेचे जे ध्येय धोरण ठरविले होते ते वास्तवात येण्याची शक्यता पूर्णपणे मावळली.

आंबेडकरी चळवळीच्या इतिहासात दोन घटना अतिशय महत्त्वाच्या आहेत. त्यातील पहिली घटना म्हणजे दलित पँथरची स्थापना तर दुसरी घटना म्हणजे नामांतराचा लढा. या दोन घटनांनी बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर दलित समाजात जागृती, चेतना, अस्मितेची जपणूक करण्याचे कार्य केले. मुळात आंबेडकरी चळवळीतील राजकीय चळवळीची अवस्था बिकट असताना, दुहीचे राजकारण खेळले जात असताना आंबेडकरी चळवळीतील सांस्कृतिक चळवळ, सामाजिक चळवळ ही खऱ्या अर्थाने ऐन उमेदीत होती. किंबहुना कर्तृत्वाच्या शिखरावर चढण्यास सज्ज झाली होती. यातील आंबेडकरी साहित्य चळवळीने एक स्वतःचे स्थान,अस्तित्व निर्माण केले होते.

आंबेडकरी सामाजिक चळवळीचा विचार करता वेगवेगळ्या आंबेडकरी अनुयायींच्या ताकदीवर सामाजिक प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी आंबेडकरी चळवळ कार्य करताना दिसते. वेगवेगळ्या संघटना, वेगवेगळे नेते सामाजिक चळवळीला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करीत होते. या सगळ्या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर पुढील काळात आंबेडकरी चळवळीचे स्वरूप कसे असावे याबद्दल मी काही मते नोंदविण्याचा प्रयत्न करीत आहे. ती अपूर्ण असू शकतील याची मला जाणीव आहे.

आंबेडकरी चळवळीचे भवितव्य : -

बदलत्या सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक परिस्थितीमध्ये आंबेडकरी चळवळीने आपले स्थान कायम ठेवण्याचे मोठे आव्हान आहे. स्वार्थकेंद्रित व्यवस्थेत समाज विकासाचे मोठे कार्य चळवळीला पार पाडावयाचे आहे. आंबेडकरी विचारधारेला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी प्राप्त करून दिलेले वैचारिक अधिष्ठान हे मोलाचे आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता, सामाजिक न्याय ही चतु:सूत्री या वैचारिक अधिष्ठानापाठीमागे आहे. समाजातील शेवटच्या माणसाचा विचार आंबेडकरी विचारधारेने महत्त्वाचा मानला आहे. 'बहुजन 'हिताय, बहुजन सुखाय' हे अंतिम ध्येय आंबेडकरी विचारधारेने स्वीकारले आहे. सर्वांना बरोबर घेऊन जाण्यास ही चळवळ सज्ज आहे.

आंबेडकरी चळवळीला बाबासाहेबांनी प्राप्त करून दिलेले सर्वसमावेशकतेचे तत्त्व मागे पडता कामा नये. केवळ विद्रोह, द्वेष यांच्यापेक्षा विधायक, सर्वमंगल, प्रेम यातून भारतीय समाजाचे पुनर्निर्माण शक्य आहे. गौतम बुद्धांचा विचार बाबासाहेबांनी स्वीकारून दलित चळवळीला जागतिक परिमाण प्राप्त करून दिले आहे. आंबेडकरी चळवळीमध्ये विचारवंत, लेखक, कलावंत, समीक्षक यांची खूप मोठी फौज असल्याचे दिसते. सांस्कृतिक चळवळीमध्ये काम करणाऱ्या या विविध व्यक्ती सामाजिक व राजकीय चळवळीमध्ये सक्रिय होण्याची गरज आहे. सांस्कृतिक चळवळीत काम करणारे सर्वजण हे सृजनशील कार्य करीत असतात. समाज परिवर्तन हे अंतिम ध्येय मानणाऱ्या या विचारवंतांनी पुढील काळात सर्व आंबेडकरी चळवळींना दिशादिग्दर्शनाचे कार्य केल्यास विधायक सामाजिक बदल घडू शकतो. विचारवंत, लेखक, सृजनशील कलावंत, सच्चे कार्यकर्त्यांनी स्वतःला कोणत्याही नेत्यांच्या पक्षाच्या दावणीला बांधून घेऊ नये, स्वतःचे अस्तित्व दाखवण्याची गरज आहे. केवळ हितसंबंधींची राखण करण्याच्या नादात स्वतःला व समाजाला विकावे हा समाजद्रोह आहे. आपल्या जबाबदारीचे भान राखणे फार महत्त्वाचे आहे.

दलित चळवळीला धोका आहे तो स्वयंघोषित पुढारी, कार्यकर्ता यांच्यापासून हे स्वत:ला चळवळीतील पुढारी, नेते, कार्यकर्ता म्हणून घेतात. यांचे चळवळीत येण्याचे ध्येय स्वार्थ साधणे हे आहे. ही सर्व मंडळी श्रेय लाटण्यासाठी वेळप्रसंगी कोणतीही वैचारिक तडजोड करण्यास तयार असतात. यांच्यापासून आंबेडकरी जनतेला धोका आहे. यांना बरोबर घेऊन चालणे विश्वासघाताचे ठरू शकते. यांना चळवळीतून बाजूला केल्याशिवाय नवनिर्माण अशक्य आहे. आंबेडकरी चळवळीचे नेतृत्व करणारी मंडळी ही राजकारणापासून अलिप्त असणारी असावी. सर्वसामान्य जनतेचा नेतृत्वावरील उडालेला विश्वास कायम होण्यासाठी चळवळीतील नेतृत्व हे स्वच्छ चारित्र्याचे, राजकारणापासून अलिप्त असणारे असल्यास याचा फायदा चळवळीला होऊ शकतो.


आंबेडकरी चळवळीने संघटना मजबूत करण्याची गरज आहे. बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, यातील दुसऱ्या घटकाचा विचार करण्याची गरज आहे. चळवळीला एक निश्चित धोरण ठरवून योजनाबद्ध कार्यक्रम आखून संघटन वाढविण्याची गरज आहे. संघटन वाढल्यास सर्व पातळीवर दबावगट म्हणून कार्य करणे सोपे जाऊ शकते. संघटनेची बांधणी करत असताना बाबासाहेबांच्या विचारधारेचा प्रचार आणि प्रसार करण्यावर भर देणे आवश्यक आहे. समाजातील शेवटच्या माणसांपर्यंत बाबासाहेबांचे विचार पोहचल्याशिवाय नवसमाजाचे स्वप्न अपूर्ण राहू शकते. बाबासाहेबांची वैश्विक विचारधारा सर्वश्रुत करणे अतिशय महत्त्वाचे आहे. या विचारधारेप्रमाणे सर्वांना बरोबर घेऊन चालणे आवश्यक आहे. आंबेडकरी चळवळीने सर्वसमावेशक धोरण स्वीकारले पाहिजे. किंबहुना आंबेडकरी चळवळीनेच राष्ट्रीय पातळीवर नेतृत्व करण्याची गरज आहे.


सर्व घटकांना बरोबर घेऊन चालल्यास एक तर संघटना अधिक मजबूत होईल व चळवळ व्यापक होऊ शकते. आंबेडकरी चळवळीने एक निश्चित कृतिशील कार्यक्रमपत्रिका ठरविण्याची गरज आहे. यातून समाजातील चेतना जागृत राहण्यास मदत होते. समाजाच्या विकासासाठी सतत सक्रिय राहणे गरजेचे असते. सुप्त अवस्थेत कोणत्याही चळवळीचा विकास थांबत असतो. हे टाळण्यासाठी कृतिशील कार्यक्रम राबविल्यास संघटनेत चलनवलन होऊन तिला जिवंतपणा प्राप्त होत असतो.


आंबेडकरी चळवळीने आक्रमक परंतु विचारी (सम्यक) लोकमत निर्माण करणे गरजेचे आहे. अंतिमतः नीतिमान समाजव्यवस्था निर्मितीचे बाबासाहेबांचे स्वप्न साकारण्यास चळवळीने सज्ज होण्याची गरज आहे.



( लेख पूर्व प्रसिद्धी - प्रज्ञासूर्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर संपादक - ॲड. महेंद्र शिंदे स्नेहवर्धन प्रकाशन , पुणे प्रथमावृत्ती - ६ डिसेंबर २०१२ )

डॉ. गणपतराव ढेंबरे

मराठी विभाग ,

श्री.व्ही.एस.नाईक महाविद्यालय , रावेर जि . जळगाव

पिनकोड - ४२५५०८

मोबाईल नंबर - ९४२१०८१२७०

ई - मेल - dhembregr@gmail.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

वैशिष्ट्यीकृत पोस्ट

भाषा , साहित्य निर्मिती आणि कृत्रिम बुद्धिमत्ता

 भाषा, साहित्य निर्मिती आणि कृत्रिम बुद्धिमत्ता डॉ. गणपतराव ढेंबरे  मराठी विभाग श्री.व्ही.एस. नाईक महाविद्यालय, रावेर,ता.रावेर,जि. जळगाव पिन...