रविवार, २ जानेवारी, २०२२

मराठी बोलींच्या अभ्यासाचे महत्त्व डॉ. गणपतराव ढेंबरे

 मराठी बोलींच्या अभ्यासाचे महत्त्व 


डॉ.गणपतराव ढेंबरे, रावेर


प्रस्तावना : -


भाषा ही एक सामाजिक संस्था आहे. तसेच ते संस्कृतीच्या अभिव्यक्तीचे माध्यमदेखील आहे. सामाजिक व सांस्कृतिक जीवनामध्ये आवश्यक असणाऱ्या संपर्कक्रियेसाठी व सहकार्यासाठी मानव अनेक प्रकारच्या संदेशवहनाच्या पद्धती किंवा व्यवस्था वापरतो. 'भाषा' ही मानवाची सर्वात महत्त्वाची संदेशवहन पद्धती म्हणावी लागेल. मानवी समाज व संस्कृती याचा ती एक अविभाज्य घटक आहे. आपण एकाच समाजात वावरत असलो, एकच भाषा बोलत असलो तरी अनेक कारणांमुळे समाजात वेगवेगळे स्तर निर्माण होतात. शिक्षण व्यवसाय, नागरी वा अनागर वातावरण, जाती-जमाती कौटुंबिक वातावरण, देशविदेशाचा प्रवास इत्यादी अनेक कारणांमुळे समाजात लहान मोठे गट अस्तित्वात येतात. या गटांची भाषापद्धती भिन्न असते. आपण जी भाषा म्हणतो ती तर शेवटी एकसंघ असते काय ? मराठी भाषेपुरतेच बोलावयाचे झाल्यास ही भाषा म्हणजे निरनिराळ्या बोलींचा एक संग्रह आहे. अस्तित्वात असलेल्या बोलींपैकीच एखादी बोली प्रतिष्ठा पावते व तिला प्रमाण भाषेचे स्थान लाभते. या प्रमाण भाषेत साहित्य व्यवहार होतो. पण नित्याच्या व्यवहारात ही प्रमाणभाषा काटेकोरपणे योजली जातेच असे नाही. तसे पाहिले तर प्रत्येक व्यक्तीची बोलण्याची ढब वेगळी असते. परंतु त्यामुळे भाषा बदलत नाही. एकच व्यक्ती निरनिराळ्या मानसिक अवस्थेत अथवा भिन्न प्रसंगाच्या संदर्भात वेगवेगळ्या शब्दांचा प्रयोग करीत असली तरी तिची एकंदरीत भाषापद्धती बदलेलच असे नाही. परंतु सामाजिक व सास्कृतिकदृष्ट्या निरनिराळ्या स्तरांवर असलेल्या व्यक्तीच्या भाषेत मात्र अंतर पडल्याचे निदर्शनास येईल.


प्रमाणभाषा आणि बोली यांच्यातील साभ्यभेद स्पष्ट करताना प्रा.अ.का. प्रियोळकर म्हणतात, " ज्या कारणांनी इतर देशात प्रमाण भाषा अस्तित्वात आल्या. त्याच कारणांनी आपल्या महाराष्ट्रातही ग्रांथिक भाषा निर्माण झाली. हिंदुस्थानातील इतर प्रांतामध्येही आपल्याप्रमाणे अनेक बोली आहेत. तेथे ज्या ग्रांथिक भाषा पुढे आल्या त्यांच्या बाबतीत निराळा प्रकार नाही. एखाद्या विशिष्ट भागाचे राजकीय महत्त्व आणि त्या बोलीत एखादा मोठा शब्दसृष्टीचा ईश्वर निर्माण होणे. यापैकी कोणतीही एक किंवा दोनही प्रमाण भाषेला रूप देतात. " महाराष्ट्रात प्रमाण मराठी भाषेच्या निर्मितीपाठीमागे या दोनही गोष्टी कारणीभूत असल्याचे आपल्या लक्षात येते. पुणे हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे शहर आहे. राजकीयदृष्ट्या या शहराला काहीएक महत्त्व आहे. साहित्यनिर्मितीचा विचार करता पुणे, मुंबई हीच शहरे केंद्रस्थानी असल्याचे आपल्या लक्षात येते. म्हणून प्रमाण मराठी भाषा निर्मितीपाठीमागे प्रा. प्रियोळकरांचा विचार आपल्याला मान्य करावा लागतो. प्रमाण भाषा म्हणजे काय ? या प्रश्नांचा शोध घेतल्यास आपल्या हेच लक्षात येते की, एकभाषिक समाजातील सर्व व्यक्तींना बव्हांशी समजली जाणारी, समाजातील 'शिष्ट' लोकांनी लेखनासाठी मान्य केलेली, अशी भाषा म्हणजे प्रमाणभाषा होय." या भाषेला 'शिष्टमान्य ' भाषा असेही म्हणता येईल. प्रमाणभाषेची शिष्टमान्यता ओळखण्यासाठी ज्यांना मान्य अशी ही भाषा असते, ते 'शिष्टजन' किंवा 'प्रतिष्ठित म्हणजे नक्की कोण ? हे सांगणे अवघड असते. काळानुसार या 'शिष्ट' व 'प्रतिष्ठित' लोकांमध्ये बदल होत असतो. थोडक्यात ज्या काळात जे वर्गाची राजकीय सांस्कृतिक सत्ता असते. त्या वर्गाचे लोक म्हणजे प्रतिष्ठित किंवा शिष्ट लोक होय. आणि या लोकांच्या भाषेला प्रमाण भाषेचे स्वरूप प्राप्त होत असते.


प्रमाणभाषा ही लिखित स्वरूपात असल्यामुळे बोलभाषेचे क्षणभुंगुरत्व या भाषेला नसते. ही सर्व समाजाला समजू शकणारी असल्यामुळे या भाषेद्वारा होणारे विनिमयाचे क्षेत्र फार मोठे असते. मुद्रणकलेमुळे आज प्रमाण भाषेच्या व्यवहाराचे क्षेत्र फार मोठे झाले आहे. प्रमाणभाषा ही समाजाच्या दैनंदिन वैचारिक व भावनिक जीवनाचा, लेखनाद्वारे आविष्कार दाखविणारी असते.


प्रमाण भाषा म्हणजे काय ? या विषयी ना.गो. कालेलकर म्हणतात, "एकाच प्रदेशातील अनेक स्थानिक बोलींपैकी जी बोली साहित्यनिर्मिती किंवा बौद्धिक चळवळ या बाबतीत प्रारंभापासून आघाडीला असते ती बोली, किंवा ज्या भागात राजसत्तेचं किंवा शैक्षणिक चळवळींच केंद्र असतं त्या भागातील बोली प्रमाण बोली ठरते. " थोडक्यात प्रमाण भाषा म्हणजे काय तर, स्थानिक बोली कितीही असल्या तरी त्या ज्या व्यापक प्रदेशात बोलल्या जातात तो ज्या शासनाखाली असतो, त्या शासनाच्या व्यवहारासाठी निवडली गेलेली विशिष्ट बोलीच प्रमाणभाषा समजली जाते. आणि तिचे शिक्षणात ,प्रसारमाध्यमात, साहित्य क्षेत्रात व सामान्य एकत्रित जीवनात सर्वत्र वर्चस्व असते. विशेषतः लेखनातल्या एकरूप वापरामुळे ही प्रमाण भाषा रूढ व्हायला मदत होते. असे आपणाला म्हणता येईल. 


मराठीच्या प्रमुख बोली : -


भाषा ही शेवटी बोलींचा एक समूह असतो. प्रत्येक बोली ही भाषा असली तरी प्रत्येक भाषा बोली नसते. भाषेला आपल्या समृद्धीसाठी बोलींच्याच शब्द भंडाराकडे लक्ष द्यावे लागते. नवनिर्मिती आणि अभिनय आविष्कार यांची क्षमता बोलीत असते तेवढी प्रमाण भाषेत नसते. दैनंदिन जीवन आणि पारंपारिक संस्कृती यात बोलींचे वर्चस्व असते. बोली म्हणजे काय ? बोली हा Dialect या इंग्रजी शब्दाचा मराठी प्रतिशब्द म्हणून आपण योजतो. Language या शब्दाचा मराठी प्रतिशब्द म्हणून 'भाषा' असा शब्द आपण वापरतो. वास्तविक भाषा व बोली समानार्थक शब्द आहेत.  Language किंवा भाषा हा ग्रांथिक किंवा प्रमाण (Standard) स्वरूप प्राप्त झालेल्या बोलीला उद्देशून आपण वापरात असतो. या प्रमाण किंवा ग्रांथिक बोलीपासून जे भिन्न असे बोली प्रकार असतात त्यांना आपण 'बोली (Dialects) असे म्हणतो.


बोली म्हणजे काय ? या विषयी विजया चिटणीस माडगूळकर म्हणतात, "बोली म्हणजे परभाषकांना जवळजवळ पूर्णपणे कमीअधिक प्रमाणात सारख्या वाटणाऱ्या तर तद्‌भाषकांना पूर्णपणे एकरूप वाटणाऱ्या व्यक्तिभाषांचा समूह होय." काही सामान्य वैशिष्ट्य असलेल्या आणि त्याच भाषेच्या इतर बोलींपेक्षा एकमेकांशी अधिक साम्य असलेल्या बोलींचा एकंदर समूह म्हणजे बोली होय. एकाच प्रदेशात बोलली जाणारी मूळ बोली काळाच्या ओघात त्या प्रदेशाच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या प्रकारे बदलते आणि तिच्यातून एकमेकांशी नाते असणाऱ्या पण वेगवेगळ्या अशा नव्या बोली निर्माण होतात. त्या बोली त्यांच्या त्यांच्या भागांच्या नावांनी ओळखल्या जातात. त्या भिन्न भिन्न बोलींमध्ये ध्वनी, शब्द, वाक्य इत्यादी बाबतीत काही भेद असले, तरी त्यांच्यामुळे त्या बोलणानऱ्या लोकांच्या विनिमयात अडथळा येत नाही. विनिमयात अडथळा येण्याइतक्या त्या भिन्न झाल्या, म्हणजे मात्र त्यांना स्वतंत्र भाषा म्हणणं आवश्यक होते.


महाराष्ट्राच्या विस्तृत प्रदेशात पसरलेला (आणि महाराष्ट्राबाहेरही स्थायिक झालेला) मराठी समाज जी भाषा बोलतो तिला आपण मराठी म्हणतो. परंतु महाराष्ट्रात सर्वत्र सारख्याच रूपाची मराठी बोलली जात नाही. संपूर्ण महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्राच्या बाहेर मराठी समाजाकडून बोलल्या जातात त्या मराठीच्या विविध बोली. यातील एक बोली प्रमाण बोली आहे. इतर बोली या प्रमाण बोलीपासून स्वनिमप्रक्रिया , व्याकरणप्रक्रिया आणि शब्दसंग्रह यांच्या बाबतीत कमी अधिक दूर आहेत. मराठीच्या बोलींचा पद्धतशीर अभ्यास करण्याचा पहिला मान जॉर्ज गिअर्सन या भारतीय भाषांचे सर्वेक्षण करणाच्या इंग्रज अधिकाऱ्याकडे जातो. हिंदुस्थानच्या भाषिक पाहणीचे काम इंग्रज सरकारने इ.स. १८९४ मध्येच हाती घेतले होते. हे काम ग्रिअर्सनकडे सुपूर्द करण्यात आले. त्याने इ.स. १८९८ ते १९२७ या काळात 'लिंग्विस्टिक सर्व्हे ऑफ इंडिया' चे १ ते ९ खंड प्रकाशित केले. त्याने आपल्या पाहणीत हैदराबाद व म्हैसूर ही संस्थाने व मद्रास इलाखा वगळता हिंदुस्थानच्या सर्व प्रदेशातील मिळून १७९ भाषा व ५४४ पोटाभाषांचा तपशीलवार अभ्यास सादर केलेला आहे. मराठी व तिच्या बोली याबाबतचा ग्रिअर्सनने केलेला अभ्यास 'लिंग्विस्टिक सर्व्हे ऑफ इंडिया' च्या सातव्या खडात समाविष्ट असून तो इ.स. १९०५ प्रसिद्ध झालेला आहे, त्याने मराठी भाषेचे 

१) दख्खनची मराठी 

२)  वऱ्हाड आणि मध्य प्रांताची मराठी आणि 

३) मध्य व उत्तर कोकणातील मराठी, अशी तीन रूपे मानलेली आहेत. ग्रिअर्सनचे काही निष्कर्ष आज चुकीचे आणि काही वादग्रस्त ठरतात.


शिवाय आजच्या मराठीचे बोलीसमूह पाहता त्याचे विवेचन अपुरही वाटते. तथापि या अभ्यासाला एक ऐतिहासिक महत्त्व आहे. ग्रिअर्सने केलेले विवेचन लक्षात घेतल्याखेरीज कोणत्याही मराठी बोलीचा अभ्यास पूर्ण झाला आहे, असे म्हणता येणार नाही. मराठी बोलीचा समग्र एकत्रित अभ्यास म्हणून ग्रिअर्सनने केलेल्या कार्याचे महत्त्व निर्विवाद आहे. मराठीच्या प्रमुख चार बोली आहेत. वऱ्हाडी बोली. अहिराणी बोली, डांगी बोली, कोकणी बोली यांचा त्यात समावेश होतो. या प्रत्येक बोलीच्या अनेक उपबोली आहेत. यातील वऱ्हाडी बोलीचा विचार केल्यास प्रदेशानुसार तिचे दोन भाग पड़तात 

१) घाटावरची वऱ्हाडी बोली 

२ ) घाटाखालची वऱ्हाडी बोली, 

अशी दोन रूपे दिसतात. याशिवाय वऱ्हाडीचे स्थानिक वैशिष्ट्यांनुसार नागपुरी, हळबी, बालाघाटी इ.भेद दिसतात, तर धंदा, जात व जमात यांच्या वैशिष्ट्यानुसार कोष्टी,धनगरी, झारपी, कुणबी,पोवारी असे भेद दिसतात. अहिराणीचे 'बागलाणी आणि नंदुरबारी असे सूक्ष्म प्रादेशिक भेद दिसून येतात. 'बागलाणी' बोली नाशिक जिल्ह्यातील बागलाण, कळवण, मालेगाव या तालुक्यात बोलली जाते. नंदुरबारी' नंदुरबार, तळोदे या भागात बोलली जाते. जातीजमातीनुसार अहिराणीचे पावरी, भिल्ली लाडशिक्की असेही उपभेद होतात.डांगी बोली ही एक मराठीची प्रमुख बोली आहे. डांगीचे तेथील भिल्ल, कुणबी , वारली इत्यादी जमातीनुसार वेगवेगळी बोलीरूपे दिसून येतात. कोकणी ही मराठीच्या संदर्भातील वादग्रस्त बोली होय. कोकणी मराठीची बोली आहे की स्वतंत्र भाषा याबद्दल वाद आहे. कोकण या प्रदेशावरून येथील बोलीला कोकणी हे प्रादेशिक नाव पडलेले आहे. कोकणीचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या तीन रूपे आहेत. १) उत्तर कोकणी २) मध्य कोकणी ३) दक्षिण कोकणी अशी तीन रूपे होय. वरील प्रादेशिक भेदाच्या अंतर्गत कोकणीचे पुन्हा दमणची कोकणी, बाणकोटी, घाटी, संगमेश्वरी, कुडाळी, गोमंतकी इ. स्थानिक उपभेद आहेत.


या प्रादेशिक व स्थानिक भेदांशिवाय कोकणीचे, समाजातील भिन्न भिन्न स्तरांनुसार जातीनुसार भेद होतात, उदा. चित्पावनी बोली, गौड सारस्वतांची बोली, ठाकरी बोली, कुणबी बोली इ. बोलींचा समावेश होतो. खिश्चन मिशनरी लोकांची एक वेगळी बोली कोकणीत दिसते. तिला 'किरिस्ताव बोली' असे म्हणतात. कोकणीच्या सहा बोलींचा अभ्यास डॉ. सु. मं. कत्रे यांनी केलेला आहे. तो खालील प्रमाणे, 

१ ) कर्नाटक किंवा चित्रापुर सारस्वतांची कोकणी

२) गौड सारस्वतांची कोकणी

३) श्री. वालावलीकर उर्फ गोयबाब यांच्या लेखानातून प्रामुख्याने प्रत्ययाला येणारी गोव्याच्या उच्चवर्णीय

हिंदूची कोकणी

४) मंगरूळ आणि दक्षिण कर्नाटक जिल्हातील खिश्चनांची कोकणी 

५) उत्तर कर्नाटक जिल्ह्यातील खिश्चनांची कोकणी

६) गोव्यांच्या खिश्चनांची कोकणी


डॉ. सु.मं. कत्रे यांचे हे विश्लेषण द.दि.मुंडे यांनी सांगितले आहे.


वरील प्रमाणे मराठी भाषेच्या अनेक बोली आहेत. प्रमाण बोलीइतके या प्रत्येक बोलीला महत्त्व आहे. कारण बोली ह्या त्या त्या भाषकांचा सामाजिक सांस्कृतिक वारसाच असतो. त्यामुळे महाराष्ट्राचा मराठी माणसाचा, त्यांच्या संस्कृतीचा परिचय करून घेण्याचे एक साधन म्हणून मराठीच्या बोलीकडे पाहिले पाहिजे. 



मराठी बोलींच्या अभ्यासाचे महत्त्व : -


ग्रिअर्सेन नंतर मराठीच्या समग्र बोलींचा एकत्रित असा अभ्यास झालेला नाही. लोकशाही राज्यात लोकांच्या भाषेला महत्त्व असते. हे महत्त्व केवळ प्रशासकीय कामकाजापुरते नसते तर सामाजिक व सांस्कृतिक दृष्टयाही असते. प्रदेश भाषा आणि संस्कृती यांचा निकटचा संबंध असतो. महाराष्ट्रातील समाजाचा अभ्यास करण्यासाठी बोली अभ्यासाची मदत होऊ शकते. महाराष्ट्राबाहेरील मराठी संस्कृती असणाऱ्या प्रदेशातील बोलींचा अभ्यास केल्यास मराठी भाषेच्या विकासात निश्चित हातभार लागेल.


कोणतीही बोली सहजासहजी नष्ट होत नाही. कारण ते दैनंदिन व्यवहारातलं नैसर्गिक साधन असते. ते साधन मौखिक असते आणि जिवंत असते. आता तर आकाशवाणी, दूरदर्शन यासारख्या प्रसारमाध्यमांनी बोलींना महत्त्व दिले आहे. एकीकडे आपण लोकनाट्य, लोकसाहित्य ह्यांचं पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न करतो आहोत. प्रसारमाध्यम अधिकधिक प्रभावी करण्याचा प्रयत्न करीत आहोत. अशा वेळी बोलींच्या अभ्यासाला महत्व प्राप्त होणे आवश्यक आहे. बोलींचे महत्त्व काळाच्या ओघात कमी होईल. कारण बदलत्या युगात शिक्षणाचा प्रसार होईल व जागृत समाजात लोकांना व्यापक विनिमयाच्या प्रमाणभाषेचा अधिकाधिक वापर करावाच लागेल. भाषेच्या दृष्टीनी समाज अधिकाधिक संघटित होत जाईल. पण नित्य व्यवहारासाठी स्वतःच्या भागातील प्रमाण बोली वापरणे आणि लेखनासाठी आणि सांस्कृतिक व्यवहारासाठी प्रमाणभाषा वापरणं यातही सामाजिक ऐक्याचं द्विविध स्वरूप आणि प्रगतीच प्रतिबिंबित होते. या सर्व पार्श्वभूमीवर बोलींच्या अभ्यासाची गरज आहे. बोली भाषेचे संचित असते. याविषयी डॉ. श्रीधर रंगनाथ कुलकर्णी, म्हणतात, "तसे पाहिले तर मराठी भाषेच्या बोली म्हणजे आपल्या भाषेचे जिवंत झरे, एका परीने ते आपल्या भाषेचे 'संचित ' असून या संचिताद्वारे 'प्रारब्ध' आकाराला येते,भाषेचे भवितव्य घडविले जाते तेही याच बोलीत साठविलेल्या संचिताच्या बळावर आजच्या प्रमाणभाषेत न आढळणारे भाषेचे कितीतरी ऐतिहासिक विशेष बोलींनी जपून ठेवलेले आहेत.


 बोलीतील संचितांचा अभ्यास व संशोधन अत्यंत महत्त्वाचे आहे. ऐतिहासिक भाषाविज्ञान पध्दतीने मराठीच्या वेगवेगळ्या बोलींचे संशोधन केल्यास प्रमाणभाषेच्या आधारेने न गवसणारे भाषाविकासाचे निश्चित स्वरूप आपल्याला सांगत येईल. मराठी भाषेच्या विविध बोलींचा अभ्यास करणे महत्त्वाचे आहे. कारण आधुनिकीकरणामुळे बोली आणि प्रमाणभाषा यांच्या सीमारेषा पुसट होत आहेत. आजच्या परिस्थितीत कोणत्याही बोलीची सामग्री गोळा करण्यासाठी आधुनिक साधने उपलब्ध आहेत. दृक-श्राव्य साधनाद्वारे बोलींची सामग्री जमा केली पाहिजे. एकाच बोलीचा अभ्यास करत असताना मर्यादित भौगोलिक क्षेत्राचा वापर करणे आवश्यक वाटते. त्या मर्यादित भौगोलिक क्षेत्रातील व्यवसाय व समाजानुसार सामग्री जमा करणे महत्त्वाचे असते. वेगवेगळ्या बोलींचे नमुने आज उपलब्ध असणाऱ्या आधुनिक इलेक्ट्रोनिक साधनाद्वारे जमा केल्यास दीर्घ काळासाठी अभ्यासकांना ही सामग्री उपलब्ध होऊ शकते. यातून पुन्हा पुन्हा सामग्री गोळा करण्याचे कष्ट कमी होऊ शकतात. महाराष्ट्रामध्ये अनेक अशा जाती-जमाती आहेत की त्या मुख्य प्रवाहापासून दूर आहेत. अशा जाती-जमातीतील शिक्षणाचे प्रमाण अत्यअल्प आहे. या जाती-जमाती, भटक्या जाती समूहाच्या बोलींचा अभ्यास व संशोधन होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. हे संशोधन त्या त्या जाती-जमातीतून आलेल्या नवशिक्षित तरुणांनी केल्यास बोलींच्या अभ्यासाला गती मिळू शकते. या बोलीच्या अभ्यासातून त्या त्या समाजाचे सांस्कृतिक विश्व प्रकाशात येऊ शकते. मराठीच्या काही बोलींचे अभ्यास प्रसिद्ध झाले आहेत. अत्यंत परिश्रमपूर्वक बोलीचे स्वरूप विशेष अभ्यासकांनी नोंदवून ठेवलेले आहेत. हे अभ्यास मराठीच्या मुख्य बोलींचे जास्त प्रमाणात झाले आहेत. बोलींर्तगत उपबोलींच्या अभ्यासाचे क्षेत्र आजही आंधारात आहे. त्यांचा अभ्यास होणे आवश्यक आहे.


मराठीच्या वेगवेगळ्या बोलींचा तुलनात्मक अभ्यास व संशोधन होणे महत्त्वाचे वाटते. वेगवेगळ्या बोलींची स्वनिमप्रक्रिया ,व्याकरण प्रक्रिया आणि शब्दसंग्रह या तीनही घटकांचा तुलनात्मक अभ्यास करणे महत्त्वाचे वाटते. बोलींच्या शब्दकोशाची निर्मिती होणे आवश्यक वाटते. मराठी भाषेच्या संवर्धनास्तव बोलीभाषेचा शब्दकोश है एक वरदान ठरणार आहे. विविध क्षेत्रातील व विभिन्न परिसरातील शब्द एकत्र येऊनच मराठीचे शब्दभांडार समृद्ध होऊ शकेल. एका बाजूला मराठी शब्दसंपदा तोकडी आहे म्हणून ओरड करायची आणि दुसऱ्या बाजूने ग्रामीण शब्दांना अशिष्ट मानायचा हा दुटप्पीपणा बंद करणे आवश्यक आहे. बोलींच्या शब्दकोशा विषयी डॉ. हरिचंद्र बोरकर म्हणतात, " भाषेला प्रवाही करण्याचे कार्य बोली करीत असतात. बोली शब्दकोश यासाठी महत्त्वाचे साधन ठरते. भाषेतील शब्दकोशात अनेक शब्दांच्या व्युत्पत्ती दिल्या जातात. ज्याचे मूळ कळू शकत नाही अशा शब्दांना 'देशी' या सदरात समाविष्ट करून भाषावीद मोकळे झालेल असतात. या देशी शब्दाचा खरा 'देश' या बोली-कोशावरून कळू शकतो. जसे जसे अनेक बोलींचे कोश तयार होतील तसतसा या देशी शब्दांचा मूळ 'देश' कोणता ते सापडेल आणि ग्रांथिक मराठीतील या बेवारशी शब्दांची योग्य व शास्त्रीय विल्हेवाट लावणे शक्य होईल." वरील मतावरून बोलींच्या शब्दकोशाचे महत्त्व आपल्या लक्षात येते. बोलींच्या शब्दकोशामुळे आपल्या भाषेतील अनेक शब्दांची व्युत्पत्ती उलगडून दाखवण्यास मदत होऊ शकते, बोलींच्या शब्दकोश एक बोली दुसरीपेक्षा किती प्रमाणात भिन्न आहे. हे समजण्यास उपयुक्त ठरू शकतात. बोली व प्रमाणभाषा यांच्यातील भेद स्पष्ट करण्यासाठी मूलभूत संदर्भसाधन म्हणून बोलींचे शब्दकोश उपयुक्त ठरू शकतात. बोलींच्या अभ्यासामुळे संतसाहित्याचे अध्ययन सुलभ होऊ शकते. संतवाङ्मयाच्या पुनर्अध्ययानाची गरज असल्याचे मत डॉ. हरिचंद्र बोरकर यांनी मांडले आहे. ते म्हणतात, "मुकुंदराज - ज्ञानेश्वरांपासून तर तुकाराम - रामदासपर्यंत आपल्या सर्व संतानी लोकभाषेतूनच रचना केलेली आहे. त्यामुळे त्यांच्या रचनांचे यथार्थ अर्थनिवेदन होण्यासाठी संस्कृतच्या गहन अरण्यात फिरण्यापेक्षा लोकबोलींच्या उद्यानात विहार करणे अधिक लाभकारी ठरणार आहे." आपण संत साहित्याचा अभ्यास करताना कोणताही शब्द शोधताना तो संस्कृतमध्ये शोधतो. संत साहित्य आणि बोलींचा संबंध अत्यंत घनिष्ट आहे. बोलींमध्ये संतानी वापरलेल्या शब्दाचा शोध घेता येतो. यातून संत साहित्यातील वेगवेगळ्या बोलीतील शब्दांचा शोध घेणे शक्य होऊ शकते.


महाराष्ट्रा बाहेरील मराठी जनांच्या बोलींच्या अभ्यासाचे क्षेत्र अजूनही मोठ्या प्रमाणात उपेक्षित आहे. धार बडोदा, तंजावर, इंदोर, ग्वाल्हेर या ठिकाणी बोलल्या जाणाऱ्या मराठी बोलींचे अभ्यास नीटपणे झालेले नाहीत. ते होणे महत्त्वाचे वाटते. बोलीच्या अभ्यासामुळे बोलीभाषेत असणान्या लोकसाहित्यावर प्रकाश पडू शकतो. किंबहुना बोलींच्या सर्वधनामुळे लोकसाहित्याचे संचित पुढील काळासाठी आपण जतन करू शकतो. शिक्षणाचे माध्यम मराठी असावे किंवा इंग्रजी याबद्दल वाद आहेत. प्राथमिक शिक्षण बोलींच्या माध्यमातून दिले गेल्यास मुलांना त्याचा फायदा होऊ शकतो. प्रमाण मराठी विदर्भातील ,कोकणातील, खानदेशातील मुलांना आकलनास जड जाते. मुलांना त्यांच्या बोलीभाषेतून अध्यापन केल्यास मुले फार लवकर अनेक गोष्टी आत्मसात करू शकतात. हे संशोधनातून पुढे आले आहे. आज बोलींचा अभ्यास हा मातृभाषा शिक्षणातील हल्लीच्या समस्या निरनिराळ्या बोली आणि पाठ्यपुस्तकातील भाषा यांचा समन्वय, द्विभाषिक पध्दतीचे शिक्षण इत्यादी गोष्टींचा विचार करण्यासाठी होणे आवश्यक आहे. पूर्वी शिक्षण एका विशिष्ट समजापुरतच मर्यादित होतं. ते आता सर्वव्यापी झालेले आहे. अनेक स्तरांवरची मुलं आपआपल्या भाषिक सवयी घेऊन एका वर्गात बसून 'मातृभाषा' नामक प्रमाणभाषा पुस्तकांच्या द्वारा शिकतात आणि त्यामुळे अनेक शैक्षणिक समस्या निर्माण झाल्या आहेत. या विषयी विजया चिटणीस माडगूळकर म्हणतात, "ग्रामीण भागातील शाळा, झोपडपट्टीतल्या शाळा इत्यादी अनेक समस्यांवर बोलींचा अभ्यास करणे, बोली प्रमाणभाषा यांच्यातल्या नात्याचं सुस्पष्ट चित्र लक्षात घेणे हेच उपाय आहेत. " बोलींच्या अभ्यासाचे महत्त्व यातून आपल्या लक्षात येते. या संदर्भात भालचंद्र नेमाडे म्हणतात, "आपल्या अत्यंत जवळची, रोजची, स्थानिक संस्कृती सांभाळून ठेवणे ह्यात आपल्या नैतिक हक्काचं सामर्थ्य अधिक आहे. मोठमोठ्या राष्ट्रीय संस्कृती ह्या त्यांच्या पोटातल्या लहान लहान संस्कृतिमुळेच टिकतात. मराठी वाचवयाची मला फिकीर नाही. कारण मराठी अशी वेगळी कोटी नाही. ती खानदेशी, वऱ्हाडी, नागपुरी, झाडी, कोकणी, अशा लहान लहान बोलींनी टिकवून ठेवली आहे. मी घरात खानदेशी बोलतो, तसं घरात कोकणी बोलणाऱ्यांना मराठी मेल्याची चिंता नाही. कारण कोकणी टिकली तर मराठी टिकेलच आणि मराठी टिकली तर महाराष्ट्र टिकेल, महाराष्ट्र टिकला तर हिंदुस्थान असा हा सारा व्यूह आहे. ह्या आपल्या हजारो वर्षांपासूनच्या समृद्ध अशा परंपरांना चिकटून राहणं हा अपला नैतिक हक्क आहे. " यातून बोलींचे अस्तित्त्व किती महत्त्वाचे आहे. ते समजते.


समारोप : -

बोली ह्या समाजाची ओळख असतात. या बोलींच्या अभ्यासाचे एक निश्चित ध्येयधोरण योजण्याची गरज आहे. शासकीय मदतीवर अवलंबून न राहता महाराष्ट्रातील विद्यापीठांनी आणि साहित्य संस्थांनी बोलींच्या अभ्यासास अग्रक्रम देण्याची गरज आहे. प्रत्येक विद्यापीठाच्या परिक्षेत्रात येणाऱ्या बोलींचा अभ्यास झाल्यास अनेक बोलींच्या स्वरूपावर प्रकाश पडू शकतो. यापुढील काळात बोलींच्या अभ्यासाची गरज लक्षात घेऊन मराठी बोलींचा अभ्यास केला जाईल असा आशावाद व्यक्त करतो.


____________________________


संदर्भ टिपा: -



१) प्रियोळकर अ.का.ग्रांथिक मराठी भाषा आणि कोकणी बोली, पुणे विद्यापीठ, पुणे, प्रथमावृत्ती १९६६ 

पृ. ३६ 


२ )  कालेलकर ना.गो.भाषा आणि संस्कृती,मौज प्रकाशन गृह, मुंबई तिसरी आवृत्ती १९९९, पृ.६४


३) चिटणीस विजया, वर्णनात्मक भाषाविज्ञान स्वरूप आणि पद्धती, 

डॉ.कल्याण काळे,डॉ.अंजली सोमण, (संपा.) गोखले एज्युकेशन सोसायटी नासिक, प्रथमावृत्ती १९८२

पृ.१६०,१६१


४) पुंडे द.दि. ,वर्णनात्मक भाषाविज्ञान स्वरूप आणि पद्धती डॉ. कल्याण काळे, डॉ. अंजली सोमण, ( संपा) गोखले एज्युकेशन सोसायटी नासिक, प्रथमावृत्ती १९८२ ,पृ. १९७


५ )कुलकर्णी श्रीधर रं. , सामाजिक भाषाविज्ञान प्रा.डॉ.प्रभाकर जोशी,

 प्रा.सौ.चारुता गोखले (संपा.) निराली प्रकाशन, पुणे, द्वितीय आवृत्ती १९९९ पृ. २० 


६)बोरकर हरिश्चन्द्र ,झाडी बोली : मराठी शब्दकोश, विजय प्रकाशन, नागपूर, प्रथमावृत्ती २००० 

पृ.प्राक्कथन २५


७) तत्रैव पृ. २६


८) चिटणीस विजया, उनि, पृ. १७६


९)नेमाडे भालचंद्र, साहित्य संस्कृती आणि जागतिकीकरण,लोकवाङ्मय गृह, प्रकाशन ,मुंबई, सहावी आवृत्ती- २००९,पृ.२०


डॉ.गणपतराव ढेंबरे

 मराठी विभाग,

श्री.व्ही.एस.नाईक महाविद्यालय, रावेर

ता. रावेर, जि. जळगाव,

पिन कोड -४२५५०८

भ्रमणध्वनी ९४२१०८१२७०

 ई-मेल :- dhembregr@gmial.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

वैशिष्ट्यीकृत पोस्ट

भाषा , साहित्य निर्मिती आणि कृत्रिम बुद्धिमत्ता

 भाषा, साहित्य निर्मिती आणि कृत्रिम बुद्धिमत्ता डॉ. गणपतराव ढेंबरे  मराठी विभाग श्री.व्ही.एस. नाईक महाविद्यालय, रावेर,ता.रावेर,जि. जळगाव पिन...